शेतकरी जगला, तर देश जगेल; शेतकरी संपला तर हा देशही संपेल...
पडघम - सांस्कृतिक
सुशील धसकटे
  • ‘परंतु’ या दिवाळी अंकाच मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिका
  • Fri , 05 November 2021
  • पडघम सांस्कृतिक दिवाळी अंक Diwali Ank परंतु Parantu महात्मा गांधी Mahatma Gandhi डॉ. राममनोहर लोहिया RamManohar Lohiya सुशील धसकटे Susheel Dhaskate

मराठीत दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी तीन-चारशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. यंदा दिवाळी अंकांच्या या परंपरेला १११ वर्षं झाली. काही अंक सत्तर-ऐंशी वर्षांपासून नियमित प्रकाशित होतात. तर दरवर्षी चार-दोन अंक बंद होतात आणि चार-पाच अंक नव्याने सुरू होतात. ‘परंतु’ हा या वर्षीपासून सुरू झालेला एक वैशिष्ट्यपूर्ण अंक आहे. तो महात्मा गांधी आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्यावर आहे. या अंकाच्या निमित्ताने संपादक सुशील धसकटे यांनी लिहिलेलं हे संपादकीय खास ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...

.................................................................................................................................................................

‘परंतु’चा हा पहिलावहिला अंक प्रकाशित करताना संमिश्र भावना आहेत. हर्मिस प्रकाशनाकडून असा अंक नियमित करावा, हा विचार मागील चार-पाच वर्षांपासून मनात घोळत होता. शिवाय काही लेखक आणि मित्रमंडळींकडून ‘अंक सुरू करा’ अशा सूचना येत होत्या. या वर्षी प्रत्यक्ष अंक घेऊन येत आहोत. महात्मा गांधी आणि डॉ. राममनोहर लोहिया या थोर मंडळींवरील हा अंक आहे.

वास्तविक गांधी आणि लोहियांवर अंक करतोय म्हटल्यावर अनेकांनी नाके मुरडली. गांधी आणि लोहिया हा काय अंकाचा विषय आहे? यातून असा कितीक पैसा मिळणार? हा जणू मूर्खपणाच आहे, असा एक तुच्छतेचा भाव यातून जाणवला. तर मग यावर ‘असा मूर्खपणा पुन्हा पुन्हा करण्याची ताकद मिळो,’ इतकंच म्हणावंसं वाटतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कुठल्याही व्यक्तिगत संपत्तीसंचयात न अडकता हा देश आणि इथली माणसं सुखी, समृद्ध आणि समाधानी राहावीत, असं मानून व्यक्तिगत सुख-दु:खावर पाणी सोडून देशासाठी निर्मोही आयुष्य जगणारी ही दोन थोर माणसं! गांधी आणि लोहिया यांच्या आमच्याकडून अपेक्षा तरी अशा काय होत्या? तर चांगलं वागा, हिंसा करू नका, भ्रष्टाचार करू नका, भेदभाव करू नका, दुसऱ्याला त्रास देऊ नका, प्रामाणिक राहा... इतकंच तर होतं. पण आम्ही हेही करू शकलो नाही. आम्ही जातीधर्माच्या नावावर समाजमन भेदत राहिलो. आम्ही शिकलो. नोकरदार, पगारदार, अधिकारी झालो, पण माणूस झालो नाही. आम्ही पेन्शन, बढती, बंगला, गाडी, मानसन्मान, वेतन आयोग, सुट्ट्या यात इतके मश्गूललो की, दुसऱ्याकडे, समाजाकडे स्वच्छपणे बघूही शकत नाही. आमच्या दृष्टीला भौतिकसुखाचा मोतीबिंदू झाला. आमच्या वेदना बोथट झाल्यात.

संपूर्ण देश अरिष्टाच्या संक्रमनातून जात आहे. हे अरिष्ट निसर्ग, पर्यावरण, आर्थिक, सामाजिक, राजकीय, आरोग्य अशा विविधांगी स्वरूपाचे आहे. त्याची व्याप्ती प्रचंड असल्याने त्याची झळ प्रत्येकाला बसते. कोविड-19ने गेले दीडेक वर्षे माणसाचे कंबरडे मोडले. तशात सरकारी नियम आणि धोरणे यांच्यात सुस्पष्टता नसणे, सामान्य माणसांच्या प्रश्नांचे सत्ताधाऱ्यांना घेणंदेणं नसणे, सामान्य माणसाच्या व देश हिताच्या दृष्टीने जे मुद्दे राजकारणाच्या चर्चेचे विषय व्हावेत, ते न होता अर्थहीन, उथळ आणि ज्याची आवश्यकता नाही, त्या निरर्थक गोष्टींवर राजकारण चालवणे, गेल्या काही वर्षांत नोटबंदी-जीएसटी-लॉकडाऊन आदींमुळे आलेल्या आर्थिक असुरक्षिततेने प्रत्येक व्यक्तीला मनातून पोखरून टाकणे, अनेकांच्या रोजगार, नोकऱ्यांवर, व्यवसायांवर आलेले गंडांतर, शिक्षण घेऊन दहा दहा-पंधरा पंधरा वर्षे नोकरीच्या प्रतिक्षेत आयुष्य व्यतीत करणारे आणि नैराश्य-वैफल्यात एकेक दिवस जाणारे करोडो भारतीय तरुण, स्त्री अत्याचारात दिवसागणिक होणारी वाढ, प्रचंड वाढत जाणारी महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारी आस्थापनांचे होणारे खासगीकरण, शिक्षण आणि आरोग्य यांचा बाजार होणे, वाढते भांडवलीकरण, निसर्गाची अनिर्बंध लूट, ऊन आणि पाऊस यांचे बदललेले रंगरूप इत्यादी इत्यादी अशा अनेक गोष्टी सांगता येतील.

एका बांधकाम मजुराशी बोलताना तो सहज, परंतु मन पिळवटून टाकणारं बोलून गेला- ‘‘सब कुछ कहाँ ठीक हो रहा है साब?... दिन ब दिन जिंदगी मुश्कील होती जा रही हैं... पैसा न होणे के कारण मेरी बच्ची का इलाज कर न सका। सरकारी अस्पताल में बेड नहीं मिला। वहां कोई किसी को ठीक तरह से बोलता भी नहीं। और प्राईवेटवाले पहले बहोत सारा पैसा मांगते है। वहां जाने की तो हमलोग सोचते भी नहीं। कहां से लाऊं इतना पैसा... मेरी बच्ची गई... हमारे बचपन का वो समाज, वो भाईचारे दिन कहाँ गये? किसने हमसे छिने? वो छिननेवाले कौन है? जिने का मजाही नहीं रहा...अब जिएं क्या और मरें क्या...एकही है... जिंदा लाशें...’’

पैशाअभावी उपचार न घेता आल्याने या देशातील किती गरीब लोक असे मरत असतील? सामान्य माणसाचा आवाज सत्ताधाऱ्यांच्या कानावर का पडत नाही? की सामान्य माणसाचा आवाज ऐकण्यासाठी त्यांच्याकडे कानच नाही? स्वातंत्र्यानंतरचे साठ-सत्तर वर्षे हे कोणाचं ऐकत होते?

मजुराच्या या बोलण्यानं माझे पुढचे किती तरी दिवस प्रचंड उलाघालीत, अस्वस्थतेत गेले. आपण काहीच करू शकत नाही, ही नाकर्तेपणाची इंगळी आतल्या आत मनाला प्रचंड डंख करत राहिली... प्रत्येकाच्या मनात एक अनामिक घुसमट खदखदेतय. कुठं चाललो आहोत आपण सगळे? आणि काय होणार या देशाचं? अशा स्थितीत गांधी आणि लोहियांशिवाय पर्याय दिसत नाही... सत्य... अहिंसा... सहिष्णुता आणि प्रेम!!

..................................................................................................................................................................

एका शैक्षणिक प्रकल्पासाठी ‘समन्वयक’ हवे आहेत!

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव - १) किमान पदवीधर, २) इंग्रजीचे किमान जुजबी ज्ञान, ३) संगणक येणे आवश्यक, ४) फिल्डवर्कचा अनुभव असल्यास प्राधान्य, ५) शिक्षणक्षेत्रातील ज्ञानाचा अनुभव असल्यास प्राधान्य, ६) संभाषण आणि संवाद कौशल्य अनिवार्य

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलवर अर्ज पाठवावेत. त्यात महाराष्ट्रात आपण काम करू इच्छित असलेल्या जिल्ह्याचा उल्लेख करावा.

ई-मेल -  SAF.CPM@outlook.com 

पुढील लिंकवर जाऊनही अर्ज करता येईल - http://surl.li/anqmw

आपले अर्ज ६ नोव्हेंबर २०२१पर्यंत पाठवावेत. पात्र उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू झाली असल्याने इच्छुकांनी त्वरित अर्ज करावेत.

..................................................................................................................................................................

भारत हा कृषिप्रधान देश आहे, असं अभिमानानं म्हणण्याचे दिवस संपले. देशातील इतर लोकांना आणि पुढाऱ्यांना आता शेतकऱ्यांची गरज उरली नाही. कृषिप्रधान आणि विविधतापूर्ण असलेला हा देश मुळापासून विस्कटून टाकला जात आहे. शेतीसंबंधीचे तीन कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी गेले सलग नऊ महिने पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि देशभरातील विविध राज्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने सर्वस्व पणाला लावून सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर या दिल्लीच्या सीमांवर लोकशाही मार्गाने आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. हा प्रश्न केवळ शेतकऱ्यांचा, केवळ खेड्यांचा नाही, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाचा आहे, जो शेतकऱ्याने पिकवलेले अन्नधान्य खातो. आज या खाल्लेल्या अन्नाला जातपातधर्मपंथ विसरून जागण्याची वेळ आली आहे. या देशातील सर्वसामान्य लोक, कष्टकरी, नोकरदार, मध्यमवर्गी, निम्नमध्यमवर्गी, निम्नवर्गी अशा सर्व नागरिकांसाठी येणाऱ्या काळात हा प्रश्न जीवनमरणाचा असणार आहे. हे कायदे मोजक्या बड्या भांडवलदारांच्या हिताचे आहेत. देशाला रोज जगवणारा शेतकरी अन्नदाता आता देशाचा रक्षणकर्ता म्हणून ऊन-वारा-थंडी-पावसात या लढ्याला स्वत:च्या खांद्यावर घेऊन ठाम उभा आहे. ज्या ज्या वेळी देशावर अरिष्ट आले, त्या त्या वेळी या देशातील शेतकरी त्या विरोधात ठाम उभा राहिलेला आहे. छत्रपती शिवरायांच्या खांद्याला खांदा लावून स्वराज्याचा लढा लढणारा हाच शेतकरी-कष्टकरी अठरापगड मावळा होता.

न पटलेल्या एखाद्या निर्णयाविरोधात, एखाद्या गोष्टीच्या संदर्भात सरकारला विरोध करणे किंवा प्रश्न उपस्थित करणे किंवा असहमती दर्शवणे म्हणजे देशद्रोह, अशी कूटनीती लोकशाही तत्त्वांना-घटनेच्या मूळ गाभातत्त्वाला नख लावते. लोकशाहीतील ‘लोक’च नाकारते. लोकशाहीत चर्चा-विरोध होणारच. असं होणं हे लोकशाही जिवंत असल्याचं लक्षण. शेवटी कुठलेही सरकार देशातील नागरिक किंवा लोक निवडतात. मग त्यांनाच देशद्रोही ठरवून कसं चालेल? देशापेक्षा आणि देशातील नागरिकांपेक्षा सरकार मोठे नाही, नसते आणि नसावेही. जनता मायबाप आहे नि असते. लोकशाहीमध्ये घटनेने प्रश्न विचारण्याचा, विरोध करण्याचा, मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे. ‘आलम रयत आहे, म्हणून आम्ही राजे’ असं शिवाजीमहाराज म्हणत. ‘लोकशाहीत लोक महत्त्वाचे’ असे गांधींनी म्हटले आहे, तर ‘लोकशाही मेली तर विनाश अटळ’ असा इशारा डॉ. आंबेडकरांनी दिला होता. दुर्दैवानं महापुरुषांच्या या मूलभूत विचारांचा आणि लोकमताचा अनादर होताना दिसत आहे.

लालबहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ हा नारा दिला. याच किसानांचे कैक हजारो जवानपुत्र देशासाठी सीमेवर शहीद झाले, आणि अजूनही होत आहेत. आज ‘किसान विरुद्ध जवान’ उभे केले जात आहेत. आंदोलन स्थळावरील वीज, पाणी, इंटरनेट बंद केले गेले. रस्त्यांवर खिळे ठोकले गेले. बॅरिकेड्च्या भिंती उभारल्या गेल्या. शांतपणे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दगडफेक केली गेली. पोलीसबळ वापरून अश्रुधूर, अमानुष लाठीचार्ज केला गेला. लखिमपूर खिरी येथे रस्त्यावरून चालणाऱ्या शेतकऱ्यांना पाठीमागून चारचाकीने निर्दयीपणे चिरडून टाकले गेले. हे सगळे कोणा अतिरेक्यांसाठी-दहशतवाद्यांसाठी, शत्रूंसाठी नव्हे, तर या देशातील अन्नदात्यांसाठी केले गेले. का? तर त्यांनी कायद्यांना विरोध केला म्हणून. मग माणसाच्या मूलभूत मानवीहक्कांचे काय? या ऐतिहासिक किसान आंदोलनात शेतकऱ्यांवर स्वकीयांनी केलेले हे सर्व अन्याय, अत्याचार काळा इतिहास बनून शेतकऱ्यांच्या मनात चिरकाल ‘खिळ्यां’सारखे रुतून बसतील, हे नक्की. खिळे ठोकणं सोपं होतं, पण त्यामुळे अन्नदात्यांच्या मनाला झालेल्या खोल जखमा कायम धगधगत राहतील.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

‘‘शेतकऱ्याच्या कणसाला, दाण्यागोठ्यालाही हात लावता कामा नये’’ अशी आपल्या सरदारांना, सैन्याला सक्त ताकीद देणारे सकलजनप्रतिपालक शिवाजीमहाराज राज्यकर्ते म्हणून खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी सदैव उभे राहिले. शिवकाळात ज्वारीच्या कणसाच्या रक्षणासाठी तलवार होती. ही तलवार कणीस पिकवणाऱ्यांवर कधी उगारली गेली नाही. उगारली गेली तेव्हा उगारणाऱ्याचे हात कलम केले गेले. एकोणिसाव्या शतकात ‘शेतकऱ्याचा आसूड’ लिहून महात्मा जोतीराव फुले यांनी शेतकऱ्यांची कैफियत तळमळीने मांडली. शेतकऱ्यांना छळणाऱ्या, त्यांचे शोषण करणाऱ्यांच्या विरोधात जोतीरावांची लेखणी तळपते. महात्मा गांधी यांनी ‘‘खेडे नष्ट झाले तर हिंदुस्थानही नष्ट होईल. मग तो हिंदुस्थान राहणार नाही. त्याचे जीवितकार्य हरपल्यासारखे होईल,’’ अशी ठाम भूमिका शेती-शेतकरी आणि खेड्यांच्या संदर्भात कायम घेतली. याचाच अर्थ शेतकरी जगला, तर देश जगेल, शेतकरी संपला तर हा देशही संपेल, असं तळमळीनं सांगत महात्मा गांधी सदोदित शेतकऱ्यांच्या बरोबर राहिले. चंपारण्य, चारीचौरा, निळीचे आंदोलन, याचे स्मरण केले तर गांधी किती खंबीरपणे शेतकऱ्यांबरोबर राहिले ते दिसते. ‘‘गोरगरीब, कामकरी व शेतकरी वर्गाचे हितरक्षण करणे, हे आपल्या पक्षाचे पहिले कार्य आहे,’’ असे डॉ. आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभेत ठणकावून सांगितले होते. इतिहासपुरुषांच्या आणि राष्ट्रपित्याच्या या कार्याचा विसर पडणं, हा देशासाठी मोठा दैवदुर्विलास आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

या देशाची माती सर्जक आहे. ती पोसणारी, भाईचारा जपणारी आहे. आपल्या व्रात्य, भ्रमिष्ट लेकरांनी (धरतीपुत्रांनी) केलेले अत्याचार सहन करूनही ती त्यांना ममत्वाने पुन्हा अन्नाचे चार घास भरवून जगण्याचा अवसर देते. तिच्यात ममत्व आहे, तसं दातृत्वही. ती विषमता नव्हे, तर समता उगवते. द्वेष नव्हे, बंधुभाव जगवते. ती खिळे उगवत नाही, तर अन्न पिकवून देते. ती विषपेरणी नव्हे, तर माणुसकीची पेरणी करते. हिसकावून घेणं नव्हे, तर देणं शिकवते. ती हात उगारायला नव्हे, तर कष्टानं हाताला घट्टे पाडायला शिकवते. ती उलटायला नव्हे, तर जागायला शिकवते. ती परजीवी नव्हे, श्रमजीवी आहे. ती बांडगूळ नव्हे, तर करोडो पोटांना जगवणारी आहे. ती विद्वेषी नव्हे, तर सहिष्णू आहे. ती एकचालकानुवर्ती नव्हे, तर लोकचालकानुवर्ती आहे. ती एकवचनी नव्हे, बहुवचनी आहे. माती म्हणजे जीवन. शेती म्हणजे जीवनपद्धती, जगण्याची संस्कृती. या देशाची नस. मृत्यूनंतर उदरात सामावून एकजीव करणारी. तिच जन्म देते, तिच जगवते, तिच पदरी घेते. हाच शेतकरी धर्म, हीच भूमाता. भारतमाता. कृषिसंस्कृती! या शेतकरी धर्माचा आम्ही पूर्ण आदरसन्मान करतो. तिचे शेतकरीपुत्र अन्यायाला, दडपशाहीला डरत नाहीत. सहिष्णुता, अहिंसा आणि लोकशाही मार्गाने आपला लढा व्यापक करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्येच आहे. जी गांधीजींना आकळली होती. म्हणूनच कृषिसंस्कृतीशी नाळ असलेला एक तरुण या नात्याने या शेतकरी लढ्याला, आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना कृतज्ञतापूर्वक सलाम करणं, त्यांच्या अतूट धैर्याला मानवंदना देणं, त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करणं, त्यांच्या सोबत राहणं, हे एक भारतीय म्हणून माझं कर्तव्य आणि जबाबदारी समजतो...

खंत इतकीच की, अन्नदात्यालाच टाच रगडून, अत्याचार सहन करून न्यायासाठी झगडावं लागणं, यासारखं शिवछत्रपती-जोतीराव फुले-भगतसिंह-महात्मा गांधी, साने गुरुजी, आंबेडकर आणि लोहिया आदींच्या योगदानातून स्वातंत्र्य-समता-धर्मनिरपेक्षता या लोकशाही मूल्यांवर उभ्या राहिलेल्या देशात यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणते?

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

गेल्या काही वर्षांतील कटुअनुभवाने सर्व संदर्भ बदलले आहेत. त्यामुळे परस्पर वैचारिक-श्रेयवादाच्या साठमारीत मश्गूल होऊन एकमेकांना टोकत बसायचं, की एकत्र येऊन जातधर्मवर्चस्ववादी संकुचित श्नतींचा सामना करायचा. हा मुद्दा निर्णायक ठरून त्यावरच देशाचं पुढील भवितव्य अवलंबून असल्याचे ठळक अधोरेखन या किसान आंदोलनाने केलेलं आहे. या आंदोलनात सर्व जातीजमातींतील-धर्मांतील शेतकरी ‘भारतीय शेतकरी’ म्हणून एकवटले आहेत आणि ते त्यांच्या ‘अखिल शेतकरी एक’ या भूमिकेवर ठाम आणि अढळ आहेत. त्यांना हे नीटपणे कळलं आहे की, आपण जातधर्माच्या संकुचित अस्मितांमध्ये, राजकीय पक्षांच्या गटांत विभागलो, तर हे आंदोलन सहजपणे संपुष्टात येईल. शेतकऱ्यांचं या गोष्टीवर ठाम असणं, खूप काही सुचवून जातं. या अर्थानं या शेतकरी आंदोलनानं आपल्याला यापुढील वाटचालीची वाट आणि दिशा दाखवली आहे, असं म्हणता येईल.

‘सहभावनेवर आधारित सहनागरीजीवन’ हेच सूत्र या देशाच्या मूळ स्वभावप्रवृत्तीला धरून आहे. विद्वेषी विचारांनी या सहभावनेला ठेच लागते. त्या त्या काळात अशा विद्वेषी विचारांनी प्रेरित होऊन काही लोकांनी या देशाच्या अखंडतेला अडचणीत आणायचा प्रयत्न केला, मात्र देशातील सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुता या तत्त्वानं असे विघातक प्रयत्न हाणून पाडलेले आहेत. आपल्या न्याय्य मागण्या सनदशीर, अहिंसात्मक पद्धतीनं मागताना या किसान आंदोलनात पाचशेपेक्षा अधिक शेतकरी शहीद झाले. एखाद्या आंदोलनात इतके लोक शहीद होणं, ही स्वातंत्र्योत्तर भारतातील पहिलीच घटना असावी, जी लोकशाहीवादी, घटनादत्त देशासाठी अत्यंत दुर्दैवी आणि अशोभनीय आहे.

संत नामदेव-कबीर-गुरु नानकजी साहिब-गुरु गोविंदसिंहजी साहिब-शहीद भगतसिंह-महात्मा गांधी-राममनोहर लोहिया अशा व्यापक वारशाच्या ऊर्जाबळावर हे किसान आंदोलन उभे असल्याने शेवटी शेतकऱ्यांचा जय होणारच! आंदोलनात शेतकरी धर्म जगलेल्या सर्व शहिदांना विनम्रतापूर्वक आदरांजली अर्पण करतो...

गांधीजी नेहमी म्हणत, ‘मला एक पाऊलसुद्धा पुरेल.’ या अंकाच्या निमित्ताने खारीचा वाटा म्हणून ‘परंतु’चे हे एक पाऊल...

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शेवटी, गांधी-लोहिया आणि एकूणच शेतकरी विचार, या सगळ्यांना स्पर्श करणाऱ्या केदारनाथ सिंह यांच्या कवितेच्या ओळींची तीव्रतेने आठवण होतेय. शेतकरी, सामान्य माणूस ते श्रीमंत व्यक्ती यांच्यातील थेट नात्यावर या ओळी प्रकाश टाकतात...

वह जो आपकी कमीज है

किसी खेतमें खिला

एक कपास का फूल है...

आपण सूज्ञ वाचक आहात, यापेक्षा ते अधिक काय सांगू... थांबतो... धन्यवाद!

‘परंतु’ :  महात्मा गांधी आणि डॉ. राममनोहर लोहिया विशेषांक - संपादक सुशील धसकटे,

पाने : १८८, मूल्य - २५० रुपये.

अंकासाठी संपर्क - ७२४९० ०८८२४, ९८२२२ ६६९३९

.................................................................................................................................................................

लेखक सुशील धसकटे कादंबरीकार आणि प्रकाशक आहेत. ‘जोहार’ ही त्यांची कादंबरी बहुचर्चित ठरली आहे.

hermesprakashan@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Narendra Apte

Thu , 11 November 2021

"शेतकरी जगला, तर देश जगेल; शेतकरी संपला तर हा देशही संपेल." हे अगदी खरे आहे. आपला लेख वाचल्यावर मला सुचलेले काही मुद्दे: असे आहेत: (१) अल्प भूधारकांचे आणि अन्य शेतकऱ्यांचे सध्याचे कोणतेआहेत? ते कशामुळे निर्माण झाले आहेत? ते फक्त गेल्या पाच-सात वर्षातील आहेत की बरेच जुने आहेत ? (२) राजकारणी फक्त मोठ्या शेकऱ्यांचे हित सांभाळतात आणि याला कुठलाही राजकीय पक्ष अपवाद नाही. (३) शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी शेतकऱ्यांचे विविध गट आणि उपगट केले तरच वेगवेगळ्या विविध स्तरातील शेतकऱ्यांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील. या प्रत्येक गटात आणि उपगटात किती शेतकरी आहेत या संबंधीच्या आकडेवारीची छाननी करून काही निष्कर्ष नक्कीच काढता येतील. (प्रत्येक गटाचे आणि उपगटाचे प्रश्न वेगळे असतात.) (४) शेतकरी सक्षमीकरण म्हणजे ग्रामविकास आणि ग्रामीण विकास म्हणजेच भारताचा सर्वांगीण विकास हा विचार योग्यच आहे. त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांचे सध्याचे प्रश्न समजून घेणे आवश्यक आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......