“याच्या एवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही...”
ग्रंथनामा - झलक
जयंत कुलकर्णी
  • ‘वॉल्डन’च्या मराठी अनुवादाचे मुखपृष्ठ
  • Sat , 28 November 2020
  • ग्रंथनामा झलक वॉल्डन Walden हेन्री डेव्हिड थोरो Henry David Thoreau

हेन्री डेव्हिड थोरो या जगप्रसिद्ध लेखकाच्या ‘वॉल्डन’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद जयंत कुलकर्णी यांनी केला असून तो नुकताच मधुश्री पब्लिकेशनने प्रकाशित केला आहे. या अनुवादाला अनुवादाने लिहिलेल्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

थोरो जर्नल लिहायचा. वैयक्तिक जर्नल ठेवण्याची त्या काळात अमेरिकेत फॅशन होती. त्यात दिवसभराच्या नोंदी असत आणि त्यावर विचारही प्रकट केले जात.

एक-दोन टवाळखोरांबरोबरचे प्रसंग सोडल्यास थोरोला कॉन्कॉर्डमध्ये तसा काहीच त्रास नव्हता आणि खरे सांगायचे तर थोरोला त्याची तमाही नव्हती. तो त्याच्या प्रतिष्ठेची, कोण काय म्हणेल याची फिकीरच करत नसे. पण एक दिवस जेव्हा चार्ल्स स्क्राईब्नरकडून त्याला पत्र आल्यावर त्याला आश्चर्यच वाटले. त्याने अमेरिकन लेखकांच्या कोशात त्याचे नाव अंतर्भूत करण्यासाठी त्याची माहिती मागवली होती... थोरोचे नेहमीप्रमाणे काम सुरूच होते. गरीब आयरीश स्थलांतरितांना मदत करणे, सर्वेक्षण करणे, पळून जाणाऱ्या गुलामांना मदत करणे, निसर्गातील घडामोडींच्या नोंदी ठेवणे, हिंडणे, भटकणे, पक्ष्यांच्या येण्याजाण्याच्या नोंदी ठेवणे, कीटकांचा अभ्यास करणे इ. इ. पण संध्याकाळी उन्हे उतरली की, अंधूक संध्याछायातून आणि रात्रीच्या अंधारात त्याचे रानावनातून भटकणे मात्र वाढलेच होते. त्याच्या लिखाणाचा तो आत्माच होता असे म्हटले तरी चालेल. त्या भटकंतीची वर्णने म्हणजे फक्त निसर्गरम्य जंगलाची वर्णने होती असे नव्हते.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

माणसांना माहीत असते की, त्यांनी ज्या जीवन पद्धतीचा अंगीकार केला आहे, ते त्यांच्या अनारोग्याच्या मागचे मूळ कारण आहे. ते न बदलता आपण उपचार करत राहतो आणि मग दैवाला, देवाला, नशिबाला, वैद्याला दूषणे देत बसतो. जीवन पद्धतीत थोडा जरी बदल केला तर मनाचे आणि शरीराचे आरोग्य सुधारण्यास निसर्ग निश्चितच मदत करतो. थोरो म्हणतो ते त्याचे (निसर्गाचे) कामच आहे...

“...ऋतू चक्रातील प्रत्येक ऋतूवर मनापासून प्रेम करा, उत्कटपणे तो ऋतू जगा. प्रत्येक ऋतूत हवा वेगळी असते, पाणी वेगळे असते, फळे वेगळी असतात, त्यामुळे प्रत्येक ऋतूत या सगळ्याचा आस्वाद घ्या. त्या त्या ऋतूत मिळणारी फळे, हवा, पाणी हाच तुमचा आहार असू देत. तुमची पेयं आणि तीच तुमची औषधं असू देत. ऑगस्ट महिन्यात फक्त बेरीजवर राहा. त्या महिन्यात मांसाहार वर्ज्य करा. असं समजा की तुम्ही एखाद्या निर्जन वाळवंटातून किंवा सागरातून प्रवास करत आहात आणि बेरीजशिवाय तिथं काही मिळत नाही. अंगावर जरा वारा घ्या. शरीरातील रंध्रं उघडू द्या आणि निसर्गाच्या लाटांमध्ये, झऱ्यांच्या पाण्यामध्ये, महासागरांच्या लाटांवर स्वार होत त्यात स्नान करा. संसर्ग हा शरीराच्या आतूनच होत असतो. अनैसर्गिक जीवन पद्धतीने थडग्याच्या काठावर येऊन बसलेला आजारी माणूस गवती चहा पितो आणि तेच अनैसर्गिक जीवन जगतो, मग तो बरा कसा होणार? हे म्हणजे मोरीला बोळा आणि दरवाजा उघडा असाच प्रकार झाला. त्याचं त्याच्या जीवनावर आणि निसर्गावर मुळी प्रेमच नसतं. त्यामुळे तो आजारी पडतो आणि खंगत जातो आणि कदाचित मरूही शकतो. कुठलाही डॉक्टर त्याला बरं करू शकेल असं मला तरी वाटत नाही. वसंत ऋतूत तुम्हाला पालवी फुटू दे! शिशिरामध्ये तुमचा रंग पानांप्रमाणे बदलू दे! परिपक्व होऊ दे! कुपीतील औषधासारखं प्रत्येक ऋतूचा अर्क, जो खास तुमच्यासाठी निसर्गाने तयार केला आहे त्याचं प्राशन करा. ग्रीष्म ऋतूच्या अर्काने तुम्ही कधीच आजारी पडणार नाही, पण तुमच्या कपाटात ठेवलेल्या मद्याच्या बाटल्यांनी मात्र तुम्ही आजारी पडू शकता. पिण्यासारखं मद्य असेल तर निसर्गानं बाटलीबंद केलेलं मद्यच! तुम्ही पिता ते नाही! कातडी पिशव्यांतून भरलेलं मद्य पिऊ नका, तर फळांच्या गरात भरलेलं सुमधूर मद्य प्या. निसर्गालाच तुझ्यासाठी खऱ्या मद्याचे प्याले भरू देत, कारण निसर्ग प्रत्येक क्षणी आपल्याला बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. शिवाय तो हे काम खास तुमच्यासाठी आणि विनामोबदला करत असतो. त्याचे अस्तित्व यासाठीच तर आहे. त्याला प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष विरोध करणे हा आपला मूर्खपणा! निरोगी राहण्याची तुमची इच्छा जर तीव्र असेल तर निसर्ग तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदतच करणार हे निश्चित. माणसाला आरोग्यासाठी निसर्गातील काही गोष्टींचाच फायदा कळला आहे… अजून त्याला त्याचे बरेच फायदे कळायचे आहेत असं मला वाटतं. मी तर म्हणतो चांगल्या आरोग्याचं दुसरं नावच मुळी निसर्ग आहे आणि ऋतू आपल्या आरोग्याची वेगवेगळी रूपं आहेत. काही माणसांना वाटते की त्यांना शिशिरात बरं वाटत नाही, किंवा हिवाळ्यात ते आजारी पडतात, पण त्याचं खरं कारण हे आहे की, ते त्या ऋतूशी एक रूप झालेले नसतात...”

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

- थोरोने हे लिहिले त्याच्या जर्नलमध्ये १८५३ साली.

तो मरणाच्या दारात होता आणि त्याच्या मागचं कारण होतं त्याला झालेला क्षयरोग. हे त्याला आता कळून चुकलं होतं. आता तो भटकण्यासाठी जाऊ शकत नव्हता. तेवढी शक्तीच त्याच्या अंगात उरली नव्हती. पण त्याने पूर्वी भटकताना, हिंडताना जी वर्णनं लिहिली होती, ती वर्णनं परत परत वाचून तो तेवढाच आनंद मिळवत असे.

“मला निसर्गाबद्दल दोन शब्द लिहायचे आहेत. पूर्ण स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य, अफाट गूढ निसर्ग आणि मानवाची संस्कृती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे मला समजून सांगायचं आहे.... मी चालण्याबद्दल जे बोलतो, ते चालणं एक स्वतंत्र व्यवसायच आहे, हे मला लोकांना समजावून सांगायचं आहे... माझा जंगलांवर, त्यांच्या मूक गूढ अफाटतेवर विश्वास आहे... माझा गवताळ कुरणांवर लोभ आहे आणि त्या रात्रीवरही, ज्यात मक्याची कणसं वाढतात...”

मला खात्री आहे त्या काळात तो मनाने परत सर्व जंगले, तळी, डोंगर दऱ्या भटकून आला असणार. तेच आयुष्य परत मनाने का होईना जगला असणार. जुन्या दिवसांचे प्रहर मनाने त्याने परत अनुभवले असणार. जशी तब्येत अधिकाधिक बिघडत गेली, तशी त्याच्या बहिणीने त्याला त्याचे लेख तपासण्यास मदत केली. हे सगळे लेख ‘द आटलांटिक’मध्ये छापून येणार होते. त्याचे मित्र त्याला भेटून जात होते. तो जेव्हा तुरुंगात होता तेव्हाचा त्याचा जेलर सॅम स्टेपल्सही त्याला भेटण्यास आला होता. या माणसाने नंतर थोरोला सर्वेक्षणामध्ये मदतनीस म्हणून काम केलं होतं. नंतर त्याने एमर्सनला सांगितलं, “एवढ्या आनंदाने आणि शांत चित्तानं मरताना मी आजवर एकही माणूस पाहिलेला नाही. त्याच्या बरोबर मी एक तास काढला असेल, पण एवढं समाधान मला आयुष्यात कधीही लाभलं नसेल.”

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘लुडो’ : हा सिनेमा पॉपकॉर्न खाता खाता, घरबसल्या टाईमपास म्हणून बघण्यासारखा नाही!

..................................................................................................................................................................

थोरोच्या आत्यानं त्याला विचारलं, “तुझे आणि परमेश्वराचे भांडण मिटलं की नाही? तुमच्यात तह झाला की नाही शेवटी?” थोरोने उत्तर दिलं, “आमचं भांडण होतं हे मला आत्ताच कळतंय!” चॅनिंगला तो जाणार हे पाहून अत्यंत दु:ख झालं. त्याने त्याचं दु:ख बोलून दाखवल्यावर थोरोनेच त्याचं सांत्वन केलं, “चॅनिंग, काही गोष्टींचा शेवट झालेलाच चांगला असतो.”

एक माणूस भेटायला आल्यावर थोरो त्याला म्हणाला, “मरण कोणाला चुकलं आहे? मी लहान होतो, तेव्हाच मला समजले होतं की सगळ्यांना एक ना एक दिवस मरायचं आहे. त्यामुळे मला आता त्याचा खेद होत नाही आणि मला त्याचा शोकही नाही. मृत्यू जेवढा तुमच्या जवळ आहे, तेवढाच माझ्याही.”

अजून एक माणूस त्याला भेटायला आला होता. हा बहुधा धार्मिक असावा. त्याने त्याला मृत्यूनंतरच्या जगाबद्दल सांगण्यास सुरुवात केल्यावर थोरोनं त्याला रोखलं व म्हणाला, “एका वेळी एकाच जगाबद्दल बोललेलं बरं!”

६ मे उजाडला. सकाळ सूर्यकिरणांनी उजळून निघाली होती. हवा मस्त पडली होती. शेजाऱ्याने थोरोला काही हायसिंथची फुलं आणून दिली. ती हातात घेत थोरो शांतपणे त्याच्या कोचावर मागे रेलला. त्याने डोळे मिटले व पुटपुटला, ‘मुस’ ‘इंडियन’.

त्या क्षणी वयाच्या ४४व्या वर्षी त्याने जे डोळे मिटले, ते परत कधीही न उघडण्यासाठी…

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

त्याचा दफनविधी कॉन्कॉर्डच्या पॅरिश चर्चमध्ये करण्यात आला. त्या वेळी त्याला श्रद्धांजली वाहताना एमर्सन म्हणाला, “याच्या एवढा सच्चा अमेरिकन आजवर झाला नाही आणि पुढे होईल असं वाटत नाही.” त्याने त्याच्या निरोगी शरीराचे आणि मनाचे कौतुक केले, “तो अचूकपणे सोळा रॉड चालू शकत असे जे इतरांना पट्टीनेही मोजता येणार नाही. तो भर रात्री जंगलात रस्ता चुकत नसे कारण तो नजरेने जंगल पाहात नसे, तर पायाने पाहात असे. झाडांचा घेर व उंची तो नुसत्या नजरेने पाहून सांगू शकत असे. कुठल्याही प्राण्याचे अचूक वजन तो नजरेने पाहून सांगत असे. डब्यातून पेन्सिल काढायच्या वेळी प्रत्येक वेळा तो एक डझन पेन्सिलीबरोबर काढायचा. तो उत्कृष्ट पोहायचा, बोट वल्हवायचा. पळायचा, स्केटिंग करायचा आणि मला वाटते पायी प्रवास करण्यामध्ये त्याचा हात धरणारा या राज्यात सापडणार नाही. त्याचे शरीर आणि मन जणू एका अज्ञात धाग्याने बांधले गेले होते.”

त्याने नंतर म्हटले, “एवढे तारतम्य बाळगणारा माणूस माझ्या पाहण्यात नाही. त्याचे हात कणखर होते, तर इच्छाशक्ती प्रबळ होती. त्याच्या बुद्धिमत्तेविषयी तर बोलायलाच नको.” भाषणाचा शेवट त्याने एखादी भविष्यवाणी करावी तसा केला-

“आपल्या देशाने किती महान पुत्र गमावला आहे याची अजून आपल्या देशवासियांना कल्पना नाही. त्याने जे काम सुरू केले आहे ते पूर्ण करणे कोणाला शक्य होईल की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे. हे काम अर्धवट टाकून या माणसाने विश्वाच्या रंगभूमी वरून निघून जावे, हे कोणाच्याही मनास न पटणारी गोष्ट आहे. चीड आणणारी गोष्ट आहे. त्याने त्याच्या कामाची ओळख त्याच्या एवढ्याच थोर माणसांना करून दिली असती तर बरं झाले असते एवढेच म्हणणे आपल्या हातात आहे. पण मला खात्री आहे तो समाधानातच गेला असणार. त्याचे हदय विशाल, प्रेमळ व अनुकंपेने सदा भरलेले असायचे. जेथे सद्गुण आहेत, सौंदर्य आहे, निसर्ग आहे तेथे त्याला त्याचे घर सापडो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना!”

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ही प्रार्थना झाल्यावर थोरोचे शव ‘न्यू बरिईंग ग्राऊंड’वर नेण्यात आलं. ही दफनभूमी बेडफोर्ड स्ट्रीटच्या शेवटी आहे. काही वर्षांनंतर त्याचे अवशेष स्लीपी हॉलो सेमेटरी इथं सन्मानानं परत दफन करण्यात आले. कॉन्कॉर्डने आपला सर्वोत्तम पुत्र गमावला होता आणि देशाने एक सच्चा माणूस व त्या काळातील एक अद्वितीय लेखक...

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......