‘डबल इंजन की सरकार’ अशी भाषा आता बंद झाली तर बरे! जीभ आणि रेल्वे, दोन्ही घसरू नये!!
पडघम - देशकारण
जयदेव डोळे
  • ओदिशा रेल्वे अपघात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Wed , 07 June 2023
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

मोदींना गती आणि शक्ती यांचा भारी सोस. मंदगतीने चाललेले देशी व्यवहार एकदम टॉप गिअरमध्ये न्यायचा त्यांना फार छंद. छंदच ना! नाही तर जमिनीवरचे वास्तव नीट उमजते, तर त्यांनी ‘नवा भारत’ गाठायची घाई केली नसती. त्यांनी म्हणजे अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या शाखांतले सर्व हिंदुत्ववादी. ‘समृद्धी महामार्ग’ असो की ‘वंदे भारत’ जलद गती रेल्वेगाड्या, कशाचीच फिकीर न करता मोदी महाशयांनी देशाला भरधाव पळायला लावले.

त्या ‘वंदे भारत’ गाड्यांची इंजिने रूळावर आलेल्या जनावरांना धडकून इतक्यांदा रखडली की, आताशा बातमी म्हणूनही त्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्या गुरांना ‘रेल्वे आली, पळा पळा’ असे कोण सांगणार? त्यांची भाषा येत असती तर तमाम गोशाला चालकांना रोजगार तरी मिळला असता. पण छे! हैक हैक करत माणसे गुरांसारखी हाकायची अन् फक्त आपल्यालाच सारे समजते, असा तोरा सतत मिरवायचा, यात मोदींना जनावरांचे रुळाकर्षण समजलेच नाही.

समृद्धी महामार्गाचेही तसेच. भारतीय बनावटीच्या मोटारी टायर्स, सस्पेन्शन, चालकाचा स्वभाव, सिमेंटचे रस्ते वगैरे काहीही ध्यानात न घेता लावले की, पळायला त्या महामार्गावर. बघता बघता अपघात अन् बळी यांची संख्या कैक डझनांवर गेली. अजूनही रोज ते घडत आहेत.

त्यामुळे मोदींना कधी तरी लहाणपणी बघितलेली दोन इंजिने लावलेली गाडी ते आता मोठे झाल्यावरही आठवते, याचे रहस्य त्यांच्या बालपणातच आहे. ते म्हणे रेल्वे स्थानकावर चहा विकायचे. साहजिकच येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांकडे त्यांचे लक्ष असणार. त्यामु‌‌ळे बालमनावर असा संस्कार झालेला की, डबल इंजिनाची गाडी वेगात तर धावतेच अन् डबेही जास्त खेचून नेते. मोदींना तेवढेच ठाऊक असावे. दुसरे इंजिन खेचकाम जसे करते, तसे ब्रेक लावायलाही कामी येते. उतार, वळणे आणि नादुरुस्त भाग यावरून चाललेली गाडी आटोक्यात ठेवायचे काम, हे दुसरे इंजिन करत असते.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

शंभर डब्यांची गाडी असेल तर एक इंजिन मध्यभागीही ठेवले जाते. या इंजिनांचे नियंत्रण सर्वांत पुढे असणाऱ्या इंजिनाकडे दिलेले असते. शक्यतो सारे नियंत्रण यांत्रिक व विद्युत शक्तीवर चालल्यामुळे जादा इंजिनांमध्ये चालक नसतात. आता तर संगणक आणि इलेक्ट्रॉनिक शक्तीमुळे इंजिनांचे नियंत्रण अधिक सुधारले असणार. डिझेलचे आणि विजेवरचे अशी दोन्हीसाठी इंजिने, अशा प्रकारे संचालित करता येतात. हा सारा मामला बराचा गुंतागुंतीचा आणि कौशल्याचा. पण उचलली जीभ लावली टाळ्याला या धडाकेबाज शैलीचा सोस मोदीसारख्यांना थोडाच ज्ञानी करणार?

दुसरे-तिसरे इंजिन वेग कमी करायलाही असते, हे त्यांना ना माहीत करवून घेतले, ना सांगितले. बिचाऱ्या मोदीभक्तांना आणि भाजपच्या मतदारांनाही वाटले की, डबल इंजिन म्हणजे सुसाट अन् ताकदवान!

आणखी एक विशेष म्हणजे लोकोमोटिव्ह अर्थात इंजिन पुढे वा मागे कसेही धावू शकते. डिझेल वा विजेच्या इंजिनांना तोंड एकीकडे अन निघाली उलटीकडे अशी बंधने नसतात. म्हणून ‘बॅक टू बॅक’ इंजिने जोडायची असतात. सर्वांत पुढे असणारे इंजिन मात्र फॉर्वर्ड ठेवावे लागते. कारण पुढे जायची नियंत्रणे त्याच्या चालकांहाती असतात.

रेल्वेचे धावणे चालकाच्या म्हणजे इंजिनाच्या मर्जीवर नसते. जिकडे रूळ जातील तिकडे ती जाते. म्हणून गती आणि ताकद यांचा अगदी घनिष्ट संबंध रूळांशी असतो. ते मजबूत असतील तरच रेल्वे धावेल, नाही तर पडेल. त्यामुळे मोदींनी प्रतिमांचा वापर करताना विज्ञान-तंत्रज्ञान यांचा विचार करायला हवा.

‘डबल इंजिन की सरकार’ म्हणताना रूळ म्हणजे पायाभूत संरचना मजबूत, धड अथवा व्यवस्थित आहे की नाही, यांचा ते विचार करताना आढळत नाहीत. प्रचारात ते उलटी मांडणी करतात. म्हणजे डबल इंजिन असेल तर पायाभूत संरचना उत्तम होतील, असे ते म्हणतात. अशी मांडणी ते करत राहतील, तर अपघात होतीलच ना!

त्यांच्या प्रचाराचा साधा अर्थ असा की, केंद्रात व राज्यात एकाच पक्षांचे म्हणजे त्यांच्या भाजपचे सरकार असल्यास विकास सुलभ व सुरळीत होईल. ते हे लक्षात घेत नाही की, दुसऱ्या इंजिनात कोणी माणूसच नसतो. ते दूरनियंत्रित असते. पण एका अर्थाने मोदी संघराज्यात्मक चौकट जुमानत नाहीत, याचेही ते एक प्रतीक झाले. म्हणजे मोदींना राज्याचे इंजिन स्वयंचलित नको असते!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

ज्या राज्यात नुकताच जो रेल्वे अपघात झाला, ते गेली पंधरा वर्षे डबिल इंजिनाचा सिद्धान्त फेटाळते आहे. उडिसाच्या मतदारांना भाजपचा हिंदुत्ववाद विधानसभेसाठी नामंजूर दिसतो. त्या राज्याची सत्ता भाजपला फार खुणावते. मात्र मतदार काही भुलत नाहीत. जिथे मुळात इंजिनच नाही, तर दुसऱ्याची काय गरज?

मोदींचा राजकीय उदय भूज भागात झालेल्या भूकंपात आपात्कालीन कार्य केल्यानंतर झाला. त्या आधारावर त्यांनी केशुभाई पटेल यांचे मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे, यासाठी भाजपच्या श्रेष्ठींवर दबाव आणला होता. ते मिळवलेही. आता एका मानवी दुर्घटनेने त्यांच्या सत्तेचा अस्त होतो की काय, अशी भीती वाटू लागली आहे. कारण मोदी दुर्घटना कोणतीही घडो, तोच तो प्रतिसाद देऊ लागले आहेत.

चीनने भारतभूमी बळकावणे असो, शेतकऱ्यांवर वाहून घालून त्यांना चिरडणे असो, महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ असो की रेल्वेचा भयंकर अपघात, मोदी आपल्यावर, मंत्रीमंडळावर अथवा भाजपची मदार असणाऱ्या नेत्यांवर जबाबदारी घेताना-टाकताना दिसतच नाहीत. नथुराम गोडसेचा गौरव करणाऱ्या प्रज्ञा ठाकूरला त्यांनी काही दिवसांसाठी दूर केले आणि आता किरण रिजीजू यांचे खाते बदलणे, यांत काही तडजोडी दिसतात. कारवाईऐवजी राजकीय हेतूच साफ दिसतो. बालेश्वर अर्थात बालासोर प्रकरणी  रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायची जरुरी नसल्याचे मोदींनी स्वत: अपघातस्थळी जाऊन लोकांना कळवून टाकले.

राहुल गांधी अमेरिकेत मोदींबद्दल जे बोलले, त्याचेच प्रत्यंतर बालेश्वर येथे आले. आपल्याला सारे कळते आणि जे काही वाईट घडते, ते आपल्याविरुद्ध कारस्थान तरी आहे किंवा घातपात तरी, असा मोदींचा नेहमीचा पवित्रा. तो सीबीआयची चौकशी लावून पुन्हा एकदा जाणवून दिला गेला.

प्रत्येक घडामोड आपल्या राजकीय लाभासाठी वापरायची, हा संघाचा नेहमीचा खटाटोप. माध्यमांवर या अपघातास मुसलमान जबाबदर असल्याचा प्रचार सुरूही झाला. रुळांशेजारी असलेले एक मंदिर त्यांनी मशीद असल्याचा अपप्रचारही केला आहे. संसदेत या रेल्वे अपघाताविषयी चर्चा, प्रश्न, खुलासे होणारच. त्याची वेळ येऊच नये, यासाठी मोदी नेहमीच्या युक्त्या वापरत आहेत. मोदी इथेच भाजपला भोवतील.

दोषी कोणीच नसणार, जबाबदारी कोणावरही नसणार, दुर्घटना अन्याय व अत्याचार तर घडतच राहणार, अशी स्थिती लोक किती दिवस सहन करणार? जोवर प्रत्यक्ष काही आढळत नाही, तोवर अपराधी असणे मंजूर नाही, अशी मोदींचा पळवाट आहे. त्यांना हे समजत नाही की, प्रतिनिधित्वाच्या राज्यव्यवस्थेत प्रत्यक्षतेची गरज नसते. दुरान्वय हा प्रतिनिधींच्या राज्यव्यवस्थेचा गाभा आहे. त्यामुळे संबंध थेट असलाच पाहिजे असे मानणे नादानपणाचे आहे.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

लोकशाही कारभार लोकांच्या नावे केला जातो. याचा अर्थ लोकांचा प्रतिनिधी म्हणून जसा यशाचा स्वीकार राजकीय नेता करतो, तसा अपयशाचाही स्वीकार नेता करत असतो. परंतु मोदी स्वत:ला अचूक, निर्दोष, निपुण व निर्णायक मानून लोकांची जागा घेत, सर्वत्र स्वत:चीच वर्णी लावत आहेत. अशा लोकव्याप्त, लोकमय माणसाची वैशिष्ट्ये राहुलने अमेरिकेत कथन केला न् केली तोच त्याचा प्रत्ययही आला. वा, मोदीजी वा! उलटेच झाले म्हणायचे! पप्पू बोले, बाप्पू हाले!!

या आपल्याला सर्वांतून अलग काढण्याच्या खटपटीला सत्तापिसाही म्हणतात. सत्तेला चिकटून राहण्यासाठी दोष, अपराध, जबाबदाऱ्या असे सारे नाकारत जायची परंपरा मोदींनी अत्यंत कुशलतेने आणि निर्लज्जपणे रुजवली आहे. ती मुळात रा.स्व.संघाची आहे, हे आपण विसरतो. सारे काही करायचे अन् नामानिराळे राहायचे, ही चाल खास संघाची. काही प्राप्ती केली की, संघाचे स्वयंसेवक कसे सेवापरायण, सेवातत्पर आहेत, असे भासवायचे. काही अंगलट आले की, आमचा काही संबंध नाही, असे सांगून काखा वर करायच्या! खरे तर का‌खा वर करून दाखवण्याची, प्रणाम करण्याची नवी पद्धत संघाने आता शाखांत सुरू केली पाहिजे. काखेत दंड असणे काय अन् दंडाच्या वरती काख असणे काय, एकूण एकच! साऱ्याच समस्यांना बगल द्यायची सवय असणाऱ्या संघाला असा बगल-प्रणाम मुळीच जड जाणार नाही.

आता संघवाल्यांच्या जिभा घसरण्याबद्दल. गेली नऊ वर्षं सत्तेत असल्यापासून संघाने क्वचितच जीभ चावली. म्हणजे चूक कबूल केली किंवा अपराध मान्य करून आपल्यात सुधारणा केली. त्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. पुराणकथांत अनेक तपस्वी त्यांच्या तपस्येत कोणी अडथळा आणला की, शाप देत. राग शांत झाला की, उ:शापही सुचवत.

आता ही शापवाणी एकप्रकारे जीभ घसरण्याचाच नमुना! संतापाच्या भरात किंवा तपश्चर्येच्या नशेत दुसऱ्याचा निकाल लावण्याची वृत्ती. तप करतोय म्हणजे फार ज्येष्ठ उच्च काम करतोय असा भ्रम झालेल्याची ती कृती. दुसऱ्याचे ऐकून न घेता, त्याची बाजू समजावून न घेता केलेला अघोरी न्याय.

संघ कायम आपल्याला उच्च ठिकाणी ठेवतो. आपले कार्य राष्ट्रकार्याखेरीज अन्य कसलेच नाही, असा त्याने स्वत:चा व देशाचा भ्रम करून दिलेला आहे. मुसलमानांना राष्ट्रद्रोही ठरवणे काय अन डाव्यांना शिव्याशाप देणे काय, संघाला ते सेवाकार्यच वाटते. प्रत्यक्ष ती जीभ घसरलेली असते. मेंदूचा वापर न करता, सारासार विचार न करता केलेले बेछूट, बेताल विधान म्हणजे जीभ घसरणे. शाप देताना जसे दुसऱ्याला य:कश्चित ठरवले जाते, तसाचा हा प्रकार. आपले तप ते पुण्यकर्म, दुसऱ्याचा अडथळा किंवा आक्षेप तो अपराध. ही वृत्ती थेट त्या ब्राह्मण तपस्व्यांसारखीच. किंबहुना त्यांचीच.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

म्हणूनच वर्षानुवर्षं ही घाण कानीकपाळी पडून तिचा अतिरेक झाल्यावर सर्वोच्च न्यायालयही वैतागले. तिथे मात्र जिभ घसरल्याची चुकचुक वा बचाव करता येईना. संजय राऊत अशा वेळी जर संघवाल्यांसारखे जिव्हाश्री झाले, तर त्यांच्याविरुद्ध केवढे काहूर!

आज अशी स्थिती झाली आहे की, एकटे संजय राऊत सकाळी सकाळी ‘अजेंडा सेटिंग’ करतात आणि दिवसभर भाजप-संघ त्यावर जिव्हाघात आणि जिव्हाक्रमण करत बसतो. ही वेळ का आली? डबल इंजिन असो की ट्रिपल इंजिन, गाडी कधीही कशीही घसरते. ती दुर्घटनाच. जीभ घसरल्यावर मात्र पराक्रम, विजय, कुरघोडी असे का?

एकूण, समज कमी आणि प्रचारात प्रतिमांचा बिनडोक वापर करून विरोधकाला चित केल्याचा उन्माद देशाने पुष्कळ सोसला. आता वेळ आली आहे मोदी व भाजप यांना घसरगुंडीवर बसवायची. घसरण सुरूच आहे, एक धक्का जरुरी हैं….!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा