भारतीय जनता नक्कीच पुरोगामी आदर्श समाजव्यवस्थेकडे जाईल, पण कधी?
पडघम - सांस्कृतिक
संदीप ताह्मणकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 14 September 2020
  • पडघम सांस्कृतिक देव धर्म श्रद्धा अंधश्रद्धा आस्तिक नास्तिक विवेकवाद पुरोगामी सनातनी

मी म्हणजे कोण? जीवमात्रातील स्वत्व नक्की आलं कुठून? ते काय आहे? मानवी जीवनाचा उद्देश काय? मृत्युनंतर काय होतं? जीव येतो कोठून आणि जातो कुठे? या सारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी माणसाने हजारो वर्षे विविध प्रकारचे चिंतन केले, कल्पना केल्या, शोध घेतला. हेच विचार जेव्हा कोणीतरी एकत्रितरीत्या मांडले आणि ते बहुसंख्य लोकांना मान्य झाले, तेव्हा धर्म उदयास आले.

जगाचा अफाट पसारा पाहून हे काम कोणत्या तरी अलौकिक शक्तीने केलेले असावे, अशी सामान्य माणसाची समजूत होणेही साहजिकच आहे. माणसाला त्याच्या अस्तित्वाबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न विविध धर्मांनी केलेला आहे.

कोणत्याही धर्माचे तत्त्वज्ञान किंवा विचार ढोबळमानाने तीन प्रकारांत विभागता येतील - अधिभौतिक जीवनाचे नीतिनियम, पारलौकिक जीवनविषयक कल्पना आणि त्यांचे पालन किंवा उल्लंघन केल्यास होणारे परिणाम. हे सर्व प्रत्यक्ष परमेश्वराने सांगितलेले आहे, असेही सगळे धर्म ठामपणे सांगतात. या लेखाचा तो विषय नाही. माणसाला आयुष्यात भोगाव्या लागणाऱ्या सुख-दुःखाची कारणमीमांसा आणि त्यावरचे उपाय या बाबतीत सर्वच धर्मांचे प्रयत्न तोकडे, काल्पनिक आणि अनेकदा हास्यास्पद आहेत, असेही आपल्याला आढळून येईल. सर्वच धर्मांनी सर्वशक्तिमान जगन्नियंत्या अशा देवाची कल्पना केलेली आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

धर्म ही कल्पना एवढी लोकप्रिय होण्याचे कारण काय? माझ्या मते धर्मांनी एक महत्त्वाची गोष्ट मांडली आहे. ती म्हणजे मृत्युनंतरच्या अस्तित्वाचे आश्वासन. माणसाच्या मृत्युनंतरही, कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या स्वत्वाच्या अस्तित्वाची खात्री. धर्म ही संकल्पना एवढी लोकप्रिय होण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

धर्मांमधील पाप-पुण्य हे सामाजिक वर्तणुकीचे नियम असून त्याची मृत्युनंतरच्या अस्तित्वाच्या आश्वासनाशी सांगड प्रत्येक धर्माने घातलेली आहेच. पाप-पुण्य हा एका अर्थाने मृत्युनंतरही अस्तित्व टिकवून ठेवण्याचा विमा आहे. कदाचित अशी लालूच दाखवून माणसांना या जन्मात नीतीने वागण्यासाठी भाग पडायची ही एक क्लृप्ती असावी, असेही म्हणता येईल.

महत्त्वाचा मुद्दा असा की, कोणत्याही जीवित व्यक्तीला आपल्या मृत्युपश्चात आपल्याबाबतीत सगळं संपलं, आयुष्य संपल्यावर अस्तित्वाला पूर्णविराम मिळतो, हे मान्य करणं भावनिकदृष्ट्या फारच अवघड वाटतं. माणसाच्या स्वत्वाची, मीपणाची जी एक कल्पना जिवंत माणसाच्या मनात असते, त्यामुळे स्वतःच्या मृत्युनंतर काहीही नाही, हे स्वीकारणं फारच क्लेशकारक वाटतं. भौतिक आयुष्यातही माणसाला सुखान्त असलेल्या कथा आणि घटना आवडतात. दुःख म्हणजे अंताकडे सुरू झालेला प्रवास असं मानलं जातं. दुःख टाळण्याकडे माणसाचा आपसूक कल असतो. जर कोणी सुख वाढवणारे आणि दुःख कमी करणारे तत्त्वज्ञान मांडत असेल, तसा दावा करत असेल तर त्याचे अनुयायी बनणे, हा उपायही सोपा असतो. मानवी जीवनाचा जैविक उद्देश अस्तित्व आणि वंशसातत्य हा आहे. त्यानुसार माणसामध्ये सगळ्या प्रेरणा असतात. त्यामुळे मृत्युपश्चात पूर्णविराम हे मान्य करणे माणसाला जमत नाही, जे साहजिक आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

जरी सर्वच धर्मांनी सुख-दुःखाकडे निर्विकारपणे पाहावं, अशी शिकवण दिलेली असली तरी तसे प्रत्यक्षात आणणे माणसाला शक्य होत नाही. त्यामुळे जी व्यक्ती निर्विकार मनाने सुख आणि विशेषकरून अपरिमित दुःखं भोगते, त्यांच्याबद्दल सामान्य माणसे अचंबित होऊन त्यांना अलौकिक मानू लागतात आणि तिच्या शिकवणीचे, विचारांचे पाठीराखे होतात. या बरोबरच मानवाला करणे शक्य नाही असे काही चमत्कारही धर्मसंस्थापकांनी केल्याची ठाम समजूत असते. बहुतेक सर्वच धर्मात आपल्याला अशीच उदाहरणे सापडतील.

जगाच्या लोकसंख्येपैकी ३० टक्के लोक खिश्चन धर्माचे आहेत. येशू खिस्ताने मानवजातीच्या कल्याणाकरता स्वीकारलेल्या अपरिमित वेदना आणि नंतर दिलेले बलिदान, यामुळे ते भारावून गेलेले असतात, त्याबद्दल कृतज्ञ असतात, त्याच्या शिकवणीचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. येशूने केलेल्या चमत्कारांची पण त्याला जोड असते. अंतिम फैसल्याच्या दिवशी सदेह पुनरुत्थान आणि त्यानंतर चांगल्या माणसांना कायमस्वरूपी स्वर्गसुख मिळेल, असे प्रत्यक्ष प्रभूने त्याच्या सर्वांत प्रिय शिष्याच्या तोंडून सांगितले असल्यामुळे आणि त्याच्या प्रत्यक्ष आयुष्यातही तसे झालेले असल्याचा पुरावा समोर असल्याच्या घटनेवर श्रद्धा असल्यामुळे अशी शिकवण देणाऱ्या धर्माचे अनुयायी होणे, हा एक आकर्षक पर्याय ठरतो.

मुसलमान धर्मात पुनरुत्थान नसले तरी कायमस्वरूपी स्वर्ग (किंवा नरक का होईना, पण अस्तित्व आहे) अशीच संकल्पना आहे. महम्मद पैगंबर यांनी आयुष्यात केलेला संघर्ष, भक्ती आणि त्यामुळे केलेल्या कथित स्वर्गारोहणामुळे प्रभावित होऊन (आणि त्यामुळे केलेल्या धर्मप्रसारामुळे) जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या मुसलमान धर्माची अनुयायी झालेली आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘नकारात्मक’ विचाराकडून ‘सकारात्मक’ विचाराकडे जाण्याचा एक प्रयोग… करून तर पहा!

..................................................................................................................................................................

बुद्धाने मानवी जीवनातील दुःखाचे कारण शोधण्यासाठी ती दुःखं स्वतः अनुभवण्याचा केलेला प्रयास लोकांना प्रभावित करतो. बुद्धाने अनुयायांना पुनर्जन किंवा निर्वाणाची हमी दिलेली आहेच. माणसामध्ये धर्मकल्पना रुजण्यामध्ये बालसंगोपनाचा, संस्कारांचा मोठा भाग आहे.

हिंदू धर्म काही बाबतीत थोडा वेगळा आहे. हिंदू धर्माचा कोणी एकाच एक संस्थापक नाही. हा धर्म अनेक आदिम विचारधारा, वेद, उपनिषदे, पुराणे, महाकाव्ये, गीता यांच्या माध्यमातून लौकिक आणि पारलौकिक तत्त्वज्ञान मांडतो. तसेच दुःख सहन करणे ही हिंदू धर्मातील संकल्पना नाही. हिंदू धर्म दुःखाचे उदात्तीकरण करत नाही, तर कर्मफळ सिद्धान्तानुसार दुःख ही वैयक्तिक भोगाची अपरिहार्य गोष्ट मानतो. म्हणजेच प्रत्येक जण आपापल्या सुखासाठी स्वतःच जबाबदार असल्यामुळे दुःख निवारणासाठी एकत्रित सामाजिक प्रयत्न करणे, हाही हिंदू तत्त्वज्ञानाचा भाग नाही. प्रत्यक्ष आयुष्यात जास्त वैयक्तिक सुख कसे मिळेल, यासाठीची जीवनशैली हिंदू धर्म सांगतो. पाप-पुण्याच्या फेऱ्यांमध्ये अडकून मिळणाऱ्या अनेक जन्मांपैकी कोणत्या तरी जन्मात पूर्णब्रह्माचे सम्यक ज्ञान झाले की, कायमस्वरूपी मोक्ष मिळेल, स्वर्गसुख मिळेल, याचे आश्वासन हिंदू धर्मातही आहेच. यासाठी भक्ती, कर्म, ज्ञान आणि संन्यास असे मार्ग (योग) सांगितलेले आहेत.

यांसारख्या सगळ्या धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या संकल्पनांचा पक्का पगडा पृथ्वीतलावरील सर्व माणसांवर असतो. धर्माचे अस्तित्व शब्दप्रामाण्यावर अवलंबून असते. शंका घेणे किंवा प्रश्न उपस्थित करणे, याला ‘पाखंड’ मानले जाते आणि ‘पाखंडी’ व्यक्तीला दंड देणे हे धर्माचे आणि पुण्यकर्म मानले जाते! जगात रोगराईने मेलेल्या माणसांपेक्षा जास्त माणसे धर्माच्या नावाने झालेल्या युद्धांमध्ये मारली गेलेली आहेत. प्रत्यक्षात पाहिल्यास जिज्ञासा, कुतूहल, शंका घेऊन तपासून पाहणे, प्रयोग करणे, प्रश्न विचारून त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणे, यामुळेच अखिल मानवजातीची वाढ आणि प्रगती होऊ शकली आहे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : भक्तीचा बुरखा पांघरून भक्तांचा गैरफायदा घेणाऱ्या ढोंगी आध्यात्मिक बाबाचा समाचार घेणारी वेबमालिका

..................................................................................................................................................................

आज जगात फारच थोडे लोक संपूर्णपणे अधिभौतिक (मटेरिअल) विचार मानतात. देव नाही, निर्माता नाही, जग कसे निर्माण झाले, याचे ज्ञात विज्ञानाच्या आधारे दिलेले स्पष्टीकरण, पाप-पुण्य या कल्पना जरी उचित असल्या तरी त्या आधारे मृत्युनंतर कोणताही फरक पडत नाही, कोणीही अंतिम फैसला करत नाही, मृत्यूनंतर त्या माणसासाठी सगळं संपुष्टात येतं, पुनरागमन नाही, जनजन्मांतरीचा फेरा नाही, स्वर्ग नाही, नरक नाही, प्रत्यक्ष प्रमाण आणि त्या आधारे काढलेलं अनुमान यावरच विश्वास, अशी विवेकवादी किंवा नास्तिक विचारांच्या माणसाची विचारपूर्वक स्वीकारलेली वैचारिक भूमिका असते. यामुळे विवेकी माणसाचे या पृथ्वीवरील आयुष्याचे अस्तित्व सुखात जाते. विवेकवादामध्ये मृत्युनंतर पुढे काय या बाबतीत कोणतेही काल्पनिक आकर्षक आश्वासन असूच शकत नाही. कारण तसा कोणताही व्यक्तिनिरपेक्ष पुरावाच माणसासमोर नाही. त्यामुळे नास्तिक-मताला जास्त अनुयायी मिळू शकत नाहीत.

धार्मिक माणूस म्हणजे वाईट आणि नास्तिक म्हणजे चांगला असा किंवा याच्या विरुद्ध असा कोणताही निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही, उद्देशही नाही. पण प्रत्यक्षात बहुमताचा आदर या तत्त्वाने स्वीकारलेल्या लोकशाहीमध्ये धर्मकल्पनांच्या आधारे राजकारण करून माणसाची विवेकबुद्धी ताब्यात घेतली जाते आणि त्याला भावनेच्या प्रभावात आणून राजकीय सत्ता मिळवली जाते. धार्मिक माणूस जास्त करून दैववादी असतो, प्रयत्नवादी नसतो. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’. त्यामुळे दुःख, दैन्य, दारिद्र्य, सुख, संपत्ती हे दैवगत न्यायानेच ज्या त्या व्यक्तीच्या वाट्याला आलेले आहे, असा युक्तिवाद त्याला मान्य असतो. आणि जर अशी दैवी योजनाच असेल तर ती प्रयत्नाने बदलण्याचे दुःसाहस करणे हे पाप मानलेले असल्यामुळे धार्मिक माणूस असे करणे कटाक्षाने टाळतो. एका अर्थाने दैववाद हा स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीचे तत्त्वज्ञान पुरवतो.

या उलट विज्ञानवादी व्यक्ती असे नवीन शोध लावण्याच्या प्रयत्नात असते की, ज्यामुळे सर्व माणसांचे अधिभौतिक आयुष्य सुखी, समाधानी, निरोगी, कमी कष्टाचे होईल. स्वतंत्र विचार करण्याची मुभा, सर्व मनुष्यप्राणी समान असल्याचा ठाम विश्वास, बंधुभाव यासाठी असा माणूस प्रयत्न करतो. प्रत्यक्षात मानवी जीवनात सुखाची हमी ही प्रयत्नवादी, पाखंडी, विज्ञानवादी व्यक्तीच्या कामामुळेच मिळते. मानसिक पातळीवरही पाप-पुण्य, चांगले-वाईट, खेद-खंत, आनंद-दुःख याचे परिपूर्ण विवेचन मानवी मनाच्या अभ्यासातून विज्ञानाने शोधून काढलेले आहेच. आपण कायद्याचे राज्य ही संकल्पना स्वीकारल्यानंतर समाजाचे धारण करणारे नियम हे कायद्याच्या माध्यमातून अमलात आलेले आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी शासन आणि पोलीस यंत्रणा आहेत. थोडे अपवाद सोडल्यास अनेक कट्टर धार्मिक देशांनीही शरियतसारख्या धार्मिक संहिता बाजूला ठेवून आधुनिक विचारांवर आधारित दंडसंहिता अमलात आणल्या आहेत. सार्वजनिक जीवनात धर्माधिष्ठित व्यवस्था असून उपयोगी नाही, तिथे वैज्ञानिक विवेकवादी विचारांच्या आधारेच राज्यव्यवस्था चालवली गेली पाहिजे, हे आपल्याला पटलेले आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

बहुसंख्य लोक भौतिक आयुष्यात विज्ञान-तंत्रज्ञानाने लावलेले शोध वापरतात आणि आपले आयुष्य सुखकर करून घेतात, पण पारलौकिक आयुष्याचा मुद्दा आला की, परत आपल्या मृत्युनंतरच्या अस्तित्वाची हमी देणाऱ्या काल्पनिक धार्मिक संकल्पनांकडे जातात. नास्तिक आणि विज्ञानाधिष्ठित मताच्या प्रचारासाठी हे एक मोठेच आव्हान आहे की, ‘मृत्यूनंतर काय?’ काहीही नाही, हे उत्तर सोडून इतर काही प्रॉमिस असेल तर सांगा. आपण कितीही सैद्धांतिक पातळीवर म्हटले की, शासन आणि धर्म यामध्ये अकराव्या शतकातील मॅग्ना चार्टापासून एक रेषा आखण्यात आलेली आहे. तरीही प्रत्यक्षात अनेकदा धर्म ही रेषा ओलांडून राजसत्तेवर चाल करून जातो आणि प्रसंगी राजसत्ताच ताब्यात घेतो, हे आपण अनेकदा अनुभवलेले आहे. सहिष्णू, निरपेक्ष राजसत्ता मिळण्याबाबतही अनेकदा अपेक्षाभंग झालेला आहेच. यावर उत्तरे आणि उपाययोजना शोधाव्याच लागतील. असे उपाय कदाचित राजकीय, संवैधानिक, वैज्ञानिक, सामाजिक, ऐतिहासिक वा सगळ्याच्या मिश्रणातून मिळू शकतील.

यासाठी काय करावे लागेल, याची यादी मोठी आहे. मानवाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर धर्माचे आणि विज्ञानाचे योगदान, त्याची तुलना, सुशासनासाठी तार्किक उपाययोजनांची गरज, शब्दप्रामाण्याचा त्याग, वर्धिष्णू आणि प्रगतिशील असा परिवर्तनक्षम धर्म सांगणारे नवे आधुनिक प्रेषित, कायद्याच्या राज्याबद्दल जनजागृती, धर्म आणि विज्ञानाच्या सहयोगातून मानवाने मिळवलेले यश; समान संधी देणारी भेद न बाळगणारी शासन व्यवस्था, पारलौकिक आकांक्षांना पर्याय म्हणजे मानवजातीचे पिढीजात जैविक वंश सातत्य हे जनतेला समजावून सांगणे; तथाकथित उच्चनीच, जातीपातीसारख्या ‘दैवी’ व्यवस्था मुद्दाम प्रयत्नपूर्वक संपवणे; आर्थिक संपन्नता, शिक्षण, वैज्ञानिक विचारांचा प्रसार या प्रत्येक मुद्द्यावर समविचारी लोकांच्या सहयोगाने मूलभूत काम केले, तर भारतीय जनता नक्कीच पुरोगामी आदर्श समाजव्यवस्थेकडे जाईल.

..................................................................................................................................................................

लेखक संदीप ताह्मणकर पुणेस्थित वकील आहेत.

advsandeeptamhankar@yahoo.co.in

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा