काँग्रेस - पक्ष की समृद्ध अडगळ?
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • राहुल गांधी आणि सोनिया गांधी
  • Sat , 12 September 2020
  • पडघम देशकारण राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi काँग्रेस Congress

सध्या जी काही अंतर्गत सुंदोपसुंदी माजलेली आहे, कलह सुरू आहे आणि त्यातच अध्यक्षपदाचा सावळागोंधळ सुरू आहे, त्यामुळे देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष एक समृद्ध अडगळ झाल्यासारखी स्थिती आहे. सलग दोन लोकसभा निवडणुकांच्या पराभवाच्या मानसिकतेतून हा पक्ष सावरणं, कार्यकर्त्यांत चैतन्य निर्माण करून संघटना मजबूत करणं आणि काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तसंच भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हे सध्याच्या घडीला तरी ‘मुंगेरीलाल के सपने’ दिसू लागलेलं आहे, इतका हा पक्ष (राहुल गांधी वगळता) निष्क्रिय झालेला आहे!

या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान असणारा, पंतप्रधानपदी राहिलेल्या दोघांच्या प्राणाचे बलिदान दिलेल्या, सत्तेत तब्बल सहा दशकं राहिलेल्या, या देशाला विकासाच्या वाटेवर नेणाऱ्या आणि अगदी गाव-खेड्यापर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली आहे. इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून हा पक्ष अधिकाधिक व्यक्तीकेंद्रीत होत गेला, गांधी कुटुंब तसंच काही नेते आणि त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित झाला, पक्ष संघटनेची वीण उसवली आणि कार्यकर्ता पक्षापासून दुरावत गेला, ही वस्तुस्थिती आहे.

कधी काळी संसदेच्या सभागृहात कायम बहुमतात असणाऱ्या या पक्षाला गेल्या दोन निवडणुकांत लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्याइतक्याही जागा संपादन करता आलेल्या नाहीत, इतकी या पक्षाची वाताहत झालेली आहे, कारण साडेतीन-चार दशकात या पक्षाची रीतसर संघटनात्मक बांधणी झालेली नाही. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत आणि दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत ‘तेच ते’ नेते आहेत. नवीन कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज उभारलेली गेलेली नाही, असं घडलं तर त्या तरुण रक्ताला वाव द्यावा लागेल, अशी विद्यमान नेत्यांना भीती आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

ई-बुक खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/Maayleki-Baapleki-Marathi-Bhagyashree-Bhagwat-ebook/dp/B08DLGCNXL/

..................................................................................................................................................................

त्यातच गेल्या सुमारे सव्वावर्षापासून या पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नसतानाही कोणतंही सोयरसुतक या पक्षाच्या नेत्यांना आणि नेतृत्व करणाऱ्या गांधी घराण्याला नाही, अशी चारही बाजूंनी मोडकळीस आलेल्या वाड्यासारखी अवस्था सध्या पाहायला मिळते आहे. याचं एक कारण म्हणजे या पक्षाला शीर्षस्थानी आवश्यक आहे, तसं खंबीर नेतृत्व सध्या नाही. जे काही शीर्षनेतृत्व ‘गांधी’ घराण्याचं आहे, ती एक अपरिहार्य अगतिकता आहे. पण आता त्या गांधी नावाचा करिष्मा ओसरू लागलेला आहे, असं म्हणण्यास खूप वाव असल्यासारखे निवडणुकांचे निकाल आहेत.

त्यात सोनिया गांधी यांना नेतृत्व सोडायचं आहे, असं दिसत नाही आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावरही पक्षावरची पकड ढिली होऊ देण्यास राहुल गांधी तयार नाहीत, असा हा एकंदरीत  तिढा आहे. आहे त्या नेतृत्वाभोवती बहुसंख्येनं स्वार्थी, बेरके, जनाधार नसलेल्या आणि जुनाट विचारांच्या (Fossil), खुज्या उंचीच्या नेतृत्वाचा (खरं तर सरदार म्हणा किंवा मनसबदार!) भरणा आहे. या बहुसंख्य नेत्यांची मानसिकता पराभूततेची आणि नव्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करणारी आहे. या बहुसंख्य नेत्यांना शीर्षनेतृत्व म्हणून कुणी तरी गांधी तर हवे आहेत, पण त्यांची पूर्ण हुकमत मात्र नको आहे, असा हा अवघड गुंता आहे आणि त्या गुंत्यात काँग्रेस पक्ष पूर्णपणे अडकलेला आहे.

यामुळे पक्षाची स्थिती आणखी वाईट होत चाललेली आहे. अलीकडच्या काळात भाजपशी लढण्याची नुसती भाषा आहे. प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्याशिवाय त्या आघाडीवर अन्य कुणीच लढताना दिसत नाही. सर्व विरोधी पक्षांना या लढाईसाठी एकत्र आणण्यातही काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरलेला आहे. उमेद हरवलेलं, पराभूत मानसिकता असणारं सैन्य लढाई जिंकू शकत नाही, हेही भान काँग्रेसला राहिलेलं नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पक्षाला उभारी देण्याऐवजी राहुल गांधी यांना बळ प्राप्त करून देण्याऐवजी काँग्रेस नेते कसे बेजबाबदार वागत आहेत, याचं उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात २३ नेत्यांनी केलेल्या बंडाकडे पाहायला हवं. पक्षाची इतकी काळजी आहे तर पक्ष पातळीवरच चर्चा होऊ देण्याऐवजी या नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेलं पत्र माध्यमांकडे पोहोचतं केलं आणि तेही या पत्रावर चर्चा करण्याचं मान्य केलेलं असल्यावर. याचा अर्थ ते पत्र/बंड/कळकळ एक स्टंट होता. पक्षाची वाईट स्थिती झालेली आहे, याचं भान या नेत्याना आलं हे चांगलंच होतं असं म्हणता आलं असतं, पण अशी स्थिती निर्माण होण्यासाठी गांधी घराणं वगळता, या नेत्यांपैकी कोणी कोणती जबाबदारी पेलायला हवी होती आणि ती पेलण्यात त्यांना अपयश कसं आणि का आलेलं आहे, याचा ऊहापोह या पत्रात करण्यात आलेला नाही.

इतकी वर्षं पक्षात पदं आणि सत्तेत प्रदीर्घ काळ खुर्ची उबवूनही यापैकी एकही नेता किमान राज्यात तरी पूर्ण जनाधार मिळवू शकलेला नाही, याची प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धाडस या नेत्यांनी दाखवलं नाही. राहुल गांधी यांनी या पत्रासंदर्भात हल्ला चढवताच या नेत्यांनी ते पक्षाशी कसे एकनिष्ठ आहेत आणि आजवर त्यांनी कशी पक्षात बंडखोरी केलेली नाही, याचा दाखला दिला. पण गेल्या सहा-सात वर्षांत राहुल गांधी देशभर फिरून नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे नेते का सहभागी झाले नाहीत, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला असता तर हे सर्व नेते निरुत्तर झाले असते. राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हते तरी किती वेळा या नेत्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले, विविध संसदीय अस्त्रांचा वापर करून किती प्रसंगात सत्ताधारी भाजपची कोंडी लोकसभा आणि राज्यसभेत केली, याही प्रश्नांची उत्तरे जर या नेत्यांनी दिली असती तर चांगलं झालं असतं.

भाजपकडून होणाऱ्या गळचेपी विरुद्ध, फिरवल्या जाणाऱ्या वरवंट्याविरुद्ध, घाईत लादलेल्या नोटबंदी, वस्तू आणि सेवा कराविरुद्ध, राफेल विमानाच्या खरेदीच्या संदर्भात रान पेटवत राहुल गांधी यांनी पुकारलेल्या लढाईत काँग्रेसच्या यापैकी कोणत्या नेत्यानं समिधा टाकण्याचा कधी प्रयत्न केला, याचंही उत्तर मिळायला हवं.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : सामूहिक नेतृत्वाची ‘पिपाणी’ आणि त्रात्याचा ‘शंख’!

..................................................................................................................................................................

राहुल गांधी यांचे काही आरोप अंगलट आले हे खरं आहे, राजकारणात तसं घडतच असतंच, पण त्याचसोबत राहुल यांच्यामागे यापैकी किती नेते पूर्ण ताकदीने उभे राहिले हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण त्या लढाईत पूर्ण ताकदीनं सहभागी न होऊन या बहुसंख्य नेत्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केलेली आहे. राजकारणात पक्षनिष्ठा महत्त्वाच्या असतातच, पण त्यासोबत वेळोवेळी प्रतिस्पर्धी पक्षाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेतली, हेही त्याइतकंच महत्त्वाचं असतं. अशा भूमिकातून त्या नेत्याचं नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा झळाळून निघत असते. काँग्रेसच्या या बहुसंख्य नेत्यांनी या काळात स्वीकारलेल्या मौनी भूमिकेला म्हणूनच ‘सोयीस्कर’ असा अर्थ प्राप्त झाला आणि भाजपला अप्रत्यक्षपणे बळ मिळालं, हे विसरता येणार नाही.

या पत्रावर गंभीर चर्चा करवून आणण्याऐवजी श्रीमती सोनिया गांधी यांनी त्रागा व्यक्त करण्यातून काहीही साध्य झालेलं नाही, हेही सांगून टाकायला हवंच. पक्षाच्या प्रती त्यांचं असणारं योगदान कुणीही कधीही (अगदी त्यांच्या विरोधकांनीही) नाकारलेलं नसताना आणि आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राहणं शक्य नसताना, त्यांनी पुन्हा हंगामी असेना अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं. कोणत्याही दबावाला बळी न पडता सोनिया गांधी यांनी एक तर राहुल गांधी यांच्याकडे झुकणारा त्यांचा कल स्पष्ट सांगायला हवा होता आणि राहुल गांधी यांची रीतसर निवड होईपर्यंत एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपद सोपवून दूर होणं इष्ट ठरलं असतं किंवा गांधी घराण्याला या पदाचा कोणताही मोह नाही, हे एकदा निक्षून सांगून टाकत पक्षाच्या सर्व कटकटीतून मुक्त होत अन्य इच्छुकासाठी अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करून द्यायला हवा होता. पुन्हा हंगामी का असेना पद स्वीकारून, हे पद त्या ‘गांधी घराण्या’तच ठेवू इच्छितात असा संदेश (नकळतपणे का होईना) श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडून दिला गेला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

राहुल गांधी यांना खरंच जर अध्यक्षपदात रस नसेल तर त्यांनीही ते स्पष्ट करायला हवं आणि त्या पदासाठी एखाद्या उमेदवाराचं नाव सुचवण्याचा उमदेपणा दाखवायला हवा किंवा सलग तिसऱ्या पराभवाची भीती न बाळगता, जुन्या धेंडांना कठोरपणे बाजूला सारत त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेत पक्षाची नव्यानं बांधणी करायला हवी. सर्व स्तरावर नवे चेहरे देत पक्षाचा चेहरा ‘तरुण’ करायला हवा. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा तर दिला, पण सोनिया गांधी यांचं स्वास्थ्य ठीक नसल्यानं निर्णयाधिकार राहुल यांच्याकडेच आहेत, हे एक उघड गुपित आहे.

ताजं उदाहरण राज्यसभेतील उपनेतेपद गौरव गोगोई आणि प्रतोदपद रवनीतसिंग बिटू यांच्या नियुक्तीचं आहे. गुलाम नबी आझाद, मनीष तिवारी, चिदंबरम यांसारख्या ज्येष्ठांना डावलून या नियुक्त्या झाल्या आहेत. असाच खमकेपणा यापुढे राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ते जमत नसेल तर त्यांनी पक्षाची आणखी वाताहत होऊ देण्यापेक्षा अन्य कुणाच्या सूत्रं देणं इष्ट ठरेल. देशाच्या राजकारणात नुसती अडगळ बनून राहण्यापेक्षा काँग्रेसनं ‘समृद्ध अडगळ’ होणं बरं असेल, कारण त्यामुळे दिवाणखान्यात शोभेची वस्तू म्हणून तरी स्थान मिळेल!    

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vivek Date

Wed , 16 September 2020

Why the journalists are wasting their and reader time in writing about Sonia and Rahul. Both are politically dead. Rahul did not take any position of responsibility during 10 years of M M Singh leadership as PM. Even now he does not see anyone after six in the evening as reported by Rajdeep Sardesai. Sonia has been running a kitchen cabinet for over 20 years. The leadership and responsible opposition role has to evolve though we see no chance of happening that in Congress. That has to come from people who care.


Vividh Vachak

Sun , 13 September 2020

आपण सोनिया गांधींच्या योगदानाबद्दल बोललात, ते नक्की काय होते हे समजू शकेल का? आणि त्यांचे राजकीय विरोधक जर हे समजत असतील तर ते कुठल्यातरी दुसऱ्या जगात जगतात असे म्हणावे लागेल. तसेच गांधी घराण्याला सत्तेचा मोह नाही हाही एक शोधच म्हणावा लागेल. पदावर नसतानाही एक समांतर सरकार चालवण्याचे कर्तृत्व केवळ त्यांच्याच नावावर आहे आणि त्यातून केलेल्या भ्रष्टाचाराच्या कथा अजून चर्चिल्या जाताहेत . मुळात सत्तेचा मोह नसता तर राजकारण सोडून त्यांनी कधीच काॅंग्रेस पक्ष इतरांच्या हातात सोडला असता. असो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......