र.वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
भाऊसाहेब नन्नवरे
  • र.वा. दिघे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 03 July 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो र. वा. दिघे Raghunath Vaman Dighe पाणकळा Pankala पड रे पाण्या Pad Re Panya आई आहे शेतात Aai Ahe Shetat

र. वा. अर्थात रघुनाथ वामन दिघे यांनी ग्रामीण जीवन, शेतकरी व आदिवासींची दुःखं, व्यथा-वेदना अत्यंत समर्थपणे आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडली. त्यांच्या ११ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, ३ नाटके व १ लोकगीतसंग्रह, अशा एकूण २१ साहित्यकृतींतून व्यापक मानवतावादी दृष्टी, शेतीबद्दलचा आधुनिक विचारविवेक व्यक्त होतो. २५ मार्च १८९६ रोजी जन्मलेल्या रवांचे २०२० - २०२१ हे ‘शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष’ आहे.

४ जुलै १९८० रोजी त्यांचं निधन झालं. उद्या त्यांची ४०वी पुण्यतिथी आहे. या दोन्हींच्या निमित्ताने हा विशेष लेख…

..................................................................................................................................................................

विसाव्या शतकात नाथमाधव, ग. त्र्यं. माडखोलकर, पु. भा. भावे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आदींनी ‘कादंबरी युग’ निर्माण केलं. त्याच वेळी व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘माणदेशी माणसं’मुळे ग्रामीण जीवनाचं अस्सल चित्रण साहित्यातून मांडलं जाऊ लागलं. त्याच काळात ग्रामीण भागातील शेतकरी-आदिवासी समाजाला आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ‘नायक’ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम र. वा. दिघे यांनी केलं.

कोकणातल्या खंडाळा घाटाच्या पायथ्याशी शेतकरी, आदिवासींमध्ये फिरून त्यांच्या जगण्यातली दाहक वास्तवता पहिल्यांदाच प्रभावीपणे मांडणारे खोपोलीचे लेखक म्हणजे रघुनाथ वामन दिघे. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून त्यांनी ग्रामीण जीवन तेथील शेतकरी, त्याचं दुःख व व्यथा-वेदना अत्यंत समर्थपणे चित्रित केल्या. त्यांच्या साहित्यातून व्यापक मानवतावादी दृष्टी व्यक्त होते. दिघे यांच्या कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लेखनातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. मराठी संस्कृतीची नस पकडून त्यांनी वारकरी शेतकऱ्याला नायक बनवलं. शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्यं जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी  संघर्ष करतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची उत्तम वर्णनं दिघेंच्या कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळतात. 

कवी व समीक्षक सतीश काळसेकर म्हणतात, “ज्ञानदेव-तुकारामांच्या विचारांत असलेल्या तत्त्वांची कलात्मक हाताळणी करणारे दिघे हे मराठी कादंबरीचे मापदंडच होत.”

‘पाणकळा’ ही दिघेंची पहिली कादंबरी १९४० साली प्रकाशित झाली. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना त्यांनी या कादंबरीतून मांडल्या आहेत. ही सजलपूर गावातील गावकऱ्यांची आणि तिथल्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या भिल्लांची कथा. १९४० साली जमखिंडीमध्ये भरलेल्या ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलना’त उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ व र.वां.च्या ‘पाणकळा’ या कादंबऱ्यांना भागून देण्यात आला. अलीकडेच माधुरी तळवलकर यांनी ‘पाणकळा’ची संक्षिप्त आवृत्ती (जोत्स्ना प्रकाशन) संपादित केली आहे.

दिघेंनी ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’, ‘हिरवा सण’ आदी कादंबऱ्यांतून शेतकऱ्यांची, आदिवासींची दु:खं समाजासमोर आणली. बीए, एलएलबीचे शिक्षण घेतलेले र.वा. दिघे स्वत: हाडाचे शेतकरी होते. कोकणात न पिकणारा गहू स्वत:च्या शेतात पिकवून दाखवल्यामुळे १९५४-५५ मध्ये खालापूर तालुका विकास संघानं ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून त्यांना गौरवलं होतं. आज शेतकरी आत्महत्या करताहेत, पण हा इशारा दिघेंनी तेव्हाच दिला होता. नुसत्या शेतीवर अवलंबून काही होणार नाही. काही तरी जोडधंदा करा. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा विचारविवेक त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून दिला.

‘आई आहे शेतात’ ही कादंबरी म्हणजे शेतकऱ्यांचं जीवन समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. या कादंबरीतून शेती ही फुकाची नाही, इथं कौशल्य लागतं, शेतीचं ज्ञान असणाऱ्यांच्या हातात तरी जमीन गेली पाहिजे किंवा ज्यांच्या हातात ती आहे, त्यांनी अद्ययावत शेतकरी बनलं पाहिजे. नाहीतर ही काळी आई आपली बाळं खाऊन टाकील. शेतीबद्दल सर्व माहिती आपण मिळवली पाहिजे. शेतकीच्या यशाचं गमक त्यांनी एका कृषीतज्ज्ञाच्या अधिकारवाणीनं शेतकऱ्यांना सांगितलंय. शेतकरी व समाजाबरोबर त्यांनी इतरही काही सामाजिक विषय हाताळले आहेत.

त्यांची ‘कार्तिकी’ ही कादंबरी अस्पृश्यता निवारण या विषयावर आहे. त्यावर पुढे ‘कार्तिकी’ नावाचाच मराठी सिनेमा निघाला. लेखन करण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. ‘सोनकी’ ही कादंबरी लिहिण्यासाठी गोंडवनात जाऊन त्यांनी आदिवासी जीवन व परिसर जवळून पाहिला. नंतर ‘निसर्गकन्या : रानजाई’ व ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. ‘पड रे पाण्या’ या कादंबरीतून त्यांनी पावसाला केलेली आळवणी वाचनीय व उदबोधक आहे.   

“पड रं पाण्या, पड रं पाण्या 

कर पाणी पाणी

शेत माझं लय तान्हलं चातकावाणी

बघ नांगरलं कुळवून वज त्याची केली

सुगरणबाई पाभळली शेतावर नेली

तापली धरणी,

पोळले चरणी मी अनवाणी

पड रं पाण्या, पड रं पाण्या,

कर पाणी पाणी...

‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीत त्यांनी ग्वाल्हेर संस्थानाचा तोमर वंशीय राजा मानसिंह व त्याची प्रेयसी मृगनयना यांची प्रेमकथा रंगवली आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात ठिकठिकाणी पद्यं आहेत.

दिघे यांनी काही कथालेखनही केलेलं आहे. त्यांची ‘लज्जा’ ही पहिली कथा ‘मनोहर’ या मासिकातून प्रसिद्ध झाली. पुढे त्यांच्या कथा ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रकाशित होऊ लागल्या. ‘रम्यरात्री’, ‘पूर्तता’, ‘आसरा’, ‘ताजमहाल’ हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘माझा सबूद’, ‘द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड्’ (इंग्रजी) ही नाटकं त्यांनी लिहिली. त्यांच्या नावावर ‘गातात व नाचतात धरतीची लेकरे’ नावाचा एक लोकगीतसंग्रहही आहे. काही कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अप्रकाशित आहेत.

लोकसंस्कृती, लोकजीवन, निसर्ग, माणसं त्यांच्या समजुती, चालीरीती, बोलीभाषा, दैवतं यांचा समूहनिष्ठ कलात्मक आविष्कारच दिघे यांच्या लेखनातून व्यक्त होतो. ग्रामीण जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून व निसर्गाच्या रम्य सहवासातून त्यांचं लेखन स्फुरलेलं आहे. “बाबांनी कुठलंही लेखन चार भिंतीच्या आत बसून न करता निसर्गाच्या सानिध्यात केलं. कधी आमच्या घराच्या परसात असणाऱ्या आंब्यांच्या झाडाखाली, शेताच्या बांधावर, विहारीत नदीवर बांधलेल्या पुलाच्या खांबाला टेकून ते लेखन करत असत,” अशी आठवण त्यांचे चिरंजीव वामनराव सांगतात.

त्यांच्या कादंबऱ्यांत नाट्यपूर्ण, रसरशीत साहसी घटना, अद्‌भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णनं, ठसठशीत व्यक्तिदर्शनं, ग्रामीण जीवन यांचं प्रत्ययपूर्ण चित्रण आलं आहे.

दिघेंच्या ‘पाणकळा’ या कादंबरीवर ‘मदहोश’ व ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा मराठी चित्रपट आला. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दिघेंचा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव केला.

दिघे यांच्या साहित्यावर संशोधन करून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी ‘कादंबरीकार र.वा.दिघे’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे. १९६० साली ठाणे येथील साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सन्मान झाला. असं असलं तरी कोकणातला हा महान साहित्यिक काहीसा उपेक्षित राहिला. मराठी समीक्षेनं म्हणावी तशी दखल त्यांच्या लेखनाची घेतली नाही. “कथा-कादंबरीकार या नात्याने र.वा. दिघे यांचे मूल्यमापन करण्यात व त्यांची स्थाननिश्चिती करण्यात आपल्याला यश आले नाही,” अशी खंत कवी-समीक्षक सतीश काळसेकर यांनी व्यक्त केली आहे.

कोकणाला एक मोठी साहित्यिक परंपरा आहे. ‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कादंबरीकार विश्वास पाटील हे र. वा. दिघे यांना प्रेरणास्थानी मानतात. ‘र.वा.दिघे यांची खोपोली’ म्हटलं की, अभिमानानं उर भरून येतो. खोपोलीतील ‘विहारी’त त्यांचं वास्तव्य होतं. खोपोली नगरपरिषदेच्या पुढाकारानं व शासनाच्या सहकार्यानं ‘र.वा.दिघे स्मारक व वाचनालय’ उभं राहिलं आहे. त्यांच्या लेखनाचा वारसा त्यांच्या स्नुषा कवयित्री सौ. उज्ज्वला वामन दिघे पुढे चालवत आहेत. वामनराव दिघे यांनी अथक प्रयत्नातून संस्कृती प्रकाशना (पुणे)च्या माध्यमातून वडिलांची सर्व ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे. नव्या पिढीसाठी ती प्रेरणादायी आहे. दिघेंची साहित्यिक परंपरा जपण्याचं काम खोपोली व पंचक्रोशीतील नव्या पिढीचं लेखक-कवी जोमानं करत आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक भाऊसाहेब नन्नवरे खोपोलीच्या के.एम.सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.

nannwareb@yahoo.com

..................................................................................................................................................................

र. वा. दिघे यांची साहित्यसंपदा

कादंबरी : पाणकळा, सराई, आई आहे शेतात, पड रे पाण्या, कार्तिकी, सोनकी, हिरवा सण, निसर्गकन्या : रानजाई, गानलुब्धा मृगनयना, वसंतराव व चाळीसचोर,

कथासंग्रह : पूर्तता, पावसाचं पाखरू, रम्यरात्री, पांडुरंग कांती, लक्ष्मीपूजन, आसरा

नाटके : माझा सबुद (मराठी), द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड् (इंग्रजी)

लोकगीतसंग्रह : गातात  व नाचतात धरतीची लेकरे

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......