इस्रायलचा प्राचीन इतिहास आणि ज्यूंच्या हक्काच्या भूमीची पार्श्वभूमी (भाग १)
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
आदित्य कोरडे
  • इस्राइल आणि त्याचे शेजारी देश
  • Mon , 30 January 2017
  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इस्राइल Israel पॅलेस्टाईन Palestine अब्राहम Abraham ज्यू Jew

हा संक्षिप्त इतिहास आहे जन्मापासून सतत संघर्षरत असलेल्या एका चिमुकल्या देशाचा. १४०० वर्षांचा प्रसवकाळ आणि दुसऱ्या महायुद्धातल्या नरसंहाराच्या/ वंशविच्छेदाच्या कळा सोसून जन्माला आलेल्या आणि जन्मत:च आजूबाजूला त्याच्या नरडीला नख लावायला टपून बसलेल्या अरबी लांडग्यांच्या छाताडावर पाय देऊन गेली ६६ वर्षं सतत ताठ मानेनं जगणाऱ्या मानव समूहाचा, त्यांच्या विजीगिषु वृत्तीचा, बलिदानाचा, शौर्याचा आणि त्यांच्या ‘मोसाद’ नावाच्या शक्तिशाली आणि सुप्रसिद्ध/कुप्रसिद्ध गुप्तचर यंत्रणेचा.

विसावं शतक हे अनेक अर्थानं अभूतपूर्व असं होतं. मानवी संस्कृतीच्या-सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ त्याआधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाने जगाची घडीच बदलून गेली. (दुसरं महायुद्ध खरं तर पहिल्याचंच एक्स्टेंशन होतं असं म्हणतात!). या दुसऱ्या महायुद्धामुळेच जगभर विखुरलेल्या ज्यू लोकांना १४००-१५०० वर्षांच्या संघर्षमय वणवणीनंतर आणि अनन्वित अत्याचार, उपेक्षा व अवहेलना सोसल्यानंतर स्वत:चा देश मिळाला. त्याची ही कहाणी!

………………………………………..

इस्रायल या देशाच्या पुन:स्थापनेच्या आधीपासून, म्हणजे खूप आधीपासून ‘इस्रायल’ हा शब्द, ही संकल्पना आणि त्याचे पुरस्कर्ते/ पाईक म्हणजे ‘ज्यू’ (यहुदी) हे सर्व जगाला परिचित आहेत. अमेरिकेतल्या कृष्णवर्णियांना निग्रो म्हणणं जसं गैर आहे (ते तर ही शिवीच मानतात), तसंच काहीसं ज्यू या शब्दाचं आहे. म्हणून आपण इथून पुढे त्यांचा उल्लेख ‘यहुदी’ असा करू.

दुसऱ्या महायुद्धानंतर जरी यहुदी सर्व जगभर चर्चेत आले असले आणि त्यांच्या प्रश्नांची जाणीव युरोप बाहेरच्या जगाला प्रकर्षानं झाली असली तरी हे यहुदी आणि त्यांचा धर्म, त्यांची संस्कृती जवळपास ४०००-४५०० वर्षं जुनी आहे. त्यांचा धर्म एकेश्वरवादी हाही सगळ्यात जुना. बायबलच्या जुन्या कराराप्रमाणे- ‘बुक ऑफ जेनेसिस’मधील उल्लेखाप्रमाणे यहुदींचा इतिहास त्यांचा मूळ पुरुष अब्राहमपासून सुरू होतो. तेव्हा अरबस्तानातल्या ‘उर’ नावाच्या वाळवंटी प्रदेशात अनेक भटक्या टोळ्या राहत होत्या. त्यातल्याच एका टोळीचा मुखिया म्हणजे अब्राहम.

हा अब्राहम, नोवाच्या (जलप्रलयातून मानव आणि प्राणी वाचवणारा- त्यांचा मनु) १०व्या पिढीतला वंशज... ईश्वराने त्याला या सर्व भटक्या टोळ्यांना एकत्र करून ‘केनान’ या समृद्ध प्रांतात जाऊन राहण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे अब्राहमने येतील तेवढे टोळीवाले आणि स्वत:चा कुटुंबकबिला घेतला आणि केनान इथं राहायला आला. अब्राहमच्या दोन बायका. सारा आणि हागार. त्यापासून त्याला दोन मुलं झाली. इस्माईल आणि इसाक. ईश्वराने या इसाकला अब्राहमची परीक्षा पाहण्यासाठी मारायचा/बळी द्यायचा आदेश दिला होता. या इसाकचा मुलगा जेकब. त्याला त्याच्या चार बायकांपासून (लेह, झील्पा, बिल्हाह आणि रेचेल) एकूण १२ मुलं झाली. (त्यांची नावं अशी - रुबेन, सिमोन, लेवी, जूडाह, झेबुलीन, दिना, गाड, अशार, दान, नाफ्ताली, जोसेफ, बेन्जामिन.) जेकबला प्रत्यक्ष ईश्वराने ‘इस्रायल’ हे नाव दिलं होतं. त्यामुळे तो सर्व यहुदीचा राष्ट्रपिता ठरतो. तर त्याचे १२ पुत्र आणि त्यांच्यापासून उत्पन्न झालेली प्रजा म्हणजेच आजचे यहुदी.

आपलं जसे गोत्र असतं, तसं या १२ जणांच्या नावानं यहुदी लोकांची १२ घराणी/गोत्र किंवा टोळ्या आहेत. पण सगळे अब्राहमचे आणि जेकबचेच वंशज असल्याने सर्व यहुदी स्वत:ला ‘इस्रायली’ मानतात. (एक लक्षात ठेवायला हवं की, हा खरोखर इतिहास नसून दंतकथा/पुराणकथा असू शकतात. त्यात सत्याचा अंश फार थोडा किंवा अजिबात नसूही शकतो, पण सश्रद्ध यहुदी मात्र हाच खरा इतिहास आहे असं मानतात.)

तर हे यहुदी लोक केनान प्रांतात इ.स. पूर्व विसाव्या शतकात आले, ते इ.स. पूर्व पंधराव्या-सोळाव्या शतकापर्यंत तिथंच सुखेनैव पशुपालन, शेती आणि व्यापार करत राहिले. पण केनन प्रांतात फार मोठा दुष्काळ पडल्याने त्यांना नाईलाजानं नाईलच्या खोऱ्यातल्या गोशान या प्रांती येऊन वस्ती करावी लागली. त्या काळी हा प्रांत इजिप्तच्या फारो राजांच्या अमलाखाली येत होता. त्याने या यहुदी लोकांना राहण्याची, व्यापार उदीम करायची परवानगी दिली. आपल्यातल्या एकी आणि उद्यमी स्वभावानं यहुदी लवकरच संपन्न जमात बनले, पण त्यामुळेच मत्सरग्रस्त होऊन इजिप्तच्या राजे लोकांनी त्यांना गुलाम बनवलं आणि त्यांना मोठी मोठी मंदिरं व थडगी (पिरामिड्स) बनवायच्या कामाला गुलाम म्हणून जुंपलं.

असे हाल यहुदींनी थोडेथोडके नाही तर ४०० वर्षं काढले. आपल्या लोकांचे हे हाल न बघवून ईश्वराने त्यांच्यातून एक मोझेस नावाचा माणूस निवडला. त्याने ईश्वराने दिलेल्या आदेशाप्रमाणे बंड करून सर्व यहुदींना इजिप्तमधून बाहेर काढलं आणि त्यांना घेऊन तो बराच मोठा, खडतर प्रवास करत लाल समुद्राकाठच्या सायनाई प्रांती आला. इथंच त्याला सायनाईच्या पर्वतावर ईश्वराचा पुढचा आदेश तसंच १० आज्ञा (१० commandments) मिळाल्या. मग तो सर्व यहुदींना घेऊन परत मजल दरमजल करत केनान प्रांती आला. ही सगळी गोष्ट फार रंजक आहे आणि त्यावर खूप चांगले चित्रपटही बनवले गेले आहेत (10 commandments, Prince of Egypt, Gods and kings वगैरे) जिज्ञासूंनी ते जरूर पाहावेत.

अब्राहम आणि त्याचा कुटुंबकबिला

असो. तर अशा प्रकारे यहुदी परत त्यांच्या अब्राहमने वसवलेल्या भूमीत पोहोचले, पण मध्ये अनेक शतकांचा काळ गेला होता आणि हा केंनान प्रांत आता परत अनेक रानटी बर्बर टोळ्यांच्या हाती गेला होता. सततच्या संघर्षानं थकल्या भागल्या मोझेसने आपल्या कार्याची धुरा जोशुआ या आपल्या शिष्यवर सोपवली व स्वत: निजधामाला गेला. अनेक वर्षं संघर्ष, प्रवास, संकटांचा सामना कराव्या लागल्याने यहुदी जरी भटकेपणाला वैतागले असले तरी त्यांना एकीचं महत्त्व चांगलंच कळून चुकलं होतं. आता त्यांना अधिक प्रवास करायचा नव्हता. जोशुआच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वत:च्या पूण्यभूसाठी लढा देऊन केनानचा बराचसा भाग परत मिळवला. हाच तो आजचा इस्रायलमध्ये असलेला प्रांत.

अशा प्रकारे ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ देत यहुदी लोकांनी कायमच या भूमीवर आपला हक्क सांगितला आहे. त्यानंतरची जवळपास २०० वर्षं शांततेची सुख-समृद्धीची, शेती, व्यापार, उद्योग, कला यांच्या भरभराटीची होती. पण त्याच बरोबर आलेल्या स्थैर्य आणि संपन्नतेमुळे यहुदी मधली एकी कमी कमी होऊन त्यांच्यात गट तट पडू लागले. त्यांच्या समाजरचनेत एक प्रकारचा विस्कळीतपणा आला. अशात एजीयन समुद्रातल्या क्रीट या बेटावरून काही लोक केननमध्ये आले. हे लोक लढाऊ वृत्तीचे होते आणि त्यांनी यहुदींच्या भूमीवर कब्जा मिळवला. अर्थात त्यांनी प्रतिकार केला, पण त्यांच्यात ती पूर्वीची धार एकी आता राहिली नसल्याने त्यांच्या केनान प्रांतामधील काही भूभाग गेला तो गेलाच. हाच तो आजचा गाझाचा प्रांत आणि ते म्हणजे पॅलेस्टिनी लोक. म्हणूनच त्या प्रांताला नंतरच्या काळात पॅलेस्टाईन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. शांततेचा, भरभराटीचा काळ संपून परत एकदा संघर्ष, युद्ध, वाताहत यहुदींच्या नशिबी आली. त्यांचा आणि या पॅलेस्टिनीच्या संघर्षातच किंग साउल, डेव्हिड (डेव्हिड आणि गोलीअथ या गोष्टी मधला) किंग सोलोमन असे अनेक महान राजे, नेते यहुदी लोकांना लाभले. पण त्यांचा काळ विपरीत होता हेच खरं.

त्यांचा आणि पॅलेस्टिनींचा संघर्ष अजून चालूच होता, पण मध्येच असिरीयन राजवटीनं त्यांच्या प्रांतावर हल्ला करून यहुदी आणि पॅलेस्टिनी दोघांनाही गुलाम करून टाकलं. इ.स. पूर्व ७४० ते ७२२ मध्ये आपली केनान ही प्राणप्रिय पुण्यभूमी पारतंत्र्यात गेलेली यहुदी लोकांना पहावी लागली.  यावेळी ती त्यांना परत मिळवण्यासाठी थोडी थोडकी नाही तर तब्बल २७०० वर्षं संघर्ष करावा लागला. असिरीयनानंतर बाबिलोनियन, पर्शिअन, रोमन, बायाझंटाइन अशा राजवटींच्या ताब्यात केंनन प्रांत जात राहिला आणि यहुदी त्या त्या सत्तेचे मंडलिक म्हणून तग धरून होते. त्यांनी स्वत:चा धर्म, स्वत:चं वेगळेपण, स्वत:चं स्वतंत्र अस्तित्व सोडलं नाही, हे विशेष, पण इ.स. ६००-७०० मध्ये काळ अधिक विपरीत होणार होता. इ.स. ६५०-७०० मध्ये हा सगळा प्रांत अरबी मुस्लीम सत्तेच्या हाती गेला आणि त्यांनी तिथल्या प्रजेचं सक्तीनं धर्मांतर सुरू केलं. त्यातच सगळे पॅलेस्टिनी मुसलमान झाले. आता मात्र यहुदी लोकांना तिथं राहणं शक्य नव्हतं. ते आपापलं चंबूगबाळं घेऊन वाट फुटेल तिकडे पळाले. त्यांनी युरोपातल्या इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, रशिया, नॉर्वे अशा निरनिराळ्या देशांत आश्रय घेतला. मुख्यत्वे करून या देशांत त्यांनी आश्रय घेतल्यामुळे तिथं ते जास्त प्रमाणात सापडतात, पण तसं पाहू जाता यहुदी सर्व जगभर पसरले. आज साधारण १५० देशांमध्ये विस्थापित यहुदी वस्ती करून असलेले सापडतात. यात भारतही येतो. भारतामध्येही केरळच्या किनाऱ्यावर ते याच सुमारास आले. भारतामध्ये आजही हे यहुदी अत्यंत थोड्या संख्येनं असले तरी आपलं स्वतंत्र अतित्व टिकवून आहेत. विशेष म्हणजे असमानता, जातीप्रथा, शोषण, धार्मिक द्वेष यांनी बजबजलेल्या भारताने या यहुदी लोकांना कधीही त्रास दिला नाही, त्यांच्या धार्मिक आणि सामाजिक रीतीरिवाजात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केली नाही. अर्थात यहुदींनीही कधी इथल्या लोकांशी प्रतारणा केली नाही किंवा कोणत्याही प्रकारे त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न केला नाही. कोकणातही यहुदी आले आणि वसले. त्यांना आपण ‘शनवार तेली’ म्हणून ओळखतो. भारतीय यहुदी स्वत:ला ‘बेने इस्रायली’ म्हणतात. बेने म्हणजे पुत्र – इस्रायलचे पुत्र. रुबी मायर्स (पडद्यावरचं नाव सुलोचना), नादिरा, डेव्हिड चेउलकर (बूट पोलिश, अभिमानसारख्या अनेक चित्रपटांत काम केलेला चरित्र अभिनेता, फक्त डेव्हिड म्हणून प्रसिद्ध) , ले. ज. जेकब, डेव्हिड ससून, इस्टर विक्टोरिया (पहिली मिस इंडिया), रणजीत चोधरी (बातो बातो में मधला टीना मुनीम (nancy) चा वायोलिनवादक भाऊ), अनिश कपूर (प्रसिद्ध शिल्पकार) असे अनेक भारतीय यहुदी प्रसिद्ध आहेत. ही यादी खूप मोठी आहे. फक्त वानगीदाखल ही सर्वपरिचित काही नावं. (संदर्भ, ‘उत्तम-मध्यम’ - श्री. बा. जोशी)

मोझेस

इथं थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगायचं म्हणजे १९४८ साली जेव्हा इस्रायल या देशाची निर्मिती झाली किंवा यहुदी लोकांनी ती केली, तेव्हा जगभरातून सर्व यहुदी लोकांना तिथं येऊन राहण्याचं आवाहन केलं गेलं. इतर जगाप्रमाणे भारतातूनही बहुसंख्येनं यहुदी गेले, पण शेकडो वर्षं, पिढ्यानपिढ्या भारतात राहिलेले हे यहुदीच फक्त असे होते जे भारताच्या, आपल्या मायभूमीच्या आठवणीनं व्याकूळ होत असत. इतर देशांतून आलेल्या यहुदींना त्या त्या देशांतून तुच्छतेचीच वागणूक मिळालेली असल्यानं त्यांचं तसं नव्हतं. एवढंच नाहीतर भारतातून गेलेल्या या यहुदींना सुरुवातीला भेदभावाला सामोरं जावं लागलं, त्यांना हीन लेखलं गेलं. ते गोरे नसल्यामुळे, श्रेष्ठतर अशा युरोपातून (मार खाऊन, अपमानाचे जिणं सोडून का होईना) आलेले नसल्यामुळे त्यांना इतर युरोपीय यहुदींपेक्षा दुय्यम लेखलं गेलं. त्यामुळे ते अधिकच व्याकूळ होत. अशी हीन वागणूक त्यांना भारतात कधीच मिळाली नव्हती आणि इस्रायलमध्ये तर त्यांच्या हक्काच्या भूमीत त्यांना आमंत्रण देऊन बोलावून असं अपमानास्पद वर्तन केलं जात होतं. अर्थात पुढे परिस्थिती निवळली. १९६२-६४ दरम्यान भारतीय यहुद्यांनी इस्रायलमध्ये स्वत:च्या हक्कांसाठी आंदोलनही केलं होतं.

बाळ मोझेस, आपल्याकडील कर्णाच्या जन्माच्या गोष्टीशी याचे साम्य आहे

रूपेण रेमण्ड हे असेच एक भारतातून इस्रायलला गेलेले यहुदी. ते म्हणतात, “इतर यहुदी ज्या देशातून आलेले होते, तिथं त्यांना फार अपमानास्पद वागणूक मिळालेली असल्याने त्यांना त्या त्या देशांचं स्मरणही करणं आवडत नसे, पण भारतीय यहुदी मात्र आपल्या भारताच्या आठवणीनं व्याकूळ होत असत, इस्रायल ही आमची पितृभूमी असेल आता कर्मभूमीही बनेल, पण आमची मातृभूमी ही कायम भारतच असेल.”( संदर्भ – ‘अल्पसंख्यांक वाद’ – मुजफ्फर हुसेन, अनुवाद- डॉ. रवी पागनीस)

आधुनिक जगात सभ्यतेचा आणि सांस्कृतिक श्रेष्ठत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स आदी राष्ट्रांमध्ये यहुदी लोकांना कायम छळाला, द्वेषाला, अवहेलनेला सामोरं जावं लागलं आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनांनी छळ केला. म्हणजे फक्त हिटलर व नाझी-जर्मनच यहुदींचा द्वेष करायचे असं नाही, अगदी शेक्सपिअरच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’मधला शायलॉक हा टिपिकल यहुदी म्हणजे त्या काळातील समाजच्या धारणेप्रमाणे दुष्ट, क्रूर, कावेबाज, पाताळयंत्री असा दाखवला आहे. अर्थात याला काही अंशी यहुदीही जबाबदार आहेत. ते जिथे जातील तिथं आपलं स्वतंत्र अस्तित्व, धार्मिक आणि सामजिक वेगळेपण जपत, तिथल्या स्थानिक रूढी, परंपरा, धर्म यांच्याशी संपर्क ठेवत नसत. सगळे साधारण एकत्र, वेगळे, शहराजवळ, गावकुसाबाहेर वस्ती करून राहत- त्यालाच ‘घेटो’ म्हणतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या प्रथा-परंपरा पाळणं सोपं जात असलं तरी ते समाजापासून, मुख्य प्रवाहापासून फटकूनच असत. त्यातून मध्ययुगात युरोपात सगळीकडे ख्रिस्ती धर्माचा बोलबाला होता. येशू ख्रिस्त हा जन्माने ज्यूच, पण त्याने स्थापन केलेल्या ख्रिस्ती धर्माबद्दल आणि येशूबद्दल कधीही कोणतीही सहानुभूती किंवा आदरभाव ज्यू लोकांनी कधी दाखवला नाही. येशूला सुळावर एका ज्युच्या द्रोहामुळेच जावं लागलं याचा रागही तत्कालीन ख्रिस्ती लोकांच्या मनात होताच. त्यामुळे जे यहुदी युरोपातून राहत होते, ते कायम अवहेलना, निंदा, द्वेष, क्रौर्य यांचे बळी ठरले आहेत.

खरे तर यहुदी ख्रिस्ती आणि इस्लाम हे तिन्ही अब्राहामिक धर्म म्हणजे ईश्वराचे द्वैतत्व, त्याचे प्रेषित, देवदूत, सैतान, सर्व मानव अॅडम आणि इव्हची अपत्यं इ. संकल्पना मानणारे. यात यहुदी हा वयाने सगळ्यात वडील, पण संख्येनं सगळ्यात लहान, तर इस्लाम वयानं सगळ्यात तरुण पण या तीन भावंडात कधीही सख्य नांदलं नाही. युरोपचा अख्खा इतिहास तर ख्रिस्ती-मुस्लीम धर्मातल्या झगड्यानं रक्तरंजित झालेला आहे....असो. तो वेगळा मुद्दा आहे.

(या लेखाचा दुसरा भाग उद्या प्रकाशित होईल.)

 

संदर्भ : १. Mossad : The Greatest Missions of the Israeli Secret Service -Michael Bar-ZoharNissim Mishal

२. Gideon's Spies : The Secret History of the Mossad (Updated) by Gordon Thomas

३. Israel's Secret Wars : A History of Israel's Intelligence Servicesby Ian Black, Benny Morris

४. Mossad : The Untold Stories of Israel's Most Effective Secret Service by Mike Livingston

आणि यु- ट्यूब वरील अनेक documentaries

……………………

लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

Post Comment

MUNDIP Nanda

Mon , 30 January 2017

Excellent.Good article.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......