बारामतीचा किल्ला सुप्रिया सुळे राखणार की, भाजपच्या कांचन कुल सर करणार?
पडघम - राज्यकारण
ऋषिकेश नळगुणे
  • शरद पवार, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह, चंद्रकांतदादा पाटील आणि महादेव जानकर
  • Thu , 16 May 2019
  • पडघम राज्यकारण शरद पवार Sharad Pawar सुप्रिया सुळे Supriya Sule राष्ट्रवादी काँग्रेस NCP कांचन कुल Kanchan Kool चंद्रकांतदादा पाटील Chandrakant Patil महादेव जानकर Mahadev Jankar

शरद पवार आणि बारामती हे मागील ३५ वर्षांपासूनचे समीकरण आहे. त्यांचे या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व आहे. देशातील वारे कोणताही दिशेने, कितीही वेगाने वाहिले तरी पवारांचा हा बुरुज ढासळलेला नाही. आणि केवळ आजचाच नाही तर १९५७ पासूनचा इतिहास आहे.

मात्र भाजपने २०१४ पासून पवारांच्या या अभेद्य किल्ल्याला खिंडार पाडण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. २०१४ ला राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेविरोधात कडवी झुंज दिली होती. २००९ च्या विजयाच्या तुलनेत त्यांचा २०१४ चा विजय अवघड करून ठेवण्यात जानकर यशस्वी झाले होते. त्यामुळे सुळेंनी अवघ्या ६९ हजार ७१९ मतांच्या फरकाने विजय मिळवला. पवारांची या मतदारसंघावर असणारी पकड, पवार कुटुंबियांना मानणारा वर्ग आणि महादेव जानकरांसारखा यापूर्वी बारामतीमधून कधीही निवडणुकीला उभा न राहिलेला नवखा उमेदवार व ७० हजारांचे मताधिक्य हे समीकरण न जुळणारे आणि न पटणारे होते.

१७व्या लोकसभेसाठी भाजपने दौंडचे रासपचे एकमेव आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. जानकरांनीदेखील या निवडणुकीत चिन्हाचा हट्ट न धरता कुल यांच्या उमेदवारीला हरकत घेतली नाही. २०१४ मध्ये भाजपने विनंती करूनही जानकर यांनी कमळ चिन्ह न घेता निवडणूक लढवल्यानं त्याचा फटका त्यांना बसला होता. अन्यथा तेव्हाच बारामतीच्या इतिहासात धक्कादायक निकाल लागला असता! पण यावेळी कुल भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. कांचन यांच्या सासूबाई आणि सासरेदेखील आमदार होते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या त्या जवळच्या नातेवाईक आहेत.

बारामतीत कोल्हापूरची एन्ट्री

भाजपने राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना बारामती लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयकाची जबाबदारी दिली आणि बारामतीच्या राजकारणात कोल्हापुरची एन्ट्री झाली. त्यामुळे चंद्रकांतदादांनी काही दिवस आपला मुक्काम कोल्हापुरहून बारामतीत हलवला होता. त्यांनी पवार घराण्याच्या मागील चार दशकांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. 
तर शरद पवार यांनी वयाच्या ७९ व्या वर्षीही संपूर्ण महाराष्ट्रभर ८० पेक्षा जास्त प्रचारसभा घेत तरुण नेत्याला लाजवतील अशा उत्साहात प्रचार केला.

भाजपकडे तुलनेने प्रचाराचे चेहरे जास्त आहेत, तर राष्ट्रवादीकडे शरद पवार यांच्याव्यतरिक्त राष्ट्रीय पातळीवरील चेहरा नाही, हे या निवडणुकीतही सिद्ध झाले.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal

.............................................................................................................................................

विधानसभा मतदारसंघातील वातावरण

सुप्रियाताई यांचे बंधू, माजी उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवार, इंदापूरचे दिग्गज नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार दत्तात्रय भरणे, भोरचे काँग्रेस आमदार संग्राम अनंतराव थोपटे हे सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आहेत. तर खडकवासलाचे भाजप आमदार भीमराव तापकीर आणि पुरंदरचे शिवसेनेचे मंत्री असलेले विजय शिवतारे यांनी आपली ताकद कुल यांच्या पाठीशी उभी केली आहे.

राहुल कुल यांच्याबाबत निवडणुकीच्या काळात जनमानसात फारसे चांगले बोलले जात नव्हते. त्यांच्या ताब्यात असलेला भीमा पाटस सहकारी साखर कारखाना अडचणीत आलेला आहे. या साखर कारखान्याने एफआरपीनुसार उसाला दर दिलेला नाही आणि गेली आठ महिने कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे खुद्द दौंडमध्येच कांचन यांना आघाडी मिळेल का याबाबत शंका आहे. 

दिग्गजांच्या सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारामतीमध्ये सभा व्हावी यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी फिल्डिंग लावली होती. मात्र मोदींनी ऐनवेळेस आपल्यातील शिष्य जागवत सभेला नकार कळवला. यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, राम शिंदे, गिरीश महाजन, पाशा पटेल यांच्यापर्यंत सर्वांनी बारामती मतदारसंघात वेगवेगळ्या सभा घेतल्या. त्यांनी बारामतीच्या भक्कम किल्ल्यावर वेगवेगळ्या आरोपांच्या तोफा डागत किल्ला सर करण्यासाठी ‘एडी से लेकर चोटी तक’ जोर लावला. राज्यात युती या वेळी ४३ जागा जिंकणार असून ४३ वी विजयी जागा बारामतीची असेल, अशी भीमगर्जना मुख्यमंत्र्यांनी पुण्यातून केली.

राज्यातील प्रचार हा प्रामुख्याने शरद पवार विरुद्ध भाजप असाच राहिला. महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या जेवढ्या सभा झाल्या, त्या सर्व सभा शरद पवारांभोवतीच फिरल्या. शरद पवारही गमतीने एका सभेत म्हणाले होते की, मला तर शंका वाटते की झोपेतही भाजपवाले ‘शरद पवार, शरद पवार, शरद पवार’ असे बोलत असतील.

बारामती मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी दोन लाख ३२ हजार ८२९ मतांची वाढ झाली आहे. बारामतीमध्ये गेल्या निवडणुकीत ५८.८३ टक्के मतदान झाले होते, तर यावेळी ६१.५८ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्यामुळे हे वाढलेले मतदान कोणाला लोकसभेत घेऊन जाणार, हे पाहावे लागणार आहे.

चंद्रकांतदादा-शरद पवार कलगीतुरा

कधीही निवडणूक न लढवणारे चंद्रकांत पाटील यांच्यासारखे नेते इतक्या आत्मविश्वासाने बारामतीची जागा जिंकण्याचा दावा करत आहेत. हा दावा ईव्हीएमच्या जोरावर तर केला जात नाही ना? चंद्रकांतदादा लागलीच शंकेवर उत्तर देत म्हणाले, ‘शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे. शरद पवार यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती यावेळी निवडून येणार नाही. त्यामुळे पवारांनी त्यांच्या पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केली आहे.’ 

दरम्यान चंद्रकांत पाटील गुलाल उधळायला येत्या २३ तारखेला बारामतीला जाणार आहेत, अशीही बातमी वाचायला मिळाली आहे. मात्र ‘मोठ्या साहेबांचा शब्द आमच्यासाठी आदेश आहे. त्यामुळे सुप्रियाताईंना लोकसभेवर पाठवणार’ असे मतदारसंघातले अनेक लोक म्हणतात. त्यामुळे एकंदरीत वडिलांच्या पुण्याईवर सुप्रियाताई पुन्हा लोकसभा गाठतील असे दिसते. त्यामुळे चंद्रकांतदादा बारामतीचा किल्ला घेणार का, हे २३ मे रोजीच कळेल.

.............................................................................................................................................

लेखक ऋषिकेश नळगुणे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.

hrishikeshnalagune123@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा