अदृश्य तरीही सर्वत्र (राष्ट्रीय स्वयंसेवक) संघपरिवार!
पडघम - माध्यमनामा
जयदेव डोळे
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज
  • Tue , 19 January 2021
  • पडघम माध्यमनामा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS भाजप BJP पत्रकारिता Journalism पत्रकार Journalist वृत्तवाहिन्या News Channels डावे Leftist उजवे Rightist

काय हे, रिपब्लिकन स्वयंसेवक समूहाला जिथे तिथे समाजवादी अन डावे दिसतात, तसे आणि अगदी तस्सेच भारतात डाव्यांना जिथे तिथे संघवाले दिसतात. कावीळ झालेल्या माणसाला म्हणजे सगळीकडे पिवळे दिसू लागते, तसेच हे. एकदा एका संघवाल्याने एका डाव्याला हिणवले की, ‘तुम्हाला संघाची कावीळ झालीय.’ डावा मोठा खवट अन हजरजबाबी होता. म्हणाला, ‘हो! सारे चड्डीवाले दिसतात आम्हाला. पण कावीळ झालेलीय म्हणताच आहात तर तुमच्या चड्ड्या पिवळ्या दिसतात मला, का कोण जाणे! पिवळ्या चड्ड्या घालता की चड्ड्या पिवळ्या होतात, ते सांगता का जरा? चड्डी पिवळी होणे याचा अर्थ काय ते माहीत असणारच.’ तो संघवाला होता. त्याने नंतर पुन्हा ‘संघाची कावीळ झालीय’ असे कुणाला म्हटले नाही. शिवाय संघाने चार वर्षांपासून चड्डीची पूर्ण विजार केल्याने त्यांना आता ‘चड्डीवाले’ म्हणणेही बरे नाही. बाळूचा बाळाराव झाला, त्याला आपण काय करणार ना?

तर आपला विषय चाललाय डाव्यांना सर्वत्र संघवाले दिसू लागले याचा. सर्वत्र म्हणजे कुठे? सरकार, नोकरशाही, पोलीस, न्यायसंस्था, प्रसारमाध्यमे, साहित्य व कला, विज्ञान, तंत्रज्ञान, लष्कर, शिक्षण, संस्कृती अशा शेकडो क्षेत्रांत… सरकारचे समजले. संघवाल्यांनी निवडणूक जिंकून ते तयार केलेले. सरकार संघाचे म्हटले की, नोकरशाही तशी वागणारच. त्यामुळे हे दोन घटक गृहीत धरू की, तिथे संघाचा वरचष्मा आहे. बाकीची ठिकाणे एक तर स्वायत्त किंवा खाजगी तरी समजली जातात. तिथे हा संघाचा आहे, त्याला कामावर लावा, असे सांगून वा ठरवून काही करता येत नाही. कारण प्रत्येक संघवाला त्या कामाला सत्पात्र असेलच असे काही नाही. ते स्वत:ला लायक समजत असतील तरी! प्रभात शाखेत जाऊन आल्यावर त्यांना आपल्या कामाला घराबाहेर पडताना काळी टोपी, पांढरा शर्ट, तपकिरी विजार, काळे बूट, लाठी या गणवेषात तर जाता येत नाही ना! खरे तर कोणी काय कपडे घातले, त्यावरून कोणाची नेमकी ओळख आपल्याला कधी होत नसते. त्याला फक्त आपले प्रधानसेवक अपवाद. त्यांना म्हणे कपड्यांवरून माणूस ओ‌ळखता येतो. एका जाहीर भाषणात त्यांनी कपड्यांवरून माणसाची ओळख होते, असे म्हटल्याचे स्मरते बुवा!

तरीही डावे का म्हणत असावेत की, ‘सगळीकडे संघवाल्यांचा भरणा झालेलाय?’ तिकडे पश्चिम बंगालच्या निवडणुकीत बऱ्याच डाव्या मतदारांनी ममताला धडा शिकवायचा म्हणून भाजपला मते दिली होती. आता काय होईल माहीत नाही.

..................................................................................................................................................................

आंबेडकरांना सहन करावा लागलेला विकृत व अविचारी वैरभाव या व्यंगचित्रांमधून उघड होतो. त्याचबरोबर ऐतिहासिक अन्याय सहन केलेल्या आंबेडकरांचं वास्तविक चरित्रही उजेडात येतं.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीमध्ये खरेदीसाठी करण्यासाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5282/Hasanyawari-Neu-Naka

..................................................................................................................................................................

परवा एक डावा भेटला. म्हणू लागला, ‘‘लोकसत्ता’, ‘लोकमत’, ‘पुढारी’, ‘दिव्य मराठी’, ‘सकाळ’, ‘महाराष्ट्र टाइम्स’ ही दैनिके संघवाल्यांनी काबीज करून टाकलीत!’ गनिमी कावा करून किल्ला ताब्यात घेण्याच्या गोष्टी संघवाले फार चघळून सांगत असतात, तसेच या डाव्याने म्हटले. काबीज केली म्हणजे? ते रांगेत उभे होते अन एका मागोमाग त्यांना संख्या असे ओरडून खुर्च्यांत बसायला सांगितले की काय?

‘ही दैनिकेच नाहीत साले, शाखा आहेत शाखा!’ पुन्हा ठामपणे तो डावा म्हणाला. हा ठामपणा संघवाल्यांसारखाचा ‘ठाकरे सरकार गडगडणार’ या सुरातलाच होता.

त्याला सावरीत म्हणालो, ‘अहो, ही दैनिके डाव्यांची वा समाजवाद्यांची किंवा गांधीवाद्यांची अन शेकापवाल्यांची कधी होती? रिपब्लिकनांची तर ना ती कधी होती, ना राहतील? मग कशाला उगाच ताण करून घेताय जिवाला? ‘ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी’ अशा अप्पलपोट्या बुद्धीचे लोक तिथे असतात कामाला! पत्रकार म्हणवून घेत टोपल्या टाकायचे काम करतात तिथे हे. शाखा काय, गुरुदक्षिणा कशी जमते, दीनदयाळ उपाध्याय यांचा खून कोणी केला, बळराज मधोक जनसंघामधून हद्दपार का झाले, नितीन गडकरींचा पूर्ती घोटाळा कोणत्या वृत्तवाहिनीने अन कोण्या अँकरने फोडला असे काही म्हणजे काही त्यांना माहीत नसते. एवढेच काय, त्यांना गोळवलकर गुरुजींनी काय लिहिले, बाळासाहेब देवरस यांचे कार्य, आणीबाणीत संघाची दुटप्पी भूमिका याबद्दल काहीही ठाऊक नसते. ते शाखांवरही गणवेशात जात नसतात. मग कसे काय संघवाल्या पत्रकारांची दैनिके?’

‘अहो, लेखकमहाशय, ज्या पक्षाची कड घ्यायचीय त्या दैनिकाला, त्यातल्या पत्रकारांना त्या पक्षाची मेंबरशिप नाही घ्यावी लागत, ते मलाही माहीताय. पगारदार पत्रकार असतात ते. त्यांना काय करावे लागते, ते एकदा सांगितले की झाले! ‘छू’ केल्यावर कुत्रा काय करतो? मालकाचे ऐकतो की नाही? मालक संघाकडे प्रेमळ नजरेतून पाहतो म्हटल्यावर नोकराने काय करायचे?’ डावा बिनतोड प्रश्न टाकल्यासारखा कंबरेवर दोन्ही हात ठेवून बोलला.

‘अरे, मग मालकाला संघवाला ठरव ना, सर्व पत्रकार कसे काय संघिष्ट होतील?’ मी

तो चांगलाच पेटला होता. ‘मालक काहीही सांगेल म्हणून कोणता बुद्धिजीवी ते काम करायला तयार होईल सांगा बरे?’, असा सवाल करून तो सुटलाच – ‘तुम्हाला हे तर पटेलच की, भांडवलदारांची दैनिके उजवी असणार. म्हणजे फक्त नफा, स्वार्थ, खप, जाहिराती, सत्ता, प्रसिद्धी यांपुरताच त्यांचा मेंदू नाही काम करत. लोकांना जे जे आवडते ते ते सारे देण्यात त्यांची दैनिके आघाडीवर असतात. धर्म, श्रद्धा, प्रथा, सण, वार, उत्सव, जत्रायात्रा, पूजाअर्चा इत्यादी साऱ्या गोष्टी ते दैनिकातून देत राहतात. ज्योतिष, वास्तुशास्त्र, पंचांग असतेच. म्हणजे या दैनिकांनी अन पत्रकारांनी नास्तिक, निधर्मी, अश्रद्ध, इहवादी वाचक घडवायला काही वेगळे केले नाही. त्यांना तसे करणे नकोही होते! दाभोलकर आणि श्याम मानव यांच्या बातम्या छापून कोणी विवेकवादी होत नाही. किती दैनिके विवेकनिष्ठासारखे वागतात, सांगू शकाल का?’

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

‘खरेच!’ मी जरा चुचकारत म्हणालो, “सामना’मधले किंवा ‘सामना’चे पत्रकार शिवसैनिक कसे असतील? ते तर सारे प्रोफेशनल. आपले कौशल्य शिवसेनेच्या दैनिकासाठी वापरणारे अन त्या बदल्यात पगार घेणारे. प्रत्येकाला वैयक्तिक मते बाळगायचा अधिकार असतोच की…’

डावा आता अधिक खुलला. बोलला, ‘हे मान्य. पोटासाठी ‘पाकड्या’, ‘लांड्या’, ‘हिरवे साप’, ‘लव्ह जिहाद’, ‘मुस्लीम गुंड’ असे छापायला काय भ्यायचे? आपले काम भले, आपण भले! अहो, साहेब इथे व्यक्तीला काय वाटते अन तिचे काय मत हे नाही महत्त्वाचे. दोन व्यक्ती हे शब्द एकमेकांशी बोलताना वापरतात, ते खाजगीत असेल तर त्याने काही बिघडत नाही. पण तुम्ही जाहीर, उघड आणि बातमीलेखनाच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी वाचकांना सांगता तेव्हा काय होईल? तुम्ही बातमी देतानाच कोणाकोणाला ‘नराधम’, ‘नरपशू’, ‘क्रूरात्मा’ आणि ‘राक्षस’ म्हणत दोषी ठरवून टाकत आहात, हे लक्षात येतेय का तुमच्या? तसेच बाकीची दैनिकेही. संपादक आणि मालक ठरवतील त्याप्रमाणे मुकाट काम करतात बिचारे पत्रकार. विचार, दुसरी बाजू, प्रतिवाद, फेरतपासणी, पार्श्वभूमी आदी काहीही न मांडता वाचकांपुढे ढकलून मोकळे होतात सारे. आज आपण सोशल मीडिया शिवीगाळ करतो असे म्हणतो. अहो, ‘सामना’, ‘तरुण भारत’ यांचे जुने अंक काढून पाहा. वृत्तपत्रीय संकेत तिथे काही पाळलेलेच नाहीत. म्हणून म्हणतो की, आज मराठीत दोनच दैनिके शिल्लक आहेत. एक ‘सामना’ आणि दुसरे ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘सकाळ’, ‘दिव्य मराठी’, ‘पुढारी’ यांच्या रूपाने ‘तरुण भारत’!

‘तू म्हणतोयस ते खरेय बरे का! शेतकरी आंदोलन कव्हर करायला एकाही दैनिकाने आपला प्रतिनिधी दिल्लीला पाठवलेला नाही. वाहिन्यांनी तर फक्त संध्याकाळच्या बातम्यांत एखादी झलक देणे सुरू केलेय. इंग्रजी अन हिंदी दैनिके व वाहिन्या जरा जास्त देतात आंदोलनाच्या बातम्या. याचा अर्थ सरकारच्या विरोधात काही येऊ द्यायचे नाही, असा चंग या मराठी पत्रकारितेने बांधलाय. ती लस आलीय तर केवढा कोडकौतुकसोहळा चाललाय यांचा, विचारता सोय नाही! आपोआप आंदोलन, बेकारी, मंदी, शाळा मुद्दे मागे पडलेत. तरीही पत्रकार सारे संघवाले होऊन गेले हे आपल्याला पटत नाही.’ मी

डावा पुरता सटकला. माझे उगाचच तटस्थ पत्रकारितेचे गुणगान चालल्याचा त्याला संशय येऊ लागला. तसे बोलून दाखवत तो म्हणाला, ‘मला सांगा, आमटे कुटुंबात काय चाललेय ही शोधवार्ता होऊ शकते का? संघ परिवारात अशा गोष्टी घडत नाहीत अन त्या माहीत नसतात की काय? सेवाग्रामच्या गांधीवाद्यांत गटबाजी असल्याच्या बातम्या आनंदाने देऊन किती वाचकांना त्यात गोडी वाटली? साबरमतीत भाजपवाल्यांनी गांधीस्मारकात काय गोंधळ करून ठेवलाय ते का नाही सांगत? अमृता फडणीस यांच्या गाण्यांच्या व्हिडिओजचा खर्च किती, कोणी केला, काय मानधन मिळाले आणि अॅक्सिस बँकेत त्या काय काम करत, हे कोणी कसे काय इंटरेस्टिंग मानत नाही? अर्णब गोस्वामीच्या व्हॉटसअॅप मेसेजसमधून किती बातम्या मराठी माध्यमांनी शोधून काढून लावल्या? मराठा आंदोलकांना न चुकता पहिल्या पानाची जागा कशी मिळते हो? किरीट सोमय्या ज‌वळपास रोज काहीतरी गाजावाजा करत राहतात, मग त्यांना उमेदवारी का नाकारली भाजपने? विनोद तावडेसुद्धा सध्या काय करतात अशी चौकशीदेखील चौकस पत्रकार करत नाहीत. अहो, माझे ऐका आता. हे सारे पत्रकार संघवाल्यांच्या आरोपांना टरकून आहेत. तुम्ही काँग्रेसवाले आहात, डावे-समाजवादी आहात, भाजपच्या बातम्या दाबून टाकता, असे आरोप केले की, हे घाबरतात आणि देतात छापून वाटेल ते! संघवाले असतात या दैनिकांवर. मग काय होईल सांगा?’

‘म्हणजे दहशतीखालचे संघवाले झाले की पत्रकार…’ हे एवढे बोलून आणखी काही सांगणार तेवढ्यात मला अडवत तो डावा म्हणू लागला, ‘एक सांगा मला. ते ‘सनातन’ संस्थावाले प्रत्येक वृत्तवाहिनीवर कसे काय झळकू लागले हो अचानक? एकीकडे दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासाच्या बातम्या आणि दुसरीकडे ‘सनातन’चे हे प्रवक्ते, स्वयंसेवक अप्रत्यक्षपणे या तिघांनाच ते कसे ‘हिंदूद्वेष्टे’ होते यावर युक्तिवाद करणार. बोला, संशयितांची बाजू मांडायला कोणाला न्यायालयाव्यतिरिक्त जागा मिळते का? कोणी प्रायोजित केले या ‘सनातन’वाल्यांना, ब्राह्मण जातीच्या प्रवक्त्याला आणि ‘सनातन’च्या वकिलाला? सरकारचा अन संघपरिवाराच्या सत्तेचा दबाव असल्याशिवाय असे नादान, एकांगी अन बेभान लोक कसे येतील स्टुडिओजमध्ये?

संघाने सावरकरांना कायम दूर ठेवले असूनही एका वाहिनीने ‘सावरकर खलनायक की नायक?’ असे शीर्षक दिल्यावरून एकच गहजब केला आणि माफी मागायला लावली. हा परिवाराने मिळवलेला विजय होता. राज्यही फडणवीसांचे होते. हळूहळू डाव्या विचारांचेच नव्हे तर तटस्थ पत्रकार, प्राध्यापक आणि कार्यकर्ते यांनाही चर्चांमधून वगळायला सांगितले जाऊ लागले. बोला आता, असा दबाव व दहशत कशी काय स्वीकारत राहिला हा पत्रकार वर्ग? एक तर तो घाबरत होता किंवा त्यांना शरण गेला होता. म्हणून आम्ही म्हणतो की, अवघा मीडिया संघपरिवारमय झालाय…’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

‘लेका डाव्या, तू एवढा हिशोब ठेवतोस मीडियाच्या भगवेकरणाचा, तुझे स्वत:चे काम काही सुरू आहे की नाही?’ असा प्रश्न विचारून मी त्याला जरा अडचणीत टाकायचा प्रयत्न केला. तर तो म्हणाला, ‘कळतोय मला या प्रश्नाचा रोख. माझे काम काय असे विचारता आणि संघवाल्यांच्या बातम्या मात्र कसलीही खातरजमा न करता छापता. जणू सत्य आणि प्रामाणिकपणा यांची खाणच ते! पण शहानिशा केली की, ते म्हणणार तुम्ही काँग्रेसवाल्यांच्या, राष्ट्रवादीच्या बातम्यांचा खरेखोटेपणा पडताळता का? यांच्या शाखा इतक्या वाढल्या अन पसरल्या अशा बातम्या छापणारी पत्रकार मंडळी एकदाही आपल्या गावात किती शाखा चालतात, याची मोजणी करत नाहीत. याला काय म्हणावे सांगा बरे?

आणि एक सांगू का, पटेल तुम्हाला, संघपरिवार माणसे घडवतो अन राष्ट्रनिर्मिती करतो म्हणजे काय करतो हे तपासले का कोणी? शक्यच नाही. तपासणी, प्रतिप्रश्न, प्रतिवाद, शंका, पृच्छा यांना वर्ज्य म्हणजे वर्ज्य. अगदी उपवासाच्या दिवसांतली दारू जणू! त्यामुळे तुम्ही पहा, हे लोक कुठल्याही दैनिकात काम करणाऱ्यांमध्ये ‘आपला’ कोण, अशी चौकशी करूनच जातात. त्यालाच आपली पत्रके आणि पत्रिका सोपवतात आणि आश्वस्त होतात. तो ‘आपला’ म्हणजे कोण असतो, माहिताय का? तो आवर्जून ब्राह्मण, ओबीसी असतो. आणखी एक सांगू का? कोविडमुळे आर्थिक संकट ओढवले म्हणून अनेक पत्रकार काढून टाकले गेले. त्यात भाजपवर टीका करणारे जास्त का होते, याचा विचार करा. त्यांपैकी कोणी ना डावा होता, ना गांधीवादी. सांगा ना!’

हा डावा तर बेरक्यापेक्षा भारी निघाला… आपल्याहून भारी माणसापुढे आपण काय बोलणार? बाय बाय!

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vividh Vachak

Tue , 19 January 2021

लेखातील शेवटच्या भागाबद्दलच बोलायचे झाले तर जर कोरोना काळात खरोखरच भाजपाविरोधी पत्रकारांच्या नोकऱ्या जात असतील तर याचा एकच अर्थ उरतो: पत्रकारिता ही कधीच निष्पक्ष नव्हती. विशेषत: १९९० च्या दशकात जेव्हा वृत्तपत्रांनी नफेखोरी अंगिकारली तेव्हापासून तर जे वाचकांना हवे आहे तेच द्या ही विचारसरणी बळावली. आता जर बहुतांश वाचक हिंदुत्वाकडे झुकू लागले असतील तर चाणाक्ष वृत्तसमूहांनी हे ओळखले आहे की त्या प्रकारचा मजकूर प्रसिद्ध करण्यात त्यांचा फायदा आहे. सामान्यपणे प्रत्येक वृत्तपत्राचे ॲानलाइन संकेतस्थळ आहे व तिथे कुठल्या लेखकाला जास्त वाचक मिळतात हे शोधून काढणे अत्यंत सोपे झाले आहे. मग ज्यांचा वाचकवर्ग घसरत आहे अशांना नारळ मिळाला तर नवल नाही. ही साधने उपलब्ध नसल्यामुळे व कॅाग्रेसी सरकार असल्याने काही पत्रकारांचे पूर्वी फावले., इतकेच. त्यामुळे ऊठसूठ भाजपाच्या नावाने खडे फोडणे यात हशील नाही.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा