महाराष्ट्रात ‘लव-जिहाद’ मोर्चे केवळ दोन समाजांत तेढ निर्माण करून, त्याचा ‘राजकीय फायदा’ उठवण्यासाठी काढले जात आहेत...
पडघम - राज्यकारण
अमेय तिरोडकर
  • महाराष्ट्रात ‘लव-जिहाद’ मोर्च्याचे एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Fri , 05 May 2023
  • पडघम राज्यकारण लव-जिहाद Love Jihad हिंदू-मुस्लीम Hindu-Muslim लव-जिहाद मोर्चे Love Jihad Protest

“आज आपल्याला प्रत्येक घरात शिवाजी हवाय. आजकाल ‘लव-जिहाद’च्या नावाखाली अफज़लांची संख्या सगळीकडे वाढत चालली आहे. ज्या घरात अफज़ल निर्माण होईल, ते घर संपवण्यात येईल”, हे शब्द आहेत टी. राजा सिंग या निलंबित करण्यात आलेल्या भाजपच्या आमदाराने मुंबईत २९ जानेवारी २०२३ला काढलेल्या ‘लव-जिहाद मोर्चा’त उच्चारलेले.

महाराष्ट्र राज्य सरकाराने राज्यात वाढत चाललेल्या ‘लव-जिहाद मोर्चां’ना हाताळण्यात दाखवलेल्या असमर्थतेवर टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला ‘शक्तिहीन आणि नपुंसक’ संबोधून हिणवलं. शाहीन अब्दुल्लाह या केरळच्या पत्रकाराने महाराष्ट्र सरकार द्वेषपूर्ण भाषणांना रोखण्यास नाकाम झाल्याबद्दल दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी चालू असताना न्यायाधीश के.एम. जोसेफ आणि बी.व्ही. नागरत्न यांच्या खंडपीठाने हे उद्गार काढले. ते म्हणाले, ‘‘द्वेष ही एका सूडचक्राची सुरुवात आहे आणि सरकारने ती थांबवण्यासाठी कारवाई करायला हवी. राजकारण आणि धर्म यांची सांगड घालणं जेव्हा थांबेल, तेव्हाच हे सूडचक्र थांबेल.’’

सर्वोच्च न्यायालयाच्या या तीव्र वक्तव्यानंतर सरकारने लगेच टी. राजा सिंग यांच्यावर २९ जानेवारीला द्वेष पसरवणारं भाषण केल्याबद्दल कलम १५३ (A) (I)(a) खाली आरोपपत्र दाखल केलं. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, महाराष्ट्र सरकारच्या गृह मंत्रालयाने या द्वेषपूर्ण भाषणाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाला असे खडे बोल सुनवावे लागले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

‘लव-जिहाद मोर्चे’

नोव्हेंबर २०१२पासून महाराष्ट्रात ‘लव-जिहाद मोर्च्यां’च्या संख्येत बरीच वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत ‘सकल हिंदू समाज’ या नावाखाली ५०पेक्षा जास्त असे मोर्चे निघाले आहेत. अनेक राजकारणी आणि राजकीय निरीक्षक यांच्याशी चर्चा केल्यावर आढळून आलं की, हे मोर्चे केवळ दोन समाजांत तेढ निर्माण करून त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी काढले जात आहेत, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि राज्याच्या निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत.

या सकल हिंदू समाजाचा पहिला मोर्चा परभणी जिल्ह्यात काढला गेला. त्यानंतर मुंबई, नवी मुंबई, कल्याण, पुणे, पिंपरी-चिंचवड, सातारा, कोल्हापूर, इचलकरंजी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, सोलापूर आणि अजून काही ठिकाणी असे मोर्चे काढले गेले.

देशभरात या मोर्चाची सुरुवात अजमेर, राजस्थानमध्ये २३ जून २०२२ रोजी झाली. यातला पहिला मोर्चा तेव्हाच्या वादग्रस्त भाजप प्रवक्ता नुपूर शर्माच्या - ती पैगंबर मोहम्मदबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्क्यामुळे विवादात सापडली होती. त्यामुळे भाजपची जगात नाचक्की झाली होती - समर्थनार्थ काढला होता. त्यानंतर अनेक ठिकाणी असे मोर्चे काढल्याचे अहवाल आहेत.

नोव्हेंबर २०२२मध्ये या मोर्चांना जोर आला, जेव्हा श्रद्धा वालकर प्रकरण गाजलं होतं. जरी त्यातला आरोपी अफताब पूनावाला हा मुस्लीम नव्हता, पण तरीही त्याला मुस्लीम ठरवून हे प्रकरण ‘लव-जिहाद’चे उदाहरण म्हणून पसरवण्यात आलं आणि त्या द्वारे ‘लव-जिहाद’ विरुद्ध वातावरण तापवण्याचा प्रयत्न झाला. श्रद्धा महाराष्ट्रातील होती. त्यामुळे महाराष्ट्रात मोर्चे काढण्याचे प्रमाण वाढलं, असं दिसून येतंय.

हे मोर्चे जरी ‘सकल हिंदू समाज’ या संघटनेच्या नावाखाली काढले गेले, तरी या संघटनेला कुठेही अधिकृत ओळख आहे, असे दिसत नाही. पण विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, दुर्गा वाहिनी, विश्व राम सेना या आणि अशा सारख्या अनेक उजव्या विचारसरणीच्या संघटना मिळवून त्यांची ती एक शिखर संघटना आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, ही या लोकांची एक ठरवलेली धोरणक्लृप्ती आहे, जेणेकरून जेव्हा दोष द्यायची वेळ येईल, तेव्हा एवढ्या सगळ्या गटांमध्ये कुणाला दोषी ठरवायचं, हे कठीण होईल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

‘हिंदू जनजागृती मंचा’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगडचे संयोजक सुनील घनवट म्हणाले, “आम्हाला ‘लव-जिहाद’ ही समस्या गंभीर वाटते. हा हिंदू समाजावर केला जात असलेला पद्धतशीर हल्ला वाटतो आणि म्हणून आम्ही सकल हिंदू समाजाच्या विचारांना समर्थन दिले आणि पाच-सहा मोर्च्यांचे आयोजन केले. पण बाकी सर्व संघटनांच्या बाबतीत असे नाही.”

‘विश्व हिंदू परिषदे’चे प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले, “आम्ही मोर्च्यांचे आयोजन करत नाही आहोत, आम्ही फक्त त्यात सहभाग घेत आहोत. ‘सकल हिंदू समाज’लाच या समस्येची तीव्र निकड वाटते आणि म्हणून मोर्चे काढले जात आहेत. आम्हालाही ‘लव-जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ या दोन अतिशय महत्वाच्या समस्या आहेत, असे वाटते. ‘लव-जिहाद’मध्ये हिंदू मुली कशा फसवल्या जात आहेत, हे आम्ही बघतो आहोत. त्यामुळे मोर्च्यांमधून आम्हाला हिंदूंना या विरुद्ध जागृत करायचे आहे.”

सनातन संस्थेचेही हे धोरण आहे; ते मोर्चे आयोजित करत नाहीत, पण जेव्हा जेव्हा मोर्च्याचे आयोजन ‘सकल हिंदू समाजा’कडून होते, तेव्हा त्यांचे कार्यकर्ते त्यात सहभागी होतात.

सावरकरांचा प्रभावी ठसा

‘सकल हिंदू समाज’ या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यसंग्रामातील वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असलेल्या सावरकरांच्या मराठी कवितेतील एका ओळीवरून झाली आहे. ते लिहितात, ‘तुम्ही आम्ही सकल हिंदू, बंधु बंधु’. यात सावरकर मार्मिकपणे हिंदू समाजातील सर्व जाती-जमातींना एकत्र येण्याचे आवाहन करत आहेत. आंतरधर्मीय लग्नांची समस्या ही काही नवीन नाही. गोखल्यांना दिलेल्या एका मुलाखतीत सावरकर म्हणतात, “मला आंतरजातीय विवाहांची भीती वाटत नाही, पण मला हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा याच्यात होत असलेल्या विवाहाची भीती वाटते, ही राजकीय भीती आहे.”

महाराष्ट्रात झालेल्या सर्व मोर्च्यांमध्ये तीन गोष्टी समान आहेत- अजेंडा, प्रमुख वक्ते आणि मोर्च्यांचे स्वरूप. सर्व मोर्च्यांमध्ये ‘लव-जिहाद’विरुद्ध कडक कायद्याची मागणी केली जाते. सर्व वक्ते ‘लव-जिहाद’चा तीव्र शब्दांत निषेध करून आणि अल्पसंख्याक, विशेषतः मुस्लिमांविरुद्ध अपशब्द उच्चारत लोकांच्या भावना भडकवतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

१० मार्चला अहमदनगर येथे झालेल्या मोर्च्यात टी. राजा सिंग म्हणाले, जर कोण मुस्लीम मुलगा हिंदू मुलीशी लग्न करतोय, असं दिसलं तर त्याला मारलं जाईल. त्यांचे नेमके शब्द आहेत, “जो भी लांडा लव-जिहाद करेगा, अरे, बेटा तुम आधे तो कटे हो, पूरे काट देंगे!” त्याच्या या व्याख्यानासाठी त्याच्यावर एफआयआर दाखल केला गेला. १९ मार्चला औरंगाबाद येथे झालेल्या मोर्चात तो म्हणाला, “लव जिहादींना मारायचे आहे ना? जिथे जिथे तुम्हाला कळेल की, मुस्लीम मुलगा हिंदू मुलीशी लग्न करतोय, लगेच आपल्या टीमला घेऊन जा.” इथेही त्याच्यावर औरंगाबाद पोलिसांनी द्वेषपूर्ण वक्तव्याबद्दल कलम १५३, १५३ (ए) खाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

सतत एका पाठोपाठ एक होत असलेल्या या मोर्च्यांमध्ये सिंग किंवा आणखी कोण वक्ता ‘लव-जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ संदर्भात मुस्लिमांविरुद्ध विखारी प्रचार करत आहेत. या मोर्च्यांमुळे समाजात धार्मिक ध्रुवीकरण होत आहे, यात शंका नाही. तसंही जेव्हापासून भाजपने उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले, तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळलेले आहे. त्यातच निवडणूक आयुक्तांच्या निर्णयाने ठाकऱ्यांना त्यांचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाला मुकावं लागलं आहे. त्यामुळे ठाकऱ्यांबद्दल लोकांमध्ये सहानुभूती निर्माण झाली आहे. या मोर्च्यांचा उद्देश ही सहानुभूतीची लाट थोपवणे हा आहे.

राजकीय उद्देश

या सर्व घडामोडी जवळून बघणारे ज्येष्ठ पत्रकार आणि माध्यम-अभ्यासक जयदेव डोळे म्हणतात, “या मोर्चाची वेळ आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात बघायला हवी. नुकताच केलेला सर्व्हे दाखवतोय की ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मिळून भाजपला भारी पडतील. म्हणूनच हे मोर्चे काढून हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करायचा आणि ठाकऱ्यांबद्दल असलेली सहानुभूतीची लाट थोपवण्याचा प्रयत्न होतोय.”

भाजप हे सर्व आरोप स्पष्टपणे नाकारत आहे. पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय म्हणतात, “हिंदू समाज एकत्र येतो आहे. कुणालाही स्वतःच्या अखत्यारीत या जनचळवळीत सामील व्हायचे असेल, तर ते होऊ शकतात. पक्ष म्हणून आम्ही या मोर्च्यांमधून ज्या समस्या सांगत आहेत, त्याबद्दल काळजीत आहोत.” भाजपने जरी स्वतःला या मोर्च्यांपासून वेगळं ठेवायचा प्रयत्न केला असला, तरीही त्यांचेच महिला आणि बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा आपल्या विधानसभेतील भाषणात म्हणतात, “महाराष्ट्रात एक लाखाच्या वर ‘लव-जिहाद’ केसेस आहेत.” पण जेव्हा समाजवादी आमदार रईस शेख यांनी त्याच खात्यात चौकशी केली, तेव्हा उत्तर मिळालं की, अजूनपर्यंत ‘लव-जिहाद’ची एकही केस झालेली नाही. ते म्हणाले, भाजप जे पडतच नाही, त्याची हवा करत समाजात धार्मिक तेढ निर्माण करत आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

जेव्हा या लेखकाने सरकारकडून आंतरधर्मीय विवाहाबद्दलची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला आढळलं की, विवाह नोंदणी कार्यालयात किंवा राज्य महिला आयोगाकडे अशा प्रकारची कोणतीच माहिती जमा केलेली नाही. या नंतर राज्य महिला आयोगाने विवाह नोंदणी कार्यालयाला लवकरात लवकर ही माहिती पाठवायला सांगितले आहे.

आपल्या देशांतर्गत आंतरधर्मीय विवाहाबद्दल काय विचार आहेत, याचा सर्वे करून ‘Pew Research Centre’ने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात स्पष्ट झाले आहे की, भारतीय लोक क्वचितच आंतरधर्मीय विवाह करतात. ९९ टक्के हिंदू, ९८ टक्के मुस्लीम, ९५ टक्के ख्रिश्चन, ९७ टक्के बुद्ध आणि ९७ टक्के शीख लोक त्यांच्या धर्मातच लग्न करतात. एवढंच नव्हे तर बहुतेक सर्व भारतीय म्हणतात की, आपापल्या धर्मातच लग्न करणे सर्वांत इष्ट. ६५ टक्के पुरुष आणि ६७ टक्के स्त्रिया म्हणतात की, आंतरधर्मीय विवाह बंद करायला हवेत. या संशोधनाच्या माहितीवरून हे मात्र कळतंय की, ‘लव-जिहाद’ मोर्च्यांना इतका मोठा प्रतिसाद का मिळतोय.

आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्याची गोष्ट

जुलै २०२१मध्ये नाशिकमधील रसिका आडगावकर आणि आसिफ खान यांच्या लग्नाची पत्रिका ‘व्हायरल’ झाली आणि रसिकाचे वडील, प्रसाद ज्यांची नाशिकमध्ये सोन्याची पेढी आहे, त्यांना धमकीचे फोन येऊ लागले, पण न डगमगता त्यांचा विवाह संपन्न झाला. त्याला अनेक पुरोगामी मंडळींनी समर्थन दिले. आता दीड वर्षानंतर रसिका आणि आसिफ म्हणतात की, ते या लग्नात खूप खूश आहेत. आसिफ म्हणाला, “आमची निमंत्रण पत्रिका ‘व्हायरल’ झाल्यानंतर लोकांनी आमच्या संबंधाबाबत बरेच गैरसमज पसरवले, पण आमची दोन्ही कुटुंबं आमच्या सोबत राहिली. मी खात्रीने सांगू शकतो की, आमच्यामध्ये फक्त ‘लव’ आहे, ‘जिहाद’ नाही.”

रसिकाचे वडील आणि तिचे कुटुंबीयसुद्धा या लग्नात खूश आहेत. वडील म्हणाले, “मला आनंद आहे की माझ्या मुलीने खूप चांगल्या व्यक्तीशी लग्न केले आहे. आणि मला सर्वांना सांगायचंय की, जिथे प्रेम आहे तिथे धर्म, जात किंवा भाषा या कशाचेच बंधन असत नाही.” रसिका म्हणते, “दोन वर्षांपूर्वी मी घेतलेल्या निर्णयाबद्दल मी खूप खूश आहे. माझ्यासारख्या परिस्थितीत असलेल्या जोडप्यांना मी सांगू इच्छिते की, तुम्ही तुमच्या कुटुंबाला तुमच्या बरोबर घ्या, म्हणजे पुढचा त्रास टाळू शकाल.”

आंतरधर्मीय विवाहाबाबत समिती

डिसेंबर २०१२मध्ये महाराष्ट्र सरकाराने १३ सभासदांची समिती स्थापन केली आणि त्याला नाव दिलं, ‘आंतरधर्मीय विवाह कुटुंब समन्वय समिती’. सरकार म्हणतं की, या समितीचा उद्देश आंतरधर्मीय विवाह थांबवण्याचा नसून त्यावर लक्ष ठेवण्याचा आहे, जेणेकरून या विवाहातून श्रद्धा वालकरसारखी प्रकरणे होऊ नयेत. जेव्हा या समितीची घोषणा झाली, तेव्हा महिला अधिकारासाठी लढणान्या संघटनांनी याला विरोध करून म्हटलं की, हे गोपनीयतेच्या अधिकाराविरुद्ध आहे आणि राजकीय पक्षांना हे सर्व थांबवण्याचे आवाहन केले.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या समितीचे मुख्य मंगलप्रभात लोढा वार्ताहरांशी बोलताना म्हणाले, ‘‘आमची समिती नियमित भेटत असते आणि एप्रिलच्या शेवटी आम्ही आमचा रिपोर्ट सादर करू. त्यानंतर सरकार हे पुढे कसे न्यायचे, हे ठरवेल.’’ आतापर्यंत किती प्रकरणे या समितीसमोर आली आहेत. असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘अजून मला नेमका आकडा माहीत नाही, पण तक्रारी येत आहेत आणि आम्ही त्यावर काम करत आहोत.’

या लेखकाने ‘सकल हिंदू समाज’ संघटनेला विचारले की, त्यांनी आतापर्यंत किती प्रकरणांची माहिती या समितीला दिली. एकाही सभासदाने सांगितले नाही की, त्यांनी एखादे नेमके प्रकरण समितीकडे नेले आहे. कितीतरी पुरोगामी संस्था संघटनांनी विरोध करूनही ‘राजकीय प्रचार’ काही थांबायचे नाव घेत नाही. आता-आत्तापर्यंत आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह ही पुरोगामी आणि प्रागतिक घटना समजली जायची. सरकारतर्फे या कल्पनेला प्रोत्साहन दिले जात होते, पण आता दिवस बदलले आहेत. संघर्षामध्ये प्रेम औषधासारखे असते, पण जेव्हा प्रेमाचा वापर फूट वाढवण्यासाठी केला जातो, तेव्हा धार्मिक तेढ वाढायला लागते. आणि हे प्रयत्न जर यशस्वी झाले, तर ते देशात ‘प्रतिगामी समाज’ निर्मितीच्या दिशेने टाकलेले पाऊल असेल.

लव आझाद हैं।

या ‘लव-जिहाद’ विरुद्ध काढण्यात आलेल्या मोर्चांना आव्हान देण्यासाठी ‘लव आझाद हैं’ अशी चळवळ काही पुरोगामी गटांनी महाराष्ट्रात सुरू केली आहे. अशा काही समविचारी कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी लोकशाही उत्सव समितीचे गठण केले आहे, त्यात ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’चाही समावेश आहे. त्यानी लोकशाही आणि प्रेम या संकल्पनांचा उत्सव साजरा करण्यासाठी पुण्यात एका दिवसाचे संमेलन आयोजित केले होते. त्यात त्यांनी आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह केलेले, तृतीयपंथी टोकाच्या भिन्न आर्थिक परिस्थितीतून आलेली जोडपी अशा सर्वाना निमंत्रित केले होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. म्हणाल्या, असा कार्यक्रम आयोजित करण्यामागे उद्देश हा की, या जोडप्यांचे अनुभव ऐकून लोकांना आंतरधर्मीय विवाहाबद्दलची वस्तुस्थिती समजेल आणि ते ‘लव-जिहाद’च्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत. आम्ही असेच कार्यक्रम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नेऊन लोकांना आंतरधर्मीय विवाहांचे अनुभव ऐकवणार आहोत. आम्ही यांचे व्हिडिओ काढले आहेत आणि ते यू-ट्यूबवर टाकणार आहोत. आम्ही शक्य आहे अशा सर्व माध्यमांचा वापर करून लोकांना अशा लग्नांची खरी माहिती देणार आहोत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’नेसुद्धा ‘लव आझाद हैं’ या नावाने ऑनलाइन आणि ऑफलाइन मीटिंग्ज ठेवल्या आहेत. इथे समविचारी लोक भेटून चर्चा करतात. प्रशांत ननावरे हा तरुण पत्रकार अशा एका पनवेलमधील कार्यक्रमात बोलत होता. त्याचं स्वतःचं लग्न आंतरजातीय असल्याने तो स्वानुभवातून म्हणाला, “प्रेम ही प्रामाणिक भावना आहे. ती कुठल्याही व्यवस्थेत निर्माण होऊ शकते. तेव्हा जोडीदार निवडताना त्याचा स्वभाव, त्याची अनेक बाबतीतील मते, भविष्याचा विचार या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जात आणि धर्म या गोष्टी महत्त्वाच्या नसतात.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आंतरधर्मीय विवाहावरचं पुस्तक

आंतरधर्मीय विवाहावर लिहिलेल्या ‘धर्मरेषा ओलांडताना’ या पुस्तकात आंतरधर्मीय विवाह केलेल्या १५ जोडप्यांच्या मुलाखती आहेत. त्यात त्यांनी लग्न झाल्यानंतर संसारात त्यांना कशा प्रकारच्या आव्हानांना तोंड द्यावे लागले, हे सांगितले आहे. या पुस्तकाच्या लेखिका हिनाकौसर खान म्हणाल्या, “ ‘तनिष्क’च्या जाहिरातीत एक हिंदू आणि मुस्लीम जोडपे कौटुंबिक कार्यक्रमात दाखवलं होतं, म्हणून त्यांना ती जाहिरात मागे घ्यावी लागली. या घटनेने या जोडप्यांच्या मुलाखती घेण्याची कल्पना सुचली. त्यामुळे अशा आंतरधर्मीय लग्नाबद्दल, विशेषत: हिंदू-मुस्लीम लग्नाबद्दल असणाऱ्या गैरसमजुती दूर होतील. या मुलाखतींमध्ये या जोडप्यांनी मनापासून संवाद केला. वर्षागणिक त्यांनी एकमेकांची संस्कृती कशी समजून घेतली, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कसा आधार दिला; आर्थिक, मुलांबाबतच्या आणि सामाजिक गोष्टी त्यांनी कशा एकमेकांच्या साथीने पार पाडल्या. शेवटी प्रेमाकडे कुठल्याही पूर्वग्रहदूषित नजरेने न पाहणे ही प्रगल्भता लाभली, तरच समाजातून आंतरधर्मीय लग्नाबद्दलच्या गैरसमजुती दूर होतील.”

‘आंदोलन’ मासिकाच्या मे २०२३च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

लेखक अमेय तिरोडकर इंग्रजी माध्यमांत पत्रकार आहेत.

ameyatirodkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा