गांधी : तिरस्काराकडून आदरभावनेकडे  
सदर - गांधी @ १५०
तुषार म्हात्रे
  • म. गांधी यांच्या विविध भावमुद्रा
  • Mon , 02 October 2017
  • गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram

सुमारे चार वर्षांपूर्वीचा प्रसंग. डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत फरिदाबाद येथील कॉन्फरन्स आटोपून दिल्लीकडे निघालो. दिल्लीत फिरण्यासाठी पुढील योजना आखत होतो. माझ्यासोबत आणखी चार सहकारी होते. सकाळी दहाच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ पोहोचलो. सोमवार असल्यानं किल्ल्याचं प्रवेशद्वार बंद. बाहेरूनच धुक्यामुळे पांढरा झालेला लाल किल्ला पाहिला आणि एक टुरिस्ट बस पकडून जिवाची दिल्ली करण्यास निघालो. एक दोन स्थळं पाहिल्यानंतर गाईडनं पुढील स्थळाचं नाव घोषित केलं- राजघाट! नाव ऐकून डोळे चमकले. उत्साहानं हिरवळीतून मार्गक्रमण करत समाधीस्थळाजवळ पोहोचलो. महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. सोबत असलेल्या राहुलला आवर्जून छायाचित्र काढायला लावलं. मनातील एक अपूर्ण इच्छा पूर्ण झाली.

‘तिरस्कार ते आदरभावना’ असा न विरुद्ध टोकाचा प्रवास सहजासहजी होत नाही. माझ्याबाबतीत तो घडलाय. याला कारणीभूत आहे महात्मा गांधींची ‘कृतियुक्त विचारशैली’.

शाळेत असल्यापासून भिंतीवर हसऱ्या छबीची गांधी प्रतिमा पाहत आलो. जोडीला रंग उडालेल्या भिंतीवरील निर्जीव चित्रंही. ‘एक रुपया चांदीचा, सारा देश गांधीचा’ या स्वरूपातल्या घोषणाही ऐकल्या. पण ‘गांधी’ नावाच्या माणसाचे विचार फारसे ऐकायला मिळाले नाहीत. नाही म्हणायला स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती-पुण्यतिथीला विद्यार्थ्यांनी रट्टा मारून केलेली रटाळ भाषणं ऐकायला मिळायची. शालेय जीवनात महान व्यक्तींवरील सर्वाधिक विनोद, कुचेष्टा ‘गांधी’ नावाभोवतीच फिरणाऱ्या होत्या. त्यांच्या शरीरप्रकृतीवरून, कपड्यांवरून विनोद केले जायचे (अजूनही केले जातात).

या  वातावरणातच ‘गांधी’ नावाची एक विशिष्ट प्रतिमा आपोआपच तयार होत गेली. पुढे थोडी समज यायच्या वयात ‘गांधींमुळे आपल्याला स्वातंत्र्य थोडं उशिरानं मिळालं’ या आशयाचं वाक्य कानावर पडायचं. सत्य, अहिंसा वगैरे शब्द त्यावेळी खूपच तकलादू वाटायचे. उपलब्ध स्रोतांतून गांधींविषयी फार चांगलं पाहायला, ऐकायला मिळत नव्हतं. वाचनाची आवड पूर्वीपासून होतीच. पण तरीही ‘गांधी विचारधारा’ किंवा तसलं इतर काही माझ्यापर्यंत पोहचत नव्हतं.

घरात गांधीजींवरील ‘प्रेषित’ नाव असलेलं, कव्हर फाटलेलं पुस्तक होतं. पण मला ते कधीही उघडून वाचावंसं वाटलं नाही. गांधीजींचा प्रत्यक्ष उल्लेख असलेलं पहिलं पुस्तक वाचलं ते म्हणजे गोपाळ गोडसेंचं ‘गांधीहत्या आणि मी’. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ‘पंचावन्न कोटींचे बळी’. या सर्व वाचनातून आणि उपलब्ध माहितीवरून ‘मोहनदास करमचंद गांधी’ नावाची एक फसव्या व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती भारतात होऊन गेली, हाच माझा समज होता.

गांधीजींविषयी टोकाचा अनादर असताना, ‘राजघाटा’पर्यंतच्या प्रवासात असं काय घडलं की, मी केवळ त्या स्थळाचं नाव ऐकल्याबरोबर उल्हासित झालो? त्या पवित्र भूमीत समाधान पावलो?

गांधी नावाचं गारूड माझ्या विचारांवर कसं झालं?

मला जरी त्यांचे विचार पटत नव्हते, तरी प्राथमिक शाळेत असताना आमच्या शिक्षकांनी शिकवलेला ‘प्रथम श्रेणीच्या डब्यातला’ प्रसंग माझ्या मनावर बिंबला होता. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा ‘गांधी’ मी त्या पाठात अनुभवला होता.

माझ्या मनातील महात्म्याच्या कलुषित प्रतिमेला सर्वप्रथम छेद दिला तो नारायणभाई देसाईंच्या अचंबित करणाऱ्या ‘बापूकथा’ या मथळ्याखालील ‘अज्ञात गांधी’ नावाच्या पुस्तकानं. समकालीन प्रकाशननं प्रकाशित केलेल्या नव्या कोऱ्या आणि सर्वार्थानं हटके अशा श्रेणीतलं हे पुस्तक. नावातील वेगळेपणामुळे मी ते वाचलं, पुन्हा पुन्हा वाचलं. काहीतरी वेगळेपणा होता या पुस्तकात, लेखन शैलीत आणि बापूंच्या विचारांत. हे वेगळेपणच मला भावलं. ग्रंथालयाचं पुस्तक परत केल्यानंतर मी दादरच्या आयडीयल मधून ‘अज्ञात गांधी’ विकत घेतलं, माझ्यासाठी.

लगेचच काही दिवसांनी बापूंची आत्मकथा म्हणजेच ‘माझे सत्याचे प्रयोग’ वाचलं. हे पुस्तकही माझ्या संग्रही आहे. यानंतर ‘महात्मा गांधी’ नावानं मिळालेलं चांगलं-वाईट सर्व प्रकारचं साहित्य वाचलं. माझ्यावरील गांधी विचारांचा प्रभाव वाढला. तिरस्काराच्या भावनेचं रूपांतर ‘कुतूहलयुक्त आदरात’ झालं.  

हे वाचन चालू असतानाच एके दिवशी हॉलिवुडचा आयर्न मॅन ‘बेन किंग्जले’नं अजरामर केलेला ‘गांधी’ नावाचा चित्रपट पाहिला. ‘शटर आयलंड’, ‘आयर्न मॅन’, ‘प्रिंस ऑफ पर्शिया’मध्ये पाहिलेला हा अॅक्शन हिरो एका योग्याची भूमिका अक्षरश: जगत होता. दोन-चार दिवसांनीच दै. ‘लोकसत्ता’मध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरोंची ‘गांधी’ चित्रपटनिर्मितीमागची दोन दशकांची संघर्ष कथा वाचायला मिळाली. या चित्रपटाविषयीचा आणि महात्म्याविषयीचा आदर दुणावला. हा आदर टिकूनही राहिलाय.

भारतातील स्वातंत्र्यलढ्यापेक्षाही गांधींचं दक्षिण आफ्रिकेतील कार्य मला अधिक प्रेरित करतं. त्यांचे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे संघर्षमय प्रसंग मला प्रेरणा देतात. कोणत्याही तत्त्वज्ञानाची सूत्रबद्ध मांडणी न करता स्वत:च्या कृतीतून तत्त्वज्ञानाला आचरणात आणणारे गांधी मला आवडतात.  

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

गांधींची आत्मकथा वाचल्यानंतर मी माझा संयम तपासण्यासाठी एक वर्षाहूनही अधिक काळ शाकाहारी राहिलो होतो. (मला वैयक्तिकरीत्या ओळखणाऱ्यांना हे माझ्यासाठी किती कठीण आहे याची कल्पना असू शकेल!). अर्थात हा प्रयोग केवळ प्रतीकात्मक होता.

मी जसजसे त्यांच्याविषयी वाचत चाललोय, तसतसे समोर येणारे नवीन पैलू मला गांधीविचारांकडे झुकवत चालले आहेत. (गांधींभोवती रेंगाळणाऱ्या गैरसमजांचं धुकं दूर करण्यात ‘अक्षरनामा’ या वेब पोर्टलचासुद्धा मोठा वाटा आहे. यातील प्रत्येक महिन्याच्या दोन तारखेला येणारा गांधींविषयीचा लेख मी नियमितपणे वाचतोय.)

एक खंत वाटतेय, ती म्हणजे शांतीचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माणसाला शांततेचं नोबेल पारितोषक मिळालं नाही. गांधींच्या विचारांनी प्रेरित झालेल्या नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांना नोबेल मिळालं, पण गांधींना नाही. असो. बहुतेक नोबेलच्या नशिबात गांधी नसावेत.

येत्या वर्षांत गांधी जयंतीचं ‘शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष’ सुरू होईल. या निमित्तानं आपल्या जाणिवा पुन्हा एकदा तपासून पाहूया. कोणताही विचार परिपूर्ण नसतो. त्याला काळाच्या कसोटीवर घासून पाहाणं गरजेचं असतं. हे पाहताना विचारातील संदिग्धता, विसंगती शोधता येते. गांधीविचाराबाबत असहमती दर्शवूनही आपण त्याचा कालसुसंगत विचार करू शकतो. एखाद्या विचारधारेबाबत असहमती दर्शवणं अथवा समज-गैरसमजाचे थर साचत जाणं म्हणजे त्या विचारधारेला विरोध करणं नसतं, तर विचार तपासण्याची ती एक संधीही असते. यासाठीच सांगोवांगीच्या कथांवर विश्वास न ठेवता चिकित्सक वृत्तीनं गांधी शोधूया. जर त्यांचे  विचार सोन्यासारखे असतील तर आगीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर अधिकच चमकतील. पण त्यासाठी चिकित्सक वृत्तीची धग आणि विवेकबुद्धीची नजर गरजेची आहे. यातूनच सत्य काय ते सापडू शकेल. गांधीविचारांना अभ्यासण्याची आणखी एक संधी स्वत:ला देऊया, स्वत:साठी!

लेखक तुषार म्हात्रे रयत शिक्षण संस्थेमध्ये (मु. पिरकोन, ता.उरण, जि. रायगड) शिक्षक आहेत.

tusharmhatre1@gmail.com

.............................................................................................................................................

गांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_list

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

sagar gawand

Mon , 02 October 2017

मी सुद्धा 'गांधी' कधी वाचले नाही, बघितले ते फक्त गांधीवादी म्हणून मिरवणाऱ्या लोकांमध्ये, आणि ऐकले ते फक्त लोकांच्या बोलण्यामधून ( त्यातील बहुतेक गोडसे आणि भगतसिंग समर्थक ). गांधीवादी म्हणून मिरवणाऱ्या लोकांच्या आचरणात अपेक्षित 'गांधी' कधी दिसलेच नाही ( बहुतेकांनी गांधीवाद हा फक्त गांधीटोपी प्रमाणे डोक्यावरच ठेऊन दिला असावा , त्याला डोक्यात शिरून नाही दिला) , आणि गांधींबद्दल बोलणाऱ्या लोकांमध्ये गांधींबद्दल द्वेषच दिसला. काही दिवसांपूर्वी तुझ्याशी बोलताना पहिल्यांदा मला व्यासपीठ नसतानाही गांधींजीविषयी बोलणारा समर्थक दिसला.अर्थात तुझे मत हे unbiased (मराठी शब्द आठवला नाही) आणि सर्वांकष विचार करून केलेले असतात त्यामुळे तेव्हा ( आणि आत्ताही) गांधी नीट समजून घेयाला हवे असे वाटले. वेळ मिळाल्यावर नक्कीच प्रयत्न करेन...!! बाकी तुझी लेखणी आणि विचार नेहमीप्रमाणेच सखोल आणि सुंदर


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......