महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांमध्ये भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक तपासले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे!
पडघम - राज्यकारण
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चे बोधचिन्ह आणि या आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक छायाचित्र
  • Thu , 25 March 2021
  • पडघम राज्यकारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC स्पर्धा परीक्षा Competitive Exams मानसिक ताण बुद्यांक करिअर Career सोशल मीडिया Social Media

“Everyone thinks of changing the world, but no one thinks of changing himself.” ― Leo Tolstoy

गेले काही दिवस ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ (MPSC) अनेक कारणांनी चर्चेत आहे. त्यातील एक कारण म्हणजे शीतल फाळके या २७ वर्षीय वयाच्या तरुण महिला अधिकार्‍याची आत्महत्या हेही आहे. त्या तीन वर्षांपूर्वी लखणी येथे तालुका महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून रूजू झाल्या होत्या. या दुर्दैवी घटनेचे कारण काहीही असू शकते, परंतु एवढ्या मोठ्या पदावरील व्यक्ती जर असे पाऊल उचलत असेल तर बाकीच्यांनी काय करावे?

एमपीएससीच्या परीक्षेमुळे अलीकडच्या काळात बराच गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी ही परीक्षा देणाऱ्या एका तरुणाने निराशेच्या भरात आत्महत्या केली. महाराष्ट्रातल्या बहुसंख्य आई-वडिलांची असते, तशी या परीक्षेला बसून मी तहसीलदार व्हावे, अशी मा‍झ्याही आई-वडिलांची फार इच्छा होती. पैशापेक्षा मिळणारा सामाजिक मान व वरची कमाई, हे या नोकरीसाठी कमालीचे आकर्षण निर्माण करणारे दोन घटक आहेत.

कोविडमुळे लांबलेली एमपीएससीची परीक्षा आणि त्यामुळे रस्त्यावर उतरलेले तरुण-तरुणी कशातून जात असतील, याची कल्पना आपण करू शकत नाही. ही परीक्षा अनेक कारणांनी लोकांचे स्वप्न असते किंवा तसे स्वप्न तयार होण्यास अनेक गोष्टींनी हातभार लावला आहे. सरकारी अधिकारी होणे, हे मराठी आई-वडिलांचे विशेष करून ग्रामीण व निमशहरी भागातील लोकांचे स्वप्न असते. गेल्या काही वर्षांत संगणक क्षेत्र भरभराटीला आल्यावर संगणक अभियंता बनण्याची लाट निर्माण झाली, त्यातून या नोकरीसाठी लागणारी कौशल्ये आपल्यात आहेत किंवा नाहीत याचाही विचार अनेकांनी केला नाही. त्यातील अनेकांना तंत्रज्ञानाचा वेग न झेपल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच काहीसे एमपीएससीच्या परीक्षांच्या बाबतीत घडत आहे.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भारतात शक्यतो ‘काय जमते व कशाला पुढे वाव आहे’ यापेक्षा कशात पैसे जास्त व चटकन मिळतात, यावरून करियरची निवड होते. त्यात काही वावगेही नाही, कारण भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणार्‍या देशात निवडीला वाव कमी आणि स्पर्धा जीवघेणी असते. तरीही अगदीच मनाजोगते काम नाही मिळाले, तरी काही प्रमाणात क्षमता व आवड यांची योग्य सांगड घालून केल्या जाणाऱ्या कामाला वाव आहे.

एमपीएससीच्या एकंदरीत परीक्षांचे स्वरूप हे केवळ बौद्धिक क्षमता (त्यात प्रामुख्याने स्मरणशक्तीची कसोटी लागते) आहे, मात्र केवळ पुस्तकी परीक्षा पास करून या अधिकार्‍यांना दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक कौशल्य येतीलच असे नाही. अधिकारी म्हणून काम करताना लोकांशी सतत संपर्क येतो आणि त्यांच्याकडून काम करून घेणे, ही नोकरशाहीची जुनी पद्धत आहे. मात्र त्यामुळे काम होईलच याची खात्री नसते.

स्पर्धा परीक्षांच्या (यात भारतीय सैन्य दल भरतीही येते) सर्व उमेदवारांना मानसशास्त्रीय कसोटीतून जावे लागते. त्यामुळे फक्त बौद्धिक पातळी नाही तर भावनिक पातळीसुद्धा तपासली जाते. एक संघ म्हणून वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी वेगवेगळ्या परिस्थितीत काम करताना ते कसे वागतील, याची कल्पना येते. कारण बहुतेक कामांत बौद्धिक पातळीपेक्षा भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक उपयोगी ठरतो. याचमुळे अचाट बुद्धिमत्ता असलेल्या आईनस्टाइनला काय काम द्यावे, हे त्याच्या विद्यापीठातल्या सहकाऱ्यांना कळायचे नाही. सर्वसाधारण बुद्धिमत्ता, परंतु लोक हाताळण्याचे कौशल्य हेच सध्याच्या काळात यशाचे गणित आहे. अत्यंत हुशार व शिस्तबद्ध अधिकारी हे अनेक वेळा कोरडे व माणूसघाणे असतात. लोकांशी जुळवून न घेता आल्याने त्यांची वारंवार बदली होते, हे अनेकांच्या बाबतीत घडलेले आपण बघितले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या परीक्षांमध्ये भावनिक व सामाजिक बुद्ध्यांक तपासले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘स्वत:चा ताण व कठीण भावना हाताळणे’ यांना या अधिकार्‍यांना रोजच सामोरे जावे लागते. मात्र अनेक जण ताण कमी करण्यासाठी चुकीची पद्धत वापरतात, त्यातून पुढे व्यसने लागतात.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

अधिकारी निवडताना मानसशास्त्रीय कसोट्या वापरणे, निवड झालेल्या अधिकार्‍यांना सुरुवातीलाच तसे प्रशिक्षण देणे आणि पुढेही गरजेनुसार प्रशिक्षण देत राहणे, हे अधिकारी व व्यवस्था दोन्हीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

एमपीएससी वा यूपीएससीची तयारी करताना आयुष्यातील महत्त्वाची वर्षे वाया गेल्यावर हातात फारसे काही उरत नाही. त्यामुळे ही तयारी तार्किकदृष्ट्‍या करायला हवी. महाराष्ट्रात एमपीएससीचे आकर्षण इतके जास्त आहे की, ही परीक्षा उत्तीर्ण होऊन मिळणारी नोकरी आपल्याला झेपेल का, याचा विचार बहुतेक वेळा केला जात नाही. मा‍झ्या आई-वडिलांना सरकारी नोकरी असल्याने त्यांची इच्छा असूनही मी सरकारी नोकरीचा मार्ग निवडला नाही, कारण मी त्यात टिकणार नाही याची मला जाणीव होती. मात्र बहुतेक एमपीएससीच्या मार्गाने जाणाऱ्या तरुणांना याची जाणीव नसते किंवा तशी ती करून देण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. मानवी मेंदूची शिकण्याची क्षमता व शरीराची ऊर्जा ही तारुण्यात अर्थातच नैसर्गिकरित्या जास्त असते. त्यामुळे जसे वय वाढते, त्यानुसार स्मरणशक्ती व विचारशक्ती कमी होत जाते. या हिशेबाने तारुण्यात येणार्‍या काळासाठी सर्व दृष्टीने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे जाहिरात व सोशल मीडिया या भुलभुलैयाच्या मागे न लागता वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

हे पहा - How memory and thinking ability change with age

एमपीएससी वा यूपीएससीसाठी साधारण २२व्या वर्षापासून तयारी सुरू केली जाते. त्यात बऱ्यापैकी खर्चिक शिकवण्या असतात. त्या बराच वेळ घेतात. त्यामुळे बहुतेकांना नोकरी करणे जमत नाही, मात्र तरीही वर्षभर थोड्या प्रमाणात का होईना इतर नोकरीसाठी काही लोकांशी संपर्क ठेवणे अत्यावश्यक आहे. एका वर्षात परीक्षा पास होऊ, या नादात अनेक विद्यार्थी दुसरा पर्याय समोर ठेवत नाहीत. व्यवस्थापन शास्त्रात प्लॅन A, प्लॅन B  व अगदी प्लॅन C असतो. त्यामुळे एक जमले नाही तरी दुसरे काहीतरी तयार असेल, याची खात्री असल्याने माणूस हवेत अधांतरी राहत नाही. मात्र बहुतेक तरुण इथेच चुकतात.

वास्तववादी विचार केल्यास काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या, तर त्रास व टोकाचे निर्णय घेतले जात नाहीत. काही वेळा परीक्षा दिल्यावर जर यश येत नसेल, तर हे आपल्याला जमणार नाही, हे वेळीच ओळखून दुसरा पर्याय निवडणे हे मानसिक संयमाचे लक्षण आहे. मात्र नकार व अपयश पचवणे अनेकांना जमत नाही. त्यातून पुढे वैफल्य येते. तसेच एमपीएससी पास होऊन पुढे व्यवस्थेत गेल्यावर अनेकांना ते जमते किंवा आवडते असेही नाही, त्यामुळेही भ्रमनिरास होऊ शकतो.

या सर्व बाबतीत आई-वडिलांची भूमिका मोलाची ठरते. त्यामुळे मुलांवर दबाव न आणता त्यांना त्यांचे निर्णय घेऊ देणे गरजेचे आहे. जी मुले-मुली आई-वडिलांचे ऐकून एमपीएससी वा यूपीएससीची परीक्षा देतात आणि ती पास होऊन कामही करतात, त्यांच्यात कितपत निर्णयक्षमता व नेतृत्वगुण असतात, हे ओळखण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाही. आई-वडिलांच्या भावनेपेक्षा मुला-मुलींना काय झेपते हे जास्त महत्त्वाचे आहे. ही बाजू नीट समजावून घेतली गेली तर पालक मुलांना भावनिकदृष्ट्या त्रास देणार नाहीत.

सोशल मीडियामुळे अनेक आभासी गोष्टी आपल्याला खऱ्या वाटतात. मॅरेथॉन जिंकणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या छायाचित्रातून त्याचा रोजचा संघर्ष कळणे अशक्य आहे. आणि अशा अधिकार्‍यांनीसुद्धा आपल्या सोशल मीडियावरील पोस्टसमुळे चुकीचा संदेश तर जात नाही ना, याचे भान ठेवायला हवे. खरे तर अशा अधिकार्‍यांसाठी एक नियमावली तयार करण्यात यावी, त्यामुळे त्यांच्याकडून अनावधानाने काही चुकीच्या गोष्टी लोकांसमोर जाणार नाहीत.

नोकरी संपूर्ण आयुष्य बदलू शकते हे मृगजळ आहे. एमपीएससीमुळे तहसीलदार झालेल्या तरुणांचे आयुष्य हे छायाचित्रामध्ये दिसते, तसे परिपूर्ण असते का? तसे ते कोणत्याही नोकरी/कामामुळे असू शकत नाही. आयुष्यातील आनंद अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यात आपली नाती, शारीरिक व मानसिक आरोग्य या गोष्टी प्रामुख्याने येतात. कामातून मी सगळा आनंद मिळवतो/ते किंवा काम हेच माझे ध्येय आहे, असे सांगणारी मंडळी एकतर खोटे तरी बोलत असतात किंवा त्यांना दुसरे आयुष्यच माहीत नसते. काही गोष्टी जमल्या नाही तर त्या सोडून जे जमते त्यात प्रगती करणे, हे आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी पुरेसे आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सोशल मीडियामुळे आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात सेलिब्रिटी झालो आहोत. पूर्वी सरकारी अधिकारी काम करायचे ते फक्त अधिकारी म्हणून. त्यात सामाजिक भान असायचे. त्यांची भूमिका एकच म्हणजे सरकारी अधिकार्‍याचीच असायची. मात्र आता सरकारी अधिकारी ‘सोशल मीडिया सेलिब्रिटी’ म्हणूनही वावरतात आणि अनुसारक मिळवायला त्यांनाही छायाचित्रे व शब्द वापरावे लागतात. ही भूमिकेची सरमिसळ त्या अधिकाऱ्यांवर कसा परिणाम करते, हे जाणून घ्यायची मला उत्सुकता आहे.

सध्याच्या काळात नोकरी/व्यवसाय हे कौशल्यावर आधारित असून त्यात सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणे आवश्यक आहे. बदल हा वेगवान पद्धतीने आपल्यावर परिणाम करत असून त्यानुसार स्वत:ला बदलवणे गरजेचे आहे. राजकारण्यांना अनेक गोष्टी समजावून सांगणे हे सरकारी अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. मला पगार मिळतो व मा‍झ्या भविष्याची सोय झाली आहे, असा दृष्टीकोन ठेवल्यास सर्वच सरकारी कर्मचार्‍यांना पुढचा काळ कठीण जाणार.

मी गेले १५ वर्षे खासगी क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे काम केले नाही तर पैसे मिळत नाहीत आणि कामाशिवाय पैसे घेणे जमत नाही. हीच वृत्ती सरकारी क्षेत्रातसुद्धा यायला व आणायला हवी. कामगिरीनुसार पगार व बढती ही मानव संसाधन पद्धत सरकारी कामात आणणे अत्यावश्यक आहे.

सरकारी अधिकारी वर्गाने जर वेळीच जुन्या अनेक पद्धती बदलून नवीन आत्मसात केल्या नाहीत, तर त्यांच्यामुळे उभा असलेला व्यवस्थेचा डोलारा कोसळायला फारसा अवधी लागणार नाही.

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा