मुस्लिमांनी ‘सच्चा सेक्युलर’ व्हावं, हाच हिंदू राष्ट्रवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा मार्ग आहे…
पडघम - सांस्कृतिक
सुशोभित सक्तावत
  • प्रातिनिधिक चित्रं
  • Sat , 18 June 2022
  • पडघम सांस्कृतिक भारतीय मुसलमान Indian Muslim हिंदू Hindu पाकिस्तान Pakistan इस्लाम Islam

पहिली गोष्ट म्हणजे भारतीय मुसलमान हे समजून घ्यायला तयार नाहीत की, १९४७ ही त्यांच्या अस्तित्वाच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक घटना होती. १९४७नंतर भारतात त्यांचं स्थान पहिल्यासारखं राहिलेलं नाही, हे कटुसत्य आहे. भारतीय मुसलमान फाळणीच्या अघटिताला न स्वीकारण्याची चूक करतात. पण जेव्हा तुम्ही असं म्हणता की, आम्हाला आमच्यासाठी एक वेगळा देश हवाय, तेव्हा या मागणीत हे अनुस्युत असतं की, फाळणीनंतर जे दोन देश होतील, त्यानंतर दुसरा देश हा दुसऱ्यांसाठी असणार. इथं दुसरा म्हणजे हिंदू, शीख, जैन, बौद्ध, दलित, आदिवासी, पारशी, ईसाई, यहुदी म्हणजे सीएएच्या श्रेणीतले सर्व गैर-मुस्लीम.

यावर तुम्ही म्हणाल की, फाळणी ही देशातल्या सर्व मुसलमानांची मागणी नव्हती, ते फक्त मुस्लीम लीगवाल्यांचं कारस्थान होतं. पण हेही खरं आहे की, फाळणीच्या विरोधात देशातल्या मुसलमानांनी रस्त्यावर उतरून असं कुठलंही आंदोलनही केलं नाही की, ज्यामुळे ‘क़ायदे-आज़म’ बॅ. जीना यांचा चेहरा शरमेनं लाल होईल किंवा त्यांची ‘ना घर का, ना घाट का’ अशी स्थिती होईल. भारतीय मुसलमान रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या बाबतीत किती सक्षम आहेत, हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

तुम्ही असं म्हणून शकत नाही की, ‘टू स्टेट थिअरी’ ही हिंदूंची मागणी होती. हिंदू महासभेने त्याचा झेंडा आपल्या खांद्यावर घेतलेला होता. मी तर असं म्हणेन की, हिंदू महासभेची ही इच्छा होती की, जर एक मुस्लीम देश होणार असेल, तर दुसरा देश ‘हिंदू राष्ट्र’ असेल. आणि हे फाळणीच्या घटितातच अनुस्यूत होतं. पण भारत आजतागायत ‘हिंदू राष्ट्र’ झालेला नाही. ही गोष्ट भारतीय मुसलमान समजू शकत नाहीत की, याने भारतातल्या त्यांच्या अस्तित्वाला सावधानता आणि विवेक यांच्या आधारे सांगितली जाणारी एक नाजूक बाब करून टाकलं.

गंमतीची गोष्ट म्हणजे मुसलमानांसाठी वेगळा देश तयार झाल्यानंतर भारतात जे मुसलमान राहिले, ते याच अटीवर राहिले, ज्यांनी इस्लाम आणि देश या दोहोंपैकी देशाची निवड केली. इस्लामशी तडजोड केल्याशिवाय फाळणीनंतर ते इथं राहू शकत नव्हते. पण असं दिसतं की, ही अट त्यांनी स्वीकारलेली नाही आणि इस्लामलाच सर्वोच्च स्थानी ठेवलं. यामुळे अनेक संघर्ष निर्माण झाले.

समजा एका कुटुंबात दोन मुलगे आहेत. दुसरा मुलगा भांडून-झगडून वाटणी करून घेतो, घरात भिंत उभी करून वेगळा राहायला लागतो. पण बाप दोन्ही मुलांकडे सारख्याच नजरेनं पाहतो. तो दुसऱ्या मुलाला सांगतो की, ठीक आहे, ‘वाटण्या झाल्या, पण तू अजूनही तुझ्या भावाच्या घरी येऊ-जाऊ शकतोस. तुझं स्वागतच होईल’. तथापि पहिला मुलगा भावाच्या घरापासून स्वत:ला लांब ठेवतो. म्हणजे दुसऱ्या मुलाला आपली स्वतंत्र वाटणी मिळाली, तर पहिल्या मुलाला एक मिळून-मिसळून असलेला हिस्सा मिळाला. ही गोष्ट वाटणीच्या घटिताला खोडून काढते आणि हे तेव्हाच टिकू शकतं, जेव्हा पहिला मुलगा भलामाणूस असेल. पण याची काही खात्री नाही की, त्याची नातवंडं-पतवंडंही त्याच्यासारखेच भले असतील, दुसऱ्याचा तेवढाच आदर ठेवतील. त्यामुळे दुसऱ्यानंही हे समजून घ्यायला हवं की, वाटणीनंतर त्याचं आधीच्या घरात पहिल्यासारखं आगतस्वागत होणार नाही. ही अशी गोष्ट नाही की, जिचा उल्लेख राज्यघटनेत स्पष्टपणे केला जाऊ शकतो. त्यामुळे घटनातज्ज्ञांनी दाखवून द्यावं की, असं घटनेत कुठे नमूद केलेलं आहे. हे तर सरळ साधं सामाजिक मनोविज्ञान आहे, समजून घेण्याची बाब आहे.

भारतातल्या हिंदूंना वाटतं की, मुसलमानांनी त्यांचा पाकिस्तानही घेतला, आणि भारतातही राहिले. केवळ राहिलेच नाही, तर पूर्ण ताठ्यानं राहतात. हा एक समस्याप्रधान ‘कोन’ आहे. ही गृहयुद्धाच्या दिशेनं जाणारी रेसिपी आहे. फाळणीनंतर ज्या मुसलमानांना भारतात राहण्याची परवानगी दिली गेली, त्यांना तत्कालीन शासनकर्त्यांनी सांगितलं होतं की, तुम्ही काळजी करू नका, इथं तुम्हाला पूर्ण सन्मान मिळेल. पण हे केवळ सांगण्यापुरतंच होतं. असं तर म्हणता आलं नसतं की, तुम्हाला दुय्यम दर्जाचा नागरिक मानलं जाईल. घरी आलेल्या पाहुण्यांना आपण म्हणतो ना की, हे आपलंच घर समजा. तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की, पाहुण्यानं त्या घरावर आपला मालकीहक्क गाजवावा.

मुसलमान हा सामान्य शिष्टाचार समजून घेऊ शकलेले नाहीत. त्यांना वाटलं की, पाकिस्तान पण आपलंच आहे आणि भारतातही आम्ही आमच्या मर्जीनुसार राहू. ते हे विसरले की, घरमालक एका मर्यादेपर्यंतच आपला आदर करू शकतो.

पहिलं म्हणजे भारतीय मुसलमानांनी फाळणीच्या विरोधात आंदोलन उभं करायला हवं होतं. ते त्यांनी केलं नाही. म्हणजे ‘क़ौमी एकता’चे तराणे आणि ‘गंगा-जमुनी तहजीब’चे फसाने यांचा खात्मा १९४७मध्येच झाला. जे इथं राहिले, त्यांनी पूर्ण तयारीनिशी भारताचा सेक्युलर नागरिक होऊन राहायला हवं होतं आणि आपला धर्म घराच्याच मर्यादेत ठेवायला हवा होता. तेही त्यांनी केलं नाही. ते शरीयत, हिजाब, वक्फ़, अज़ान, हलाल, बाबरी यांवरच अडून राहिले. ते हे विसरले की, यासाठी त्यांनी धार्मिक आधारावर पाकिस्तानची निर्मिती केलेली आहे, भारत ही त्यासाठीची जागा नाही.

