‘साम्राज्य’ : एका ‘सोसायटी’ने ‘सोसायटी’साठी काढलेला कल्पक आणि अनुकरणीय ‘सोसायटी’ दिवाळी अंक
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • ‘साम्राज्य’ दिवाळी २०२०चं मुखपृष्ठ
  • Fri , 27 November 2020
  • पडघम साहित्यिक दिवाळी अंक Diwali Ank साम्राज्य Samrajya सुभाष नाईक Subhash Naik

‘साम्राज्य’चा हा या वर्षीचा पहिलावहिला डिजिटल दिवाळी अंक. या अंकाची अनेक वैशिष्ट्यं सांगता येतील. हा दिवाळी अंक पुण्यातल्या कोथरुड भागातल्या पौड रस्त्यावरच्या ‘साम्राज्य’ या गृहसंकुलाचा दिवाळी अंक आहे. यातील सर्व लेखक हे या सोसायटीतले रहिवासी आहेत. त्याचबरोबर संपादक, चित्रकार आणि मांडणीकारही. थोडक्यात हा सबकुछ ‘साम्राज्य’ सोसायटी दिवाळी अंक आहे.

एका सोसायटीमध्ये इतके लेखक, चित्रकार आहेत, ही कौतुकास्पद म्हणावी अशीच गोष्ट आहे. या अंकामध्ये ज्यांनी ज्यांनी लिहिलं आहे, त्यातले फारच थोडे सराईत वा हौशी लेखक आहेत. बाकीच्या लेखकांकडून लिहून घेणं किंवा त्यांच्या मुलाखती वा शब्दांकन करणं हे सर्व काम संपादक मंडळाने केलं आहे.

त्यामुळे हा अंक केवळ ‘साम्राज्य’ सोसायटीमधल्या सदस्य व रहिवाश्यांमध्ये खाजगी वितरणासाठी तयार करण्यात आलेला आहे. हा अंक बाजारात इतरत्र कुठेही विक्रीसाठी उपलब्ध नाही. मात्र ज्यांना हा अंक वाचायचा आहे, त्यांच्यासाठी तो या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवरून विनामूल्य डाउनलोड करून घेता येईल, वाचता येईल.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://www.booksnama.com/

..................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार सुभाष नाईक यांच्या प्रेरणेतून हा अंक तयार झाला आहे. त्यांना कल्याणी कुलकर्णी, गौरी बर्गी, डॉ. अंजली मरकळे आणि अमृता क्षीरसागर यांनी मदत केली आहे.

या अंकाची कल्पना या संपादक मंडळाला सुचली ती करोनाकाळामुळे. त्याविषयी त्यांनी संपादकियामध्ये म्हटले आहे - “ ‘साम्राज्य’मध्ये आपण दहीहंडीपासून ते होळीपर्यंत सगळेच सण उत्साहात एकत्र साजरे करत असतो. ज्येष्ठ नागरिक, बालगोकुलम, सांस्कृतिक मंडळ, योगासनं, रनिंग, सायकलिंग करणारी मंडळी यांचे नेहमी काही ना काही उपक्रम चालू असतात. एकत्र भेटायचं नाही म्हटल्यावर हे सगळंच टाळणं आलं. ‘दिवाळी पहाट’ नाही, ‘जल्लोश’ची तयारी नाही, अशी दिवाळी तर अगदीच सुनीसुनी वाटणार. मग आपण डिजिटल दिवाळी अंक बनवू या का? आपल्याकडे कलाकार आहेत, लेखकही असतीलच. त्यांना शोधूया.”

आणि त्या शोधाशोधीतून हा जवळपास २०० पानांचा दिवाळी अंक तयार झाला आहे.

या अंकात विविध विषयांवरील ३७ लेखांचा समावेश आहे. त्यात वैयक्तिक अनुभवांपासून ते निसर्गप्रेमापर्यंत आणि पाककृतींपासून ते पालकत्वापर्यंत अनेक विषयांचा समावेश आहे. उदाहरणार्थ अल्बर्ट आईन्स्टाईन, संस्कृत, आर्थिक साक्षरता, अभियांत्रिकी, राज कपूर, मुघल-ए-आझम, रुक्मिणी स्वयंवर, मिनिमलिस्टिक डिझाइन्स, ऑस्टिओपॅथिक आणि कायरोप्रॅक्टिक ट्रिटमेंट या विषयांवरील वाचनीय लेख.

शिवाय बालसाहित्याचा स्वतंत्र विभाग असून त्यात मुलांनी लिहिलेल्या कथा, कविता, गोष्टी, शब्दकोडी यांचा समावेश आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘पुरुषस्पंदनं’ : ‘विषारी मर्दानगी आणि मानवी नातेसंबंध’ यांचा आढावा घेणारा रौप्यमहोत्सवी वर्षातला नावीन्यपूर्ण दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

या अंकाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यात चित्रकार मुकुंद पळसापुरे, शास्त्रीय गायिका अंजली मालकर आणि सामाजिक कार्यकर्त्या सानिया किर्लोस्कर यांच्या मुलाखती आहेत.

‘देणं कृतज्ञतेचं’ या पहिल्या लेखात अनिकेत अजित निकम यांनी करोनाकाळात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी राबवलेल्या मोहिमेचा अनुभव सांगितला आहे. या काळात त्यांनी पोलिसांच्या मदतीनं ‘आपत्कालीन व्यवस्थापन प्रमुख’ म्हणून केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद म्हणावी अशी आहे. अनेक मित्र-नातेवाईकांच्या आर्थिक मदतीमुळे गरजूंना धान्याची किटस पाठवली. जवळपास ६० हजार लोकांना जेवण दिलं. अनेक गरजू गरोदर स्त्रियांना त्यांच्या इच्छित ठिकाणी पोहोचवलं. अनेक गरीब रुग्णांची रुग्णालयाची बिलं दिली. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे विनाकारण अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या पोलीस, पीएमटी, रेल्वे विभाग, एसपीओ यांच्या मदतीने त्यांच्या गावी पोहचवलं. कोथरुड आणि कर्वेनगर परिसरातील जवळपास १० हजार मजुरांचं यशस्वीपणे स्थलांतर केलं. त्यासाठी वेळ, श्रम, पैशाची उभारणी हे सगळं त्यांनी केलं. ते कौतुकास्पद आहे. ते खरेखुरे ‘करोनायोद्धे’ आहेत!

निशा किर्लोस्कर यांनी ‘या चिमण्यांनो’ या लेखातून त्यांचं चिमणीप्रेम सांगितलं आहे. त्यांचं घर हे चिमण्यांचं हक्काचं प्रसृतिगृह आहे. निसर्ग संवर्धन, जैवविविधता हा केवळ बोलण्याचा विषय नसून तो प्रत्यक्ष कृती करण्याचाही विषय आहे, याचा वस्तुपाठ या लेखातून मिळतो.

‘विज्ञान प्रसाराचे अनुभव’ या लेखात जयंत श्रीधर एरंडे यांनी जगविख्यात शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्यापासून डॉ. होमी भाभा यांच्यापर्यंतचे अनुभव सांगितले आहेत. आणि त्यांनी विज्ञानप्रसारासाठी केलेल्या कामाविषयी थोडक्यात लिहिलं आहे.

‘गेली माधवी कुणीकडे’ या लेखात माधवी कुलकर्णी यांनी ‘गेला माधव कुणीकडे’ या प्रसिद्ध नाटकात काम करत असताना झालेल्या फजितीचा अनुभव सांगितला आहे. तो बोलका आहे.

..................................................................................................................................................................

हेही पाहा : ‘ऋतुरंग’ : करोनाकाळात आणि करोनोत्तर काळातही लढण्याचं बळ देणारा, जगण्याची प्रेरणा देणारा आणि आपल्यातलं स्फूल्लिंग जाग‌वणारा दिवाळी अंक

..................................................................................................................................................................

निसर्गचित्रकार मुकुंद पळसापुरे यांची गार्गी गुजर यांनी घेतलेली मुलाखतही वाचनीय आहे. या मुलाखतीमध्ये पळसापुरे यांनी केलेली काही लँडस्केप पेंटिंग दिली आहेत. ती अतिशय चांगली आहेत.

शास्त्रीय गायिका अंजली मालकर यांची मुलाखत निशा किर्लोस्कर यांनी घेतली आहे. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कामाची चांगल्या प्रकारे ओळख होते.  

तिसरी मुलाखत आहे सानिया किर्लोस्कर यांची. ‘सनबर्ड ट्रस्ट’ या संस्थेच्या माध्यमातून त्या मणिपूरमधील दुर्गम भागातल्या गावांतल्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करतात. त्यांचे अनुभव अतिशय रोचक आणि रोमहर्षक आहेत.

त्याचबरोबर ‘बालविभागा’त मुलांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेत केलेलं लेखनही दाद देण्याजोगं आहे.

.................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हा अंक हौसेचा मामला असला आणि यातले बरेचसे लेख हे वैयक्तिक अनुभवपर असले तरी हा एकंदर अंक वाचनीय आहे. नेहमीच्या साहित्य निकषाच्या फुटपट्ट्या न लावता हा अंक वाचला तर तो नक्की आवडू शकतो. एका सोसायटीतल्या सदस्यांनी करोनाकाळात सर्वांना सामावून घेण्यासाठी केलेला हा सांघिक प्रयत्न कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे.

हा अंक विनामूल्य डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा – 

https://drive.google.com/file/d/1FHAdGiPVHaA4sPAOCjUKzS241nWM1qYr/view

हा अंक ब्लॉग स्वरूपात वाचण्यासाठी क्लिक करा – 

https://samrajyaeank.blogspot.com/2020/11/blog-post_31.html

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख