नरभक्षक माणसाच्या पुनरागमनाची कथा
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
जयदेव डोळे
  • ‘टेंडर इज द फ्लेश’ या कादंबरीचे मुखपृष्ठ आणि लेखिका ऑगस्टिना बझ्तेरिका
  • Tue , 30 June 2020
  • ग्रंथनामा इंग्रजी पुस्तक टेंडर इज द फ्लेश Tender is the Flesh ऑगस्टिना बझ्तेरिका Agustina Bazterrica कोविड-१९ Covid-19

कोविड-१९ या विषाणूने लेखकांना खूप फुरसत दिलेलीय. कोंडमारा, घुसमट, दडपशाही यांचा काळ फार सर्जनशील असतो. कितीतरी अफाट अन अचाट कल्पना सुचतात त्यात. सत्ताधाऱ्यांना अशा कधी आपण केलेल्या दडपशाहीतून तर कधी आपसूक तयार झालेल्या कोंडीतून जे साहित्य प्रसवते, त्याची फार धास्ती असते. ते बारीक लक्ष ठेवून असतात. या लोकांच्या कल्पनांमधून काय बाहेर पडेल व आपला घास घेऊन टाकील याने तमाम सत्ताधारी (अर्थातच एकाधिकारशाही, हुकूमशाही वृत्तीचे) काळजीत पडलेले असतात. यापुढचे उत्तम साहित्य काश्मिरी असेल का? कित्येक वर्षे या राज्याने मुस्कटदाबी अन दहशत सोसलेली. त्यात गेली १० महिने आणीबाणीसदृश परिस्थिती. समजा लेखक-कवी लिहू लागले तर केवढे दाहक, दु:खी अन दीप्तीमान असेल ते!

पण काही लेखक तसे वातावरण सभोवती नसताना केवळ कल्पनेद्वारे अशा भयंकर जगाची उभारणी करतात की, ते बनावट वाटू लागते. ‘छे! असे कधी घडेल का?’, ‘असे होऊच शकणार नाही’, असे म्हणत त्या लेखकाची वाट लावण्यास वाचक मागेपुढे बघत नाहीत. आता २०१७ साली कुणी विषाणूच्या विश्वव्यापी विध्वंसाची कल्पना केली असती तर असेच झाले असते. ही तर विज्ञानकथा किंवा हे भयकथेचे एक उदाहरण म्हणून त्याकडे बघितले गेले असते. ‘टेंडर इज द फ्लेश’ या कादंबरीची अशीच वासलात लागली असती. ऑगस्टिना बझ्तेरिका यांनी २०१७ साली स्पॅनिश भाषेत लिहिलेली ही कादंबरी मात्र तशी नाही. अर्जेंटिना देशाची ही लेखिका तशी तरुण व नवी आहे. म्हणजे हे तिचे दुसरे पुस्तक. त्याआधी एक कथासंग्रहही प्रसिद्ध झालेलाय. मात्र या कादंबरीचा  नऊ भाषांत अनुवाद होऊन एक टीव्ही मालिकाही तीवर निघालीय.

एका अनाम देशाच्या अनाम शहराची ही कहाणी. एका विषाणूमुळे सारे प्राणी-पशू विषारी होऊन जातात. ते सर्व नष्ट केले जातात. ना घरी कुणी पाळायचे, ना प्राणीसंग्रहालयात. खायचा तर प्रश्नच नाही. पण एक अडचण आली. माणसाला लागणारी प्रथिने कुठून मिळवायची? माणूस खायला सुरुवात केली तर? सरकार परवानगी देते. मग सुरू होते माणसांची कत्तल. मृतदेहांची पळवापळवी, काळाबाजार, चोरटी वाहतूक असे सारे. ‘ह्यूमन ब्रीडींग’ही केले जाते. मग सरकारी काही कठोर नियम करते. ‘नरभक्षण’ (कॅन्निबालिझम) शब्द वापरायचा नाही. ‘कत्तलखाना’, ‘माणूस’, ‘मानवी मांस’ हेही शब्द वापरायचे नाहीत. जो वापरेल त्याची रवानगी खाद्य म्हणून होईल! कुठे? प्रोसेसिंग प्लांट अर्थात प्रक्रिया कारखान्यात. ‘स्पेशल मीट’साठी खास, शुद्ध, तरुण, निर्जंतुक, पुष्ट शरीरे जन्माला घालायला प्रयोगशाळा व फलन-संवर्धन केंद्रे सुरू होतात. मेंदूपासून यकृत, हृदय, हातपाय यांचे चवदार, पौष्टिक खाद्यपदार्थ जेवणात खाल्ले जातात.

कादंबरीचा नायक एका प्रक्रिया केंद्राचा व्यवस्थापक असूनही माणूस खात नसतो. कादंबरीची अखेर अशी आहे की, नायक मार्कोस याला भेट म्हणून मिळालेली एक स्त्री तो उपभोगतो, भयंकर असूनही. तिला एक सुंदर, निरोगी मुलगा होतो. तिला तो बेशद्ध करून खाद्य व्हायला धाडतो. मार्कोसची पत्नी एक परिचारिका असते. दोघांचे एक मूल दगावलेले असते. त्या स्त्रीचे बाळंतपण करायला मार्कोस पत्नीला बोलावतो. ती हादरते, पण सारी प्रसृती व्यवस्थित करते. मार्कोस त्या स्त्रीला बेशुद्ध करतोय हे पाहून पत्नी म्हणते, ‘अरे, तिने आणखी मुले दिली असती की आपल्याला!’ तो स्त्रीदेह उच्च प्रतीचा म्हणून जोपासलेला असतो. मार्कोसला काहीही करून मूल हवे असते. ते त्या दर्जेदार देहाकडून मिळवणे हा लेखिकेने हिटलरच्या शुद्ध संततीच्या आग्रहाशी जोडलेला प्रसंग. त्या देशाची स्थिती नाझीवादाकडे वळत चालल्याची ही सूचना. पुरुषप्रधान समाज तर तो असतोच.

बाकी कादंबरी इतकी वेधक व धक्कादायक आहे की, सारी कथा सांगण्यात खूप जागा जाईल.

कोविड-१९नंतर सारे जग बदलेल असे सांगणाऱ्यांसाठी या कादंबरीने ‘ट्रान्झिशन’ (स्थित्यंतर) हा शब्द बहाल केलेलाय. पण खरोखर तो विषाणू तेवढा खतरनाक होता काय आणि मुळात तो होता काय असा संशय कादंबरीत घेतला गेलाय. एक सुप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ सांगतो की, हा विषाणू एक बकवास असून लोकसंख्यावाढ घटवण्यासाठी हे कुभांड रचलेलेय. हा गृहस्थ एका गूढ अपघातात ठार होतो. काही बेकार तरुण एका ओसाड प्राणीसंग्रहालयाच्या आवारात सापडलेली कुत्र्याची पिल्ले मारून टाकण्याचा खेळ खेळताना म्हणतात की, ‘हा सारा बनाव आहे. बेकारी, गरिबी व लोकसंख्या कमी करण्यासाठी चाललेय हे सारे!’

जीजीबी नामक तो व्हायरस आहे, हे समजताच आलेले सामूहिक उन्मादाचे झटके, आत्महत्या अन दहशत यांचा फैलाव होतो. मार्कोसला वाटते की, प्राण्यांमधून विषबाधा होईल ही ऑफिशियल लाईन झाली. आम्ही सरकारी साच्याप्रमाणे वागावे, कोणी प्रश्न विचारू नयेत म्हणून जी कारणे दिली गेली ती वजनदार होती. माध्यमांनी ‘स्थित्यंतर’ हा शब्द असा माथी मारलाय जणू ते खरेच झालेय. पण मार्कोसला माहितेय हे स्थित्यंतर किती झटपट अन क्रूर होते ते.

कित्येक देशांत स्थलांतरितांसह गरीब अन वंचित लोक गायब होऊ लागले. त्यांचा छळ आणि शेवटी खाद्य होऊ लागले. बड्या उद्योगांनी सरकारांवर दबाव आणल्यावर माणूस खाण्याचा कायदेशीर कार्यक्रम आरंभला. त्यांनीच वाढती मागणी पाहून प्राण्यांसारखे मानवपालन-जनन सुरू केले. पण एक झाले. दारिद्रय व लोकसंख्या कमी झाली. विद्यापीठे, डॉक्टर्स सांगू लागले की, हे मांस खाण्यायोग्य आहे. भाजीपाला खाणाऱ्यांनाही रोग होऊ शकतात असे लेख प्रसिद्ध होऊ लागले. प्राणी खाऊन माणसे मरण पावल्याच्या बातम्या दिल्या जाऊ लागल्या. जनमत पालटले. विरोध मावळला. चीनमध्ये जागा पुरेना म्हणून माणसे मारली जाऊ लागल्याची उदाहरणे दिली जाऊ लागली…

स्पॅनिश बोलणाऱ्या बव्हंशी देशांनी हुकूमशाही, लष्करशाही, एकाधिकारवाद भोगलाय. त्यामुळे या भाषेतील बव्हंश लेखक राजकीयदृष्ट्या फार जागरूक व धीट असतात. कारस्थाने, कट, बंडे, प्रचार, वावड्या यांचा त्यांना इतिहास आहे. म्हणून त्यांचे लेखन प्रचंड कल्पक तरीही वास्तवास धरून असते. त्यामध्ये ऑगस्टिनाची भर पडलीय.

पत्रकार जशी कोणतीही घटना वरकरणी न घेता तिचा चौफेर व सखोल अंदाज घेतो व मग बातमीचे रूप तिला देतो, तसे या लेखकांचे भयभीत समाज, पडद्याआडची सत्ता, आंतरराष्ट्रीय बाजार आदी संबंध ते त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत जोडतात.

‘टेंडर इज द फ्लेश’मध्ये जे देह खाण्यायोग्य बनवले जात आहेत, त्यांच्या घशातून स्वरयंत्रे काढलेली असतात. कसलाच आवाज काढता येऊ नये यासाठी! हा केवढा तरी मोठा संकेत लेखिका अवघ्या तीन वर्षांपूर्वी देऊन बसलीय. शिवाय माणसांना ‘पाळीव प्राणी’ म्हणून घडवण्याची प्रतिमा तर केवढी स्फोटक आहे! कादंबरीत ती खाण्यासाठी आहेत. आपणही आसपास रक्ताला चटावलेले पाळीव हिंसक माणसे अनुभवतोय. खाद्यरूपी देहाचे उत्पादन शास्त्रशुद्ध निर्जंतुक, निर्दोष अन आवडीनुसार (काळ्या कातडीला मागणी खूप) बनवण्याचा विविध कंपन्यांचा खटाटोप आजही आपण अन्य बाबतीत बघतोच की! नको असलेली माणसे आज असंख्य कंपन्या टाकून देताहेत! त्यांच्या पोटापाण्याची पर्वा मुळीच न करता. कादंबरीत खराब, बिघडलेले, कापताना चुकलेले देह ‘स्कॅव्हेंजर्स’च्या जमावाला देण्याची पद्धत आहे. तो प्रत्येक कारखान्याबाहेर उभा असतोच. म्हणजे गरिबी, भूक, बेकारी संपलेली नाहीय.

माओच्या सांस्कृतिक क्रांतीच्या प्रयोगावेळी कित्येक लेखक, वैज्ञानिक, विचारवंत, प्राध्यापक, कलावंत, राजकीय नेते शेतात व कारखान्यात उत्पादन करायला पाठवले जात. ते सारे प्रतिक्रांतिकारक, वाट चुकलेले समजले जात. माओच्या मृत्युनंतर ‘गँग ऑफ फोर’चा अमल उठला. तेव्हा नव्या सरकारनेच या सांस्कृतिक क्रांतीत काय अनुभव आले ते लिहायला उत्तेजन दिले. पुष्कळ कथा व कादंबऱ्या आणि नवे लेखक-लेखिका यामुळे जगाला वाचता आल्या. पण आता? आता फुटकळ रूपात, सौम्य टीका सहन केली जाते. माफक टीका व विश्लेषण करणारे चित्रपट व वाङ्मय उपलब्ध आहे. चीनमध्ये व्यक्तीवाद वाढलाय, पण उच्चारस्वातंत्र्य आक्रसलेय.

युद्धे असोत की विकास, विषाणू असो की अंतराळ, सरकारी शब्दाला वजन असते आणि जनता हळूहळू त्यापुढे झुकते, हे मार्कोस समजून घेतो, हे या कादंबरीचे मर्म. मात्र त्याला या शारीरविक्रीत सामील व्हावे लागते. तरीही तो नरभक्षक होणे टाळून स्वत्व टिकवतो हेही महत्त्वाचे. भारतीय मध्यमवर्ग सरकारी उत्तेजनानुसार हिंदुत्ववादी, उग्र राष्ट्रवादी अन धर्मद्वेष्टा होतोय. सर्व उदार, पुरोगामी, आधुनिक, समतावादी, सामाजिक न्यायनिष्ठ विचार हा मध्यमवर्ग झुगारतोय तरी किंवा त्याची टिंगलटवाळी तरी करतोय.

नरभक्षक होण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे पुन्हा आदिम समाजाकडे वळणे. मानवाने केलेली प्रगती नष्ट करणे. भावनांचे राजकारण बहुतेकदा आदिम रूपातच व्यक्त होते. त्यामुळे अवघा समाज असुरक्षित, अस्वस्थ व अस्थिर होत राहतो.

कोविड-१९ने उजव्या पक्षांची सत्ता अधिक सहजपणे बळकट करण्याची संधी दिलेलीय. होतेयही तसेच. विरोधक दुर्बल, माध्यमे मांडीवर, नागरिक गाफील. अशा वेळी साहित्यिक जेवढे सर्जक होतील तेवढ जागृतीसाठी गरजेचे आहे. अजून प्रकाशन संस्थांकडे सरकारची वक्रदृष्टी गेलेली दिसत नाहीय. पण वाट कशाला पाहायची?

..................................................................................................................................................................

‘टेंडर इज द फ्लेश’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.amazon.in/dp/B082VPXVHT?ref

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......