भारतीय बुद्धिजीवींचं हे कर्तव्य होतं की, या सर्व गोष्टी त्यांनी मुसलमानांना प्रेमानं समजावून सांगण्याची गरज होती. पण त्यांनी तर मुसलमानांची खुशामत, चापलूसी करण्यातच समाधान मानलं. म्हणजे त्यांनी कारल्यावर लिंबू पिळलं. वंचित आणि अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांविषयी बोलणं आणि त्यांच्या अनेक चुकांकडे कानाडोळा करणं, त्यांनाच योग्य सिद्ध करण्यासाठी नवनवे बहाणे शोधणं, या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

‘गीते’मध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘महाबाहू अर्जुन, निष्पाप अर्जुन’ अशा विशेषणांनी संबोधलं आहे, कारण कुरुक्षेत्रावर अर्जुन दुविधेत पडला होता. पण भारतातले बुद्धिजीवी ज्या प्रकारे मुसलमानांना ‘हे महाबाहू मुस्लिमांनो, हे निष्पाप मुस्लिमांनो’ म्हणून संबोधतात, त्याला काय म्हणावं? कारण इतिहासाच्या कुरुक्षेत्रात मुसलमानांकडे सर्व काही असेल, पण दुविधा नक्कीच नव्हती. हे तर पूर्णपणे सत्य आहे की, अल्लाह एकच आहे, पैगंबर एकच आहे आणि तत्त्वज्ञान एकच आहे, आणि तेच अंतिम आहे, त्यात तोळा-मासाचाही बदल होऊ शकत नाही, हे प्रत्येक मुस्लीम मानतो. असं मानणाऱ्या माणसाला तुम्ही ‘हे महाबाहू’ म्हणून संबोधणार असाल, तर त्याची हिंमत बुलंदच होणार. पण खरं तर त्याला आत्मचिंतन करायला लावण्याची गरज आहे, त्याने स्वत:ला प्रश्न विचारण्याची गरज आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

या समस्येवर मला एक तोडगा सुचतो. तो म्हणजे मुसलमानांमध्ये बंडखोरी झाली, तरच काहीतरी घडू शकेल. म्हणजे मुसलमानांच्या तरुण पिढीनं आपल्या धर्माच्या गतानुगतिकतेविरुद्ध मोर्चा उघडायला हवा. आणि सांगायला हवं की, आम्ही भारताच्या मुख्य प्रवाहाचा भाग बनू इच्छितो. त्यासाठी जे जे गरजेचं आहे, ते ते आम्ही करू. मुस्लीम तरुणींनी म्हणायला हवं की, आम्हाला हिजाबमध्ये राहायचं नाही, आम्ही मोकळ्या हवेत श्वास घेऊ इच्छितो. असं घडलं तरच काही बदल होऊ शकेल.

पण सध्या तरी याची कुठलीही चिन्हे दूरपर्यंत दिसत नाहीत. कारण इस्लामध्ये पहिली शस्त्रक्रिया विचार करण्याच्या क्षमतेवरच केली जाते. त्यात टीकात्मक चिंतनाला जागाच नाही. पण जोवर मुस्लीम तरुण विद्रोह करणार नाहीत आणि धर्माचा पगडा बाजूला सारून नोकरी, शिक्षण, करिअर या गोष्टी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार नाहीत, तोवर काही होणार नाही.

मुस्लिमांनी ‘सच्चा सेक्युलर’ व्हावं, हाच हिंदू राष्ट्रवाद्यांना सडेतोड उत्तर देण्याचा मार्ग आहे. त्यांनी हे समजून घ्यायला हवं की, दुनिया त्यांच्या हिशेबानं चालणार नाही. त्यांनाच दुनियाच्या हिशेबानं चालावं लागणार. ज्या गोष्टी ते मानतात, त्या दुनिया मानणार नाही. कारण दुनिया शिकली-सवरलेली, समजूतदार, वैज्ञानिक, रॅशनल आहे; ती गतानुगतिक नाही. दुनियेला आपल्या हिशेबानं चालवू पाहण्याचे प्रयत्न निष्फळ आहेत. आणि ज्या घरात तुम्ही रुजू पाहताय तिथं तर हे शिष्टसंमतही नाही. मुसलमान भलेही कबूल करोत वा ना करोत, पण १९४७नंतर भारत त्यांच्यासाठी पूर्वीसारखं हक्क गाजवण्याचं ठिकाण राहिलेलं नाही.

मूळ हिंदी लेखाचा मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘आयचौक’ या हिंदी पोर्टलवर १३ जून २०२२ रोजी प्रकाशित झाला आहे, मूळ लेखासाठी पहा -

https://www.ichowk.in/politics/protesting-indian-muslim-violating-law-and-order-should-understand-few-very-important-things/story/1/24486.html

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. ..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख