मोदी सरकार, भाजप आणि संघ परिवार ‘पॉझिटिव्हिटी अभियान’ चालवत आहे. कुणासाठी? त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी की सर्वसामान्य जनतेसाठी?
पडघम - देशकारण
कुंडलिक विमल वाघंबर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 21 May 2021
  • पडघम देशकारण कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Corona Virus पॉझिटिव्हिटी अभियान Positivity Abhiyaan सकारात्मकता अभियान

आपल्या देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. केंद्र सरकारच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे रोज कित्येक लोक मृत्युमुखी पडत आहेत. करोनापेक्षाही ऑक्सिजनअभावी अनेकांचे मृत्यु झाले आहेत. राजधानी दिल्लीत ऑक्सिजन, औषधं, बेड्स, व्हेंटिलेटर इत्यादींसाठी लोकांवर वणवण भटकण्याची पाळी आलीय. काही दिवसांपूर्वी गोव्यामध्येही ऑक्सिजनअभावी काही लोक मृत्युमुखी पडले. ‘माँ गंगा’ वगैरे जिचा उल्लेख केला जातो ती सध्या पाण्यानं नाही, तर प्रेतानं भरून वाहत आहे.

ही भीषण परिस्थिती सरकारच्या नाकर्तेपणामुळे निर्माण झालेली आहे. पण तेच सरकार लोकांनी अशा परिस्थितीत सकारात्मक व्हावं, यासाठी ‘पॉझिटिव्हीटी अभियान’ राबवत आहे. या अभियानाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० मे रोजी जनतेशी संवाद साधणार आहेत. भाजपच्या आयटी सेलने ‘पॉझिटिव्हीटी’चा प्रचार चालू केलेला आहे. त्यात किती लोक मेले याचा विचार करू नका, तर किती लोकांचे प्राण वाचून ते घरी गेले, याचा विचार करा, असे सांगण्यात येत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी तर ‘पॉझिटिव्हीटी अनलिमिटेड’ यावर एक भलंमोठं व्याख्यानच दिलंय.

त्यात त्यांनी म्हटलंय – “अपने लोग चले गए, उनको ऐसे असमय चले जाना नहीं था। परंतु अब गए, अब तो कुछ नहीं कर सकते। अब जो परिस्थिति है उसमें हम हैं। और जो चले गए, वो तो एक तरह से मुक्त हो गए. उनको इस परिस्थिति का सामना अब नहीं करना है। हमको करना है।”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अशा पद्धतीनं चहूबाजूनं जोरदार प्रचार चालू झालेला आहे. सरकारच्या गलथान कारभारामुळे ज्या जनतेतले कित्येक लोक मरत आहेत, त्याच जनतेला सरकार ‘पॉझिटिव्ह व्हा’ म्हणून सांगत आहे. किती दुटप्पीपणा आहे हा! गुंड आणि बदमाश लोकही असं करत नाहीत. एवढ्या मोठ्या अपयशाची, नामुष्कीची अजूनही कोणी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली नाही. कुणीही कोणाचाही राजीनामा घेतलेला नाही आणि कोणाची नोकरीसुद्धा गेलेली नाही.  

भव्यदिव्य प्रचार अभियानं राबवून ‘स्मशान’ झालेल्या देशात ‘पॉझिटिव्हीटी’ कशी येणार? मोठमोठ्या भाषषांनी अन गोडधोड बोलण्यामुळे येणार का? सरकारला ‘पॉझिटिव्हीटी’ आणायची एवढीच गरज वाटत असेल, तर ‘सेन्ट्रल विस्टा’ बांधण्यापेक्षा देशातल्या प्रत्येक जिल्ह्यांत मोठी रुग्णालयं बांधावीत. म्हणजे ‘सवा-सो करोड़ देशवासी’यांना बरं वाटेल, दिलासा मिळेल. उद्योगपतींवर कर लावून जनतेसाठी मोठं आर्थिक पॅकेज जाहीर करावं. सर्व जनतेच्या खात्यात कमीत-कमी १०,००० रुपये टाकावेत. बेरोजगारांना बेरोजगारी भत्ता द्यावा. ६० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना भरघोस पेन्शन योजना लागू करावी. सार्वत्रिक व दर्जेदार रेशन व्यवस्था पूर्ववत चालू करावी. मोफत व चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यावं. आरोग्य सुविधा सर्व सोयी-सुविधांनी युक्त व मोफत करावी. हे करायला सरकार तयार असेल तर ‘पॉझिटिव्हीटी अभियान’ राबवण्याची गरजही पडणार नाही.

या सर्व गोष्टी मोदी सरकार सहजपणे करू शकतं, पण यातलं काहीही करणार नाही. कारण या सरकारला असं वाटतं की, २०२४ची लोकसभा निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत जनता सर्व काही विसरून जाईल. जसे लोक नोटबंदीच्या वेदना विसरून गेले. एटीएमच्या रांगेत थांबून हकनाक मेले, पण काळं धन काही परत आलं नाही, मोदी मात्र निवडून आले! जीएसटीनं व्यापाऱ्यांचं, लहान उद्योगांचं कंबरडं मोडलं. तेही लोक विसरले. तरुणांनी आपली बेरोजगारी विसरून मतदान केलं. सरकारनं नोटबंदीचा अन जीएसटीचा असा काही ‘पॉझिटिव्ह’ प्रचार केला की, लोकांमध्ये भरभरून ‘पॉझिटिव्हीटी’ आली. त्यामुळे सरकार या वेळीही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचाराच्या कामाला लागलं आहे. आपल्या भव्यदिव्य प्रचार यंत्रणेमुळे सरकारला आशा आहे की, करोनाच्या या संकट काळातही लोक ‘पॉझिटिव्ह’ होतील.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

असं म्हणतात की, जनतेची स्मृती अल्पकाळ असते. १५ लाख खात्यात जमा होणार होते, ते ती विसरेल. दोन कोटी रोजगारांचं आश्वासन विसरेल. ‘अच्छे दिना’ची घोषणा विसरेल. एटीएमच्या रांगेत थांबव लागल्याचं दुःख विसरेल. कारण त्यांना कुठंतरी वाटत होतं की, आपल्या पंतप्रधानांनी मनापासून चांगला निर्णय घेतला आहे… जरी त्याचे परिणाम वाईट झाले असले तरी. कदाचित आतापर्यंतचे सर्व घाव लोक विसरतील.

पण हेही विसरेल का की, केवळ ऑक्सिजन, औषधं, बेड्स न मिळाल्यानं अनेकांचे कुटुंबसदस्य, नातेवाईक, आप्त, मित्र मृत्युमुखी पडले? आपले आई-वडील, आजी-आजोबा, मुलगा-मुलगी, भाऊ-बहीण, जवळचे मित्र, शेजारी हे साध्या साध्या सोयी-सुविधा न मिळाल्याने आपल्या डोळ्यासमोर गेले, त्याचं कित्येकांना दुःखही व्यक्त करता आलेलं नाही. गळाभेट घेता आली नाही की, त्यांच्या प्रेताला सन्मानानं अग्नी देता आलेला नाही. आपल्या घरातल्यांना शेवटचं पाहणंही नशीब होत नाही. त्यांचा अगदी मूलभूत अधिकारही डावलला जात आहे, हे लोक कसं विसरतील?

आपली बँकेतली आयुष्यभराची बचत काढून, घर-दार-कार विकून ऑक्सिजन सिलेंडरसाठी, औषधांसाठी, बेड्स-व्हेंटिलेटरसाठी वणवण भटकावं लागलं तरी आपल्या जिवाभावाचे लोक वाचले नाहीत, हे ते कसं विसरतील? ते विसरून त्यांनी ‘पॉझिटिव्ह’पणाचा आव कसा आणावा? कोणी आपली सगळी कमाई विकून, लोकांना ऑक्सिजन सिलेंडर पोहचवत होतं, औषधं देत होतं, त्यांनाही सरकारनं अटक केली. हे लोक कसं विसरतील? सरकार बिनकाळजाचं असेल, लोकांना मात्र अजूनही काळीज आहे. जे आपल्या माणसांसाठी धडधड करतं. ज्याला हे पाहून दुःख होतं की, निस्वार्थीपणानं मदत करणाऱ्या लोकांनाही हे सरकार सोडत नाही.

‘गंगा माँ ने मुझे बुलाया है’ असं म्हणणारे पंतप्रधान आता गंगा प्रेतानं भरून वाहत आहे, तेव्हा त्यावर एकही शब्द बोलायला तयार नाहीत. हे लोक कसं विसरतील? गंगेकडे पाहून लोक ‘पॉझिटिव्ह’ होतील? ज्या-ज्या वेळी ते गंगेवर जातील, त्या-त्या वेळी त्यांना तिथं प्रेतंच दिसतील! ज्या वेळी आपला प्रिय भारत जगासमोर ऑक्सिजन सिलेंडरसाठी, व्हेंटिलेटरसाठी भिकेचा कटोरा घेऊन उभा होता, त्याच वेळी देशात पंतप्रधानांसाठी कोट्यवधी रुपयांचा महाल बनत होता. तो महाल आणि नवीन संसद देशातील जनतेला भविष्यात करोनाकहराची भयानक आठवण करून देत राहील. एकीकडे पंतप्रधान निवडणुकीत आणि कुंभमेळ्याच्या आयोजनात मग्न होते, तर दुसरीकडे देश जळत होता…

ज्या जनतेचे प्रचंड हाल झालेले आहेत, ती मोदींच्या राष्ट्रवादी चौकटीतील ‘देशभक्त’ जनता होती. ती नोटबंदीच्या वेळेला, जीएसटीच्या वेळेला मोदींसोबत होती. शिकलेल्या बेरोजगारांना मोदी पकोडे तळण्याचा सल्ला देत होते, तेव्हा याच जनतेने तो सल्ला शिरसावंद्य मानला होता. नागरिक दुरुस्ती कायद्याच्या (CAA) आणि NRCच्या निर्णयाला समर्थन करणारीसुद्धा हीच जनता होती. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जेव्हा प्रचंड आंदोलन केलं, तेव्हा त्यांना ‘देशद्रोह्यां’चं लेबल लावलं गेलं. हे लेबल लावण्यात जनताही सामील होती. शेतकऱ्यांनी आपल्या न्याय मागण्यासाठी प्रचंड मोठं आंदोलन सुरू केलं, तेव्हा त्यांनाही ‘दहशतवादी’, ‘आतंकवादी’ अशा उपमा देण्यात आल्या. तेव्हाही जनता शांतच होती. आतापर्यंतच्या मोदींच्या प्रत्येक निर्णयाला बहुसंख्य भारतीय जनतेनं साथच दिली आहे.

पण तरीही जनतेची एवढी वाईट अवस्था झाली आहे. ही जनता आज दुःखात बुडालेली आहे. आता हीच वेळ आहे की, जनतेनं आपल्या समदुःखी लोकांच्या आठवणी जागृत कराव्यात, शोषित लोकांच्या दुःखाशी जोडून घ्यावं. असं म्हणतात की, माणूस दुःखामध्ये, वेदनेमध्ये परस्परांशी लवकर जोडला जातो. त्या तुलनेत ‘पॉझिटिव्हीटी’ ही फार वरवरची गोष्ट असते. आपल्याला वरवरचा सोहळा हवाय की, परस्परांशी अधिक खोलवरचं नातं निर्माण करावयाचं आहे?

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आपल्याला या दुःखातून निर्माण झालेली जाणीव घेऊन शोषित समूहांशी संवाद करायला हवा, ज्याच्यावर गेल्या काही वर्षांत अस्तित्वाचंच संकट निर्माण झालं आहे. आपल्याला त्या स्थलांतरित कामगारांकडे जायला हवं, ज्यांना गेल्या लॉकडाऊनमध्ये हजारो किलोमीटर उपाशीपोटी पायपीट करावी लागली. त्या कामगारांच्या अतिव वेदनांना आपल्या काळजात जागा द्यायला हवी. आपल्याला परत मागे जाऊन रोहित वेमुलाचं पत्र वाचायला हवं आणि त्यानंतर उभ्या राहिलेल्या आंदोलनातील कंप आपल्या शरीरात निर्माण होऊ द्यायला हवेत. उन्नाव, हाथरस आणि त्यासारख्या कित्येक घटनांची आठवण आपल्या हृदयात जागृत करायला हवी. आणि एक कोमल फूल आपल्या हृदयात उमलू द्यायला हवं-आहे. जे आपल्यातलं माणूसपण तेवत ठेवेल.

मॉब लिंचिंग, CAA, NRC अशा कित्येक घटनांनी मुस्लीम समाजाची जी अवस्था झालेली आहे, ती आपल्या मनावर उमटू द्यायला हवी. त्यात आपल्याला या देशातल्या मातीवरचं अगाध प्रेम दिसेल. ते प्रेमच आपल्याला त्यांच्यासोबत उभं राहण्याचं बळ देईल. शेतकरी आंदोलनात जाऊन काळ्या आईच्या दुःखाशी मिठी मारायला हवी. त्या शेतकऱ्यांची वेदना आपल्या शरीराच्या रोमारोमात सामावून घ्यायला हवी. ती वेदना, त्या काळ्या आईचा सुगंध आपल्याला लढण्याची प्रेरणा देईल.

या सर्व स्मृतींना आपल्याला उजाळा द्यायला हवा. त्यांच्या आगीत सरकारचा प्रोपगंडा जळून खाक व्हावा. त्या उजेडात आपण सर्वजण स्पष्टपणे एक दिसू. तीच सर्वजण एकत्र येऊन लढण्याची सुरुवात असेल… एक नवीन खुशहाल अन सुजलाम-सुफलाम भारत घडवण्यासाठी....

..................................................................................................................................................................

लेखक कुंडलिक विमल वाघंबर लोकायत संघटना (पुणे)चे कार्यकर्ता आहेत.

kundalik.dhok@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा