‘लता सुर-गाथा’ : लतादीदींचे सात्त्विक रूप पुन्हा एकदा अधोरेखित करणारे पुस्तक
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
गणेश मनोहर कुलकर्णी
  • ‘लता सुर-गाथा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 11 February 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो लता सुर-गाथा Lata Sur Gatha यतींद्र मिश्र Yatindra Mishra लता मंगेशकर Lata Mangeshkar

वाचनाच्या प्रवासात अनेक पुस्तके आपल्याकडे येत असतात. नुकतेच यतींद्र मिश्र यांनी लिहिलेले हिंदीतले ‘लता सुर-गाथा’ हे पुस्तक हाताशी आले. तब्बल ६५० पानांचे पुस्तक एका बैठकीत वाचून संपवले तेव्हाच स्वस्थता लाभली. इतक्या बारीक-बारीक गोष्टी नव्याने समजत गेल्या की, विचारता सोय नाही. लतादीदींचे गाणे ऐकतच आपली पिढी लहानाची मोठी झाली. त्यांच्यावरचं इतके छान पुस्तक मराठीत अभावानेच आले असावे.

लतादीदींबद्दल अनेकांनी लेख लिहिले आहेत. दीदींशी आपुलकीने गप्पा मारणारे, त्यांच्यावर लेख लिहिणारे अनेक आहेत, पण नीट अभ्यास करून, सामान्यांना समजेल अशा भाषेत मांडणारे फारच थोडे. त्यापैकीच एक यतींद्र मिश्र. तब्बल सहा वर्षे निव्वळ फोनवर बोलून हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. माणूस फोनवर त्याच्याशीच मोकळेपणाने बोलतो, ज्याच्यावर विश्वास असतो. दीदींचा विश्वास लेखकाने कमावला. रोज संध्याकाळी सातची वेळ फोनवर बोलण्याची ठरलेली असायची. कधी-कधी बोलणे संपून फोन बंद केल्यावरदेखील दीदींचा फोन लेखकाला जायचा. एखादी आठवण, एखादा किस्सा परत नव्याने सांगितला जायचा.

एकदा लेखकाने फोन करायला तब्बल अर्धा एक तास उशीर केला. दीदी रागावल्या नाहीत, पण संभाषण संपताना इतकेच म्हणाल्या की, ‘माझं पडद्यावरचं गाणं फार-फार तर तीन ते चार मिनिटांचं असायचं आणि आज फोनला तीस मिनिटे उशीर म्हणजे ‘किती गाणी तुम्ही चुकवलीत ते तुम्हीच बघा,’ अशा शेलक्या शब्दांतला अहेर दीदींकडून मिळाल्यानंतर वेळेवर फोन न करण्याची लेखकाची काय बिशाद?

या पुस्तकात दीदींनी त्यांच्या लहानपणापासूनचा सगळा संघर्ष स्वत:च्या शब्दांत सांगितला आहे. त्यांच्या आयुष्यातल्या अनेक आठवणी प्रथमच या पुस्तकातून रसिकांसमोर आल्या आहेत. दीदींचा मिश्किल स्वभाव तर पानापानांतून जाणवतो. त्यांचा आवाज काळाला ओलांडून जाणारा होता, यावर तमाम संगीतकारांचा विश्वास होता.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

शास्त्रीय गाण्यातले बरेच जण आक्षेप घेतात की, दीदींना शास्त्रीय गायन जमलं नसतंच, पण ताईंची शास्त्रीय गायनाची तालीम पक्की होती. त्यांच्या संगीताच्या शिक्षणाची सुरुवातच हंसध्वनीसारख्या रागाने झाली होती, असे त्या सांगतात. दीदींबद्दल पं. अशोक रानडे लिहितात की, दीदींच्या आवाजातल्या तीन-चार मिनिटांच्या गाण्याने एखादा अनवट रागदेखील प्रस्थापित होतो. एक अख्खी पिढी गाणं शिकायला दीदींमुळे बाहेर पडली, असेही लेखक आपल्याला समप्रमाण दाखवून देतो.

दीदींनी आपल्या मदतनीसांबद्दल फारच ममत्वाने यात लिहिलं आहे. गुलाम हैदरने केलेली सुरुवातीची मदत, कवी शैलेंद्रचं आजारपणात रोज येऊन दीदींशी गप्पा मारणं, अशा अनेक खाजगी गोष्टींबद्दल दीदी मोकळेपणाने बोलतात. त्या काळात दीदी आपलं नावही रेडिओवर ऐकायला यावं म्हणून स्वत:च एखाद्या गाण्याची फर्माइश पाठवायच्या. जेव्हा रेडिओ घ्यायची ऐपत आली, तेव्हा घरी येऊन रेडिओवर गाणी ऐकता-ऐकता मध्येच गाणे थांबवून के. एल. सैगल गेल्याची बातमी दिल्यावर त्यांना तोच रेडिओ अपशकुनी वाटला, म्हणून त्यांनी तो परत केला. चित्रपटक्षेत्रात शकुन-अपशकुन यांचं जरा प्रस्थच असतं.

एकदा प्रसिद्ध संगीतकार चित्रगुप्तांचं गाणं रेकॉर्ड होणार होतं. स्वत: चित्रगुप्त लंगडत-लंगडत स्टुडिओत येताना बघून दीदींचा जीव कळवळला. त्या त्यांना म्हणाल्या, ‘‘काही होतंय का?’’ तर चित्रगुप्त आपली चप्पल दाखवत म्हणाले, ‘‘अगं काही नाही, या चपलेचा अंगठा तुटला आहे.’’ दीदींना वाईट वाटले. म्हणाल्या, ‘‘चला, आपण अगोदर तुम्हाला नवीन चप्पल घेऊया. मग गाणे रेकॉर्ड करू.” तर चित्रगुप्त दीदींना थांबवत म्हणाले, ‘‘अगं असू दे, माझ्याकडे चपला बऱ्याच आहेत, पण ही माझी लकी चप्पल आहे म्हणून मी रेकॉडिंर्गला याच चपला घालतो.” अशा अनेक किश्शांची पुस्तकभर पखरण आहे.

स्वत:च्या कष्टांच्या दिवसांबद्दल बोलतानादेखील दीदी उगाच करुण होत नाहीत. त्यांच्या गाण्यातला दर्द /नजाकत, शब्दोच्चार या सगळ्या मागे दीदींची तपश्चर्या होती. उपाशी-तापाशी राहून स्टुडिओतल्या; धूळ मातीत बसून वेळी-अवेळी गायलेली दीदींची अजरामर गाणी आपल्यास आजही सुखावतात, अपार आनंद देतात, पण त्या मागे उपसलेले कष्ट वाचून वाचकही बऱ्याचदा हळवा होऊन जातो. सुरुवातीला एका मंदिराशेजारी दीदींचं वास्तव्य होतं. सकाळच्या वेळी दीदी आपल्या गाण्याचा रियाज त्या मंदिरात बसून करायच्या, त्यावर लेखक म्हणतो की, असला सुरमयी आवाज ऐकायला देवही प्रत्यक्ष तिथे हजर होत असावेत!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

दीदींना नाझिर हिकमतच्या कविता आणि कवी माहीत होता हे वाचून तर मी आश्चर्यचकितच झालो. तुर्कस्तानच्या बंडखोर नाझिर हिकमत या कवीला शिक्षा म्हणून संडासच्या टाकीत बुडवून ठेवायचे. त्यातूनही तो आपल्या कविता जोरकसपणे म्हणत रहायचा. त्याच्यावर लक्ष ठेवणारे सैनिकच नंतर त्याची कविता म्हणायला लागले. अशा कवीची माहिती करून घेणे, त्याबद्दल संवेदना व्यक्त करणे खरेच अचाट आहे. त्या काळातले हे संवेदनशीलतेचं एक दुर्मीळ लक्षण आहे.

अनेक मोठ्या कलाकारांच्या सहवासामुळे माझं गाणं समृद्ध झालं असं त्या कबूल करतात. शास्त्रीय संगीतातले दिग्गज ऐकताना त्यांच्या सारखी तान आपल्याला घेता यावी, असा प्रयत्न सतत दीदींनी केला आणि काही गाण्यात तो अंमलातही आणला. दीदींना एकटं भटकायला खूप आवडतं, पण प्रसिद्धीच्या झोतामुळे ते दिवसेंदिवस अवघड होत गेलं. याच कारणास्तव म्हणजे सफलतेची किंमत म्हणून माझा भारत बघायचा मात्र राहून गेल्याची खंत दीदी व्यक्त करतात.

अनेक संगीतकारांना भैरवी रागात गाणी रचायला खूप आवडायचं. ‘छोड गये बालम’ (शंकर जयकिशन), ‘छोड दे सारी दुनिया’ (कल्याणजी आनंदजी), ‘दिल का खिलौना हाय टूट गया’ (वसंत देसाई) अशी या रागातली दीदींची गाणी अजरामर झाली आहेत, पण स्वत: दीदींना मात्र भैरवी गायला आवडत नाही, हे वाचून आपणही चमकतो. दीदी गाताना सूर पकडण्यासाठी एका व्हायोलीन वादकाला जवळ बसण्यास सांगत, यासारखे संदर्भ वेगळे आणि खरेच कालातीत आहेत.

एके ठिकाणी लेखक आपल्याला सांगतो आता वाचणं थांबवा आणि दीदींनी गायलेल्या एका दुर्लक्षित चित्रपटातील (शंकर हुसैन १९७७) खय्यामने संगीत दिलेलं गाणं ऐका. खरंच सांगतो ‘अपने आप....’ हे गाणं आज माझ्या संग्रहातलं खास गाणं ठरलं आहे. दीदींचा मखमली आवाज, खय्यामचं संगीत, कैफ भूपालीची रचना यात दीदींचा आवाज मन भरभरून राहतो. त्यांचं ‘अपने आप...’ म्हणणं आपल्याला पार हळवं करून टाकतं, मग नकळत आपण दीदींच्या अनेक गाण्यांमध्ये असेच गुंतत जातो. पुस्तक बाजूला राहते.

दीदींचा मुलायम आवाज आणि आपण इतकेच उरतो. अनेक वादग्रस्त मुद्द्यांबद्दल लेखकाने दीदींना बोलतं केलं आहे. राजकपूर, एस्.डी. बरोबरचं भांडण, ओ.पी. नय्यर बरोबर न जुळलेला सूर... सुमन कल्याणपूरकरबद्दल छेडले असता दीदींचे वाक्य काळजात घुसते. दीदी म्हणतात, ‘प्रतिभा के साथ आपका मौलिक होना भी जरुरी हैं!’

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

दीदींना खाण्यात जिलेबी आवडते किंवा मुंबईतल्या गेलॉर्ड हॉटेलमध्ये त्या काळातले तमाम संगीतकार, दिग्दर्शक एकत्र जमायचे आणि मजा करायचे, हे ऐकून माहीत होते, पण पुस्तकात वाचल्यानंतर अस्मदिक बरोड्यातल्या गेलॉर्डमध्ये नित्यनियमाने निदान चहा तरी पिण्यासाठी जातातच.

अगदी एके ठिकाणी दीदी केसांना कुठले तेल लावतात असाही प्रश्न लेखक करतो, तेव्हा दीदी हसून याही प्रश्नाचे उत्तर मला द्यायला लागेल का? असे उलट विचारून साधेपणाने त्याचे उत्तर देऊन टाकतात.

अनेक पुरस्कार दीदींना मिळाले. अगदी भारतरत्नसारखादेखील, तरीही तिरुपतीच्या देवस्थानाने दिलेला पुरस्कार दीदींना मोलाचा वाटतो आणि त्याहीपेक्षा सुरुवातीस कष्टाच्या दिवसात माईंचे गमावलेले तमाम दागिने स्वत:च्या पैशाने परत करून दिल्यावर आईच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान दीदींना अधिक मोलाचे वाटते.

यतींद्र मिश्रसारख्या हिंदी लेखकाने दीदींचा कमावेलला विश्वास त्यांच्या संवादातून पानोपानी जाणवतो. अॅमेझॉनवर या पुस्तकाची चौकशी करताना आजतागायत एकट्या डोंबिवलीतच या पुस्तकाच्या तब्बल २६ प्रती विकल्या गेल्या आहेत असेही कळले. लताप्रेमींसाठी हे पुस्तक म्हणजे खरे तर एक पर्वणीच आहे. यात स्वत: दीदींनी आपल्या आवडत्या १६ गाण्यांची यादीही दिली आहे. संदर्भसूची / छायाचित्रं यामुळे पुस्तकाचा भारदस्तपणा नक्कीच वाढला आहे.

तब्बल ३६ भाषेत गायलेल्या दीदींचे सात्त्विक रूप या पुस्तकाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे!

(‘शब्द रुची’च्या मे २०१९च्या अंकातून साभार)

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Lata-Sur-Gatha-Yatindra-Mishra

.................................................................................................................................................................

गणेश मनोहर कुलकर्णी

magnakul@rediffmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......