आपण अजून ‘जात्यात’ नाही, पण ‘सुपात’ जाण्याच्या मार्गावर आहोत…
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • भारताचा नकाशा
  • Fri , 22 May 2020
  • पडघम देशकारण करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus लॉकडाउन Lockdown

१.

- २४ मार्च २०२० रोजी जगभरातल्या करोनाबाधितांची संख्या होती -  ३, ८०, ०००

आणि मृतांची संख्या होती -  १६, ०००.

- ११ एप्रिल २०२० रोजी जगभरातील करोनाबाधितांची संख्या होती एक कोटी ६० लाख आणि मृतांची संख्या होती १,००,०००.

- १९ मे २०२० रोजी जगभरातल्या करोनाबाधितांची संख्या होती - ४,९७१,७६५

आणि मृतांची संख्या होती – ३, २४, १५७.

- पहिल्या ६७ दिवसांत जगभरात करोनाबाधितांची संख्या १,००,००० झाली. त्यातील बहुतेक चीनमधले होते. पुढच्या ११ दिवसांत ही संख्या २, ००,००० वर पोहोचली.

१९ मे २०२० रोजी भारतातील करोनाबाधितांची संख्या १, ०१, १३९वर पोहोचली, तर मृतांची संख्या ३,१६३ वर आणि करोनाबाधेतून बरे झालेल्यांची संख्या ३९,१७४वर. ३० जानेवारी रोजी भारतातला पहिला करोनाबाधित रुग्ण सापडला, त्याला १९ मे रोजी १११ दिवस झाले. (आज २२ मे रोजी ही संख्या आहे १,१८,५०१, तर मृतांची संख्या आहे ३,५८५.)

२४ मार्च रोजी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केलं, तेव्हा देशातील करोनाबाधितांची संख्या १, ०००पेक्षा कमी होती.

पहिलं लॉकडाऊन २४ मार्च २०२०च्या रात्री जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाभारतातलं कौरवांविरुद्धचं पाडवांचं युद्ध संपायला १८ दिवस लागले होते, आम्ही करोनाविरुद्धचं युद्ध २१ दिवसांमध्ये जिंकू असं सांगितलं होतं.

पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या या युद्धाची मुदत १४ एप्रिल रोजी संपली. पण लढाई बाकी होती. ना मोदी सरकार जिंकलं होतं, ना करोना. त्यामुळे ही मुदत ३ मे पर्यंत म्हणजे अजून १९ दिवसांसाठी वाढवली गेली. ४० दिवस झाले तरी करोनाविरुद्धचं युद्ध संपलं नाही. म्हणून मग १७ मेपर्यंत म्हणजे अजून १४ दिवसांसाठी मुदत वाढवली गेली. एकंदर ५४ दिवस झाले तरी युद्ध संपायला तयार नाही. त्यामुळे अजून १४ दिवस म्हणजे ३१ मे पर्यंत लॉकडाउनची मुदत वाढवली गेली आहे. या ६८ दिवसांच्या लॉकडाउनची फलनिष्पत्ती काय हे ३१ मे नंतरच हळूहळू सिद्ध होत राहील.

आज या लॉकडाउनला ५९ दिवस झाले आहेत. म्हणजे उद्या दोन महिने पूर्ण होतील.

दरम्यान १२ मे २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा सामना करण्यासाठी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्यानंतरचे चार-पाच दिवस केंद्रीय अर्थमंत्री त्या पॅकेजचा तपशील सांगत होत्या. इतकं मोठं पॅकेज असल्यामुळे त्याची तपशीलवार माहिती देण्यासाठी अर्थमंत्र्याला सलग चार-पाच दिवस खर्च करावे लागले!

‘२० लाख कोटींचं पॅकेज’ ही हेडलाईन १३ मे रोजी देशभरातल्या सर्व वर्तमानपत्रांत छापून आली.

कोलकात्याच्या टेलिग्राफनेही ती छापली. पण ही अशी –

अगदी नेमकी, योग्य अशी.

या बातमीचं प्रत्यंतर येत आहेच, येत राहील.

एनडीटीव्हीच्या रवीश कुमार यांनीही या तथाकथित २० लाख कोटींच्या पॅकेजवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे –

२.

असो, तर आपला मुद्दा आहे की, १९ मे रोजी देशातील करोनाबाधितांच्या संख्येनं एक लाखाचा टप्पा पार केला. आणि आता आपण सव्वालाखाच्या दिशेनं वाटचाल करतो आहोत.

हा टप्पा जगभरात केवळ आपणच केला असं नाही. जगभरातल्या अनेक देशांनी केला आहे.

या देशांना एक लाखांचा टप्पा गाठण्यासाठी मात्र वेगवेगळा कालावधी लागला आहे. त्यातील सर्वाधिक कालावधी भारताला लागला आहे.

बाधितांची संख्या १ लाखावर पोहोचण्यासाठी देशातल्या कुठल्या देशाला किती दिवस लागले?

इटलीला ६० दिवस

स्पेनला ६१ दिवस

अमेरिकेला ६६ दिवस

ब्राझीलला ६८ दिवस

जर्मनीला ७० दिवस

ब्रिटनला ७७ दिवस

फ्रान्सला ८० दिवस

आणि

भारताला १११ दिवस.

पहिल्या १०,००० केसेससाठी भारताला दोनपेक्षा जास्त महिन्यांचा कालावधी लागला, तर शेवटच्या १०, ००० केसेस केवळ दोन दिवसांत सापडल्या.

पण म्हणून आपण घाबरून जाण्याची गरज नाही किंवा भयभीत होण्याचीही गरज नाही.

घरादाराच्या दिशेनं मिळेल त्या मार्गानं ‘धोक्यात जीव’ आणि ‘जीवात धोका’ घालून निघालेल्या स्थलांतरित मजुरांची फिकीर करायची गरज नाही.

तशी ती सरकार करत नाहीच.

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, येत्या काही दिवसांत अजून अनेकांच्या जातील.

त्यांनी २० लाख कोटींच्या पॅकेजच्या हेडलाइन्स वाचाव्यात, अधिक माहितीसाठी त्याखालच्या बातम्या वाचाव्यात.

ज्यांचे पगार मागच्या महिन्यापासून कापले जात आहेत आणि ते बहुधा जूनपर्यंत कापले जातील,

त्यांनी एवढ्या मोठ्या जागतिक संकटाच्या काळात थोडीफार तरी झळ बसणारच हे स्वच्छपणे लक्षात घ्यावं.

उगाच गळेबिळे काढू नयेत.

आणि समजा काढले तरी त्याचा फायदा काय?

शून्य.

छोटे-मोठे अनेक व्यवसाय येत्या काळात बंद पडण्याची शक्यता आहे.

त्यांनीही २० लाख कोटींच्या पॅकेजच्या हेडलाइन्सची वर्तमानपत्रं रद्दीत जाण्याआधी बाजूला काढून ठेवावीत. नंतर त्या हेडलाइन्स आणि त्या खालच्या बातम्या कामी येतील स्वत:चं सांत्वन करण्यासाठी.

तेव्हा डोंट फरगेट, तेवढं लक्षात ठेवावं.

खासकरून ही वर्तमानपत्रं दिवानखान्यातल्या दर्शनी भागात ठेवा.

येता-जाता त्यावरून नजर मारत रहा.

दिल के ख़ुश रखने को ‘ग़ालिब’ ये ख़याल अच्छा है!

घरात बसून उबगला असाल तर बाहेर एखादा फेरफटका मारून या.

‘रामायण’ पहा,

‘महाभारत’ पहा.

केंद्रीय मंत्र्यांनी एवढी सोय उपलब्ध करून दिलीय त्याचा लाभ घ्या.

गेलाबाजार ‘पाताललोक’ पहा.

फेसबुक लाईव्ह करा,

वेबिनार घ्या.

कविता करा

किंवा इतरांच्या कविता सादर करा.

गोष्टी लिहा

किंवा इतरांच्या गोष्टी सादर करा.

मन रमवण्यासाठी हजार उद्योग करता येतात.

३.

अजून २५, ५०, ७५, १०० वर्षांनी जेव्हा ‘करोना’ महामाराचा इतिहास लिहिला जाईल किंवा वाचला जाईल तेव्हा आपण काय करत होतो, याची नोंद नक्कीच घेतली जाईल.

त्यासाठी काहीतरी करा, हातावर हात ठेवून बसू नका.

केवळ ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यातच समाधान मानू नका.

आपली मुलं, नातू, पंतवंडं जेव्हा २०-२५ वर्षांनी विचारतील करोनाविषयी तेव्हा आपल्याकडे सांगण्यासारखे काही किस्से, कविता, गोष्टी तरी असल्या पाहिजेत.

त्यांची निर्मिती आपल्याला आत्ताच करून ठेवावी लागेल,

म्हणजे त्या नंतर कामी येतील.

४.

सर्वांत महत्त्वाची मुख्य गोष्ट म्हणजे

ही काही पहिलीच जागतिक महामारी नाही.

याआधीही अशा अनेक महामाऱ्या आलेल्या आहेत.

प्लेग, स्पॅनिश फ्लू, सार्स, स्वाइन फ्लू, इबोला, मेर्स इत्यादी इत्यादी.

पहिल्या महायुद्धात (१९९४-१९१८) सुमारे दीड कोटी माणसं मारली गेली असं सांगितलं जातं. या युद्धाच्या शेवटी शेवटी म्हणजे १९१८मध्ये ‘स्पॅनिश फ्लू’ची महामारी आधी सैनिकांत सुरू झाली. पुढच्या तीनेक वर्षांत तिच्यामुळे जगभरात पाच ते दहा कोटी माणसं मृत्युमुखी पडली असं म्हटलं जातं. म्हणजे महायुद्धापेक्षा जास्त लोक या महामारीमुळे मेले. भारतातही दीड-दोन कोटी माणसं या महामारीमुळे मरण पावली होती.

त्याआधी म्हणजे १८९७पासून १८१८ पर्यंत प्लेगमुळे भारतात दरवर्षी अनेक लोक मृत्युमुखी पडतच होते.

५.

उत्तर इटलीमध्ये करोनाने मध्यंतरी हलकल्लोळ माजवला होता. सध्या ब्रिटन आणि अमेरिका यांनी इटलीला मागे टाकलंय. पण करोनाला इटलीतील वयोवृद्धांची पिढी सर्वाधिक प्रमाणात बळी पडली. पंचाहत्तरीच्या पुढच्या या पिढीला इतरही अनेक आजार होते. त्यामुळे तिची प्रतिकारशक्ती कमी होती. परिणामी ती करोनाला सहज बळी पडली. इटलीत कालपर्यंत करोनामुळे जे मृत्यु झाले त्यात या वयोवृद्धांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे इटलीतील जवळपास एक पिढीच करोनाने आपल्या कराळ दाढेखाली घेतलीय असं म्हटलं जातंय. आपल्या भारतात अशी परिस्थिती नाही. पुढील तक्ता काळजीपूर्व पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईलच.

चित्र साभार - https://www.indiatoday.in/india/story/83-of-india-s-coronavirus-patients-are-below-the-age-of-50-health-ministry-data-1663314-2020-04-04

याचा निष्कर्ष असा आहे की, भारताची स्थिती इटलीपेक्षा कितीतरी चांगली आहे. जवळपास ५० टक्के केसेस या २० ते ४९ या वयोगटांमधल्या आहेत. तरुणांची प्रतिकारशक्ती अधिक चांगली असते. म्हणून भारतात करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी त्यासाठी लागणारा वेळ जगातल्या इतर राष्ट्रांपेक्षा बराच जास्त आहे, आणि मृतांची संख्याही जगातल्या इतर राष्ट्रांपेक्षा बरीच कमी आहे. भारताची जवळपास ५० टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही २५ वर्षांखालची आहे, तर ६५ टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही ३५ वर्षांखालची आहे. भारत जगातला सर्वांत तरुण देश आहे.

शिवाय करोनाबाधितांची संख्या लाखाच्या पुढे गेलीय असा केवळ भारतच नाहीये. आपल्या आधी बरेच देश आहेत. आपला ११वा नंबर आहे.

साभार - https://www.worldometers.info/coronavirus/?utm_campaign=homeAdvegas1?%22#countries

आपल्या पुढे अनेक देश आहेत.

आपल्या मागे तर कितीतरी देश आहेत.

याचा अर्थ सगळं आलबेल आहे असं नाही.

आपण अजून ‘जात्यात’ नाही, पण ‘सुपात’ जाण्याच्या मार्गावर आहोत,

एवढाच याचा अर्थ आहे.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा