न आवडणारे विचारसुद्धा शांतपणे ऐकून घेतले गेले पाहिजेत. हिंसा किंवा दहशत यांमुळे ते विचार दडपून टाकण्याचा मोह होऊ नये
पडघम - सांस्कृतिक
नरेन्द्र चपळगावकर
  • ज्येष्ठ लेखक नरेन्द्र चपळगावकर त्यांचे सन्मित्र आणि प्रसिद्ध समीक्षक सुधीर रसाळ यांच्या हस्ते महाराष्ट्र फाउंडेशनचा २०२१चा साहित्य जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना... सोबत त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Tue , 31 May 2022
  • पडघम सांस्कृतिक नरेन्द्र चपळगावकर Narendra Chapalgaonkar महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation साहित्य जीवनगौरव पुरस्कार

ज्येष्ठ लेखक नरेन्द्र चपळगावकर यांना नुकतंच औरंगाबादमध्ये महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका)चा २०२१ सालच्या ‘साहित्य जीवन गौरव पुरस्कारा’नं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारताना त्यांनी केलेलं हे भाषण...

..................................................................................................................................................................

महाराष्ट्र फाउंडेशनचा वैचारिक क्षेत्रातील लेखनाबद्दल दिला जाणारा यंदाचा ‘जीवन गौरव पुरस्कार' नम्रतापूर्वक स्वीकारत असताना मला आनंद होत आहे, हे कबूल केले पाहिजे. मी महाराष्ट्र फाउंडेशनचे आणि या पुरस्कारासाठी माझी निवड करणारांचे मन:पूर्वक आभार मानतो. विचारवंत आणि प्रबोधक म्हणून महाराष्ट्र ज्यांची आजही आदरपूर्वक आठवण काढतो, त्या मेघश्याम पुंडलिक रेगे यांना प्रथमत: आपण हा पुरस्कार दिला होता. आज तो स्वीकारताना रेग्यांसारख्या ज्ञानऋषीचे स्मरण झाले म्हणजे, त्या तुलनेने आपण किती लहान आहोत, याचीही जाणीव मला मनोमन होते व मनावरचे ओझे आणखी वाढते.

आज मला आठवण होते आहे ती माझ्या वडिलांची. हैदराबाद संस्थानच्या मुक्तिलढ्यात भाग घेताना त्यांना मुख्यत: ज्या शिक्षा झाल्या, त्या होत्या त्यांनी केलेल्या भाषणाबद्दलच्या. निजामाच्या ज्यातील अनिर्बंध कारभार, जुलमी कायदे यांच्याविरुद्ध लोकमत जागृत करण्यासाठी ते काम करत होते. ज्यांना ते संबोधित करू इच्छित होते, तो समाज त्या काळात लिखित आणि मुद्रित शब्दव्यवहाराशी एवढा परिचित झालेला नव्हता. मुख्य भर बोलण्यावरच होता. संस्थानात अनुभवास येणारे सत्य ते सांगत होते. पण सत्य सांगण्याचे स्वातंत्र्य त्या वेळी नव्हते. तुरुंगात असताना सत्याग्रही तरुण मुलांना ते विविध राजकीय प्रवाहांची ओळख करून देत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हुकूमशाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अस्तित्वात असते, तेव्हा वातावरणात एक प्रकारचे कोंदलेपण असते. तसे ते त्या वेळी होते. हे वातावरण खुले करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्याचे आणि स्वतंत्र विचारांचे समर्थक त्या वेळी करत होते. त्यात अल्पसा भाग असणार्‍या माझ्या वडिलांची आठवण मला होणे स्वाभाविक आहे.

महाराष्ट्रात विचारवंतांची एक मोठी परंपरा आहे. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, न्या. महादेव गोविंद रानडे, म. जोतीराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक विचारवंतांनी नवे विचार मांडले, समाजाला मार्गदर्शन केले आणि काहींनी तर त्याचे कृतिशील नेतृत्वही केले.

नंतरच्या काळात समाजाच्या स्थितिगतीचा विचार करावयाचा आणि आपली मते स्पष्टपणे मांडावयाची ही परंपरा राखणारे अनेक विचारवंत झाले आणि त्यांनी ही परंपरा कायम ठेवली. विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, विठ्ठल रामजी शिंदे, श्रीधर व्यंकटेश केतकर, विनोबा भावे, आचार्य शं. द. जावडेकर, आचार्य स. ज. भागवत अशी काही नावे सहज आठवतात. त्यांनी समाजहिताचा विचार केला आणि परखड मार्गदर्शन केले आणि पुन्हा सत्तेची किंवा कोणत्याच अधिकाराची लालसा बाळगली नाही. त्यांचे सगळेच विचार सगळ्यांनीच स्वीकारले असे झाले नाही, परंतु या विचारांनी वाट मोकळी केली.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

प्रत्येक माणसाला स्वतंत्रपणे विचार करण्याचा अधिकार आहे, तो विचार सांगण्याचाही त्याला अधिकार आहे. प्रत्येक विचार किंवा विधान तपासून घेऊन, त्याची चिकित्सा करूनच त्यावर विश्वास ठेवावा, असे ठरवण्याचाही त्याला अधिकार आहे. समाजाच्या स्थितीविषयी आणि पुढच्या मार्गक्रमणाच्या दिशेविषयी एक विचारमंथन चालू असावे आणि त्यात आपणही सहभागी असावे, असे त्याला वाटण्याचा अधिकार आहे. विचारांचे खुले आदानप्रदान ही समाजाच्या आरोग्याची एक खूण आहे.

विचारांची ही देवाणघेवाण काहींना नको असते. ती थांबवण्याचा साधा-सरळ उपाय म्हणजे विशिष्ट विचारांना आणि ते प्रकट करणार्‍या माध्यमांना बंदी करणे. अनेक वेळा सत्ताधारी हा उपाय योजतात. पण कायद्याने असा प्रतिबंध करणे, ही नाही म्हटले तरी लोकांत अप्रिय होणारी गोष्ट आहे. लोक स्वखुशीने विचार करण्याचा आपला अधिकार सोडून देतील, असा उपाय काही हुकूमशाह अवलंबितात आणि लोक अत्यंत आनंदाने विचार करणे सोडून देतात.

वंश, धर्म, जात, भाषा किंवा एखादे सांस्कृतिक वैशिष्ट्य याचा अतिरेकी अभिमान लोकांच्या मनात रुजवला, त्याला खतपाणी घातले म्हणजे त्याच्या आधारे सामान्य माणसे विचार करण्याचा आणि इतरही अधिकार स्वखुशीने सोडून देतात. हिटलरने जर्मन आर्यवंशाबद्दलचा अभिमान पराकोटीला नेला, त्याचबरोबर ज्यूद्वेषाचे विष भिनवले. परिणाम असा झाला की, वांशिक अहंतेत खोल बुडालेल्या लोकांनी स्वतंत्र विचार करण्याचे थांबवले. ते सगळे काम हिटलर आणि त्याच्या सहकार्‍यांना सुपूर्द केले. हे सगळे निवडणुकीच्या मार्गाने सत्तेवर येऊन नाझींनी साध्य केले.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

मानवी स्वभावातील दुरभिमान आणि द्वेष या स्वभावदोषांचा वापर करून लोकांना स्वखुशीने आपले समर्थक कसे करता येते, याचे एक उदाहरणच त्यामुळे जगाला पहायला मिळाले. आपल्या सुदैवाने सर्व दिशांनी नवे विचार येऊ द्या, असे उदारपणे सांगणार्‍या भारतीय संस्कृतीची आपल्याला परंपरा लाभली आहे आणि तिचे स्मरण आपण सतत केले पाहिजे.

सार्वजनिक जीवनाविषयीच्या कुतूहलामुळे यात निर्माण झालेली अनेक मोठी माणसे मी आदराने पाहिली. त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे निष्ठापूर्ण जीवन, सत्तेसारख्या मोहापासून किंवा सुखवस्तू जीवनापासून दूर राहण्याची त्यांची वृत्ती, एखाद्या ध्येयासाठी समर्पण वृत्तीने काम करत राहण्याची त्यांची तयारी या सर्वांचा एक खोल परिणाम माझ्या मनावर झाला. या माणसांचे जीवन जाणून घेताना माझ्या मनात काही प्रश्न निर्माण होत. लोकशाही व्यवस्थेत आपल्याला सत्तास्थाने मिळणार नाहीत, हे माहीत असूनही लोकशाहीचा आग्रह काहींनी का धरला? स्वातंत्र्यानंतरसुद्धा समतेच्या लढ्यात संघर्षाचे खडतर जीवन काहींनी का स्वीकारले? आपल्या धर्मावरील अतूट श्रद्धेने देशापासून हजार मैल दूर येऊन प्रतिकूल परिस्थितीत आपले आयुष्यही प्रॉटेस्टन्ट मिशनर्‍यांनी का धोक्यात घातले? या प्रश्नांची उत्तरे देणारी कारणे स्वतंत्रपणे सांगता आली असती, परंतु मला या माणसांच्या व्यक्तित्वाचा शोधा घ्यावा म्हणजे त्यांच्या जीवननिष्ठा आपोआप स्पष्ट होतील, असे वाटले आणि मी त्यांची व्यक्तिचित्रे लिहिली. ही व्यक्तिचित्रे त्या त्या माणसांचा शोध आहे तसाचा तो त्यांनी अंगीकारलेल्या विचारपरंपरेचाही शोध आहे, असे मला वाटले.

राजकारणात पुष्कळ वेळा सोयीचा इतिहासच आपण पुन:पुन्हा सांगतो. ज्या एकोणिसाव्या शतकाने आधुनिक महाराष्ट्राच्या वैचारिक जीवनाचा पाया रचला, त्या शतकात झालेल्या अनेक विचारवंतांच्या कामाला आपण विसरूनच गेलो आहोत; म्हणून मी ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ लिहिले. सर्वसंगपरित्याग केलेल्या संन्याशाला स्वातंत्र्याच्या लढ्यात आपण उतरावे असे का वाटले याचा शोध घेण्यासाठी मी ‘कर्मयोगी संन्यासी’ लिहिले. धर्माच्या चौकटीत राहूनसुद्धा सुधारणांचा प्रयत्न कसा केला गेला, याचा विचार करण्यासाठी मी गांधीजींपासून प्रेरणा घेणार्‍या केवलानंद आणि तर्कतीर्थ या गुरुशिष्यांबद्दल लिहिले.

आज महाराष्ट्राची वैचारिक परंपरा फार क्षीण झाली आहे, अशी तक्रार आपण नेहमी करतो आणि ती खरीही आहे. समाज जेव्हा जखडलेला असतो, त्याची प्रगती अशक्य झालेली असते किंवा पुढील मार्गक्रमणाबद्दल जेव्हा त्याच्या मनात संभ्रम असतो, अशा वेळी समाजाबद्दल विचार करणारे (ज्यांना आपण विचारवंत म्हणतो) नवे विचार मांडतात, विरोधाला धैर्याने तोंड देतात. आज समाजापुढचे प्रश्न संपलेत असे नाही, पण मग वैचारिक वाङ्मय कमी का झाले आहे?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

कोणाचेही नवे विचार ऐकण्याची इच्छाच आता समाजात उरलेली नाही. मिळालेल्या सुखासीनतेत किंवा आत्मसमाधानात तो एवढा गर्क आहे की, त्याला नवा विचार करण्याची गरज वाटत नाही? की समाजाने आपल्या खर्‍या प्रश्नांचा विचारच करू नये, म्हणून अनेक भावनिक प्रश्न मुद्दाम निर्माण करून या वैचारिक प्रक्रियेला थांबवण्यात आले आहे?

ज्यांनी समाजाला नवे आणि हितकारक विचार सांगितले, त्या विचारवंतांचे लौकिक जीवन समृद्ध झाले नाही, परंतु त्यांच्याबद्दल समाजाच्या जाणत्या वर्गात अतीव आदर होता. आज असे का होत नाही? पूर्वी होऊन गेलेल्या थोर माणसांच्या तोलामोलाची माणसे प्रत्येक काळात निर्माण होत नसतात. समाजात जर खुले वैचारिक वातावरण आणि सहिष्णुता असेल तर नवे नवे विचारवंत निर्माण होण्याची प्रक्रिया मात्र चालू राहते.

समता हे मूल्य आपण मानले आहे. प्रत्येक माणसाला विचार करण्याचे व तो प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहे, हा समतामूल्याचाच एक भाग आहे. राज्यघटनेत तर ते आहे, पण ते आपल्या जीवनात हाडीमाशी रुजले पाहिजे. न आवडणारे विचारसुद्धा शांतपणे ऐकून घेतले गेले पाहिजेत. हिंसा किंवा दहशत यांमुळे ते विचार दडपून टाकण्याचा मोह होऊ नये. असा स्वतंत्र विचारांचा आदर करणारा उदार समाज निर्माण व्हावा, ही इच्छा माझ्याप्रमाणेच तुम्हा सगळ्यांचीसुद्धा असणार. हा पुरस्कार या दिशेने काम करत राहण्याची मला आठवण देणारा आहे, असे मी मानतो. मित्रहो, मी आपला खूप खूप आभारी आहे.

(‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’मधून साभार)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा