अनंत भालेराव यांच्यामुळे मराठवाड्याचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले!
ग्रंथनामा - आगामी
नरेन्द्र चपळगावकर
  • ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या चरित्राचे मुखपृष्ठ
  • Mon , 12 August 2019
  • ग्रंथनामा Granthnama आगामी अनंत भालेराव Anant Bhalerao मराठवाडा Marathwada नरेन्द्र चपळगावकर Narendra Chapalgaonkar

झुंजार स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्योत्तर काळातील ध्येयवादी संपादक अनंतराव भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत माजी न्यायमूर्ती नरेन्द्र चपळगावकर यांनी लिहिलेल्या ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या चरित्राचे प्रकाशन उद्या, मंगळवार, १३ ऑगस्ट २०१९ रोजी औरंगाबाद येथे होत आहे. अभंग प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केलेल्या या चरित्राला चपळगावकर यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

‘मराठवाडा’ वृत्तपत्र व त्याचे संपादक अनंत भालेराव यांचे मराठी वृत्तपत्रांच्या इतिहासात एक महत्त्वाचे स्थान आहे. या वृत्तपत्राचे नाव व त्याला प्रारंभ काळात अस्तित्वासाठी द्यावा लागलेला झगडा याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्याबरोबर ज्या काळात हे वृत्तपत्र जन्माला आले, त्या काळात चालू असलेला भारताचा स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यातून निर्माण झालेली मूल्ये यांचाही संदर्भ हे वृत्तपत्र आणि त्याचे दीर्घकाळ संपादक असलेले अनंत भालेराव यांना समजून घेण्यासाठी आवश्यक आहे. 

ब्रिटिश सरकारने वृत्तपत्रांवर अधूनमधून निर्बंध घातले असले व राजद्रोहासारख्या गुन्ह्याचा आरोप करून काही संपादकांना तुरुंगात पाठवले असले, तरी ब्रिटिश मुलखात वृत्तपत्रांना संपूर्ण व सर्वकाळ बंदी नव्हती. निजामाच्या हैदराबाद संस्थानात धार्मिक स्वातंत्र्य तर नव्हतेच; परंतु मूलभूत नागरी स्वातंत्र्यसुद्धा अस्तित्वात नव्हते. संस्थानात वृत्तपत्रे काढण्यास, मुद्रणालये काढण्यास, सभा घेण्यास आणि मिरवणुका काढण्यास सरसकट बंदी होती. या सर्व गोष्टींसाठी सरकारी परवानगी आवश्यक असे व ती मिळणे जवळजवळ अशक्य असे.

अशा काळात वृत्तपत्रे चालवणे हे एक दिव्य असे. तुलनेने दीर्घकाळ चाललेले एकच मराठी साप्ताहिक निजामी राज्यात टिकले ते म्हणजे ‘निजाम विजय’. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने अगदीच निरुपद्रवी असलेल्या बातम्या व इतर मजकूर छापत या वृत्तपत्राने दिवस काढले. १९३६-३७च्या सुमाराला प्रांतिक स्वायतत्तेचा फायदा ब्रिटिशशासित प्रांतांना काही दिवस मिळाला, तेव्हा हैदराबाद संस्थानातल्या जनतेला आपल्यालासुद्धा जबाबदार राज्यपद्धतीचा लाभ मिळावा, असे वाटू लागणे स्वाभाविक होते. परंतु लोकशाही म्हणजे बहुसंख्याकांचे राज्य येईल व आपण आजवर केवळ मुस्लिमांना प्राधान्य देणारी हुकूमशाही राजवट टिकवून ठेवली, ती संपुष्टात येईल हे सत्य निजामाला माहीत होते. वृत्तपत्र हे लोकजागृतीचे प्रभावी साधन लोकभाषेत शक्यतो प्रसिद्ध होऊ द्यायचे नाही, हे त्याचे धोरण कायम होते. अशा स्थितीत आनंद कृष्ण वाघमार्‍यांनी पुण्यात ‘मराठवाडा’ साप्ताहिकाचा प्रारंभ केला व अनेक अडचणी सोसून ते काही दिवस प्रसिद्ध केले. स्वातंत्र्यानंतर ते मुंबईत काही दिवस प्रसिद्ध झाले व नंतर त्याचा संसार अगोदर हैदराबादेत आणि नंतर औरंगाबादेत सुरू झाला. 

एखादा राजकीय पक्ष पक्षाच्या विचारांच्या प्रसारार्थ नियतकालिक काढतो, तेव्हा त्यात काम करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनाच सांगितले जाते. ‘मराठवाडा’ वृत्तपत्र आनंद कृष्ण वाघमार्‍यांनी प्रारंभ केले असले व तांत्रिकदृष्ट्या तेच त्याचे एकटे मालक असले तरी हे वृत्तपत्र स्वातंत्र्यचळवळ चालवणार्‍या कार्यकर्त्यांचे आहे, हीच भावना त्यांच्या मनात होती. म्हणूनच संस्थापक - संपादक वाघमार्‍यांना लढ्याच्या शेवटच्या पर्वात मुंबईत स्टेट काँग्रेसचे कार्यालय सांभाळावे लागले आणि ‘मराठवाडा’ साप्ताहिकाचे संपादनही करावे लागले.

या काळातच अनंत भालेराव स्टेट काँग्रेसच्या मुंबई कार्यालयात वाघमार्‍यांचे सहकारी होते. तेच ‘मराठवाडा’च्या कामातही मदत करू लागले. तेव्हा मुंबईच्या एखाद्या मुद्रणालयात ‘मराठवाडा’ छापून घेतला जात असल्यामुळे फार जास्त कर्मचार्‍यांची आवश्यकता नव्हती. स्वातंत्र्यानंतर जेव्हा स्वतःचे मुद्रणालय सुरू करून त्यात साप्ताहिक छापावयास प्रारंभ झाला, तेव्हा अधिक माणसे लागू लागली. स्वातंत्र्यलढा संपला होता व त्यात जी माणसे सहकारी होती, त्यांच्यामधूनच ‘मराठवाडा’साठी  माणसे निवडण्यात आली. विशिष्ट कामासाठी प्रशिक्षित तर कोणीच नव्हते. ज्याला जे जमू शकेल असे वाटले, त्याला ते काम सांगण्यात आले आणि हळूहळू त्या कामातही माणसे तरबेज झाली. सत्याग्रही कार्यकर्त्यातूनच जुळारी तयार झाले, मुद्रितशोधक तयार झाले. कोणी मशीन चालवू लागले, तर काहींनी वितरणाची जबाबदारी घेतली. चळवळीच्या निमित्ताने दांडगा जनसंपर्क असल्यामुळे बातमीदारी तर फारच सोपी गेली. अशा नवशिक्षितांच्या पण श्रद्धावान सहकार्‍यांच्या नेतृत्वपदी वाघमार्‍यांनी अनंतरावांना बसवले होते. 

स्वातंत्र्यानंतर ‘मराठवाडा’ चालू ठेवावे असे विश्वस्तांना वाटले याची कारणे उघड आहेत. स्वातंत्र्यानंतर झालेले सत्तांतर जर सुरळीत झाले असते व त्यात लढ्यातील प्रमुख नेते सत्तेत आले असते, तर त्यांचा सर्व वेळ नव्या राज्याची घडी मांडण्यातच गेला असता. प्रत्यक्षात असे झाले नाही. जी मंडळी लढ्यात आघाडीवर होती, त्यांना काँग्रेसमध्येच रस उरला नाही. समतेच्या लढ्याचे जागतिक संदर्भ ते शोधत राहिले आणि सत्तेच्या भरल्या ताटाकडे दुर्लक्ष करून त्यांनी नवा मार्ग चोखाळला. देशात कम्युनिस्टांच्या सशस्त्र बंडाळीची भीती केंद्रीय नेतृत्वाला वाटत असताना मराठवाड्यातील लढ्याचे मार्गदर्शक मात्र कम्युनिस्टांच्या बरोबर राहण्याचा आग्रह धरू लागले. याचा बरोबर फायदा लढ्याच्या काळात कुंपणावर बसलेल्या मवाळांनी घेतला आणि सत्तेतली मोक्याची स्थाने काबीज केली. काँग्रेसच्या बाहेर पडून राजकीय आणि आर्थिक परिवर्तनाची चळवळ चालवावी, असा विचार गोविंदभाई श्रॉफ आणि त्यांच्या सहकार्‍यांनी केला. चळवळ पुन्हा चालवावयाची असेल तर त्यासाठी वृत्तपत्र लागणारच होते. मात्र त्यातही एक अडचण होती. स्वामी रामांनद तीर्थांसारखे सर्वोच्च नेते अजून काँग्रेसमध्येच होते. त्यामुळे काँग्रेसला सरसकट विरोध करायचा नाही, त्यातल्या  पुरोगामी गटाला पाठिंबा द्यायचा आणि काँग्रेसविरोधात नव्याने संघटित होऊ लागलेल्या मार्क्सवादी, समाजवादी कार्यकर्त्यांची पाठराखण करावयाची अशी तारेवरची कसरत ‘मराठवाडा’ वृत्तपत्राला करावी लागली.

नंतरच्या काळात विरोधी पक्ष हळूहळू क्षीण होत गेले. त्यांच्या पाठिंब्याला व्यावहारिक दृष्टीने मोजमापाने फारसे महत्त्व उरले नाही. काँग्रेसमधला स्वामीजींचा गट हळूहळू  राजकारणाबाहेर गेला आणि ‘मराठवाडा’ला आपला लढा एकाकीपणे चालवावा लागला. स्वातंत्र्यानंतरची पहिली दोन दशके वगळली, तर मराठवाड्याच्या जनतेचे नेतृत्वच मुळी ‘मराठवाडा’ वृत्तपत्र व त्याचे संपादक अनंत भालेराव यांना करावे लागले. आपल्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी लोक त्यांच्याचकडे येऊ लागले. फक्त जोड होती ती मराठवाड्याच्या विकास प्रश्‍नाबाबत एकांडी शिलेदारी करणार्‍या गोविंदभाई श्रॉफांची. राजकारणात पोकळी राहत नाही. एखादी राजकीय शक्ती अस्तंगत झाली, म्हणजे तिची जागा घेण्यासाठी दुसरी शक्ती आपोआप निर्माण होते. राजकीय पक्ष किंवा गट त्यासाठी उपलब्ध नसले, तर एखाद्या व्यक्तीलाच काळ ती जबाबदारी सोपवतो. गोविंदभाई श्रॉफ आणि अनंत भालेराव हे दोघे दीर्घकाळपर्यंत विरोधी पक्षाचे काम करत राहिले.

आपल्या स्वतःच्या आवडीनिवडीपेक्षा चळवळीची गरज काय आहे, हे पाहून पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावयाची अशा सर्वोपयोगी कार्यकर्त्याचे जीवन अनंतराव जगले. नियोजित सत्याग्रही आला नाही, म्हणून त्यांनी स्वतःच सत्याग्रह केला. खासगी शाळा हा आंदोलनाचा भाग असल्यामुळे ते शिक्षक झाले. नंतर संघटनेसाठी पूर्णवेळ कार्यकर्ते हवे होते, म्हणून त्यांनी महाराष्ट्र परिषदेचे काम केले. जंगल सत्याग्रहासारख्या मोठ्या सत्याग्रहांचे संघटन केले. भूमिगत राहून लोकसंपर्क ठेवला. सरहद्दीवर प्रतिकार शिबिरे सुरू झाली, तेव्हा प्रसंगविशेषी हातात शस्त्रही घेतले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राजकीय लाभाची अपेक्षा न करता पुन्हा सहसंपादकाच्या भूमिकेत गेले. वाघमार्‍यांनी पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकली, तेव्हा जवळपास आयुष्याच्या शेवटपर्यंत ते संपादकाची भूमिका करत राहिले.

आर्थिक परिस्थिती कधीच फारशी चांगली झाली नाही. ओढगस्तीची जोड आयुष्यभर राहिली, तरीही अशी वेगवेगळी कामे करण्यासाठी त्यांना ऊर्जा त्यांना मिळत होती ती सामान्य जनतेतून. आपल्या आयुष्याची सगळीच कामे अप्रत्यक्षरीत्या लोकांनीच आपल्याला शिकवली आहेत, अशी त्यांची नम्र भावना होती. त्यांची विचारपद्धती, त्यांची भाषा आणि त्यांची वागणूक सगळेच लोकांशी बांधिलकी सांगणारे होते. लोकमान्य टिळक ज्या काळात ‘केसरी’चे संपादक होते, तो काळ आणि या प्रकारच्या लोकांत ते वावरत होते, तो लोकसमूह अनंतरावांचा काळ आणि त्यांच्या भोवतालचा जनसमूह फार भिन्न होता. टिळकांच्या मोठेपणाशी तुलना करण्याचा हेतू अजिबातच नाही, परंतु एक साम्य मात्र दिसते- दोघांचाही जीवनस्त्रोत सामान्य माणसांतून ऊर्जा घेत होता.

अनंतरावांचे बालपण एका वारकरी कुटुंबात गेले. त्यांचे वडीलच फडाचे प्रमुख होते. घरात नित्यकर्म म्हणून आणि आजूबाजूला वावरणारांच्या तोंडून सतत संतवाणी कानावर पडत होती. अनंतरावांसाठी हे फक्त कर्मकांड नव्हते. आपल्या वडलांचे प्रत्यक्ष जीवन ते पाहत होते. संतवचनांनी जीवनाला प्रत्यक्ष आधार कसा दिला आहे, हेही ते अनुभवत होते. विविध जातीजमातींच्या वारकर्‍यांना सामावून घेत कुटुंब कसे मोठे होते हेही ते पाहत होते. त्यांच्या विचारपद्धतीला आणि मनालाही जी एक व्यापकता आली, त्यात या वारकरी संस्काराचा मोठा भाग आहे. घरचे दारिद्रय आणि त्यामुळे पडणार्‍या मर्यादा या माहीत असूनही एकाक्षणी शासकीय नोकरी मिळण्याचा दोर कापून टाकत ते सत्याग्रही बनले. हा सर्वसंगपरित्याग करण्याची मनोभूमिका वारकरी संस्कारानेच केली होती. विठ्ठलाचा गजर करता करता सामान्य माणसांच्या आत्म्यातला विठ्ठल पाहावयाचा होता. आता अन्यायाविरुद्ध लढून मिळवावयाच्या  स्वातंत्र्यालाच विठ्ठलाचे रूप आले होते. 

अनंतरावांची भाषा ही सोपी असे. तिचे कृत्रिम अलंकरण झालेले नसे. अनंतरावांचे फारसे शिक्षण झाले नव्हते. ही गोष्ट त्यांची भाषा शुद्ध राखण्याला उपकारकच ठरली होती. लोकभाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार, लोकभाषेतले शब्द, लोकभाषेची शैली त्यांच्या लेखणीतून आपोआप स्रवू लागे. लिहिता लिहिता दृष्टान्त येत ते संतवचनांचे. अर्थात ते अलंकरण नसे. त्यांच्या मनातला आशय त्या वचनातूनच प्रगट होणे स्वाभाविक होते. 

‘मराठवाडा’ वृत्तपत्राच्या चालकांत (विश्वस्त मंडळात) भिन्न भिन्न छटा असलेल्या राजकीय विचारांची मंडळी होती. गोविंदभाई मार्क्सवादाला चिकटून होते. फक्त त्यातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यपद्धतीला आणि हिंसक मार्गाला त्यांचा पाठिंबा नव्हता. बाबासाहेब परांजपे आणि अनंतराव भालेराव लोकशाही समाजवाद मानत होते. साहजिकच त्यांना समाजवाद्यांविषयी ममत्व वाटत होते. अर्थात यापैकी कुणीही कोणत्याही राजकीय पक्षाचे सभासद नव्हते. ‘मराठवाडा’ वृत्तपत्र हे  पुरोगामी विचाराचे व लोकचळवळींना पाठिंबा देणारे वृत्तपत्र असावे एवढीच ढोबळमानाने विश्वस्तांची अपेक्षा होती. अनंतरावांनी ही अपेक्षा लक्षात ठेवली आणि कोणत्याही राजकीय पक्षाची बांधिलकी स्वीकारली नाही. ‘मराठवाडा’ वृत्तपत्राला डाव्या चळवळींविषयी सहानुभूती होती व ती त्याच्या पानापानांतून व्यक्त होत असे. 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि मराठवाडा विकास आंदोलन या दोन्हींचे ‘मराठवाडा’ हे मुखपत्रच झाले होते. अनंतरावांनी राजकीय पक्षाची बांधणी करण्यात कधी भाग घेतला नसला, तरी त्यांनी सांस्कृतिक संस्थांची बांधणी केली. त्यांच्यामुळे मराठवाड्याचे सांस्कृतिक जीवन समृद्ध झाले, यात शंका नाही. हैदराबाद मुक्त झाल्यानंतर येथल्या सांस्कृतिक संस्थांना ‘मराठवाडा’ची सतत मदत असे. मराठवाडा साहित्य परिषदेचे तर ते संवर्धकच होते. नांदेडच्या वसेकरांच्या अभिनव चित्रशाळेचे पूर्ण निकाल ‘मराठवाडा’त प्रसिद्ध होत. शास्त्रीय गायनाचे कार्यक्रम, हौशी मंडळींनी बसवलेली नाटके, व्यासंगी विद्वानांची मराठवाड्यात होणारी भाषणे, सांस्कृतिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्‍या परिषदा आणि संमेलने यांचे विस्तृत वृत्तान्त अनंतराव प्रसिद्ध करत. ‘मराठवाडा’चे वाचक वैचारिक व सांस्कृतिक दृष्टीने मागे असू नयेत, ही दृष्टी त्यामागे होती.

............................................................................................................................................................

'अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व' हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5015/Anant-Bhalerao

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......