‘गॅस चेंबर’: भयप्रद भविष्याचे चित्रण करणाऱ्या ‘अनर्थकथा’ 
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अक्षय शेलार
  • ‘गॅस चेंबर’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 29 September 2021
  • ग्रंथनामा शिफारस गॅस चेंबर Gas Chamber रत्नाकर मतकरी Ratnakar Matkari

“Hell is empty and all the devils are here.” — William Shakespeare

(“नरक रिक्त आहे आणि सर्व राक्षस येथे आहेत.” — विल्यम शेक्सपिअर)  

रत्नाकर मतकरी यांच्या मृत्यूपश्चात प्रकाशित झालेल्या ‘गॅस चेंबर’ या नवीन कथासंग्रहातील कथांमध्ये मृत्यूचे सावट, राजकीय-सामाजिक दडपशाही, नागरिकांवर पाळत ठेवणारी (सर्वेलन्स) सरकारे व खाजगी कंपन्या, अशा बऱ्याचशा गडद संकल्पनांचे अस्तित्व आहे. या कथासंग्रहातील जवळपास सर्वच कथा या ‘डिस्टोपियन’ (जेथील सर्व गोष्टी अत्यंत वाईट असतात अशी एक काल्पनिक जागा) म्हणाव्यात, अशा आहेत. त्या ज्या काळात घडतात, तो काळ काहीएक प्रमाणात पुढेमागे होत असला तरीही प्रत्येक कथेतील विश्वनिर्मिती आणि कथेत घडणाऱ्या गडद छटा असणाऱ्या घटना या डिस्टोपियाकडे सूचना करणाऱ्या आहेत. ज्यात नजीकच्या भविष्यकाळातील गडद कथानके पाहायला मिळतात. 

‘गॅस चेंबर’ ही शीर्षक कथा, ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत!’ आणि ‘ना बजेगी बाँसुरी’ या कथांमध्ये काही समान धागे आहेत. या कथा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक दडपशाही असणाऱ्या काळात घडतात. आणि अशा अस्थिर काळात साहित्य आणि वृत्तपत्रांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत असते. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारशाही गाजवू पाहणाऱ्या सत्ताकेंद्रांना आणि सर्वशक्तिमान व्यक्तींना साहित्य, वृत्तपत्रे यांसारख्या माध्यमांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे वाटते. या कथा साधारणतः अशाच वातावरणात घडतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘गॅस चेंबर’ या कथेमध्ये भारतातील सरकार गेल्या काही वर्षांत इतिहासाची सोयीस्कररीत्या मांडणी करत आहे. जुनी ऐतिहासिक पुस्तके आणि दस्तावेज नष्ट करून नवीन इतिहास रचणे, नव्याने रचलेला इतिहास क्रमिक पुस्तकांमध्ये समाविष्ट करणे यासारख्या घटना या कथेतील विश्वात (खुद्द सरकारी यंत्रणेकडून) घडवून आणल्या जात आहेत. त्यासाठी ‘भारतीय इतिहास संस्करण संस्थान’ या नावाची वेगळी संस्थाच उभारण्यात आलेली आहे! या कथेतील मध्यवर्ती पात्रं अशा जाचक वातावरणात आपले स्वातंत्र्य आणि मुख्य म्हणजे इतिहासाच्या पाऊलखुणा टिकवण्याची धडपड करताना दिसतात.

‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत!’ या कथेमध्येही पुस्तकांवर बंदी आणणे, ती नष्ट करणे; नाटकासारख्या कलाकृतींवर (विशेषतः त्यातील कलाकारांवर) नियंत्रण ठेवणे, सामाजिक-राजकीय लेखक आणि विचारवंतांवर दडपण ठेवणे यांसारख्या घटना घडतात.

तर, ‘ना बजेगी बाँसुरी’मध्ये माहिती अधिकार कायद्याचा वापर करणाऱ्या एका पत्रकारावर त्याने मोठा घोटाळा उघडकीस आणू नये, यासाठी राजकीय दबाव आणण्याचे प्रयत्न होत असतात. या तिन्ही कथांमध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये सत्ताधिशांना आणि त्यांचं साटंलोटं असणाऱ्या खाजगी व्यावसायिकांना छापील मजकुराची वाटणारी भीती प्रतिबिंबित होते. 

‘रश्शीवाला’ या कथेत वास्तवातील खरेखुरे संदर्भ आणि अद्भुताची गुंफण केली जाते. एका विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या छोट्या, सहजासहजी सोडवता येईल, अशा समस्येला राजकीय व धार्मिक रंग दिला जातो. राजकीय पक्ष (विद्यार्थी संघटनांना हाताशी घेऊन) राष्ट्रवाद आणि देशप्रेमाच्या नावाखाली राजकीय व जातीय तेढ वाढवण्यात जी धन्यता मानतात, त्यावर या कथेचा डोलारा उभा राहतो. तर, ‘सुरक्षित’ या कथेमधील विश्वात दहा-बारा वर्षांपूर्वी समाजात बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यानंतर सरकारने बलात्कारांच्या प्रमाणात घट व्हावी, यासाठी स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणली, जी आजतागायत कायम आहेत. स्त्रियांनी नोकऱ्या करण्यावर निर्बंध लादणे, संध्याकाळी सहानंतर स्त्रियांना रस्त्यावर फिरण्यास मज्जाव, इत्यादी अनेक नियम या जगात अस्तित्वात आहेत. मात्र, अशा निर्णयांमुळे स्त्रियांचे आयुष्य अधिक सुखकर झाले की, स्त्री-पुरुषांमधील दरी अधिकच वाढत गेली, हा प्रश्न कायम आहे. 

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

‘सर्वेसर्वा’ आणि ‘डोरोथीची गोष्ट’ या कथांची मांडणी रूपककथेच्या प्रकारात मोडणारी आहे. ‘सर्वेसर्वा’ या कथेचं नाव सुचवतं त्याप्रमाणे ही कथा एका सर्वशक्तिमान नेत्याबाबत आहे. सर्वेसर्वाचा पक्ष हा देशातील एकमेव पक्ष उरलेला असून गेल्या काही वर्षांत त्याने व त्याचा उजवा हात असणाऱ्या व्यक्तीने देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवले आहे. मात्र, हे करत असताना त्यांना अनेक लोकांचे शिव्याशाप लाभले आहेत. या कथेत साधारणतः अशाच लोकांच्या आठवणी सर्वेसर्वाला हॉन्ट करत आहेत. लोकशाही ते एकाधिकारशाही असा प्रवास, नैतिक मूल्यांचा ऱ्हास, सर्वेसर्वाचा आपण काहीतरी महान कार्य करत आहोत हा भ्रम, असे अनेक मुद्दे या कथेतून समोर येतात.

‘डोरोथीची गोष्ट’मध्ये खरे तर ‘द विझार्ड ऑफ ओझ’ या प्रचलित कथेची पुनर्मांडणी केली जाते. या दोन्ही कथा वास्तवाऐवजी रुपकं व प्रतीकात्मक मांडणीवर अधिक लक्ष केंद्रित करणाऱ्या आहेत. प्रतीकात्मक मांडणी ही ‘रश्शीवाला’ या कथेतही असली तरी तिथले कथाविश्व वास्तववादी तऱ्हेचे आहे. याउलट ‘सर्वेसर्वा’ आणि ‘डोरोथीची गोष्ट’ या कथांमधील विश्वं कल्पनारम्यता आणि अद्भुतावर अधिक भर देणारी आहेत. वास्तववादी मांडणीपासून फारकत घेतल्याने असेल, पण या दोन कथा संग्रहातील इतर कथांच्या तुलनेत काहीशा कमी प्रभावी वाटतात. 

या संग्रहातील कथांमधील वातावरण निर्मिती फारच उद्बोधक आहे. कथांमधील वर्णनातून कथेच्या विश्वातील सामाजिक-राजकीय अस्थैर्य, पात्रांच्या मनातील अस्वस्थतेची भावना यासारख्या बाबी ठळकपणे चितारल्या जातात. उदाहरणार्थ, ‘अलीकडे त्यांच्या हत्या नाही करत!’सारख्या कथेमध्ये मध्यवर्ती पात्राच्या सभोवतालात वाढत असलेल्या मंदिरांचा केलेला वापर फारच सूचक आहे. ही सूचकता गेल्या काही वर्षांत वाढलेली देवळांची संख्या, जागोजागी दिसणाऱ्या देवळांतून येणारा आवाज, लोकांनी नोकरीवरून घरी न जाता थेट मंदिरात जमण्याच्या घटना अशा अनेक तपशिलांतून येते.

शिवाय, या आणि इतरही कथांमध्ये धार्मिक असहिष्णूता, धार्मिक व जातीय तेढ या संकल्पना अस्तित्वात आहेत. या पार्श्वभूमीवर या कथेतील देवळांच्या वाढत्या संख्येचा आणि त्यानुषंगाने येणाऱ्या इतरही घटनांचा उल्लेख फारच महत्त्वाचा ठरतो. कथा डिस्टोपियन असल्याने समकालीन जगापासून संदर्भ घेणारे, तरीही बऱ्याच अंशी वेगळे असणारे कथाविश्व निर्माण करण्यात, या वर्णनांचा आणि तपशिलांचा महत्त्वाचा वाटा आहे. 

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

.................................................................................................................................................................

या सर्व कथांमध्ये वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या तिन्हींचा एक संबंध जोडता येतो. कारण, बहुतांशी कथांची सुरुवात होते तेव्हा भूतकाळात बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या दिसतात. ज्यात हुकूमशाही, एकाधिकारशाही गाजवणारी सरकारे, खाजगी व्यावसायिकांचे सत्ताधीशांशी असलेल्या संबंधांमुळे घडून येणाऱ्या अनैतिक गोष्टी, सांस्कृतिक-धार्मिक स्तरावरील असहिष्णू वातावरण अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.

याखेरीज हा आंतरसंबंध केवळ लिखाणातील विश्वापुरता मर्यादित नसून पुस्तकाबाहेरील जगाशीही नाते सांगणारा आहे. कारण, पुस्तकांवरील बंदी आणि ती जाळण्याच्या घटना, सिनेमा-नाटकांवरील बंदी, विचारवंतांना राजकीय कैदी म्हणून डांबून ठेवणे, यांसारख्या घटना सदर पुस्तकाबाहेरील विश्वातही घडल्याचे आपण वेळोवेळी पाहिलेले आहे. इतिहासात आणि वर्तमानातही अनेक देशांतील सरकारांनी इतिहासाचे पुनर्लेखन केल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाच्या कौतुकाचे पोवाडे गाण्याच्या आविर्भावात खरे तर सत्य आणि असत्यामधील रेषा पुसट करण्याचे प्रयत्न केले जाणे आपल्याला नवीन नाही. त्यामुळे अशा घटनांभोवती कथानके विणत रत्नाकर मतकरी सामाजिक-राजकीय आशय मांडताना दिसतात. कथासंग्रहातील कथा या नजीकच्या भविष्यकाळात घडत असल्या तरी त्यात वर्तमानाचे प्रतिबिंब पाहता येणेही सहज शक्य आहे. ज्यात या कथांमध्ये कुणाही विवेकी व्यक्तीच्या मनातील दुःस्वप्ने प्रत्यक्षात उतरताना दिसतात. 

‘गॅस चेंबर’ या कथासंग्रहातील सातही कथा लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या शेक्सपिअरच्या वाक्याची प्रचिती देणाऱ्या आहेत. राजकीय, सामाजिकदृष्ट्या येणाऱ्या काळात समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने प्रवास करत आहोत, हे मांडणाऱ्या या कथा वैश्विक स्वरूपाच्या आहेत. (असे असले तरी त्यांतील स्थानिक व देशपातळीवरील संदर्भांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.) इंग्रजी साहित्यात ‘डिस्टोपियन साहित्य’ आणि चित्रपटांची मोठी परंपरा आहे. भारतात मात्र या दोन्ही कलांमध्ये अशा प्रकारच्या कलाकृतींची कमतरता आहे. तशी ती कमतरता मराठी साहित्यातही जाणवते. या संग्रहात समाविष्ट असलेल्या कथा रत्नाकर मतकरींनी अलीकडील काळात (२०१५ ते २०१९ दरम्यान) लिहिलेल्या आहेत. त्यामुळे ‘गॅस चेंबर’ या कथासंग्रहात या कथा एकत्रितपणे प्रकाशित होणे, हे समयोचित तर आहेच, पण त्याचबरोबर मराठी साहित्यातील ‘डिस्टोपियन’ कलाकृतींच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. 

‘गॅस चेंबर’ - रत्नाकर मतकरी

समकालीन प्रकाशन, पुणे

मूल्य - २०० रुपये

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......