‘अस्मिता शोधाची’ संघर्ष कहाणी
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
नितीन जरंडीकर
  • किम स्कॉट आणि ‘ट्रू कंट्री’चं मुखपृष्ठ
  • Sun , 25 December 2016
  • ग्रंथनामा Booksnama किम स्कॉट Kim Scott ट्रू कंट्री True Country अॅबोरिजिन Aboriginal

‘ट्रू कंट्री’ ही किम स्कॉट (जन्म- १९५७) या ऑस्ट्रेलियन ‘अॅबोरिजिनल’ लेखकाची पहिली कादंबरी. (‘अॅबोरिजिनल’साठी ‘मूलनिवासी’/‘आदिवासी’ असे शब्द योजता येतील. परंतु ऑस्ट्रेलियन अॅबोरिजिनल समुदाय ‘अॅबोरिजिन’ या शब्दाबाबत कमालीचा आग्रही ‍‌असल्यामुळे व मूलनिवासी/आदिवासी शब्दांनी काहीशी दिशाभूल होण्याची शक्यता असल्यामुळे तोच शब्द वापरूयात.) १९६० नंतर जगभर विखुरलेल्या अॅबोरिजिनल समाजाचा राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरचा दडपलेला आवाज तीव्रतेने ऐकू येऊ लागला. मानववंशशास्त्राने हे सिद्ध केले आहे की, उत्क्रांतीवादातून घडत गेलेला आदिमानव हा प्रथमतः आफ्रिका आणि त्यानंतर तो इतर भूप्रदेशामध्ये स्थलांतरित होत गेला. पैकी एक समूह हजारो वर्षे आपले अस्तित्व ऑस्ट्रेलिया खंडामध्ये टिकवून आहे. हा कृष्णवर्णीय समाज आपल्या रूढी-परंपरा जपत निसर्गाशी एकरूप होऊन कित्येक शतके आपले जीवन व्यतीत करत आहे.

तथापि १६व्या शतकानंतर वसाहतवादाने आपल्या राक्षसी महत्त्वाकांक्षेने सर्वच वसाहती गिळंकृत करण्याचे जे प्रयत्न चालवले, त्याला ऑस्ट्रेलिया तरी कसा अपवाद ठरणार? मूळ वसाहतीमधील संस्कृती, त्यांच्या भाषा, धर्म यांचे समूळ उच्चाटन करून आपली संस्कृती रुजवण्याचा अजेंडा ऑस्ट्रेलियातही राबवला गेला. आशिया आणि आफ्रिका येथील वसाहतींच्या बाबत युरोपियनांनी कालौघात काढता पाय घेतला. परंतु ऑस्ट्रेलिया/कॅनडासारख्या वसाहतीत त्यांनी मूळ देशात जाण्याचे नाकारले. परिणामी आजची ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम किंवा ऑलिंपिकमधील त्यांचा चमू पाहिल्यास त्यांचे सारेच खेळाडू गौरवर्णीय दिसून येतात. आजही ऑस्ट्रेलियामध्ये अॅबोरीजिनल समूह तग धरून आहे. आजच्या ऑस्ट्रेलियन समाजव्यवस्थेला वर्णसंघर्षाचा मोठा कलंक आहे. त्यातून पुन्हा ‘गौरवर्णीय ऑस्ट्रेलियन  अॅबोरीजिनल’ समूहाची घुसमट तर अस्वस्थ करणारी आहे. (वर्णसंकरातून आपल्या संकृतीबरोबरच त्वचेचा रंगही विसरायला लावणे हा देखील वसाहतवादी अजेंड्याचाच एक भाग होता.)

किम स्कॉट हे स्वतः गौरवर्णीय ऑस्ट्रेलियन अॅबोरीजिनल लेखक आहेत. अॅबोरीजिनल समूह समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न करत असताना तिथे त्यांना करावा लागणारा संघर्ष व या संघर्षातून होणारी त्यांची ससेहोलपट हा किम स्कॉट यांच्या कादंबरी विश्वाचा विषय आहे. आजपावेतो स्कॉट यांनी ‘ट्रु कंट्री’ (१९९३) व्यतिरिक्त ‘बेनांग’ (१९९९) आणि ‘दॅट डेडमॅन डान्स’ (२०१०) या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

‘ट्रू कंट्री’ या कादंबरीचा कालावकाश हा १९८० च्या दशकातला आहे. मि. बिल स्टोरी हा या कादंबरीचा नायक. बिल हा एक शिक्षक आहे. शिक्षक म्हणून काम करण्यासाठी तो ‘कारनामा’ नामक ऑस्ट्रेलियातील अति दुर्गम भागात येतो आणि इथून कादंबरीला सुरुवात होते. कारनामा येथे अॅबोरीजीन्सना ‘संस्कारित’ करण्यासाठी ‘मिशन’ तिथे पूर्वीपासूनच काम करत आहे. निसर्गसंपन्न  कारनामामध्ये आपल्याला बिलच्या बरोबरीने त्याची पत्नी, बिलच्या शाळेचे प्राचार्य व त्यांची पत्नी, मिशनचे फादर व सिस्टर्स आदी गौरवर्णीय पात्रे आणि फातिमा, वालांगु, सेबॅस्टीअन, जिरार्ड, सॅमसन आदी कृष्णवर्णीय पात्रेही भेटतात. बिल ज्या कालखंडात पोहोचतो, त्यावेळी मिशनच्या प्रभावाला ओहोटी लागलेली दिसते. मिशनबद्दलचा आदर, दरारा आता संपलेला आहे. अॅबोरीजिनल मुलांना शिकवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बिल आणि त्याच्या साथीदारांचे विद्यार्थ्यांना शाळेला आणण्यासाठी उठवायला जाणे हे थेट आपल्याकडच्या ८०-९०च्या दशकातील प्राथमिक शाळांची आठवण करून देणारे आहे.

बिलच्या या प्रवासात त्याला फातिमा नावाची आजी भेटते. फातिमा ही मिशनने वाढवलेली कारनामा येथील पहिली मुलगी आहे. मिशनच्या जर्नल्समध्ये तिच्याबद्दलच्या सर्व नोंदींचा तपशील आहे. फातिमाच्या तोंडून बिल तिचा भूतकाळ आणि अॅबोरीजिनल संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. फातिमा स्वतःला लहानपणीच आई-वडिलांपासून मिशनने शिक्षणासाठी म्हणून हिरावून नेल्याचे सांगते. १०-१२ वर्षानंतर ती आपल्या घरी पुन्हा कारनामा येथे परतते. परंतु आता ती आपल्या आई-वडिलांशी बोलू शकत नाही, कारण ती आपली भाषाच विसरलेली असते.

वालांगु हा फातिमाचा नवरा. वालांगुबद्दल कारनामामध्ये सर्वांना प्रचंड आदर आहे. वालांगु मिशनच्या पूर्ण विरोधात आहे. तो स्वतः ऑस्ट्रेलियन अॅबोरीजिनल संस्कृतीचा रक्षणकर्ता आहे. त्याच्या तंत्रविद्द्येबद्दल सर्वांनाच भीतीयुक्त आदर आहे. गोऱ्यांच्या विरुद्ध त्याने उघड–उघड केलेली युद्धे प्रसिद्ध आहेत. आपल्याला मात्र कादंबरीत जो वालांगु भेटतो, तो थेट मृत्युशय्येवर असलेला.

शिक्षक म्हणून रुजू झालेला बिल हळूहळू कारनामामध्ये रुळायला लागतो. मात्र मिशन व इतर संबंधित गौरवर्णीय समुदाय या भूप्रदेशाला कमालीचा कंटाळलेला आहे. अॅबोरीजीनमध्ये वाढत चाललेली गुन्हेगारी, व्यसनाधीनता यामुळे ते हताश झाले आहेत. याउलट बिलला अॅबोरीजीनबद्दल एक प्रकारचा जिव्हाळा वाटू लागला आहे. त्यांच्या रूढी-परंपरा त्याला आता उमगू लागल्या आहेत. त्यांच्या नृत्याशैलीचा पदन्यास त्याने बघता बघता आत्मसात केला आहे. आणि कादंबरीच्या याच टप्प्यावर एक रहस्यभेद होतो. बिलची आजी ही मूळची अॅबोरीजिनल आहे. बिलच्या वडलांचे बिलच्या लहानपणीच निधन झाले आहे. परिणामी बिल आपली अॅबोरीजिनल वंशाची मुळे शोधण्यासठी कारनामा येथे आला आहे. फातिमा, वालांगु यांना भेटल्यानंतर, अॅबोरीजीन बांधवांच्या बरोबर नदीकिनारी, समुद्राकाठी सफरी करताना हळूहळू बिलला आपली मूळं सापडू लागली आहेत. बिल फॅंटसी टच असणाऱ्या अनेक टिपिकल अॅबोरिजिनल अनुभवांना सामोरा जातो ते सारे मुळातून वाचण्यासारखे  आहे. पण बिलसाठी या सर्व सामान्य गोष्टीच आहेत. कारण आता त्याला यामागच्या अॅबोरीजिनल जाणीवा कळून चुकल्या आहेत.

कादंबरीत एका बाजूला हताश झालेले मिशनरी व इतर गौरवर्णीय मंडळी कारनामा सोडून जाताना दिसतात. तर दुसऱ्या बाजूला कमालीच्या दारिद्र्याने पिचलेले अॅबोरीजीन्स आर्थिक आरिष्ट संपवण्यासाठी म्हणून कारनामा सोडताना दिसतात. कादंबरीत अखेरच्या टप्प्यावरती बिल नदीच्या पुरात सापडलेला दिसतो. परंतु बिलचा शेवट हा त्याला त्याचा ‘खराखुरा प्रदेश’, खरीखुरी आयडेंटीटी सापडल्याचा एक सात्त्विक, तरल, अम्लान आनंद देऊन जाताना दिसतो.

कादंबरीमध्ये गौरवर्णीय-कृष्णवर्णीय, वसाहतवादी-वासाहतिक असे प्रत्यक्ष संदर्भ येत असले तरी वसाहतवादाविरुद्धचा ‘तीव्र आक्रोश’ असा अभिनिवेश कादंबरीत कुठेही दिसत नाही. किम स्कॉट यांनी अतिशय संयतपणे, तटस्थपणे दोन्ही व्यवस्था मांडल्या आहेत. फातिमाच्या रूपाने ‘स्टोलन जनरेशन’ या ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील काळ्याकुट्ट कालखंडावरती प्रकाश पडतो. शिक्षण/संस्कार वगैरेच्या नावाखाली कित्येक लहान मुलांना त्यांच्या घरापासून तोडण्यात आले. प्रत्यक्षात मात्र ही मुलं गोऱ्यांच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक शोषणाची बळी ठरली. खरे तर या मुलांची अॅबोरीजिनल भाषा, रूढी-परंपरा पुरत्या पुसल्या जाव्यात हाच यामागचा अजेंडा होता. फातिमाच्या सुदैवाने तिला तिचे आई-वडील भेटले तरी. प्रत्यक्षात कित्येकांना तेही नशीब लाभले नाही. २००८ साली तत्कालीन ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी या सर्वांची जाहीर माफी मागितली होती.

बिलचे पुरात वाहून जाणे ही त्याची आत्महत्या असू शकते का? असू शकते. आजमितीस ऑस्ट्रेलियामध्ये अॅबोरीजीन्सची आत्महत्या हा एक चिंतेचा विषय आहे. ८० च्या दशकानंतर या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले आहे. ‘सुइसाईड एपिडेमिक’ म्हणूनच या प्रक्रियेचे वर्णन केले जाते. वंशभेदाचे तीव्र चटके, कमालीचे दारिद्र्य व त्यातून उद्भवणारे अनुषंगिक प्रश्न, तर गौरवर्णीय असूनही अॅबोरीजिनल संस्कृतीपासून तुटलेली मुळे यातून होणारा आत्यंतिक स्वरूपाचा ‘आयडेंटीटी क्रायसिस’ या पिढीला कमालीच्या नैराश्याच्या गर्तेत झोकून देत आहे. सुइसाईड एपिडेमिकला तोंड देण्यासाठी अनेक कौन्सिलिंग सेन्टर्स ऑस्ट्रेलियात उघडण्यात आली आहेत. शासनस्तरावरही प्रयत्न सुरू आहेत.

कादंबरी अॅबोरीजिनल रूढी-परंपरा, शब्दसंपदा यांनी संपन्न तर आहेच, पण तिची निवेदनशैली हे तिचे एक फार मोठे बलस्थान आहे. बहुआवाजी निवेदन तंत्राचा किम स्कॉट यांनी यात प्रभावशाली वापर केला आहे. कादंबरीची सुरुवात हेलिकॉप्टर व्हिजनने होते. बिल आणि इतर शिक्षक हेलिकॉप्टरमधून कारनामाकडे यायला निघाले आहेत. अवकाशातून ते खाली पाहताहेत आणि अॅबोरीजिनल समुदाय त्यांना संपूर्ण भूप्रदेशाचे वर्णन सांगतोय. हेलिकॉप्टर खाली उतरल्यावर बिल आणि इतरांच्या बरोबरीने वाचकांचेही या समुदायाकडून स्वागत होते. कादंबरीत कधी बिल वाचकांशी संवाद साधतो, तर कधी फातिमा, वालांगु, इतर अॅबोरीजिनल पात्रं, तर कधी कधी संपूर्ण समुदायच. कादंबरीचा शेवट देखील हेलिकॉप्टर व्हिजननेच होतो. परंतु यावेळी बिलचे अपार्थिव शरीर अवकाशात तरंगते आहे, सोबत वालांगु तरंगतो आहे आणि तिथून बिलला त्याची आजी, वडील दिसताहेत, कारनाम्याचा भूप्रदेश दिसतो आहे. आणि अॅबोरिजीनच्या या नव्या, खऱ्याखुऱ्या जगात “We are serious. We are grinning. Welcome to you”, असे म्हणत अॅबोरीजिनल समुदायाकडून ‘अॅबोरीजिनल’ बिलचे स्वागत होते.

कादंबरीत नाट्यात्मक कलाटणी देणारे असे काहीही घडत नाही. उत्कंठावर्धक, श्वास रोखून धरायला लावणारे असेही काही प्रसंग त्यात नाहीत. कथानक अतिशय संथ गतीने उलगडत जाते. जटील निवेदनशैलीने वाचकही बऱ्याचदा त्रस्त होतो. असे असूनही ऑस्ट्रेलियन अॅबोरीजिनल समुदायाच्या घुसमटीवर ती भेदक प्रकाश टाकते आणि खऱ्याखुऱ्या ‘अस्मिता शोधाची’ संघर्ष कहाणी बनते.

ट्रू कंट्री – किम स्कॉट, फ्रिमँटल आर्ट्स सेंटर प्रेस, नॉर्थ फ्रिमँटल (ऑस्ट्रेलिया), पाने - ३००, किंडल बुक किंमत - ६८१.४९ रुपये. 

 

लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.

nitin.jarandikar@gmail.com                                 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

समकालीन नवव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून, तिने जन्माला घातलेल्या नव्या समाजाचा एक्स-रे त्याने काढलाच. तो एक्स-रे म्हणजेच ‘कुत्र्याचं काळीज’ ही लघुकादंबरी!

व्यवस्थेला चिमटे काढणाऱ्या रशियन साहित्यपरंपरेचा विसाव्या शतकातला खरा पाईक म्हणजे मिखाइल बुल्गाकव! ‘कुत्र्याचं काळीज’ ही त्याची साहित्यकृती लिहिली गेली १९२५ साली, पण वाचकांना वाचायला मिळाली, ती १९८७मध्ये! हे रशियन क्रांती आणि सोवियत युनियनवरचं अंतिम भाष्य नाही वा त्याचं सर्वंकष मूल्यमापनही नाही. क्रांतिपश्चात रशियन काळाचा एक तुकडा जगलेल्या लेखकाने लावलेला एक अन्वयार्थ म्हणजे ‘कुत्र्याचं काळीज’.......

प्रवीण बर्दापूरकर यांच्या ‘मोहोळ’मधून उलगडणारी व्यक्तिचित्रं म्हणजे स्मरणरंजन नव्हे, तर त्या व्यक्तींच्या जगलेल्या आयुष्याचं प्रामाणिक टिपण आहे

‘मोहोळ’ वाचताना काही माणसांच्या आयुष्यांत आपण क्षणभर प्रवेश करत आहोत, याची जाणीव ठेवा. ही पानं घाईने उलटण्याची नाहीत; इथे थांबावं लागतं, कधी मागे वळून पाहावं लागतं. एखादं वाक्य तुम्हाला थांबवेल, एखादा प्रसंग आठवणींची दारं उघडेल, तर एखादी शांत ओळ अंतर्मुख करून सोडेल. तेव्हा या शब्दांना वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा. या व्यक्तिचित्रांत तुम्हाला परिपूर्ण माणसं भेटणार नाहीत—आणि म्हणूनच ती खरी वाटतील.......

सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून आकाराला आलेल्या भूमिकेला ‘प्रवाहासाठी प्रवाहाविरुद्ध’ असे म्हणता येईल

आपल्या सर्वांचेच सुरुवातीचे आकलन प्रामुख्याने अनुभवावर आधारित असते, नंतर त्याला अभ्यासाची जोड मिळते. अनुभव व अभ्यास यातून आपला असा एक दृष्टीकोन तयार होतो. मग दृष्टीकोनच आपल्या अनुभवांचे अर्थ लावतो आणि कोणता अभ्यास करायचा व करायचा नाही हे ठरवतो. साहजिकच एका मर्यादेनंतर अनुभव व अभ्यास यांच्यापेक्षा दृष्टीकोन महत्त्वाचा ठरतो आणि अंतिमतः दृष्टीकोनच आपल्या भूमिका ठरवत असतो. सम्यक सकारात्मक हा माझा दृष्टीकोन आहे.......

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......