भाजपला उशीरा झालेली उपरती
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर 
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
  • Sat , 15 February 2020
  • पडघम देशकारण अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal आम आदमी पार्टी AAP आप भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi अमित शहा Amit Shah

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी केलेली वक्तव्यं भोवली, ही केंद्रीय गृहमंत्री आणि या निवडणुकीचे सूत्रधार अमित शहा यांनी दिलेली कबुली म्हणजे उशीरा झालेली उपरती आहे. शहा हे काही भाजपचे साधे नेते नाहीत, तर नरेंद्र मोदी यांचे उजवे हात आहेत, निवडणुका जिंकून देणारे म्होरके आहेत, जे. पी. नड्डा राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी अजूनही पक्ष तेच चालवतात. हे लक्षात घेता शहा यांनी आता भाजपचे  कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनाही दिल्ली विधानसभेच्या निकालाबाबत जरा सबुरी आणि जबाबदारीनं व्यक्त होण्याचा सख्त आदेश दिला पाहिजे.

लोकशाहीत निवडणुका ही कधीही खंड न पडणारी प्रक्रिया आहे. निवडणुकीत विजयी होण्याची संधी एकाच पक्षाला असते, मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला सलग दुसरा दारुण पराभव भाजपचे नेते कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांच्या फारच जिव्हारी लागला असल्याचं व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रियांतून दिसतं आहे. जिव्हारी लागण्याची ही प्रक्रिया खरं तर निकालाआधीच सुरू झाल्याचं भाजपकडून येणाऱ्या बेताल वक्तव्यातून दिसत होतं. ‘गोळी मारो’, ‘भारत-पाक क्रिकेट सामना’, ‘दहशतवादी’ या जहरी आरोपातून ते जाणवत होतं. आपल्या देशातलं राजकारण, राजकारण्यांतला समंजस आणि सुसंस्कृतपणा हरवत चालला असल्याचं हे लक्षण आहे.

हे असंच सुरू राहिलं तर उद्या निवडणुकांत ‘बॅलेट’ऐवजी ‘बुलेट’ येण्याचा धोका आहे. कारण केवळ भाजपच नाही  तर कमी-अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांत अशी जहरी वक्तव्यं करणाऱ्या नेत्यांचं पीक फोफावलं आहे. आज मुखी जहर आलंय, उद्या हाती शस्त्र येण्याचंच भयकंपित करणारे हे संकेत आहेत.

सत्ताधारी पक्षानं तर निवडणुकीच्या प्रचारातच नाही तर दैनंदिन व्यवहारातही डोळ्यात तेल घालून भान बाळगावं लागतं. म्हणूनच या संदर्भात भाजपची जबाबदारी जास्त आहे. पण विशेषतः २०१४ला सत्तेत आल्यापासून विरोधकांना ‘राष्ट्रद्रोही’ ठरवण्याचा एक अत्यंत घातक पायंडा भाजपनं पाडला आहे. विरोधकांना गोली मारो, निवडणूक म्हणजे भारत-पाकिस्तान सामना आहे, अशी वक्तव्यं करण्याची सवय भाजप नेत्यांना, त्यातही प्रामुख्यानं मोदी-शहा या जोडगोळीला, गुजरात निवडणुका लढवताना लागलेली होती. त्या सवयीचं आता राष्ट्रीयीकरण करण्यात आलेलं आहे. दिल्लीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना ‘दहशतवादी’ म्हणून संबोधित करण्यापर्यंत भाजपच्या प्रकाश जावडेकर या केंद्रीय मंत्र्यांनी मजल मारावी, हा तर प्रचाराची पातळी किती खालच्या पातळीवर जावी याचा नीच्चांक आहे.

त्यावर गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘मौत का सौदागर’ झाला होता, असं स्मरण करून दिलं जात असलं तरी, त्या वक्तव्याची मोठी किंमत काँग्रेसला चुकवावी लागलेली आहे, याचा विसर न पडू दिलेला बरा. कुत्रा माणसाला चावला म्हणून काही माणूस लगेच कुत्र्याला चावत बदला घेत नाही, हे संस्कृतीच्या नावानं सतत उमाळे काढणाऱ्या भाजपचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी लक्षात घ्यायला हवं.

केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीनं दिल्लीकरांना अनेक सोयी-सवलती दिल्या म्हणून उमाळ्यावर उमाळे काढणाऱ्या भाजपच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी दिल्लीकरांना ‘फुकटे’ म्हणून संबोधनं हा निव्वळ भंपकपणा आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती, ते काय आमिष नव्हतं? आणि ते पाळलं नाही, ही काय फसवणूक नाही का?

गरिबांना गॅस  कनेक्शन, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यावर विशिष्ट रक्कम जमा करणं, या आणि अशा अनेक सवलती म्हणजे सरकारच्या खजिन्यातून मतं मिळवण्यासाठी केलेली खैरातच होती, हे भाजपच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी विसरू नये. महाराष्ट्रात शिवसेनेच्या दहा रुपयांत भोजन देण्याच्या घोषणेला शह म्हणून ‘मी परत येणार’ असा दावा करणाऱ्यांनी पाच रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली होतीच की!

फार लांब कशाला दिल्लीच्या निवडणुकीत गव्हाचं एक किलो पीठ दोन रुपयांत, मोफत स्कुटी अशा अनेक सवलतींचं आमिष मतदारांना दाखवणारा भाजपच होता. ‘आपलं ते धोरण आणि दुसऱ्याच मात्र विटलेलं वरण’, असं हे वागणं असून भाजपच्या समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांचा तो भंपकपणाच आहे. मोदी यांनी जाहीर केलेल्या अनेक सवलती दिल्या आणि अनेक अजून दिलेल्या नाहीत तरी, देशाची अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. मात्र दिल्लीकरांना इतक्या सवलती देऊनही केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं दिल्लीची तिजोरी रिकामी होऊ दिलेली नाही, हेही लक्षात घेण्याचं भान भाजपच्या कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनी दाखवायला हवं.

आठवण जुनी आहे, १९९६मधली. दै. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ या रविवार पुरवणीसाठी मी तेव्हाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते शरद पवार यांची एक मुलाखत घेतली होती. पवार यांच्या कुटुंबात न घडलेल्या एका बाबीची घोर कुजबूज तेव्हा राजकीय वर्तुळात सुरू करण्यात आली होती. त्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले होते, ‘रा. स्व. संघाची अफवा पसरवण्याची क्षमता फारच मोठी आहे.’ त्याच संघाचं अपत्य असल्यानं तो अफवा पसरवण्याचा  गुण भाजपमध्ये कसा आलाय, याचा मासला म्हणजे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पसरवल्या गेलेल्या एका माहितीचा आहे.

भाजपच्या आयटी सेलने पसरवलेल्या या माहितीनुसार भाजपचे ८ उमेदवार केवळ १०० मतांच्या फरकानं पराभूत झाले, १९ उमेदवार केवळ १ हजार आणि ९ उमेदवार केवळ २ हजार मतांच्या फरकानं पराभूत झाले आहेत. या माहितीतून दिल्या जाणाऱ्या आकड्यांची बेरीज करा – विजयी ८ + थोडक्यात पराभूत झालेले ८ + १९ + ९ म्हणजे संपूर्ण बहुमताचा आकडा येतो. थोडक्यात काय तर भाजपने फारच निसटत्या फरकानं दिल्लीची सत्ता गमावली आहे, असा या माहितीचा अर्थ आहे.

एका भक्ताकडून ही माहिती आली, तेव्हा उत्सुकता चाळवली म्हणून निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन प्रत्येक मतदारसंघाच्या निकालाची आकडेवारी काढली तर ही माहिती सपशेल खोटी निघाली! बिजवास मतदारसंघातून भाजपचा उमेदवार ७५३ तर आदर्श नगर मतदारसंघातला भाजपचा उमेदवार १५८९ मतांनी पराभूत झाला. हे दोन अपवाद वगळता १०० मतांच्या फरकानं भाजपचा एकही उमदेवार पराभूत झालेला नाही. भाजपचे सर्व उमेदवार किमान सात हजार मतांनी पराभूत झालेले आहेत. केवढा हा खोटारडेपणा आणि आत्मवंचनाही! ज्यांना पराभव खिलाडूवृत्तीनं स्वीकारता येत नाही, ते विजयी झाल्यावर उन्मत्तच होतात!

म्हणूनच उशीरा का असेना अमित शहा यांना दिल्ली विधानसभेच्या  निकालाबद्दल झालेल्या उपरतीचं स्वागत करायला हवं. पराभव मान्य करताना झालेल्या चुकाही मान्य करण्याचा उमदेपणा शहा यांनी दाखवलेला आहे. असाच उमदेपणा भाजपचे कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांनीही दाखवायला हवा. ते जर दाखवत नसतील तर तसा सख्त आदेशच शहा यांनी द्यायला हवा. शहा यांचा आदेश नाकारण्याची हिंमत पक्ष आणि कार्यकर्ते, समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तांत नाही. शहा यांचा आदेश न पाळून त्यांचा अवमान नक्कीच कुणी करणार नाही. कारण हा पक्ष तसंच त्याचे समर्थक, हितचिंतक, भक्त आणि अंधभक्तही शिस्तबद्ध आणि आज्ञाधारक आहेत. शिवाय अशा आज्ञाधारकांकडून आदेशाच्या झालेल्या पालनातून देशभक्ती उजाळून निघते, हा आणखी एक फायदा आहेच!

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Sun , 16 February 2020

The writer has again used the following furphy namely नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची घोषणा केली होती if the author removes blinker of BJP hatred he will remember that Modi only said that if all the black money is brought back it will amount to Rs. 15 lakhs in every Indians account. In this assertion Modi was wrong because that much money was not overseas. I agree that Kejariwal won this election grandly. The author does not care to consider the impact of Muslim vote. He also fails to acknowledge that BJP's vote went up but it did not reflect in seats. I wish Aksharnama's contributors live by its headline assertion.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......