नारायण भोसले : ‘ ‘देशोधडी’च्या निमित्तानं मी नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या इतिहास आणि समाजजीवनाची काही उकल केलेली आहे…’
ग्रंथनामा - मुलाखत
विलास पाटील
  • डॉ. नारायण भोसले आणि त्यांच्या त्रिखंडी आत्मकथनाच्या पहिल्या भागाचं, ‘देशोधडी’चं मुखपृष्ठ
  • Fri , 10 December 2021
  • ग्रंथनामा झलक देशोधडी Deshodhadi नारायण भोसले Narayan Bhosale नाथपंथी डवरी गोसावी Nathpanthi Dawari Gosawi

नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या भटकेपणाचा, अनिश्‍चिततेनं भरलेल्या त्यांच्या अस्थिर आणि परावलंबी जगण्याचा संघर्षानं भरलेला जीवनप्रवास मांडणारी त्रिखंडात्मक आत्मकथा डॉ. नारायण भोसले लिहीत आहेत. त्यातला ‘देशोधडी’ हा पहिला भाग मनोविकास प्रकाशनाच्या वतीनं नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यानिमित्तानं लेखकाशी साधलेला हा संवाद संपादित स्वरूपात...

..................................................................................................................................................................

आपल्या त्रिखंडात्मक आत्मकथनातील पहिला भाग नुकताच प्रकाशित झाला. याविषयीच्या आपल्या भावना काय आहेत?

- खरं तर ‘देशोधडी’ हे आत्मकथन १९९२ ते ९५च्या आसपास येणं आवश्यक होतं. तशी मी तयारीही केली होती. पण वेगवेगळ्या कारणांच्या कडबोळ्यामुळे ते येऊ शकलं नाही. तेव्हा साहित्यिक जाण आणि संवेदनशील असलेल्या मित्रांनी मला हे आत्मकथन लिहिण्यासाठी उद्युक्त केलं होतं. पण उशिरा का होईना मी माझ्या जीवनाची कथा, मला माहीत असलेली माझी कथा, माझ्या कुटुंबाची ऐकलेली कथा मनोविकास या चांगल्या प्रकाशनामार्फत आपल्यापर्यंत पोहोचू शकलो, याचा आनंद वाटतो आहे. त्यासाठी माझ्या खूप मित्र-मैत्रिणींनी मला लेखनासाठी सततचा तगादा लावून मदतच केली. आत्ताही बर्‍यापैकी वाचणारे मित्र ‘देशोधडी’वाचून भारावून गेले आहेत, त्याचाही आनंद वाटतो. पण आत्मकथन लिहिताना सारखं मागेमागे जावं लागतं आणि त्यातल्या खरं तर खूप कटू अनुभव लिहीत असताना, त्या दुःखद प्रसंगांना आठवावं लागणं अन आळवावं लागणं, हे दु:खदच असतं, पण ‘लिहावं तर लागेलच’ म्हणून मी ते लिहिलं आहे आणि आपल्या हाती सुपूर्त केलं आहे. लिहिण्यापूर्वीची ठसठस आता कमी झाली आहे. आता सुजाण वाचकांनी त्यातील साहित्यमूल्य आणि जीवनमूल्य जाणून घेऊन आपल्या प्रतिक्रिया देण्याची वेळ आहे, मी माझं काम केलं आहे, असं मात्र मनोमन वाटतं. या आत्मकथनाच्या प्रसवकळा भरपूर आहेत. त्या माझ्याकडून सोसून झाल्यानंच तुमच्यापर्यंत हे आत्मकथन आलेलं आहे, याचा आनंद होतो आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

नाथपंथी डवरी गोसावी या जमातीचं एकही आत्मकथन अद्यापपर्यंत आलेलं नव्हतं. भटक्यांमध्ये आतापर्यंत पन्नासपेक्षा ज्यास्त आत्मकथनं आली आहेत. त्यात बंजारा, वडार आणि पारधी यांची आत्मकथनं आघाडीवर आहेत. सर्वांत मागास असलेले पारधी या जमातीची मात्र पाचपेक्षा जास्त आत्मकथनं आलेली आहेत. परंतु भिक्षेकरी असलेल्या नाथपंथी डवरी गोसावी समाजाचा इतिहास आणि त्याचं समाजजीवन मराठी वाचकाला माहीत नव्हतं. ते माहीत व्हावं हाही आत्मकथन लिहिण्यामागचा एक उद्देश होता. मला वाटतं की, ‘देशोधडी’च्या निमित्तानं मी नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या इतिहास आणि समाजजीवनाची काही उकल केलेली आहे. ते आपण माझ्या या आत्मकथनातून मुळातून वाचावं.

भटक्या विमुक्तांचं जगणं मांडणारी ‘उपरा’, ‘उचल्या’ यांसारखी आत्मकथनं असताना तुमचं आणि तुमच्या डवरी गोसावी समाजाचं जगणं वाचकांसमोर आणावं असं का वाटलं?

- कोणतंही आत्मकथन त्या एका व्यक्तीच्या जीवनाची कहाणी नसते, तर ते त्या व्यक्तीचा, त्याच्या कुटुंबाचा, त्याच्या जाती-जमातीचा, त्याच्या भोवतालाचा दैनंदिन लेखाजोखा असतो. त्यानिमित्तानं उपरोक्त सर्व बाबीचा दैनंदिन विचारव्यूह कसा चढता-उतरता झालेला आहे, हे समजण्यासाठीचा हा महत्त्वाचा दस्तावेजच आहे. मी इतिहासाचा विद्यार्थी असल्यानं इतिहासाचं साधन निर्माण करणं हे माझं पण काम आहे. मौखिक परंपरेत जगणार्‍या या भटक्या जमाती! यांचा इतिहास कोण लिहिणार? लिहिला तर १८७१मध्ये ब्रिटिशानी लिहिला तसा किंवा १९११मध्ये ‘गावगाडा’ पुस्तकात आत्रे यांनी लिहिला तसा लिहिला जाणार. भारतात इतिहासकाराची जात फार कावा करते. ‘उपरा’-‘उचल्या’ यांनी त्यांच्या त्यांच्या जातीजमातीच्या दैनंदिन जीवनाचं आणि जमातीचं चित्रण केलेलं आहे. त्यातून त्यांच्या जातीजमातीचा इतिहास उभा राहिला. त्या इतिहासावर आंदोलनं उभी राहिली. या आंदोलनानं प्रबोधनाला बळ दिलं. त्यातून जातीउन्नयनाच्या, जातीअस्मितेच्या, साहित्याच्या चळवळी जन्माला आल्या. ज्यांनी ज्यांनी ते वाचलं, त्यांनी त्यांनी त्या त्या जातीजमातीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मकच केला.

म्हणून मी आत्मकथन लिहिणं या बाजूचा झालो. आणि उशिरा का होईना माझ्या जमातीचा, तिच्या भोवतालचा प्रामाणिक इतिहास रेखाटन करू शकलो. आपणही हे आत्मकथन वाचून नक्कीच बदलाल, अशीही मला अशा आहे. या संदर्भात आलेली एक छोटीशी प्रतिक्रिया सांगतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये अंकुश बागडी नावाचे एक कर्मचारी आहेत. वेगवेगळ्या सामाजिक ताण-तणावमध्ये ते जीवन जगत होते. ते ताणतणाव त्यांच्या चेहर्‍यावरही दिसायचे. नुकतंच त्यांनी माझं आत्मकथन वाचलं आणि लिखित प्रतिक्रिया दिली. ती अशी, ‘माझ्या आयुष्यातले सर्व ताणतणाव संपले. बीपीची गोळीसुद्धा मी आता खात नाही. इतकी ऊर्जा मला तुमच्या आत्मकथनातून मिळाली.’ माझ्यासाठी ही प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................. 

ज्या पारंपरिक यशस्वी कथा असतात, सक्सेस स्टोरीज असतात, तसं माझं आत्मकथन नक्कीच नाही. परंतु माझ्या आयुष्यात आलेले चढ हे हिमालयाएवढे होते आणि उतारही तितकेच भयंकर तीव्र होते. यातून मला बाहेर काढण्याचं काम प्रबोधन चळवळीतील स्त्री-पुरुषांनी केलं. त्यातूनच मी आज उभा राहू शकलो आहे. दलित आत्मकथन वाचून मला ऊर्जा मिळालेली आहे, मार्ग सापडलेला आहे. त्या आत्मकथनांना धन्यवाद देण्यासाठी मी माझं आत्मकथन लिहिलं आहे

तुमच्यासारखी काही मंडळी शिक्षणामुळे पुढे येत आहेत. त्याचा म्हणून समाजावर एक परिणाम होत असतो. तर हा समाज आता सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या बदलतो आहे का?

- माझ्या गावातील काही शिकलेल्या, काही नोकरदार असलेल्या व्यक्तींकडे बघून मी शिकलो आहे. मी शिकतो आहे म्हटल्यानंतर माझी भावंडंही शिकू लागली. आमच्या संपर्कात आलेली आमच्या जातीतील काही मुलंही शिकू लागली. आमच्या पै-पाहुण्यांची काही लेकरं शिकू लागली. मला जेव्हा नोकरी लागली, तेव्हाही त्या नोकरीचा खूप सकारात्मक परिणाम माझ्या जातीजमातीवर झाला. ‘डवरी गोसावी समाजाचा भारतातील पहिला प्राध्यापक’ म्हणून माझ्याकडे पाहिलं जाऊ लागलं. काही ठिकाणी सत्कारही झाले. मी आणि माझी भावंडं समाजासाठी एक आदर्श ठरलो गेलो. माझ्या समाजाच्या बदलाचा वेग कमी आहे, पण तो बदलत आहे, हे मात्र नक्की...

आज नाथपंथी डवरी गोसावी जमातीची महाराष्ट्रातील लोकसंख्या तीन ते चार लाख असावी. भटक्या-विमुक्तांची महाराष्ट्रातील लोकसंख्या सव्वा कोटीपेक्षा जास्त असावी. यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच लोक प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनीअर, काही पोलीस खात्यामध्ये, प्रशासनात आहेत. यांच्या संघटना उभा राहिल्या आहेत, राहत आहेत. या संघटनांच्या मार्फतही वेगवेगळ्या प्रकारचे प्रबोधन कार्यक्रम घेऊन शालाबाह्य मुलामुलींना प्रवाहात आणण्याचं काम सुरू आहे.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

आता या जमातीला कुठे फुले-शाहू-आंबेडकर कळू लागले आहेत. परवाच ‘देशोधडी’च्या निमित्तानं समाजाच्या वतीनं माझा सत्कार केला. त्या वेळी स्टेजवर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो होते. हे फार सकारात्मक चित्र आहे. पूर्वी असं नव्हतं. भिक्षेकरी समाज आणि भिक्षेचं साहित्य हेच आमच्या समाजासाठी पूजनीय होतं. आता त्या ठिकाणी परिवर्तनाला बांधील असलेल्या विचाराचं चित्र सांभाळलं जात आहे. ही सकारात्मकता अधिकधिक वाढवणं, हे माझं काम आहे. माझ्याही जातीतील काही व्यक्तींनी, ‘हे आत्मकथन वाचून ढसढसा रडलो’ असं सांगत आपलं जीवन सावरण्याचा प्रयत्न केला. विषेशत: शिक्षण घेत असलेले तरुण विद्यार्थी माझ्याशी यावर आवर्जून बोलताना दिसत आहेत, हीसुद्धा एक सकारात्मक बाब आहे.

समाज सुधारणांच्या प्रक्रियेत अशा आत्मकथनांना एकवेगळं महत्त्व प्राप्त होतं. त्या दृष्टीनं तुम्ही तुमच्या या लेखनाकडे कसं बघता?

- ‘उपरा’ किंवा ‘उचल्या’ ही आत्मकथनं प्रकाशात आल्यानंतर निरक्षर असलेला त्यांचा समाज काही प्रमाणात सकारात्मक आणि काही प्रमाणात नकारात्मकपणे व्यक्त होऊ लागला. त्यातून घडलेल्या चर्वितचर्वण आणि चिंतनानं समाज एकत्र येऊन संघटित होऊ लागला. भवतालच्या समाजाशी आपला वार्तालाप ठेवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यातून तयार झालेल्या नेतृत्वांनी संघटन बांधलं. भटक्या-विमुक्तांच्या चळवळींना एक वैचारिक साहित्य मिळालं. कोणत्याही जाती-जमातीच्या पोटात अनेक सूक्ष्म असे आणखी पोट-भेद असतात. तसे कैकाडी वा उचल्या जमातीत होते आणि ते पोटभेद बाहेर आले. त्यांच्यात वादविवाद आणि खडाजंगी झाली. आणि पुढे हे पोटभेद मिटण्याचीही प्रक्रिया झाली!

नाथपंथी डवरी गोसावी जमातीच्या दैनंदिन जगण्याचे कथन करणं, त्या कथनाला चर्चेच्या केंद्रस्थानी आणणं, या जमातीला परिवर्तनाच्या प्रवाहासी जोडून घेणं, असे काही छुपे आणि उघड हेतू माझ्या मनामध्ये होते. म्हणूनच मी आत्मकथन लिहिण्यापर्यंत आलो. मलाही वाटलं की, माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे, म्हणून ते आपण ऐकाव असं वाटतं. ज्यांना भारतीय समाजजीवन समजून घ्यायचं आहे, त्यांनी या परीघावरील जाती-जमाती समुदायांना वाचावं.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

भारतीय लोकसंख्येत १६ कोटींपेक्षा जास्त लोक या भटक्या विमुक्तांचे आहेत! हा काय कमी आकडा नाही! दुर्लक्ष करण्यासारखा तर अजिबातच नाही. मुळातच भारतातल्या या १०००पेक्षा जास्त भटक्या जाती-जमातीवर अभ्यास झाले नाहीत, असं खेदानं म्हणावं लागतं. आत्मकथन लिहिणं हा त्या अभ्यासाचाच एक भाग आहे.

 तुमचं हे आत्मकथन वाचकांनी का वाचलं पाहिजे? त्याविषयी काही सांगा.

- एका समुदायाच्या जडणघडणीला जाणण्यासाठी आपण माझं हे आत्मकथन जरूर वाचावं. आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या समुदायाला वा एखाद्या स्थानाला भेटल्यानंतर जे ओळखतो, तसे आधी सांगीवांगीवर ओळखलेले नसते. म्हणून काही समजून घ्यायचं असेल तर त्याच्याविषयी वाचलेलं बर. आणि त्यांनी स्वतःविषयी प्रांजळपणे लिहिलेलं असलं तर आणखीनच बरं. मी शिक्षण घेत असताना वर्गातील अनेक मित्रमैत्रिणी मला ‘नीट’ ओळखत नव्हते. शालेय जीवनाच्या दररोजच्या पाच-सहा तासानंतर मी ‘ज्या’ आयुष्याशी झटत होतो, त्याच्याशी त्यांचा परिचय नव्हता. मी जिथं नोकरी करत होतो, त्या नोकरीतल्या सात-आठ तासांशिवाय माझ्या आयुष्यात येत असलेले दररोजचे प्रसंग, हे त्या सहकार्‍याला माहीत नसायचे. त्यामुळे त्यांचं माझ्याविषयीचं आकलन एकांगी झालं असण्याची शक्यता होती. माझं गप्पा मारणं, बोलणं, लिहिणं, याचा जो संबंध आहे, तो संबंध नीट माहीत असल्याशिवाय, तो मुळातून समजून घेतल्याशिवाय आपणाला आपल्या ओळखीची माणसं नीट ओळखू येत नाहीत.

माझ्या या एक्कावन- बावन्न वर्षांच्या आयुष्यामध्ये अनेक मित्र आले, मैत्रिणी आल्या, शिक्षक आले, मी अनेक चळवळी पाहिल्या, त्याचा मी कार्यकर्ता होतो. पण या सर्व लोकांना माझा भूतकाळ काय आहे, हे कळावं, आणि मी तुम्हाला शिकवत असताना, चळवळीत काम करत असताना, त्याच वेळी मी कोणकोणत्या बाबींना सामोरे जात होतो, हे माझ्या भवतालाला कळावं म्हणून मी आत्मकथन लिहिलं. मला जे लोक ओळखतात त्यांना मी नीट कळावा, त्या निमित्तानं माझा समाज समुदाय ओळखू यावा, त्यानिमित्तानं माझी घडवणूक ओळखू यावी, समजावी हाही छोटासा उद्देश आहेच. म्हणून लोकांनी हे आत्मकथन वाचावं असं मनोमन वाटतं.

नाथपंथी डवरी गोसावी जमातीवर अजिबातच लिखाण झालेलं नाही. म्हणून या जमातीविषयीचं, काही लोकांचं, समुदायाचं आकलन एकांगी आहे. ते आकलन मानवीय व्हावं, यासाठीही माझं हे आत्मकथन वाचावं. कोण आहेत हे नाथपंथी डवरी गोसावी भटके लोक? कोणत्या परग्रहावरून ते अवतरले आहेत? खरं तर हे लोक याच पृथ्वीचा भाग आहे. तरीही इतके उपरे कसे? या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी आपण हे आत्मकथन वाचावं.

तुमच्या आत्मकथनाचे आणखी दोन भाग बाकी आहेत. त्याविषयी काय सांगाल?

 - हो, माझ्या आत्मकथनाचे आणखी दोन भाग लवकरच येणार आहेत. ‘देशोधडी’ ही माझ्या जीवनाची अधिअधुरी कहाणी आहे. पूर्ण कहाणी आगामी दोन भागांत आहे. त्यातील दुसरा भाग म्हणजे ‘अनाथपंथी’ आणि तिसरा भाग म्हणजे ‘भटक मत मरो कोय’. हे भाग मला नोकरी मिळाल्यानंतरच्या आयुष्याचे आहेत. वर्तमानावरील भूतकाळाच्या परिणामाचं विश्लेषण यात असणार आहे. त्या परिपक्व तारुण्यांच्या आयुष्यातील जातवर्गलिंगभाव जाणीवेविषयीची उकल यात असणार आहे. यात माझे या भटक्या जातसमूहांच्या संबंधाच्या ताण्या-बाण्याविषयीचे अनुभव आहेत. चळवळीतल्या आयुष्याविषयाचं सूक्ष्म निरीक्षणं असणार आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

माझ्या वाचनाविषयीचं, त्याच्या आकलनाविषयाचं, भटके-विमुक्तांवरील जागतिकीकरणाच्या परिणामाविषयीचं वाचन आणि विश्लेषण यात असणार आहे. त्याच्या राजकारणाविषयी खोलात बोलणार आहे. शिकवण्याविषयी, संशोधनाविषयी, त्यातील चौर्यांविषयी, त्यासाठीच्या निवडक वाचनाविषयी अर्थात माझा संबंध या सर्व प्रक्रियेशी कसा आला? त्याची उकल या माझ्या आगामी दोन खंडांतून आपणाला समजणार आहे. त्याविषयीची उत्सूकता देशोधडी वाचून अधिक वाढेलस अशी आशा आहे.

(मनोविकास प्रकाशनाच्या ‘मनोविकास वर्ड्स’ या गृहपत्रिकेच्या डिसेंबर २०२१च्या अंकातून साभार)

‘देशोधडी’ - डॉ. नारायण भोसले

मनोविकास प्रकाशन, पुणे

मूल्य – ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

या पुस्तकात विषयांची विविधता आहे. साध्या विषयापासून ते ‘खाद्यसंस्कृती’तील ‘वादग्रस्त’, तसेच ‘त्याज्य’ विषयही आढळतात. लेखांचा ग्राफ साधेसुधे पदार्थ ते अनोखा, विलक्षण असा आहे…

खाद्यपदार्थ हे निव्वळ खाद्यपदार्थ नसतात, त्यांचे आपल्या जीवनातील अनेक गोष्टींशी साधर्म्य असते, हे बिर्याणी आणि संसार यातून ते स्पष्ट करतात. इब्राहीम अफगाण यांच्यासोबत हा चविष्ट प्रवास कुठेही कंटाळवाणा न होता मजेमजेत होतो. त्यांनी दिलेला एका खाद्यप्रेमीचा वचननामा प्रत्येकाने स्वीकारावा. त्याचे पालन करावे. त्यामुळे भारताची त्यातही महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती समृद्ध होईल.......

आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे...

इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे.......