कामाचे ४८ तास केल्याने आपण सगळेच ‘जेम्स बॉन्ड’प्रमाणे अलिप्तपणा व एकटेपणा सोसत केवळ कर्मचारी म्हणून आयुष्य जगू आणि तेसुद्धा अल्पजीवी...
पडघम - देशकारण
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 16 March 2021
  • पडघम देशकारण कर्मचारी कामाचे तास

You will never feel truly satisfied by work until you are satisfied by life.”

- Heather Schuck, The Working Mom Manifesto

‘Skyfall’ या बॉन्डपटात जेम्स बॉन्डची बॉस एम ही हेरांची नियुक्ती कशाच्या आधारावर होते, हे सांगताना ‘अनाथ असणे हे मुद्दाम बघितले जाते’, असे एक कारण सांगते. कारण अनाथांना कशाचीही ओढ नसते. त्यामुळे ‘Work Hard, Party Harder’ या धर्तीवर बॉन्ड जीवावर उदार होऊन कसलीही तमा, भीड व भावना यांची पर्वा न करता काम फत्ते करतो. बॉन्ड आपल्या वैयक्तिक आयुष्यात कुठल्याही स्त्रीशी भावनिक जवळीक निर्माण होऊ देत नाही आणि त्याला कुणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईकही नसतात. थोडक्यात बॉन्ड हा हाडामांसाचा रोबोट असतो. तो फक्त दिलेले टास्क यशस्वीरित्या पूर्ण करतो. तो जर काम करताना मृत्युमुखी पडला तर त्याच्यामागे कोणी नसल्याने कंपनीवरसुद्धा कुठलीही जबाबदारी राहत नाही. रोबोट खराब झाल्यावर स्क्रॅप केला जातो आणि भंगारमध्ये विकला जातो.

२००० नंतर जगभरातील, विशेषकरून भारतातील कामगारांच्या कामाच्या स्वरूपात कमालीचा बदल झाला. तंत्रज्ञान बदलल्याने कामाचे स्वरूप जास्त यंत्रवत झाले आणि कामगार/कर्मचारी हे त्यांच्या मानवी साथीदारांपेक्षा विविध प्रकारच्या यंत्रांसोबत वेळ घालवू लागले. मशीनचे बटण दाबले की, मशीन दिलेल्या सूचनेनुसार काम करते, मात्र माणसाला भावना असल्याने त्याला बटण दाबून मनमर्जीने चालवता येत नाही. जगभरातील ज्या कामगार व कर्मचारी हक्क संघटना कामगारांच्या हक्कासाठी लढतात, त्यासुद्धा गेल्या दोन दशकांतील कामगारांच्या व कर्मचार्‍यांच्या आयुष्यातील हा सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा बदल टिपू शकलेल्या नाहीत. चाणाक्ष व धूर्त अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी कामाचे स्वरूप अशा पद्धतीने आखले की, प्रत्येक कॉर्पोरेट कर्मचार्‍याला आपण ‘बॉन्ड’ असल्याचा भास व्हायला सुरुवात झाली.

भारतीय कर्मचार्‍यांनी कधीही न अनुभवलेला पैसा, ग्लॅमर अचानक व मोठ्या प्रमाणात आले, पण तो कसा हाताळावा याचे प्रशिक्षण कधीच मानव संसाधन विभागाने कर्मचार्‍यांना दिले नाही. त्यामुळे बौद्धिक काम करणारे कम्प्युटर इंजीनिअर हे कधी बॉन्डसारखे अलिप्त व आत्मकेंद्रित झाले, हे त्यांनासुद्धा कळले नाही.

..................................................................................................................................................................

हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

करुणा, दया, सहसंवेदना या गोष्टी हद्दपार होऊन एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा व टोकाचा अलिप्तपणा कर्मचारी व कामगारांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. समाधान व आनंद यापेक्षा Adrenaline rush (धोकादायक काम करताना जाणवणारी उत्तेजावस्था) केंद्रस्थानी ठेवणारे कामाचे स्वरूप आहे. मानवी संसाधन विभागाने ज्या काळजीपूर्वक पॉलिसी तयार करायला हव्या होत्या, त्या पद्धतीने ते न होणे, भारतीय समाजाची संकुचित मानसिकता ज्यात जात व धर्म यांचा अति-पगडा, भारताची लोकसंख्या व सोशल मीडिया यामुळे आपण एकमेकांना समजून घेण्यापेक्षा एकमेकांशी स्पर्धा व कुरघोडी करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. त्यामुळे बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्यांना आयते रोबोट बनलेले मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे.

‘3 Idiots’ या चित्रपटातील प्रोफेसर सहस्त्रबुद्धे विद्यार्थ्यांना ‘Life is race, if you don't run fast, someone will trample you and run ahead,’ असे सांगतात, त्या वेळेस ते आपली शिक्षणपद्धती किती चुकीची आहे, याचा पुरावा देतात. एकमेकांशी स्पर्धा करत आपण परीक्षार्थी म्हणून जेव्हा काम करायला सुरुवात करतो, त्या वेळेस ९९ टक्के लोकांना त्यांचे सहकारी हे सहकारी न वाटता प्रतिस्पर्धी वाटतात. त्यामुळे कितीही प्रयत्न केला तरी २२-२५ वर्षे अशी मानसिकता घेऊन जगणार्‍या लोकांना अचानक खेळीमेळीने काम करायला शिकवणे जिकिरीचे असते.

मी स्वत: २००६ ते २०१९ या काळात मनुष्यबळ संसाधन व औद्योगिक मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करताना हे अनुभवले आहे. तसेच वर्गमित्र-मैत्रिणी, सहकार्‍यांना अचानक आलेले यश व पैसा यामुळे बदलताना बघितले आहे. मा‍झ्या पीएच.डी.च्या अभ्यासाच्या वेळी आयटीत काम करणार्‍या बहुतेकांनी ताण असल्याची कबुली दिली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

परदेशातील लोकसंख्या कमी असल्याने उपलब्ध मनुष्यबळाची योग्य काळजी घेणे, त्या लोकांसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे परदेशातील HR पॉलिसी या आपल्या देशातील HR पॉलिसीपेक्षा बर्‍याच चांगल्या असतात. याउलट भारतात मनुष्यबळाची कमतरता नसल्याने ‘वापरा व फेकून द्या’ या तत्त्वावर काम चालते. त्यामुळे भारतातील सार्वजनिक आरोग्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. बहुतेक कर्मचारी व कामगार शारीरिक व्याधी (उदा., उच्च रक्तदाब, मधुमेह व मानसिक आजार - औदासीन्य, ताण, चिंता, एकटेपणा, व निद्रा नाश) यांचा सामना करत आहेत.

हे पहा - India Inc looks to deal with rising stress in employees

भारतासह जगात बहुतेक ८ किंवा ८.३० तासांचा कामाचा दिवस असतो. त्यात ३० मिनिटे जेवणाच्या सुट्टीसाठी असतात. परंतु चुकीच्या कामाच्या पद्धतीमुळे बहुतेक भारतीय लोक १०-१२ तास काम करतात, त्यात प्रवासाचा वेळ गृहीत धरला जात नाही.

१९व्या शतकाच्या सुरवातीला रॉबर्ट ओवेन या माणसाने एक चळवळ सुरू केली. तिचे घोषवाक्य होते - ‘Eight hours labor, eight hours recreation, eight hours rest.’ म्हणजे ‘आठ तास काम, आठ तास करमणूक, आठ तास विश्रांती’ असं होतं. त्याच वेळेस केवळ नफ्याचा विचार करून हेंरी फोर्ड यांनी त्यांच्या कर्मचार्‍यांचा पगार वाढवून कामाचे तास दिवसाला ८ केले. त्यामुळे फोर्ड यांनी दोन वर्षांत दुहेरी नफा कमवला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

याच सुमारास औद्योगिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची शाखा उदयास येत होती. त्यात कामासंबंधी मानवी वर्तणुकीचा अभ्यास करून काम जास्त फायदेशीर व आनंददायी कसे बनवता येईल, यासंबंधी वेगवेगळे प्रयोग होत होते. मानवी मेंदू कुठल्याही कामात ९०-१२० मिनिटांनंतर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्याला थोडा वेळ विश्रांतीची गरज असते. ती मिळाली की मेंदू योग्य काम करतो. त्यामुळे ८ तासांचा जरी दिवस असला तरी आपण ८ तास काम करत नाही. या वेळात काही लोक नियोजन करून उत्तम काम करतात, तर बहुतेक काम पूर्ण करू शकत नाहीत, चुका करतात. त्याने ताण येऊन आरोग्यावर परिणाम होतो. 

औद्योगिक मानसशास्त्र काम योग्य प्रकारे कसे करायचे, जेणेकरून मानवी शरीर व मन योग्यरित्या कसे काम करेल, हे सांगते. कारण कर्मचारी केवळ कर्मचारी नसून व्यक्ती, नागरिक, कौटुंबिक सदस्य असतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची जबाबदारी त्याच्या कंपनीचीसुद्धा असते. मायक्रोसॉफ्ट या कंपनीने जपान येथे केलेल्या प्रयोगात ४ दिवसांचा आठवडा (८ तास काम) केल्यावर कामाची गुणवत्ता व प्रमाण दोन्ही वाढल्याचे दिसून आले आहे.

हे पहा - Microsoft experimented with a 4-day work week in its Japan office, and productivity jumped by 40%

स्वीडन, फिनलंड यांसारख्या प्रगतीशील व आनंदी देशात कामाचे तास कमी करणे (६ तास) किंवा कामाचे दिवस कमी करणे, असे प्रयोग केले जाण्याचे मुख्य कारण कर्मचार्‍यांचे मानसिक आरोग्य नीट राखणे व कार्बन फूटप्रिंट कमी करणे, हे आहे. त्यांना या प्रयोगात यश मिळताना दिसत आहे.

हे पहा - Will Finland introduce a four-day week? Is it the secret of happiness?

भारतातसुद्धा कामाच्या तासांच्या बाबतीत काही बदल करण्याचे सरकारकडून सुतोवाच करण्यात आले आहे. एका बातमीनुसार भारतात १ एप्रिल २०२१ पासून कामाचे तास आठवड्याला ४०वरून वाढवून ४८ आणि कामाचे दिवस ४ करण्यात येतील, असे सांगण्यात येत आहे. ‘Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020’ नुसार हे बदल करण्यात येत असून त्याच्यामागील कारण नीट सांगितले गेलेले नाही. तसेच ही व्यवस्था अनिवार्य नसून संस्थांना त्यात दोन पर्याय दिले आहेत. त्यात ४८ तासांचे काम पूर्ण होईल याची काळजी संस्थेने घेतली पाहिजे. 

हे पहा - 4-day working week in India? Modi govt finalising new labour rules

भारतातील काम करण्याची पद्धत व भारतीयांचा कामासंबंधीचा दृष्टीकोन बघता ही व्यवस्था कितपत यशस्वी होईल, हे अजून तरी सांगता येणार नाही. करोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ केले जात असले तरी पुढे जाऊन कामासाठी प्रवास सुरू झाल्यानंतर १२ तास व प्रवासासाठी २ ते ३ तास असा १५ तासांचा दिवस असलेले भारतीय कर्मचारी झोप, विश्रांती व मनोरंजन यासाठी कसा वेळ काढतील, हादेखील प्रश्न आहे. यामुळे आधीच गंभीर असलेले कर्मचार्‍यांच्या आरोग्याचे प्रश्न वाढतील. त्याचा परिणाम उत्पादनावर व कार्यक्षमतेवर होईल. अगोदरच निद्रानाशाचे बळी असलेले भारतीय कामाचे तास वाढल्याने झोपेच्या सुखाला व फायद्यांना मुकतील. त्याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर व सार्वजनिक आरोग्यावर नक्कीच होईल.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

Dr Christopher Barns यांनी ‘Washington University’मध्ये केलेल्या संशोधनानुसार अपुरी झोप घेणारे कर्मचारी दुसर्‍यांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. स्वत:च्या चुकांसाठी दुसर्‍याला दोष देतात. ज्यांना रात्री काम करावे लागते अशा व्यक्तींना सोडून जे रात्री झोप घेऊ शकतात, पण Netflix, online surfing, gaming, porn, social media यांमुळे घेत नाहीत. अशा व्यक्तींची कामाची गुणवत्ता कमी असणे, खोट बोलणे, काम उद्यावर ढकलणे, नैतिकता कमी असणे असले प्रकार संशोधनात Matthew Walker यांना आढळून आले आहेत. त्यांना असेही आढळले की, अपुऱ्या झोप घेणार्‍या कर्मचाऱ्यांमध्ये मेंदूची तार्किक क्षमता कमी होऊन उतावळेपण वाढून कामाच्या ठिकाणी चुकीचे व आवेशपूर्ण निर्णय घेतात. ‘कधीही न झोपणारे शहर’ म्हणून ओळख असणारी मुंबई मानसिक रोगाचे शहरही आहे.

हे पहा - Depression rates high among Mumbai residents

२००९मध्ये SAP Indiaचे मुख्य रंजन दास यांनी दुर्दैवाने ४२व्या वर्षी हृदयविकारामुळे आपला जीव गमावला. अत्यंत तंदुरुस्त असलेल्या दास यांना जिममधून बाहेर पडताना हृदयविकाराचा झटका आला. कारण ते चार-पाच तास रोज झोपायचे.

हे पहा - Lets revisit the shocking Death of Ranjan Das to understand the importance of healthy sleep in life 

Matthew Walker यांनी केलेल्या संशोधनानुसार अपुरी झोप ही सर्जनशीलता, मानसिक स्थैर्य, सामाजिकता व प्रामाणिकपणावर परिणाम करते. त्यामुळे दिलेल्या वेळा/शब्द न पाळणे, कामचुकारपणा, चंचलपणा/अस्थिरता, गॉसिप अशा सगळ्या गोष्टींचा अपुरी झोप घेणार्‍या कर्मचाऱ्यांवर होतो. असे कर्मचारी ताणाखाली वावरतात, व्यसनाला लवकर जवळ करतात आणि चिंता, औदासीन्य यांसारख्या मानसिक आजारांना लवकर बळी पडतात. अपुरी झोप पचनसंस्थेवर परिणाम करते. त्यामुळे कर्बोदके व गोड खाण्याची इच्छा वाढून लठ्ठपणा वाढतो. या सर्वांचा परिणाम कामगारांच्या प्रतिष्ठेवर होऊन कामावरून काढले जाणे, काम न मिळणे असे प्रकार घडतात. अशा प्रकारे वैफल्यग्रस्त होऊन शेवट वाईट होऊ शकतो.

१९व्या शतकाच्या सुरवातीला फ्रँक गिल्बर्थ व लिलियन गिल्बर्थ या दाम्पत्याने औद्योगिक मानसशास्त्राचा पाया रचला. त्या आधारे जगभरात कामगार व कर्मचारी यांच्या कल्याणासाठी नव-नवे प्रयोग करण्यात येतात. भारतात काम करण्याची शास्त्रोक्त पद्धत अत्यंत अल्प प्रमाणात वापरली जाते. जगात कामाचे तास कमी करून त्याची गुणवत्ता व काम करणार्‍यांचे आयुष्य आनंदी करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भारतात मात्र कामाचे ४८ तास करून ‘बॉन्ड’प्रमाणे आपण सगळेच अलिप्तपणा व एकटेपणा सोसत केवळ कर्मचारी म्हणून आयुष्य जगू आणि तेसुद्धा अल्पजीवी असेल…

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा