युवराज गटकळ : उद्याच्या चळवळीचा आश्वासक चेहरा
पडघम - सांस्कृतिक
रमेश दाणे
  • युवराज गटकळ आणि एका आंदोलनातील त्यांचं सहकाऱ्यांसोबतचं छायाचित्र
  • Wed , 01 June 2022
  • पडघम सांस्कृतिक युवराज गटकळ Yuvraj Gatkal शेतकरी आंदोलन Farmer Protest सर्वोदय Sarvoday मेधाताई पाटकर Medhatai Patkar

नुकताच महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा २०२१ सालचा ‘समाज कार्य - युवा पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते युवराज गटकळ यांना देण्यात आला. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयीचा हा लेख...

..................................................................................................................................................................

महात्मा गांधीजींनी ‘महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे’ असं म्हटलं होतं. सेवाग्राम आश्रमातील वास्तवाच्या दरम्यान एकूणच महाराष्ट्रातील स्वातंत्र्याच्या चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाका बघून त्यांना तसं प्रत्यंतर आलं होतं. सुधारणावादी नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी यादी महाराष्ट्राच्या इतिहासात उपलब्ध आहे. प्रत्येकाची आगळी वेगळी अशी कामगिरी आहे. त्यांत बहुतेक जण एके काळी गांधीजींच्या सहवासात आलेले कार्यकर्ते आहेत.

महाराष्ट्रात गांधीजींचा आध्यात्मिक वारसदार आणि बहुआयामी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, ते भारतरत्न विनोबा भावे आणि मायमाउली साने गुरुजी यांनी गांधीजींचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारांनी झपाटलेली तिसरी-चौथी पिढी महाराष्ट्रात आज कार्यरत आहे किंवा त्या विचारांनुसार जगण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांची संख्या कमी असली तरी त्यांचा प्रभाव आणि नैतिकतेच्या संदर्भात सार्वजनिक जीवनातील त्यांचं मोठेपण प्रकर्षाने अधोरेखित होत आहे. त्या नव परंपरेत एक नाव अग्रक्रमाने जोडावं लागेल आणि ते आहे युवराज तेजमाला-श्रीहरी गटकळ याचं!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

युवराजला मिळालेला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार योग्यच म्हटला पाहिजे. त्यासाठी निवड करणाऱ्या समितीबाबत कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे. ज्या पद्धतीने आणि ज्या जोशात युवराज श्रीहरी गटकळ याने राजधानी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जनआंदोलनामध्ये शेतकरी प्रतिनिधींचं महाराष्ट्राच्या आणि एन.ए.पी.एम. (National Alliance of People Movementsच्या) वतीने जे नेतृत्व केलं त्यास तोड नाही. यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. ही त्याची कामगिरी शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इतिहासात निश्चितपणे नोंदली जाईल. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळीतील लोकांना त्यांच्या या योगदानाचा सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या विशेषत: सेवाग्राम आश्रमातील मातीचा कलश त्याने आंदोलनस्थळी पोहचवला. त्यामुळे आंदोलनाला नैतिक बळ आणि भावनिक झालर लाभली.

युवराजची कौटुंबिक पाश्र्वभूमी कष्टकऱ्यांच्या परंपरेची आहे. ऊसतोड मजूर किंवा निमबटाईने शेती करणाऱ्या अल्पभूधारक कुटुंबाची प्राथमिक समस्या असते ती पोटापाण्याची. अशा कष्टकरी परिवारात गांधी विचारांचा प्रवासी निपजतो हा केवळ योगायोग नाही. विनोबांच्या म्हणण्यानुसार तो आत्म्याचा म्हणजे मनातून उठलेला विद्रोहाचा आवाज आहे. ‘सर्वोदय’ अशा आत्म्याचा आवाज आहे आणि युवराजला हा आवाज त्याच्या आयुष्यात ऐन तारुण्यातच ऐकू आला, हे महत्त्वाचं! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, जिथं करतो, ते काम सर्वोदयाचं असतं म्हणजेच सर्वोदयाचा विचार जगण्याचं असतं. युवराज तसा जगतो, हे स्पष्टपणे दिसतं.

अनेक आंदोलनात सहभाग, अखेरच्या माणसासाठी जीव टाकणं, त्यांची दु:खं समजून घेऊन त्यावर हळुवारपणे फुंकर घालणं हे सर्वांना जमत नाही. जे तसे जगलेले असतात किंवा ज्यांना तसा अनुभव असतो, त्यांनाच तळ-थरातल्या माणसाची कणव असते. तो साध्यासुध्या माणसांसाठीचा एल्गार असतो. युवराज गटकळ हा त्या धाटणीतला आहे. कोविड-१९मुळे लोक भयभीत होऊन घरात बसलेले होते. अशा वेळी शेकडो किलोमीटर पायी जात असलेल्या हजारो श्रमिकांची हाक कुणाला ऐकू जात नव्हती. ती हाक ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यात युवराज गटकळ हा आघाडीवर होता. जिवाची पर्वा न करता त्याने जी जी मदत शक्य होती, ती शेतकऱ्यांना केली. आम्ही ती पाहिली आहे, अनुभवली आहे. मेधाताई पाटकरांनी हे त्याचे गुण हेरले आणि या हिऱ्याची पारख केली आणि त्याच्यावर महाराष्ट्राच्या एन.ए.पी.एम.ची (राष्ट्रीय जनआंदोलनाची) जबाबदारी सोपवली. ती युवराजने प्रामाणिकपणे आणि निष्ठेने निभावली.

युवराजने उच्चशिक्षण घेऊन गांधींच्या चळवळीतील खडतर मार्ग स्वत:साठी निवडला. सर्वार्थाने तो खडतर मार्ग आहे. परंतु युवराजने तो समजून-उमजून स्वीकारलेला आहे. त्याचं कारण असावं  त्याच्यातील खिलाडूवृत्ती. मुळातच शिक्षण सुरू असताना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट खेळाडू म्हणून जी चमकदार कामगिरी त्यानं बजावली, त्यामुळे जी खिलाडू वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली त्याचाच परिणाम म्हणून कुठेही वादग्रस्त न ठरता चळवळीत तो यशस्वी होऊ शकला असं आमच्यासारख्यांना वाटतं. खादीचा अंगीकार, नशामुक्तीसाठी प्रयत्न, अनेक पदयात्रा, सायकल यात्रा, वाहन यात्रा आणि त्यातून प्रबोधन कृतिकार्यक्रम असा युवराजचा आजवरचा प्रवास आहे. त्याला या पूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात आता हा महाराष्ट्र फाउंडेशनचा युवा-पुरस्कार. हा युवराजचा यथोचित गौरव आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

पुरस्कारासारख्या सन्मानाने माणसं मोठी होतात, पण त्याबरोबर त्यांची जबाबदारीही वाढते. त्या जबाबदारीची नम्र जाणीव युवराज गटकळ याला आहे. विविध प्रदेशांची भटकंती हा आणखी एक युवराज गटकळ याचा पैलू आहे. त्यात शेती ही आली. म्हणजे प्रवासात निसर्ग, संस्कृती, लोकजीवनाची अधिक जवळीक निर्माण होते. अनेक पुस्तवंâ वाचण्यापेक्षा निसर्ग आणि माणसं वाचण्यातून माणूस प्रगल्भ आणि बहुआयामी होतो. युवराज हे त्याचं उदाहरण म्हणता येईल.

१९८०च्या दशकानंतर डाव्या आणि परिवर्तनवादी, मध्यममार्गी, विधायक चळवळींची तसेच कामगार चळवळींची मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. त्यातच आता संस्था-संघटनांमध्ये सत्तालालसा, संपत्तीचा हव्यास असलेल्या लोकांची आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या छुप्या समर्थकांची गर्दी वाढत असल्याचा अनुभव येत आहे. शिवाय मागच्या पिढीने विधायक क्षेत्रात नवी पिढी यावी यासाठी फारसे प्रयत्न केले नसल्याने सगळ्याच संस्था- संघटना अलीकडे युवकांच्या शोधात आहेत. ‘अलीकडचे युवक चळवळीत का येत नाहीत?’ यावर विचार करताना दिसत आहेत. अशा काळात युवराज गटकळ यांच्यासारखे तरुण खूप आश्वासक वाटतात. सारंच काही अद्यापी संपलेलं नाही असा दिलासा देतात. युवराज गटकळ हा उद्याच्या चळवळींचा आश्वासक चेहरा आहे, यात शंका नाही.

(‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’मधून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा