देशभक्ती म्हणजे राष्ट्रवाद नव्हे, उन्मादी वा असहिष्णू कट्टरवाद तर नव्हेच नव्हे.
ग्रंथनामा - झलक
रामचंद्र गुहा
  • ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 17 May 2019
  • ग्रंथनामा झलक रामचंद्र गुहा Ramachandra Guha देशभक्त आणि अंधभक्त Deshbhakt ani andhbhakt Patriots and Partisans

प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्या ‘Patriots and Partisans : From Nehru to Hindutva and Beyond’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या नावाने ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी केला आहे. मनोविकास प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या प्रास्ताविकाचा हा संपादित अंश...

............................................................................................................................................................

मी नेमस्त दृष्टिकोन बाळगणारा माणूस आहे. हे खरे आहे, की काही वेळा माझे विचार आक्रमकपणे व्यक्त होतात. माझ्यातील ही विसंगती आहे... विचित्रपणाही म्हणा हवा तर; कारण वादंग हा सामान्यत: उजवे आणि डावे यांचा राखीव गुणधर्म आहे! धर्मा कुमार या माझ्या स्नेही आणि शिक्षक. ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या पुस्तकातील अनेक निबंधांवर त्यांची सावली आहे. भारतीय उदारमतवादी हे निष्क्रिय राहिले आहेत, अशी तक्रार त्यांनी एका लेखात केली होती. आपल्या क्षेत्रात ते पुरेशा कणखरपणे लढले नाहीत. साशंक, सावध मतप्रदर्शनामुळे कडव्या बांधिलकीच्या (सर्व दृष्टीने) डाव्या तसेच उजव्या अतिरेक्यांपुढे सार्वजनिक चर्चाविश्वात ते निष्प्रभ ठरत आले.

पन्नासच्या आणि साठच्या दशकांत, बहुसंख्य बुद्धिवादी आणि लेखक यांनी ‘उदारमतवादी’ हे बिरूद आनंदाने आपलेसे केले असते. त्यांची ओळख असलेल्या उदारमतवादाची चार वैशिष्ट्ये होती.

एक - त्यांचा क्रांतीवर नव्हे, तर सुधारणेवर विश्वास होता. समाजात उलथापालथ घडवून आणणाऱ्या, त्याची आमूलाग्र फेररचना करू पाहणाऱ्या आदर्शवादी योजनांपेक्षा, दीर्घकाळ कठोर परिश्रम व चिकाटी यांच्या बळावर टप्प्याटप्प्याने समाजात बदल घडवून आणणे त्यांना अधिक श्रेयस्कर वाटत होते.

दोन - शासनसंस्थेत (उदाहरणार्थ, विद्यापीठे आणि न्यायालये) आणि नागरी समाजात (उदाहरणार्थ, सहकारी संस्था वा स्त्रियांचे गट) व्यक्तिनिरपेक्ष, कायद्याशी बांधील संस्थात्मक उभारणीचा त्यांचा आग्रह होता आणि त्यासाठी त्यांनी कामही केले होते.

तीन - राजकीय पक्ष आणि प्रामुख्याने राजकारणी व्यक्ती यांच्याशी ते कायम अंतर ठेवून राहिले. प्रौढ मतदानावर आधारित बहुपक्षीय राजकीय व्यवस्था, धर्मनिरपेक्ष शासनसंस्था, बहुभाषिक राज्यपद्धती, स्त्रियांना समान हक्क, दलित-आदिवासी यांच्यासारख्या वंचित समूहांसाठी विशेष पक्षपाताच्या योजना, या भारतीय राज्यघटनेतील लोकशाही आदर्शांशी त्यांची बांधिलकी होती. चार- त्यांची देशभक्ती हा त्यांचा स्वाभाविक भाग होता. या देशभक्तीच्या अवास्तव अभिव्यक्तीची गरजही त्यांना कधी भासली नाही. त्यांचे त्यांच्या देशावर प्रेम होते आणि त्याचा निरोप घेताना, ते जन्माला आले, तेव्हा ज्या स्थितीत भारत होता, त्यापेक्षा अधिक उन्नत स्थितीत- निदान कमी असंतुष्ट स्थितीत- तो असावा, ही त्यांची मनीषा होती.

भारतीय समाजात अनुदार प्रवृत्तींचे प्रस्थ १९७० आणि नंतरच्या दशकांत वाढत गेले. मार्क्सवादी-लेनिनवाद्यांना भारतीय राज्यघटना कधीच पचनी पडली नाही, कारण तिने कोणा एका पक्षाचा (म्हणजे त्यांच्या पक्षाचा!) विशेषाधिकार मान्य केला नाही. तशीच ती हिंदू कट्टरवाद्यांनाही पचली नाही, कारण तिने कोणा विशिष्ट धर्माला (म्हणजे त्यांच्या धर्माला!) विशेषाधिकार दिले नाहीत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच, धार्मिक अतिरेक्यांनी आणि डाव्या क्रांतिकारकांनी बळाचा वापर करून त्यांच्या पोथीनिष्ठा लादण्याचे वारंवार प्रयत्न केले. अलीकडच्या दशकांत लोकशाही कार्यपद्धतीला तिसरा धोका समोर येऊ लागला आहे. हा आहे भ्रष्टाचाराचा आणि व्यक्ती, घराणी आणि जातगट यांच्या मार्फत सार्वजनिक संस्था आणि राजकीय पक्ष यांच्यावर ताबा मिळवत, घटनात्मक केंद्र पोखरून दुर्बळ होण्याचा.

भारतीय उदारमतवादाच्या सर्वोत्तम काळात धर्मा कुमार यांचे आयुष्य गेले. याला ग्रहण लागू शकते, अशी शंकाही मनात न येण्याचा तो काळ. मात्र वर नमूद केलेल्या तीन आव्हानांना सामोरे जाताना उदारमतवादी कचरत असल्याचे चित्र त्यांच्या उतारवयात त्यांना दिसू लागले. जिद्द हरवल्यामुळे वा संधिसाधूपणामुळे काही लेखकांनी व बुद्धिजीवींनी काँग्रेसची खुशमस्करी सुरू केली. या लाचारीचा उद्वेग आल्याने इतर काहींनी भारतीय जनता पक्षाची कास धरली, पर्यायाने हिंदू धर्माधिष्ठित राष्ट्राच्या उद्दिष्टावर आपली मोहोर उठवली. बुद्धिजीवींचा तिसरा गट अपराधी भावनेपोटी वा निव्वळ मूर्खपणातून, मध्य भारतातील जंगल व डोंगराळ प्रदेशांत आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या क्रांतिकारी माओवाद्यांचा समर्थक बनला.

वास्तव्य दिल्लीत नाही, तर बंगलोरमध्ये असल्यामुळे असेल कदाचित, मी राजकीय पक्षांपासून माझे स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकलो. काँग्रेस, संघपरिवार आणि संसदीय डावे यांच्याविषयीच्या माझ्या मतभेदाच्या मुद्यांची चर्चा या पुस्तकातील निवडक निबंधांत केली आहे. माओवाद्यांचा आणि त्यांच्या सहप्रवाशांचा माझ्यावर राग आहे. ‘सीजी नेट’ या संकेतस्थळावर त्यांच्या एका पित्त्याने डाव्याविरोधी मतांसाठी माझ्यावर शाब्दिक हल्ला चढवला होता. ‘काँग्रेस पक्षयंत्रणेशी माझे घनिष्ठ लागेबांधे आहेत’ आणि ‘अमेरिकी व्यवस्थेशी त्याहूनही दृढ संबंध आहेत,’ असा दावा त्यात होता.

सत्य काय आहे? माझ्या दृष्टीने, बंगलोरमधील ‘कोशींचे परेड कॅफे’ या एकाच संस्थेशी माझे जवळचे संबंध आहेत! मात्र मी माओवाद्यांचा टीकाकार आहे, हे त्यांच्या सहप्रवाशाचे निरीक्षण अचूक आहे; कारण सभ्यता आणि लोकशाही यांना काँग्रेसी भ्रष्टाचार आणि संघपरिवाराची असहिष्णुता यांपासून जेवढा धोका आहे, तेवढाच माओवाद्यांपासूनही आहे, असे मी मानतो.

डावे तसेच उजवे अतिरेकी असोत वा संधिसाधू आणि केंद्रातील दलाल, त्यांच्या विरोधात लिहिताना, मी ज्या पद्धतीने माझा उदारमतवाद ठसवला, त्याला कणाहीन म्हणता येणार नाही. वृत्तपत्री स्तंभलेखन करताना मी माझ्या शिक्षिकेचा सल्ला प्रामाणिकपणे पाळला. मात्र इतिहासपर संशोधकीय लेखन करताना त्यापासून दूर गेलो. आपला युक्तिवाद मांडण्यासाठी काहीशे शब्दच हाताशी असतात, तेव्हा आक्रमकपणे तो मांडणे गरजेचे असते. मात्र काहीशे पाने असतात, तेव्हा तुमचा युक्तिवाद परिणामकारकपणे पोचवण्यासाठी त्यातील संशोधनाच्या सखोलतेवरच अधिक भिस्त ठेवणे उपकारक असते.

लिखाणाच्या सुरातील या तफावतीचा संबंध त्या त्या लेखनप्रकाराच्या अपेक्षित प्रभावकाळाशी आहे. वर्तमानपत्री स्तंभ हा तात्कालिक असतो; कारण ज्यात तो प्रसिद्ध होतो, ते वृत्तपत्र दुसऱ्या दिवशीची रद्दी असते. पुस्तकाचे आयुष्य मोठे असते. निदान लेखकाला तरी ते प्रसिद्धीनंतर अनेक महिने, वर्षे वाचले जावे, असे वाटत असते. स्तंभात आक्रमक मतप्रदर्शन, शेरेबाजी शक्य असते. पण पुस्तकलेखन अधिक काळजीपूर्वक, तारतम्य राखत करणे भाग असते.

निबंध हा स्तंभ आणि पुस्तक यांच्या मध्ये कुठेतरी मोडतो. निबंधलेखनात तुम्ही एकाच वेळी ठाशीव, आक्रमक शैलीचा अंगीकार करू शकता आणि सोबत भरीव, सखोल तथ्येही मांडू शकता. स्वत:ला भाष्याची मुभा घेतानाच, त्याला नव्या वा किमान तोवर फारशा प्रचलित नसलेल्या तथ्यांच्या गाभ्याने वजन प्राप्त करून देऊ शकता. केवळ मुद्दे मांडण्याऐवजी, पाच वा दहा हजार शब्दांच्या निबंधात त्यांचा विस्तार करायला वाव असतो. त्यांतील गर्भित अर्थ, गुंतागुंती स्पष्ट करता येतात. युक्तिवादांच्या मर्यादा, अटी अधोरेखित करता येतात. मात्र हे दीर्घ, एकसंध पुस्तक नसल्यामुळे, परिणाम चांगला असो वा वाईट, लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीला त्यात मुभा असते.

‘देशभक्त आणि अंधभक्त’ या पुस्तकातील हे १५ निबंध राष्ट्रीयत्व आणि लोकशाही यांच्याशी भारतीय प्रजासत्ताकाच्या असलेल्या अभिमानास्पद तसेच त्रुटीपूर्ण बंधाच्या विविध पैलूंची तपासणी करू पाहतात. यांतील काही प्रथमच प्रसिद्ध होत आहेत, तर उर्वरित निबंधांत ताज्या संदर्भांसह सुधारणा करण्यात आली आहे. त्यांपैकी काहींत नव्याने लक्षणीय प्रमाणात भर घालण्यात आली आहे. लेखकाच्या व्यापक युक्तिवादाचा रोख आणि लेखकाची गृहिते प्रभावीपणे वाचकापर्यंत पोचवण्यास साह्य होईल, अशा प्रकारे या लेखांचा अनुक्रम ठरवण्यात आला आहे. वैचारिक नियतकालिकांतून आधी प्रसिद्ध झालेल्या यांपैकी काही लेखांना तळटिपा व संदर्भ पुरवले होते. येथे ते वगळण्यात आले आहेत.

पुस्तकाच्या ‘भाग एक’मधील पहिले नऊ लेख प्रामुख्याने राजकीय विषयांशी संबंधित आहेत. ‘भाग दोन’मधील सहा लेख हे प्रामुख्याने वैचारिक व्यक्तिमत्त्वाची चर्चा करणारे आहेत. याखेरीज पहिल्या भागात काही विचारवंत आणि लेखक यांविषयीचे चिंतनही आहे, आणि दुसऱ्या भागात, लोकशाहीच्या राबवणुकीवरील सविस्तर नोंदी. तीन ते तेरा हजार शब्दसंख्या असलेल्या या निबंधसंग्रहात व्यक्ती, संस्था आणि विचारसरणी यांचा वेध घेतला आहे... तो या सर्वांविषयी काय सांगतो आणि आधुनिक भारतातील राजकारण तसेच समाज यांच्याविषयीही त्यातून काय गवसते, हे जाणून घेण्यासाठी!

वर्गातील विद्यार्थ्यांना परिचय करून देताना काही काळापूर्वी अमेरिकेतील कायद्याच्या एका अध्यापकाने ‘जगाचा नागरिक’ असे माझे वर्णन केले होते. त्यातून त्याला माझा गौरवच अभिप्रेत होता, मात्र मी तत्काळ खुलासा केला - मी जगाचा नागरिक नाही, तर भारतीय लोकशाहीवादी आहे. आपल्या शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे, तिला उत्तरदायी ठरवणे, हे नागरिकाच्या मुख्य कर्तव्यांपैकी एक आहे, हे ख्यातनाम जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हाल्डेन यांचे वचन मी उद्धृत केले. जगाची अशी एक शासनसंस्था नसल्यामुळे, आपल्या अपेक्षा, चिंता-तक्रारी त्यांना त्यांच्या शासनसंस्थेकडे म्हणजे भारतीय प्रजासत्ताकाकडेच व्यक्त करणे भाग होते (त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते), असे त्यांचे म्हणणे होते. ‘बऱ्याच प्रमाणात टीकेविषयीची सहिष्णुता हा भारतीय शासनसंस्थेचा चांगला गुण आहे, मात्र टीकेला तिचा प्रतिसाद तत्पर नसतो,’ या हाल्डेन यांच्या निरीक्षणाशी, जन्माने भारताचा नागरिक या नात्याने मी सहमत असल्याचेही मी स्पष्ट केले.

देशभक्ती म्हणजे राष्ट्रवाद नव्हे, उन्मादी वा असहिष्णू कट्टरवाद तर नव्हेच नव्हे. एखादी भाषा वा धर्मश्रद्धा यांच्यावरील निष्ठा आणि देशाविषयीचे प्रेम यांची सांगड तोडू पाहणे ही महात्मा गांधींची अद्वितीय प्रतिभा; तर इतर संस्कृती आणि देश यांचे उघड कौतुक करतानाच, आपल्या देशावरही प्रेम करता येते, हे दाखवून देणे ही रवींद्रनाथ टागोरांची अद्वितीय प्रतिभा. पाकिस्तान आाणि इस्त्रायल अशा दोन टोकाच्या देशांत, नागरिकत्व हे समान धर्मश्रद्धा, समान भाषा आणि समान शत्रू यांच्या स्वीकारावर ठरते. सच्चा इस्त्रायली कोण? धर्माने ज्यू, हिब्रूभाषिक आणि अरब संस्कृतीचा द्वेष करतो; तो. सच्चा भारतीय असण्यासाठी मात्र ना तुम्ही हिंदू असणे अपरिहार्य आहे, ना हिंदीभाषिक. पाकिस्तानचा तिरस्कार करणेही अनिवार्य नाही.

दुर्दैवाने, उजव्या हिंदू प्रवृत्तींनी अलीकडच्या काही वर्षांत देशभक्तीच्या भाषेवर कब्जा केला आहे. यात त्यांना साह्य केले आहे, ते मार्क्सवादी डाव्यांनी. या डाव्यांची पितृभूमी नेहमीच त्यांचा स्वत:चा देश सोडून अन्य देश राहिली आहे. आधी रशिया, मग चीन, पुढे व्हिएतनाम आणि नंतर क्युबा. (सध्या भारतीय मार्क्सवाद्यांचा कल व्हेनेझुएलाकडे वळताना दिसतो आहे!) त्यांना उदारमतवादी आणि पक्षातीत डावे यांची साथ लाभते आहे. एका बाजूला उजव्यांच्या उन्मादाचा उद्वेग आणि दुसऱ्या बाजूला अधिकाधिक परस्परावलंबी होत चाललेल्या जगात जागतिक नागरिकत्वाच्या आकर्षक वाटणाऱ्या चर्चेने उडालेला गोंधळ, यांमुळे हा वर्ग स्वत:कडे भारतीय म्हणून पाहण्यास बहुधा लाजतो!

भूतकाळात होऊन गेलेल्या अनेक महान भारतीय सुधारणावाद्यांच्या कार्याचा अभ्यास इतिहासकार म्हणून मी केला. त्यांचा वारसा ही माझ्या देशभक्तीमागील प्रेरणा आहे. शिवाय ज्या लोकशाहीवाद्यांना जाणून घेण्याचे भाग्य मला लाभले, त्यांच्या उदाहरणांनीही ती समृद्ध झाली आहे. त्यापैकी तिघांचा विशेष उल्लेख करतो. शिवराम कारंथ आणि महाश्वेतादेवी यांना माझा सलाम. त्यांच्या त्यांच्या राज्यासाठी केलेल्या कामातून त्यांच्या देशभक्तीचा आविष्कार झाला. अनुक्रमे कन्नड आणि बंगाली या भाषांतील ते ख्यातनाम कादंबरीकार. त्यांच्या लोकजीवनाशी ते पूर्णपणे समरस झाले होते. कर्नाटकात कारंथ यांनी जवळपास एकहाती पर्यावरणीय चळवळ उभी केली. यक्षगान संगीत नृत्याविष्कार, विधवाविवाहाचा पुरस्कार, कन्नड कादंबरीप्रकाराची पायाभरणी ही त्यांची इतर कार्ये. महाश्वेतादेवींनीही जवळपास एकट्याने आदिवासींच्या आणि विशेषत्वाने ब्रिटिशांनी गुन्हेगारी जमाती म्हणून शिक्का मारलेल्या समूहांच्या उद्ध्वस्तीकरणाकडे समाजाचे लक्ष वेधले.

कारंथ हे चांगले भारतीय होतेच, अधिक चांगले कन्नडिगही होते. त्यांच्याप्रमाणेच, आदिवासींशी एकरूपतेमुळे बंगाल वा भारत यांच्याविषयीच्या महाश्वेतादेवींच्या आत्मीयतेत कसर आली नाही. या बाबतीत त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे तुलनेने तरुण उत्तराखंडी इतिहासकार म्हणजे शेखर पाठक. बुद्धिमान, हुन्नरी, चैतन्यशील. दर दहा वर्षांनी ते त्यांचे राज्य पायी पालथे घालतात. नेपाळ सीमेवरील अस्कोट ते हिमाचल प्रदेशाच्या सीमेवरील आराकोट असा हा अनेक आठवड्यांचा प्रवास. वाटेत उंच हिमाच्छादित खिंडी, खडकाळ डोंगरी वाटा. हा प्रवास विनाथांबा नसतो. दुर्मीळ वनस्पती, पक्षी आणि प्राणी यांच्या छायाचित्रणासाठी ते वाटेत वेळ काढतात. बहुतेकदा भिन्न जातींच्या, वेगवेगळी भाषा बोलणाऱ्या उत्तराखंडी स्त्री-पुरुषांशी संवादात ते रमतात. या पदयात्रांच्या दरम्यानच्या काळात पूर्व-पश्चिम ऐवजी दक्षिण-उत्तर असा प्रवास ते करतात. खालच्या प्रदेशांतील दऱ्या आणि डोंगराळ भागातील बांधवांचा जगण्याचा संघर्ष समजून घेणे हा हेतू.

या प्रवासातून जे गवसत गेले, ते शेखर पाठक यांनी अनेक पुस्तके, शेकडो लेख, तसेच भाषणे आणि ‘पहर’ या नियतकालिकाच्या २० खंडांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवले आहे. या नियतकालिकाचे संपादन, निर्मिती, छपाई आणि वितरण ते एकहाती करतात. शिवाय त्यांचे व्यक्तिगत संदर्भालय आहे. त्यात शेकडो मुलाखती, हजारो पत्रे आणि छायाचित्रे यांचा संग्रह आहे. भविष्यात या माहितीच्या खजिन्याच्या आधारे, त्यांना कधीही न भेटलेले संशोधक हिमालयाचे आपआपले पर्यावरणीय तसेच सामाजिक इतिहास लिहू शकतील. स्वत:चे राज्य आणि देश यांसाठी पाठक यांचे योगदान अतुलनीय आहे.

मी स्वत:ला ‘जागतिक नागरिक’ म्हणत नाही, तो हे तीन भारतीय आणि त्यांच्यासारखे इतर यांच्या प्रभावामुळे. माझ्या मते, ते वर्णन काहीसा आत्मगौरवपर सूर लावते. जागतिक नागरिकत्वाचा आग्रह धरणारे सामान्यत: उच्चशिक्षित व्यावसायिक असतात. जगातील कोणत्याही देशाचे नागरिकत्व घेण्याची साधनक्षमता त्यांच्याकडे असते. ते सहजपणे आणि यशाच्या पायऱ्या ओलांडत एका देशातून दुसऱ्या देशाकडे वळू शकतात. बहुसंख्य भारतीयांसाठी मात्र या वाटा खुल्या नाहीत. त्यांना त्यांच्या वाट्याचे आयुष्यातील दिवस (आणि रात्री) भारतीय प्रजासत्ताकाचे नागरिक म्हणूनच व्यतीत करायचे आहेत. त्यांच्याच आशा (आणि आशंकाही) एका भारतीय लोकशाहीवाद्याने या पुस्तकात लिहिलेल्या लेखांचे लक्ष्य आहे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......