र.वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
भाऊसाहेब नन्नवरे
  • र.वा. दिघे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 03 July 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो र. वा. दिघे Raghunath Vaman Dighe पाणकळा Pankala पड रे पाण्या Pad Re Panya आई आहे शेतात Aai Ahe Shetat

र. वा. अर्थात रघुनाथ वामन दिघे यांनी ग्रामीण जीवन, शेतकरी व आदिवासींची दुःखं, व्यथा-वेदना अत्यंत समर्थपणे आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडली. त्यांच्या ११ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, ३ नाटके व १ लोकगीतसंग्रह, अशा एकूण २१ साहित्यकृतींतून व्यापक मानवतावादी दृष्टी, शेतीबद्दलचा आधुनिक विचारविवेक व्यक्त होतो. २५ मार्च १८९६ रोजी जन्मलेल्या रवांचे २०२० - २०२१ हे ‘शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष’ आहे.

४ जुलै १९८० रोजी त्यांचं निधन झालं. उद्या त्यांची ४०वी पुण्यतिथी आहे. या दोन्हींच्या निमित्ताने हा विशेष लेख…

..................................................................................................................................................................

विसाव्या शतकात नाथमाधव, ग. त्र्यं. माडखोलकर, पु. भा. भावे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आदींनी ‘कादंबरी युग’ निर्माण केलं. त्याच वेळी व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘माणदेशी माणसं’मुळे ग्रामीण जीवनाचं अस्सल चित्रण साहित्यातून मांडलं जाऊ लागलं. त्याच काळात ग्रामीण भागातील शेतकरी-आदिवासी समाजाला आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ‘नायक’ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम र. वा. दिघे यांनी केलं.

कोकणातल्या खंडाळा घाटाच्या पायथ्याशी शेतकरी, आदिवासींमध्ये फिरून त्यांच्या जगण्यातली दाहक वास्तवता पहिल्यांदाच प्रभावीपणे मांडणारे खोपोलीचे लेखक म्हणजे रघुनाथ वामन दिघे. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून त्यांनी ग्रामीण जीवन तेथील शेतकरी, त्याचं दुःख व व्यथा-वेदना अत्यंत समर्थपणे चित्रित केल्या. त्यांच्या साहित्यातून व्यापक मानवतावादी दृष्टी व्यक्त होते. दिघे यांच्या कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लेखनातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. मराठी संस्कृतीची नस पकडून त्यांनी वारकरी शेतकऱ्याला नायक बनवलं. शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्यं जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी  संघर्ष करतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची उत्तम वर्णनं दिघेंच्या कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळतात. 

कवी व समीक्षक सतीश काळसेकर म्हणतात, “ज्ञानदेव-तुकारामांच्या विचारांत असलेल्या तत्त्वांची कलात्मक हाताळणी करणारे दिघे हे मराठी कादंबरीचे मापदंडच होत.”

‘पाणकळा’ ही दिघेंची पहिली कादंबरी १९४० साली प्रकाशित झाली. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना त्यांनी या कादंबरीतून मांडल्या आहेत. ही सजलपूर गावातील गावकऱ्यांची आणि तिथल्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या भिल्लांची कथा. १९४० साली जमखिंडीमध्ये भरलेल्या ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलना’त उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ व र.वां.च्या ‘पाणकळा’ या कादंबऱ्यांना भागून देण्यात आला. अलीकडेच माधुरी तळवलकर यांनी ‘पाणकळा’ची संक्षिप्त आवृत्ती (जोत्स्ना प्रकाशन) संपादित केली आहे.

दिघेंनी ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’, ‘हिरवा सण’ आदी कादंबऱ्यांतून शेतकऱ्यांची, आदिवासींची दु:खं समाजासमोर आणली. बीए, एलएलबीचे शिक्षण घेतलेले र.वा. दिघे स्वत: हाडाचे शेतकरी होते. कोकणात न पिकणारा गहू स्वत:च्या शेतात पिकवून दाखवल्यामुळे १९५४-५५ मध्ये खालापूर तालुका विकास संघानं ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून त्यांना गौरवलं होतं. आज शेतकरी आत्महत्या करताहेत, पण हा इशारा दिघेंनी तेव्हाच दिला होता. नुसत्या शेतीवर अवलंबून काही होणार नाही. काही तरी जोडधंदा करा. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा विचारविवेक त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून दिला.

‘आई आहे शेतात’ ही कादंबरी म्हणजे शेतकऱ्यांचं जीवन समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. या कादंबरीतून शेती ही फुकाची नाही, इथं कौशल्य लागतं, शेतीचं ज्ञान असणाऱ्यांच्या हातात तरी जमीन गेली पाहिजे किंवा ज्यांच्या हातात ती आहे, त्यांनी अद्ययावत शेतकरी बनलं पाहिजे. नाहीतर ही काळी आई आपली बाळं खाऊन टाकील. शेतीबद्दल सर्व माहिती आपण मिळवली पाहिजे. शेतकीच्या यशाचं गमक त्यांनी एका कृषीतज्ज्ञाच्या अधिकारवाणीनं शेतकऱ्यांना सांगितलंय. शेतकरी व समाजाबरोबर त्यांनी इतरही काही सामाजिक विषय हाताळले आहेत.

त्यांची ‘कार्तिकी’ ही कादंबरी अस्पृश्यता निवारण या विषयावर आहे. त्यावर पुढे ‘कार्तिकी’ नावाचाच मराठी सिनेमा निघाला. लेखन करण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. ‘सोनकी’ ही कादंबरी लिहिण्यासाठी गोंडवनात जाऊन त्यांनी आदिवासी जीवन व परिसर जवळून पाहिला. नंतर ‘निसर्गकन्या : रानजाई’ व ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. ‘पड रे पाण्या’ या कादंबरीतून त्यांनी पावसाला केलेली आळवणी वाचनीय व उदबोधक आहे.   

“पड रं पाण्या, पड रं पाण्या 

कर पाणी पाणी

शेत माझं लय तान्हलं चातकावाणी

बघ नांगरलं कुळवून वज त्याची केली

सुगरणबाई पाभळली शेतावर नेली

तापली धरणी,

पोळले चरणी मी अनवाणी

पड रं पाण्या, पड रं पाण्या,

कर पाणी पाणी...

‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीत त्यांनी ग्वाल्हेर संस्थानाचा तोमर वंशीय राजा मानसिंह व त्याची प्रेयसी मृगनयना यांची प्रेमकथा रंगवली आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात ठिकठिकाणी पद्यं आहेत.

दिघे यांनी काही कथालेखनही केलेलं आहे. त्यांची ‘लज्जा’ ही पहिली कथा ‘मनोहर’ या मासिकातून प्रसिद्ध झाली. पुढे त्यांच्या कथा ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रकाशित होऊ लागल्या. ‘रम्यरात्री’, ‘पूर्तता’, ‘आसरा’, ‘ताजमहाल’ हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘माझा सबूद’, ‘द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड्’ (इंग्रजी) ही नाटकं त्यांनी लिहिली. त्यांच्या नावावर ‘गातात व नाचतात धरतीची लेकरे’ नावाचा एक लोकगीतसंग्रहही आहे. काही कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अप्रकाशित आहेत.

लोकसंस्कृती, लोकजीवन, निसर्ग, माणसं त्यांच्या समजुती, चालीरीती, बोलीभाषा, दैवतं यांचा समूहनिष्ठ कलात्मक आविष्कारच दिघे यांच्या लेखनातून व्यक्त होतो. ग्रामीण जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून व निसर्गाच्या रम्य सहवासातून त्यांचं लेखन स्फुरलेलं आहे. “बाबांनी कुठलंही लेखन चार भिंतीच्या आत बसून न करता निसर्गाच्या सानिध्यात केलं. कधी आमच्या घराच्या परसात असणाऱ्या आंब्यांच्या झाडाखाली, शेताच्या बांधावर, विहारीत नदीवर बांधलेल्या पुलाच्या खांबाला टेकून ते लेखन करत असत,” अशी आठवण त्यांचे चिरंजीव वामनराव सांगतात.

त्यांच्या कादंबऱ्यांत नाट्यपूर्ण, रसरशीत साहसी घटना, अद्‌भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णनं, ठसठशीत व्यक्तिदर्शनं, ग्रामीण जीवन यांचं प्रत्ययपूर्ण चित्रण आलं आहे.

दिघेंच्या ‘पाणकळा’ या कादंबरीवर ‘मदहोश’ व ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा मराठी चित्रपट आला. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दिघेंचा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव केला.

दिघे यांच्या साहित्यावर संशोधन करून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी ‘कादंबरीकार र.वा.दिघे’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे. १९६० साली ठाणे येथील साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सन्मान झाला. असं असलं तरी कोकणातला हा महान साहित्यिक काहीसा उपेक्षित राहिला. मराठी समीक्षेनं म्हणावी तशी दखल त्यांच्या लेखनाची घेतली नाही. “कथा-कादंबरीकार या नात्याने र.वा. दिघे यांचे मूल्यमापन करण्यात व त्यांची स्थाननिश्चिती करण्यात आपल्याला यश आले नाही,” अशी खंत कवी-समीक्षक सतीश काळसेकर यांनी व्यक्त केली आहे.

कोकणाला एक मोठी साहित्यिक परंपरा आहे. ‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कादंबरीकार विश्वास पाटील हे र. वा. दिघे यांना प्रेरणास्थानी मानतात. ‘र.वा.दिघे यांची खोपोली’ म्हटलं की, अभिमानानं उर भरून येतो. खोपोलीतील ‘विहारी’त त्यांचं वास्तव्य होतं. खोपोली नगरपरिषदेच्या पुढाकारानं व शासनाच्या सहकार्यानं ‘र.वा.दिघे स्मारक व वाचनालय’ उभं राहिलं आहे. त्यांच्या लेखनाचा वारसा त्यांच्या स्नुषा कवयित्री सौ. उज्ज्वला वामन दिघे पुढे चालवत आहेत. वामनराव दिघे यांनी अथक प्रयत्नातून संस्कृती प्रकाशना (पुणे)च्या माध्यमातून वडिलांची सर्व ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे. नव्या पिढीसाठी ती प्रेरणादायी आहे. दिघेंची साहित्यिक परंपरा जपण्याचं काम खोपोली व पंचक्रोशीतील नव्या पिढीचं लेखक-कवी जोमानं करत आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक भाऊसाहेब नन्नवरे खोपोलीच्या के.एम.सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.

nannwareb@yahoo.com

..................................................................................................................................................................

र. वा. दिघे यांची साहित्यसंपदा

कादंबरी : पाणकळा, सराई, आई आहे शेतात, पड रे पाण्या, कार्तिकी, सोनकी, हिरवा सण, निसर्गकन्या : रानजाई, गानलुब्धा मृगनयना, वसंतराव व चाळीसचोर,

कथासंग्रह : पूर्तता, पावसाचं पाखरू, रम्यरात्री, पांडुरंग कांती, लक्ष्मीपूजन, आसरा

नाटके : माझा सबुद (मराठी), द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड् (इंग्रजी)

लोकगीतसंग्रह : गातात  व नाचतात धरतीची लेकरे

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......