एखादा स्वयंप्रकाशित तारा आकाशात सदैव चमकत असतो आणि किती तरी प्रकाशवर्षे दूर असणार्‍या दुसर्‍या ग्रहांना तो जाणवतो. त्याप्रमाणे मला कुमारजी थोडेसे जाणवले आहेत, बस इतकंच!
पडघम - सांस्कृतिक
चिन्मय जोशी
  • प्रसिद्ध चित्रकार विष्णू चिंचाळकर यांनी कुमार गंधर्वांची केलेली काही रेखाचित्रे
  • Fri , 08 April 2022
  • पडघम सांस्कृतिक कुमार गंधर्व Kumar Gandharva श्रीराम लागू Shreeram Lagoo

आज, ८ एप्रिल. पं. कुमार गंधर्व जयंती. त्या निमित्ताने त्यांच्याविषयीचा हा एक लेख...

..................................................................................................................................................................

‘एखाद्या माणसाशी आपली व्हेवलेंग्थ का जुळावी याला काही उत्तर नाही.” - पु. ल. देशपांडे

पंडित कुमार गंधर्व या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला प्रत्यक्षात कधीही न भेटता माझी त्यांच्याशी ‘व्हेवलेंग्थ’ का जुळली, यालाही माझ्याकडे उत्तर नाही. तसा मी कोणत्याही कलेशी फारसा संबंध नसणारा, पण नकळत कुमारजींकडे ओढला गेलो. ते आभाळाएवढं व्यक्तिमत्त्व, एक उत्तुंग शिखर आहेत. एखादा स्वयंप्रकाशित तारा आकाशात सदैव चमकत असतो आणि किती तरी प्रकाशवर्षं दूर असणार्‍या दुसर्‍या ग्रहांना तो जाणवतो. त्याप्रमाणे मला कुमारजी थोडेसे जाणवले आहेत, बस इतकंच! ते मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…

कुमारजी सांगीतिकदृष्ट्या भारतात किती मोठं व्यक्तिमत्त्व होतं, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. ते काम आधीच थोर संगीत पंडितांनी आणि समीक्षकांनी केलेलं आहे. कुमारजींची अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतावर कमालीची पकड, हुकमत होती. इथं मुद्दाम उत्तर भारतीय, कर्नाटकी असा भेद करणं टाळलं आहे, ‘शास्त्रीय गायन’ असंही म्हटलेलं नाही. त्याचं एकमेव कारण असं की, कुमारजींनी शास्त्रीय संगीत सादर करताना जपलेली सर्वसमावेशकता. पारंपरिक बंदिशी, स्वतः तयार केलेल्या नव्या बंदिशी, नवीन राग, त्या नवीन रागांच्या व्युत्पत्तीची (उगमाची किंवा नवीन राग प्रसवण्याची) कारणं, पारंपरिक लोकसंगीत, त्यावर आधारित रागांची निर्मिती, सगुण-निर्गुण परंपरांचा भारतीय संगीत निर्मितीवर होणारा परिणाम, असा एकंदरीत अमूल्य ज्ञानसागर कुमारांनी त्यांच्या कारकिर्दीत मांडला. माझ्यासारखा रसिक त्या अथांग सागरात डुबक्या मारून, त्यातील शिंपले-मोती यांचा आनंद लुटत राहतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

एकदा घरी सोनार येऊन दागिने दाखवत असताना, कुमारांना नव्याने गवसलेली ‘कंगनावा मोरा अतही अमोला’ ही बंदिश आणि त्याबद्दलचा किस्सा सर्वश्रुत आहेच. कुमारजींनी त्या बंदिशींचे सौंदर्य ओळखलं आणि सादर करताना ते अधोरेखित केलं. त्याच सौंदर्यदृष्टीमुळे ते फक्त शास्त्रीय गायक न राहता ‘गंधर्व’, एक ‘तत्त्ववेत्ता’ आणि एक ‘तर्कविद्यानिपुण’ (Dialectician) होतात. कोणताही सिद्धांत कसून तपासून पाहून मगच आत्मसात करण्याच्या मार्गाचे ते अनुसरण करतात, म्हणून ते ‘सिद्धांतकार’ (Theoretician) होतात.

कुमारजींनी सतत नावीन्याचा वारसा जपला. जुनं ‘जुनं’ म्हणून सोडून न देता, त्यात अधिकाधिक सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न केला. परंपरेच्या आणि घराण्याच्या ‘अती अहंकारा’ची जळमटं दूर करून मूळ संगीत शक्य तेव्हढ्या शुद्ध पद्धतीनं मांडण्याची पराकाष्ठा केली. त्याचप्रमाणे अहेतूक नवनिर्मितीचा आग्रह न धरता, संगीत हे एक शास्त्र मानून त्याची अभिजातता सर्वसामान्यांपर्यंत पोहचवली. याआधी ‘अमूल्य ज्ञानसागर’ म्हणताना त्यांची ‘अतही अमोला’ शब्द गाऊन दाखवण्याची सौंदर्यदृष्टी प्रेरणा देते.

या सगळ्या पलीकडेही ते संवेदनशील रसिक होते. त्यांच्या ‘अनुपरागविलास’ या ग्रंथाचा नुसता फेरफटका जरी मारला तरी त्यातून त्यांच्यात दडलेल्या एका निसर्गआस्वादक आणि संवेदनशील कवीची ओळख होते. त्यातील शास्त्रीय संगीतावर आधारित नोटेशन्स, हा नक्कीच सखोल अभ्यासाचा विषय आहे. या ग्रंथात कुमारजींच्या नंदमधील ‘राजन अब तो आ’, बागेश्रीतील ‘टेसूल बन फूल’, गौड मल्हारमधील ‘ना बताती तू पहचान’, वसंतमधील ‘रंग केसरिया सिर पागा’, सोहनीमधील ‘रंग न डारो श्यामजी’, अशा एकापेक्षा एक चिजा आहेत. त्या त्यांनी अवघड रागांमध्ये अवीट करून बांधल्या आणि श्रोत्यांसमोर सादरही केल्या.

निसर्गात ॠतुकालोद्भव होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून, त्यातील सौंदर्याचं साध्या-सोप्या शब्दांतून काव्यात रूपांतर करण्याचं कामही त्यांनी सहज केलं. त्यातून ‘गीत वसंत’, ‘गीत वर्षा’ आणि ‘गीत हेमंत’ असे एकाहून एक सरस कार्यक्रम सादर केले. यानंतर त्यांनी धून-उगम रागातील बंदिशी मांडल्या. मग तो मधसूरजा राग असो वा निंदियारी वा लगनगंधार, लोकसंगीतातील धूनांवर आधारलेले हे राग ऐकून मंत्रमुग्ध व्हायला होतं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

कुमारजींनी गायलेले तराणेही सर्वांहून वेगळे. एरवी दैनंदिन जीवनात फारशी किंमत नसलेल्या अक्षरांची मांदियाळी घेऊन तयार झालेला तराणा कुमारांच्या आवाजात मात्र फारच अर्थपूर्ण वाटतो.

या सगळ्या पलीकडे कुमारजींनी विविध ‘निर्गुणी भजने’ सादर केली. निर्गुणी भक्तांची त्या निराकाराशी संवाद साधतानाची सहजता कुठेही लोप पावून न देता, त्यांनी प्रत्येक निर्गुणी भजन अशा प्रकारे गायलं की, जणू खरंच एखादा नाविक आपली नाव चालवताना गातो आहे किंवा एखादा कामगार आपल्या हातमागावर विणताना गातो आहे. तसं वाटण्यासाठी ठेक्याची निवडही तितकीच पारखून केलेली. त्यातून सतत नावेच्या वल्हवांचा, हातमागादी यंत्रांच्या  दैनंदिन जीवनातील लयीचा आणि नादाचा भास होत असतो. टीपेचे स्वर असतानाही कुठेही भजनातील आर्तता कमी होत नाही.

‘निर्भय निर्गुण गुण रे गाऊंगा, अवधूता गगनघटा, नहीं हरवा’ अशी एकाहून सरस एक निर्गुणी भजनं त्यांनी गायली, सामान्यांपर्यंत पोहचवली. त्यांनी केलेला ‘तुकाराम दर्शन’ हा कार्यक्रम पुण्या-मुंबईत खूप गाजला. त्यामध्ये त्यांनी गायलेला ‘आवडेल तैसे तुज आळवीन’ हा अभंग माझ्या खास लक्षात राहिला.

अन् त्यांनी गायलेली होरीगीतं. निर्गुणी होरी, त्रिवेणी - मीरा, सूरदास आणि कबीर यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम, विशेष रागांवर आधारित कार्यक्रम, असे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे सादर केले. त्यांनी गायलेली मराठी भावगीतं खूप गाजली. ते म्हणायचे, ‘ ‘आज अचानक गाठ पडे’ हा माझ्या भावगीतातला बडा ख्याल आहे आणि ‘अजुनी रुसूनी आहे’ ही त्याची जोड म्हणून मी बांधली आहे.’

कुमाजींनी केलेला एक अभूतपूर्व प्रयोग म्हणजे त्यांचा ‘मला उमगलेले बालगंधर्व’ हा कार्यक्रम.  त्यांनी फक्त बालगंधर्वांच्या ताना घेतल्या नाहीत, तर त्यांचं ‘टेंपरामेंट’ घेतलं. त्यांनी सादर केलेली बालगंधर्वांची पदं ऐकल्यानंतर बालगंधर्वांचं गाणं नव्यानं उमगायला लागतं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

हे सगळे प्रयोग यशस्वीपणे सादर करताना त्यांना टीकेलाही सामोरं जावं लागलं, पण तरीही त्यांनी विचारपूर्वक नवं शिकणं, कालानुरूप प्रयोग करणं चालू ठेवलं. आपल्या गायन शैलीतून नेहमीच सर्वोच्च बिंदूवर पोचणारी रस-व्युत्पत्ती निर्माण होईल, याची काळजी घेतली. 

कुमार गंधर्व एकदा म्हणाले होते, “कला का निर्माण करना आसान हैं, कलाकृती का आस्वाद लेना संपर्क पर निर्भर हैं, मगर कला का मर्म समझना महा कठीन हैं।”

समकालीन गायकांपेक्षा कमी प्रसिद्धी मिळूनही कुमारजींना कट्टर चाहते मिळाले आणि त्यांनी या गंधर्वाला देवत्व प्राप्त करून दिलं. या चाहत्यांच्या मांदियाळीत मोठमोठे लेखक, कवी, दिग्दर्शक, चित्रकार, छायाचित्रकार, राजकारणी आहेत. एखाद्या कलाकाराच्या चाहत्यांमध्ये एवढं वैविध्य असण्यामागे विविध कारणं असतात. कुमारजींच्या बाबतीत ते कारण आहे, त्यांची सौंदर्यदृष्टी, असं मला वाटतं.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

कुमारजींची गाणी, त्यांनी गायलेले राग, बंदिशी, तराणे, त्यांनी गायकांना केलेलं मार्गदर्शन, त्यांचे संवाद यातून खूप प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. प्रसिद्ध रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांनी त्यांचं आत्मचरित्र, ‘लमाण’मध्ये लिहिलं आहे-

“त्या दिवशी कुमार गंधर्वांचं गाणं ऐकताना मी पृथ्वीवर, इहलोकी राहिलो नाही! एका वेगळ्याच जगात ते गाणं मला घेऊन गेलं. अगदी सहज, अतिशय अलगद, माझ्याही नकळत ते कधी मला घेऊन पृथ्वीवरून पसार झालं कळलंच नाही! विठ्ठलाचं चिंतन करताना ज्यांना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला, त्यांना असाच काही अनुभव आला असेल काय?”

यावर रसिक म्हणून आपण फक्त ‘मम्’ म्हणावं...

.................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा : शास्त्रीय संगीतातलं काहीच कळत नसताना मी एका प्रतिभावंत गायकाचा ‘आतला’ स्वर ऐकला होता!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख