उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ ‘हिंदुत्वा’चा चेहरा नसतील काय?
पडघम - देशकारण
अनिल सिन्हा
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशचा नकाशा
  • Thu , 17 June 2021
  • पडघम देशकारण योगी आदित्यनाथ Yogi Adityanath उत्तर प्रदेश Uttar Pradesh नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP संघ RSS करोना Corona

सध्या देशातली प्रसारमाध्यमे, विशेषत: उत्तर प्रदेशातली, याची चर्चा करताहेत की, उत्तर प्रदेशच्या येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपला चेहरा बनवणार की नाही? भारतातला ‘गोदी मीडिया’ चुकीच्या प्रश्नांना केंद्रस्थानी आणून मूळ मुद्द्यापासून लोकांची कशा प्रकारे दिशाभूल करत आहे, याचं उदाहरण म्हणून या चर्चेकडे पाहता येईल. ही चर्चा ‘गोदी मीडिया’ने स्वत:हून सुरू केलेली आहे की, संघ-भाजपच्या रणनीतीकारांनी करून दिलेली आहे, हे सांगणं कठीण आहे.

गेल्या काही दिवसांत भारतीय तसेच विदेशी प्रसारमाध्यमांमध्ये गंगेमध्ये तरंगणाऱ्या प्रेतांची आणि तिच्या किनाऱ्यावरील वाळूत अर्धवट पुरवलेल्या प्रेतांवरील कपडे खेचून काढण्याची छायाचित्रं झळकली. काही वृत्तवाहिन्यांचे साहसी पत्रकार, सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न उचलून धरणारे पत्रकार आणि गैर-पत्रकार उत्तर प्रदेशमधील दयनीय आरोग्य व्यवस्थेमुळे कित्येक लोक आपल्या कुटुंबसदस्यांना कशा प्रकारे गमावून बसले आहेत, याच्या कहाण्या जगासमोर आणत होते. बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे बेहाल झालेल्यांच्या कथाही माध्यमांच्या चर्चेचा विषय झाल्या होत्या. त्यातच बातमी आली की, केंद्रीय नेतृत्व योगींवर नाराज आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत योगींना चेहरा बनवायचं की नाही, याविषयी विचार करत आहे. ज्या प्रश्नांची उत्तरं योगी, मोदी आणि संघ यांच्याकडे नाहीत, त्यापासून या बातमीनं लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम केलं. हे सांगण्याची गरज आहे की, करोनाच्या गैरव्यवस्थेत योगी, मोदी आणि भाजप सारखेच जबाबदार आहेत. जर ऑक्सीजन सिलेंडरचा तुटवडा, लस देण्यात दिरंगाई आणि करोनावर विजय मिळवण्याची फेक घोषणा, यासाठी मोदी जबाबदार असतील, तर दवाखान्यांची कु-व्यवस्था, लोकांना मरणाच्या दारात सोडून देणं आणि त्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्काराची पर्वा न करणं, यासाठी योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

आपण जरा माध्यमांमधून अधोरेखित केला जाणारा योगी-मोदी यांच्यातला फरक आणि संघ-भाजप यांचं केंद्रीय नेतृत्व यांची तथाकथित नाराजी समजावून घेऊ. मुळात केंद्रीय नेतृत्वाचा नेमका अर्थ काय आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. वरकरणी भाजपचं नेतृत्व जे. पी. नड्डा आणि अन्य पदाधिकारी करताना दिसतात. पण हे सर्वांना माहीत आहे की, भाजपचा लगाम अमित शहा यांच्या हातात आहे. आणि ते नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार किंवा सल्ल्यानुसारच सर्व काही करतात. संघाचा अंतिम निर्णय सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे आहे.

आता करोनाकाळात हे नेतृत्व काय करत होतं, ते पाहू. करोनाकाळातही ‘हिंदुत्वा’चं अभियान न थांबता चालू होतं, याविषयी प्रसारमाध्यमं अळीमिळी गुपचिळी धरून आहेत. करोनामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या वाढत असतानाच ५ आगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राममंदिराचं भूमिपूजन केलं. स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही घटना यासाठी ओळखली जाईल की, देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांनी मिळून एका धार्मिक स्थळाचं भूमिपूजन केलं. तेव्हा वर्तमानपत्रांनी हे अधोरेखित केलं की, हिंदुत्वाच्या या खुल्या व्यवहारात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांच्यामध्ये कशा प्रकारे एकमत दिसलं.

भाजपच्या याच हिंदुत्व-अभियानाअंतर्गत अयोध्येमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. एकाच वेळी साडेपाच लाख दिवे लावून ‘विश्वविक्रम’ करण्यात आला. हेच अभियान चालू ठेवत हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरवण्यात आला. त्यासाठी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना जाहीरपणे हरिद्वारला येण्याचं आमंत्रण दिलं. करोनाची दुसरी लाट भारतात कहर माजवत होती, तेव्हाच पंतप्रधानांच्या आशीर्वादानं हा कुंभमेळा चालू होता.

करोनाकाळात मोदी आणि योगी फक्त ‘हिंदुत्वा’चं अभियानच एकमेकांच्या सोबतीनं चालवत होते, असं नाही, तर त्याचा राजकीय रथही दोघं मिळून खेचत होते. योगी बिहार विधानसभा निवडणुकीपासून हैद्राबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत ‘कट्टर हिंदुत्ववादी चेहरा’ म्हणून प्रचारात सामील झाले होते. कमकुवत अर्थव्यवस्था, निरक्षरता आणि कुचकामी आरोग्यव्यवस्था असलेल्या राज्याचा मुख्यमंत्री करोनाकाळातल्या कठीण परिस्थितीत हे सगळं करत होता, हे विशेष. तेव्हा त्यांना संघ किंवा भाजपच्या नेतृत्वानं थांबवलं नाही. ते थांबवणार तरी कसं, कारण तेही तर तेच करत होते. तेच नेतृत्व आता येत्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांच्या कारभारावर नाराज आहोत, असं सांगत आहे. म्हणजे लोकांना असं वाटावं की, योगी नसते तर पंतप्रधान मोदींनी लोकांच्या व्यथा-वेदना कमी केल्या असत्या.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

संघाच्या इशाऱ्यानुसार ‘गोदी मीडिया’ अजून एक किस्सा पुढे करत आहे की, मोदी-शहा यांचा तर योगींना सुरुवातीपासूनच विरोध होता. पण त्यांना संघाच्या दबावामुळे मुख्यमंत्री करावं लागलं. त्याचबरोबर हेही सांगितलं जात आहे की, योगी कधीही संघात नव्हते. ते तर ‘हिंदूवाहिनी’ चालवत होते. तिचा संघाशी संबंध नव्हता. हे जर सत्य असेल तर यातून हे स्पष्ट होतं की, सत्ता मिळवण्यासाठी ते काहीही करू शकतात. कुणालाही आपला चेहरा बनवू शकतात आणि त्याला नेता म्हणून देशभर फिरवूही शकतात.

योगींनी ‘बळीचा बकरा’ बनवलं जाऊ शकतं का? आणि करोनाकाळात लोकांचा जीव वाचवण्यासाठी काहीही न केल्याचा दोष त्यांच्यावर थोपवून स्वत:ला वाचवलं जाऊ शकतं? यात कुठलीही शंका नाही की, गरज पडल्यास संघ तसं करायला मागेपुढे पाहणार नाही. त्याने याआधी लालकृष्ण आडवाणी यांच्याबाबतीत असं केलेलं आहे. भाजपसाठी आपलं सबंध आयुष्य पणाला लावणाऱ्या या नेत्याला अडगळीत टाकून देऊन नरेंद्र मोदी यांना आपला नेता बनवलं. संपूर्ण पक्ष मोदी-शहा यांच्या हाती सोपवला. परंतु असं योगी यांच्याबाबतीत करण्यात काही व्यावहारिक अडचणी आहेत. कट्टर हिंदुत्वाचा चेहरा बनलेल्या योगींकडून तो हिसकावून घेण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल. इतक्या जवळ आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते शक्य वाटत नाही. आणि केवळ मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक जिंकणं शक्य नाही. कारण त्यांची प्रतिमा आता बरीच बिघडलेली आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सत्तेविरोधातल्या लाटेपासून स्वत:चा सामना करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? पहिला प्रयत्न तरी लोकांची नाराजी कमी करण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी काही पावलं उचलली जाऊ शकतात. दुसरा प्रयत्न समाजवादी पार्टीच्या सरकारमुळे असमाधानी असलेल्या समुदायांना आणि नेत्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यात मायावती यांच्या पक्षाचाही समावेश आहे. याशिवाय नव्या उमेदवारांना तिकीटं देऊन नवी आश्वासनं दिली जाऊ शकतात.

पण त्यांचं खरं शस्त्र आहे सांप्रदायिक द्वेष. ते हे शस्त्र पुन्हा आजमावून पाहण्यासाठी काही ना काही मार्ग शोधतीलच. करोना महामारीने सगळ्याच समुदायातल्या लोकांना सरकारी उपेक्षेचं दर्शन घडवलं आहे. दु:खाचं नातं नकळत तयार झालं आहे. आपले कुटुंबसदस्य, शेजारी आणि गाववाले यांना स्मशान आणि कब्रस्तानमध्ये पाठवून पाठवून ते आंबून गेले आहेत. त्यांच्या पाण्यांनी भरलेल्या डोळ्यांत द्वेषाचं पीक उगवणं हे सोपं काम नाही.

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

लेखक अनिल सिन्हा ज्येष्ठ पत्रकार आहेत

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख https://janchowk.com या पोर्टलवर प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा - https://janchowk.com/beech-bahas/whether-yogi-will-be-hindutva-face-of-up-or-not/

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा