काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांसाठी फुकटचा सल्ला!
पडघम - राज्यकारण
एक वाचक
  • वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस
  • Tue , 04 June 2019
  • पडघम राज्यकारण वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi वंबआ VBA काँग्रेस Congress राष्ट्रवादी काँग्रेस NCP

नुकताच १७व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदी यांचं सरकार पुन्हा केंद्रात म्हणजे दिल्लीत सत्तेवर आलं. देशभारत काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाची आणि वेगवेगळ्या राज्यांतल्या प्रादेशिक पक्षांचीही काही अपवाद वगळता जवळजवळ धूळधाण झाली. महाराष्ट्रातही अपेक्षेप्रमाणे विरोधकांची एकजूट आणि सुसंवाद नसल्यामुळे जोरदार पिछेहाट झालेली आहे. 

सध्या देशभर भाजपची हवा जोरात सुरू आहे, पण तरीही येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तापालट होऊ शकतो. त्यासाठी विरोधी पक्षांनी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवून एका समान उद्दिष्टासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण राजकीय पक्षांच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी, आंबेडकरवादी, स्त्रीवादी, विवेकवादी अशा विविध प्रगतीकडे नेणाऱ्या चळवळींचं नुकसान होत आहे. असो. 

राज्यात आता सर्वांना विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. कदाचित भाजप मुदतपूर्वही निवडणूक घेऊ शकतं. त्यासाठीची अंतर्गत तयारी भाजप-शिवसेनेनं केलेली असू शकते. त्यामुळे तीही शक्यता जमेस धरली पाहिजे. मुख्य प्रश्न येतो तो विधानसभेची निवडणूक लढवणाऱ्या प्रमुख पक्षांचा. त्यात प्रामुख्यानं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सध्या नव्यानं आलेली ‘वंचित बहुजन आघाडी’ यांचा समावेश होतो. लोकसभेत जे काही झालं, त्यावर आता चवितचर्वण करत बसण्यात काही अर्थ नाही. कारण त्यातून फार काही निष्पन्न होणार नाही. फक्त ‘ब्लेमगेम’ आणि द्वेष वाढेल. त्यामुळे या तिन्ही राजकीय पक्षांनी त्यांचं धोरण ठरवलं पाहिजे. नक्की कसं आणि काय केलं पाहिजे, कुणाला जोडलं पाहिजे, कुणाला नाही हे ठरवून त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली पाहिजे. त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्यायला हवेत असं वाटतं. 

सर्वांत पहिला मुद्दा आहे, तो म्हणजे सुसंवादाचा. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीनं एकमेकांशी सुसंवाद साधला पाहिजे. काँग्रेस पक्ष आजारी असला तरी त्यानं मोठ्या भावाची भूमिका निभावत राष्ट्रवादी, वंचित, मनसे असे पक्ष जोडत एक शक्तिशाली आघाडी उभारली पाहिजे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला ‘बी टीम’ म्हणून हिणवणं बंद केलं पाहिजे. असं हिणवल्यामुळेच काँग्रेसचा मतदार दूर गेला. प्रकाश आंबेडकर यांचं कितीही स्वतंत्र अस्तित्व असलं तरी वारसाहक्कानं त्यांना ‘आंबेडकर’ हे नाव चिकटलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर लोक प्रेम करतात. त्यामुळे हे सक्तीनं टाळलं पाहिजे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही समर्थक प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्याविषयी अर्वाच्च भाषा वापरतात. त्यांना या पक्षांनी समज दिली पाहिजे. त्याचबरोबर वंचित आघाडी समर्थकांनीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे एकाच चष्म्यातून न बघता त्यांच्यातही काही विवेकवादी, पुरोगामी विचारधारा मानणारे लोक आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधत राहिलं पाहिजे. त्यांच्यावर कायम जातीयवादी ठपका मारून काही उपयोग नाही.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4772/Mahilanvishayiche-Kayade

.............................................................................................................................................

प्रकाश आंबेडकर आता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी ताठर भूमिका सोडून देऊन थोडंसं लवचीक झालं पाहिजे. एखाद्या गोष्टींसाठी अडून बसण्याचा हटवादीपणा सोडून दिला पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षेत आणायचं असेल तर आधी त्यासाठी सत्तेत यायला पाहिजे की नको?  

राष्ट्रवादी काँग्रेसनं धोकेबाजी, ‘जिकडं गुलाल तिकडं चांगभलं’ या भूमिका सोडून दिल्या पाहिजेत.  कारण त्यामुळे खूप नुकसान होतं. जितेंद्र आव्हाड संभाजी भिडेविरुद्ध लढतात; तर जयंत पाटील, उदयन राजे त्यांना पूजतात! त्याचबरोबर भाजपबरोबर मधूनच ‘अहमदनगर  महानगरपालिकेसारखे’सारखे मधुचंद्र करणं थांबवलं पाहिजे. थोडक्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं धोकेबाजीचं राजकारण थांबवलं पाहिजे. सर्व राजकीय पक्षांचं जागा वाटप झालं की, तिकीट न मिळालेल्या कार्यकर्त्याला अपक्ष लढायला लावून उमेदवार पाडायचे प्रकार खूपदा करून झाले आहेत. कोरेगाव तालुक्यात शशिकांत शिंदेंना पाडण्यासाठी कोण कोण कसकशी फिल्डिंग लावत आहे, हे आता उघड गुपित आहे. त्यामुळे असे प्रकार आता थांबवायला हवेत. कारण या प्रकारच्या राजकारणातून तुमची विश्वासार्हता धोक्यात येते. आणि मुख्य म्हणजे तुम्ही संधीसाधू, मतलबी असल्याचं सिद्ध होत राहतं.

आता मुद्दा येतो तो जागा वाटपाचा. वंचित आघाडीनं २८८ लढणार असं म्हणून आतापासूनच दबाव टाकायला सुरुवात केली आहे. दोन्ही बाजूनं वाटाघाटी होत राहतील, चर्चेतून काहीतरी मार्ग निघेल. पण असं वाटतं की, काँग्रेस – १०० ते ११०, राष्ट्रवादी- १०० ते ११० आणि वंचित आघाडी ७५-८५, असं जागा वाटप व्हायला हवं. हे असं जागा वाटप झालं की, त्या त्या पक्षांनी त्यांच्या उपघटक पक्षांना त्यांच्या कोट्यातून जागा द्याव्यात. उदा. एमआयएम किंवा मनसे. जागा वाटप करताना ‘सुजय विखे प्रकरण’ परत करायला नको. (यापुढे राजकारणात ‘सुजय विखे प्रकरण’ ही अजरामर ‘केस स्टडी’ राहणार आहे!) 

जागा वाटप करताना जो पक्ष जिथं ताकदवान आहे, ती जागा त्याला दिली गेली पाहिजे. अर्थात वंचित बहुजन आघाडीला सामावून घेताना काही आज सत्तेत असलेल्या किंवा सत्तेत येण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्या लोकांना शांत केलं पाहिजे. वंचित आघाडीनं जागा वाटप जास्त ताणून न धरता जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या पाहिजेत. बिहारमध्ये भाजपनं स्वतःच्या सहा जागा नितीशकुमारांच्या पक्षाला दिल्या. त्यामुळेच तिथं राजद हरली.

अजून एक मुद्दा म्हणजे फालतू गोष्टींना महत्त्व देत त्याच्यावर चर्चा होऊ देऊ नये किंवा त्यात भाग घेऊन अडकून पडू नये. नथुराम गोडसे, हिंदू-मुस्लीम यासारखे मुद्दे आउटडेटेड करायला हवेत. ज्या ज्या वृत्तवाहिन्या या विषयांवर चर्चा घेतील, तिथं आपले प्रतिनिधी पाठवूच नयेत! रोजगार, आर्थिक विकास, सामाजिक विकास असे मुद्दे असतील तरच वृत्तवाहिन्यांच्या चर्चेत भाग जायला प्रवक्ते, वक्ते, नेते पाठवावेत. ‘सावरकर माफीवीर’ वगैरे उगाळत बसणं कुणालाच आवडत नाही. त्यामुळे अशा चर्चांमध्ये वेळ वाया घालवणं टाळलं पाहिजे. मुख्य म्हणजे या अशा विषयांवरच्या चर्चांमधून जाणीवपूर्वक ध्रुवीकरण केलं जातं किंवा ध्रुवीकरणासाठी त्यांचा वापर केला जातो. त्यामुळे असे विषय टाळलेच पाहिजेत. वादग्रस्त वक्तव्यं ही हल्ली ‘जाणीवपूर्वक’ केली जातात. कारण मग त्यावर प्रसारमाध्यमांतून चर्चा होत राहते. त्या आधारे लोकांमध्ये समज-गैरसमज निर्माण केले जातात. त्यामुळे कुणीतरी काहीतरी बडबडतं आहे, याचा जरा साक्षेपानं विचार करून त्या विषयाला हात घातला पाहिजे. मुख्य म्हणजे त्यामागचा विरोधकांचा सापळा आधी नीट समजून घेतला पाहिजे.

शेवटचा मुद्दा. आज जरी उजवी विचारधारा जिंकली असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित या पक्षांनी आपली विचारधारा न सोडता फुले-शाहू-आंबेडकर-दाभोलकर-पानसरे यांनी दाखवलेला मार्ग न सोडता त्यांच्याच मार्गावर चालत राहावं. ज्यांनी लोकसभेसाठी भाजपला मतं दिली आहेत, ते विधानसभेसाठीही भाजपलाच मतं देतील असं समजायचं कारण नाही. मतदारांना जर सक्षम उमेदवार मिळाले, तर ते पर्यायाचा नक्कीच विचार करतात.   

हजारो वर्षांची जातीयता, अत्याचारी व्यवस्था शिवाजीमहाराज, शाहू-फुले आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, विठ्ठल रामजी शिंदे, गो. ग. आगरकर इत्यादींनी प्रयत्नांती वठणीवर आणली. त्यामुळे एक-दोन पराभवानं खचून जायचं काही कारण नाही! तयारी करून, लढून पराभव झाला तर ती अभिमानाची बाब ठरते. पण तयारी न करता झालेला पराभव उरलासुरला जनाधारही गमावत असतो!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 07 June 2019

लेख सद्हेतूने लेहिलेला वाटतो. हजारो वर्षांची जातीव्यवस्था वगैरे नेहमीचीच रड वगळता व्यवस्थित लिहिलाय. मात्र लेख बाळबोध वाटतो. प्रकाश आंबेडकर नक्षलवादी आहेत. त्यांचे बोलाविते धनी संगतील तितकीच लवचिकता ते दाखवू शकतात. असो. समान उद्दिष्टांसाठी एकत्र यायला प्रथम उद्दिष्ट ठरवायला हवं ना? तिथेच तर सगळा घोळ आहे. त्यामुळे राज ठाकऱ्यांचा मनसे आणि औवेश्यांचा मईमु एकत्र निवडणुका कसे लढवू शकतात, हा प्रश्न उपस्थित होतो. अशा अनेक घटकांचा परामर्श लेखात घेतलेला नाही. त्यामुळे लेख वस्तुस्थितीचे निरुपण न करता स्वप्नरंजनाच्या वळणाने जाणारा वाटतो. -गामा पैलवान


Praveen Mehetre

Fri , 07 June 2019

सबको sanmati दे इंसान !


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा