व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेशी झगडणाऱ्या कथा
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
राजन मांडवगणे
  • ‘पाऊल वाजे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 09 March 2018
  • ग्रंथनामा शिफारस पाऊल वाजे Paaul Vaaje विवेक गोविलकर Vivek Govilkar

विवेक गोविलकर यांची ‘द टेकओव्हर’ ही कॉर्पोरेट जगातल्या कथानकावर आधारित पहिली इंग्रजी कादंबरी. त्यानंतर त्यांनी ‘युनायटेड आयर्न अँड स्टील’ ही मराठी कादंबरी लिहिली. एका फाउंड्रीतल्या कामगारांच्या आणि व्यवस्थापकांच्या जीवनावर आधारित असलेल्या या त्यांच्या कादंबरीला ‘कोमसाप’चा २०१७-१८चा सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. नुकतंच त्यांचं तिसरं पुस्तक ‘पाऊल वाजे’ (कथासंग्रह) मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित झालं आहे.

गोविलकर यांनी आयआयटी, मुंबई या संस्थेतून अभियांत्रिकी प्रशिक्षण घेतल्यानंतर तीन दशकांहून अधिक काळ आयटी क्षेत्रात नोकरी केली. कामानिमित्त जगभर प्रवास केला. काही वर्षं त्यांचं अमेरिका आणि युरोपमध्येही वास्तव्य होतं. अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेतला असल्यानं त्यांच्या बहुतेक कथा कॉर्पोरेट कल्चरमधल्या आहेत.

‘पाऊल वाजे’ या संग्रहात एकंदर सहा कथा आहेत. त्यातील ‘इन्व्हेस्टमेंट’ ही कथा ग्लास-सीलिंग हा विषय हाताळते. आज सर्व क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत, असं आपण म्हणतो. काही अंशी ते खरं असलं तरी अनेक क्षेत्रांमधे स्त्रियांना सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना त्यांना एका अदृश्य अडथळ्याचा (ग्लास-सीलिंग) सामना करावा लागतो. अजूनही जगभरातल्या बड्या कंपन्यांच्या सीईओ पदावर किंवा बोर्डावर स्त्रिया अल्पसंख्येनंच आढळतात. आपली कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी स्त्रियांना अधिक जास्त परिश्रम घ्यावे लागतात. ऑफिसातले सहकारी आणि घरचे लोकही कळत-नकळत, प्रत्यक्ष किंवा छुपा विरोध करतात. या कथेची नायिका सई ऑफिस आणि घर, या दोन्ही आघाड्यांवर लढताना दिसते. अशा लढ्यामध्ये कठीण निर्णय घ्यायचे प्रसंग पावलोपावली येत राहतात. आणि त्या प्रत्येक निर्णयाची किंमत तिला चुकवावी लागते. 

आयटी क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्यानंतर, बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय झालं. असे अनेक लोक, भारतीय कंपन्यांमार्फत युरोप आणि अमेरिकेतल्या कंपन्यांपर्यंत पोहचले. यावर उपाय म्हणून, भारतीय कंपन्यांनी कोणालाही कामावर घेण्यापूर्वी, प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक आणि पूर्वानुभवाची पार्श्वभूमी, एखाद्या व्यावसायिक संस्थेच्या मदतीनं तपासून घ्यावी, असा आग्रह अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी धरला. उमेदवारांनी आपल्या अर्जात दिलेली शिक्षण आणि अनुभव या विषयीची माहिती त्यांच्या दाव्याप्रमाणे आहे की नाही, हे विद्यापीठ आणि आधीच्या कंपन्यांशी अधिकृतरीत्या संपर्क साधून पडताळून पाहावं, अशी त्या संस्थांकडून अपेक्षा असते. ‘बॅकग्राउंड चेक’ या कथेची अनामिक आणि अदृश्य नायिका या व्यवस्थेचा वापर स्वतःची वैयक्तिक उद्दिष्टं साध्य करण्यासाठी करते. कथानकाच्या दृष्टीनं मध्यवर्ती असलेली दोन पात्रं प्रत्यक्षात कधीच समोर येत नाहीत. त्यांच्याभोवती फेर धरणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवेदक ही कथा पुढे नेतो.

दोन मित्रांमध्ये येणाऱ्या वितुष्टाच्या कथा यापूवी येऊन गेलेल्या आहेत. ‘मित्र’ ही अभि आणि दत्ता या मित्रांची आणि त्यांच्यात निर्माण होणाऱ्या वैराची कथा, आजचा काळाच्या संदर्भात आहे. लोकप्रिय चित्रपट आणि साहित्यात वापरून गुळगुळीत झालेल्या मार्गानं न जाता, ती आजच्या नीतीमूल्यांच्या संदर्भातल्या शक्यतांचा शोध घेते. कथेचा निवेदक स्वतःकडे ‘तू’ या द्वितीय पुरुषी कर्त्याच्या भूमिकेत अलिप्तपणे बघायचा प्रयत्न करतो.

याही कथेला ऑफिसमधल्या राजकारणाची पार्श्वभूमी आहे. हे राजकारण सर्वांच्या कार्यालयीन आयुष्याचा अविभाज्य भाग बनून राहतं. दोन मित्र म्हणून एकत्रितपणे काय काय करता येईल याच्या मर्यादा, त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतच त्यांच्या लक्षात आलेल्या असतात. व्यावसायिक जगात केवळ पुढे जाण्यासाठीच नाही, तर टिकून राहण्यासाठीसुद्धा या राजकारणाचा खेळ त्यांच्यासाठी अपरिहार्य बनतो. याची तार्किक परिणती ही मैत्री तुटण्यात होते.

‘प्रोसेस ऑडिट’ ही संकल्पना चांगल्या प्रकारच्या म्हणजे नैतिक, प्रभावी आणि धोके टाळणाऱ्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असते. कंपनीतल्या एखाद्या विभागाचं काम योग्य प्रकारे चाललं आहे की नाही, हे कागदपत्रांची छाननी करून ठरवलं जातं. त्यासाठी सादर केलेली कागदपत्रं अस्सल असल्याची खात्री करून घेणं, हाही ऑडिटचा भाग असतो. कथेची नायिका निरुपमा ही हुशार, कर्तबगार आणि ‘फास्ट ट्रॅक मॅनेजर’ आहे. तिच्या मेहनतीचं चीज करणाऱ्या तिच्या बॉसविषयी तिला वाटणाऱ्या आदरापोटी, ती त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करते. आणि त्या नादात ती ऑफिसमधल्या सहकाऱ्याबरोबरचे व्यावसायिक संबंध आणि वैयक्तिक नातं यांच्यात गल्लत करते. कामासंदर्भातल्या ऑडिटमध्ये नापास होणारा तिचा आलोक हा तरुण सहकारी, तिच्याबरोबरच्या नातेसंबंधांच्या आणि विश्वासाच्या ऑडिटमध्येही नापास होतो.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या ‘विशाखा गाईडलाइन्स’चा कायदा बनला आणि कामाच्या जागी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्धच्या लढ्याला एक बळ मिळालं. हा कायदा भारतात लागू होण्यापूर्वी, आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अमेरिका आणि युरोपच्या कायद्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी काही नियम आणि धोरणं बनवली होती. चांगल्या उद्देशानं बनवलेल्या या नियम आणि धोरणांना, व्यावहारिक अडचणी आणि काही प्रसंगी कायद्याच्या परिभाषेत न सामावणारं वास्तव कसं चकवा देऊ शकतं, याची ‘बळी’ही कथा आहे. कायदा जाती-प्रांतांच्या भिंती जाणत नाही. पण कुटुंबातल्या लोकांकडून होणाऱ्या मानसिक छळापासून संरक्षण करण्यात कायदा फारसा प्रभावी ठरत नाही. एका बाजूला भावनारहित कायदे-नियम आणि दुसऱ्या बाजूला कौटुंबिक ब्लॅकमेल, यात कल्पना सिंग आणि रमेश अय्यर हे भिन्न प्रांतांमधले, भिन्न जाती, भाषा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले प्रेमी भरडून निघतात.

गौरी देशपांडे या सत्तर आणि ऐंशीच्या दशकात कथा-कादंबरी लिहिणाऱ्या मराठीतल्या एक महत्त्वाच्या लेखिका. त्या वेळचे आशय, विचार आणि मांडणी, या सर्वच बाबतीतले संकेत आणि प्रथा झुगारून देणाऱ्या या लेखिकेनं त्या काळाच्या पुढे जाणाऱ्या बंडखोर नायिकेची रंगवलेली प्रतिमा मराठी वाचकांना मोहवून गेली. अनेक वाचकांनी तिच्यावर स्त्रीवादी असा शिक्का मारला. ‘एकेक पान गळावया’ या तिच्या १९८० साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकातल्या पहिल्या कथेतल्या नायिकेचा मनू हा प्रियकर अमेरिकेला जातो आणि त्यामुळे तो अधिकाधिक दुरावत जातो. त्याला कथानायिकेनं लिहिलेली पत्रं म्हणजे, ‘कारावासातून पत्रे’ ही मूळ कथा.

‘पाऊल वाजे’ या संग्रहातल्या शेवटच्या, आणि कॉर्पोरेट कल्चरच्या बाहेरच्या एकमेव कथेत, कारावासातून लिहिलेल्या या पत्रांना मनूनं दिलेली उत्तरं आहेत. ही उत्तरं समीक्षात्मक पातळीवरची नसून कथेच्याच माध्यमातून दिलेली साहित्यिक पातळीवरची आहेत. या उत्तरांचं स्वरूप, वैचारिक वाद, प्रेमिकांची भांडणं, एकमेकांवर कुरघोडी करण्याची प्रवृत्ती आणि या सर्वांतून त्यांच्या प्रेमाला लागलेल्या ओहोटीची जाणीव, अशा प्रकारचं आहे.

आपल्या देशात ‘ग्लोबल वर्क कल्चर’च्या प्रवेशाला गेल्या शतकाच्या शेवटी सुरुवात झाली आणि बघता बघता आधुनिक उद्योग-व्यवसायातल्या लोकांचं आयुष्य ऑफिसच्या कामाभोवतीच आखलं गेलं. जागेपणीचा जास्तीत जास्त काळ ऑफिसमध्ये घालवणाऱ्या पिढीच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नं यावर ऑफिसमधलं राजकारण, ताणतणाव आणि जबाबदाऱ्या, या सगळ्याचा परिणाम होणं स्वाभाविक होतं. ऑफिसचे नियम आणि सहकाऱ्यांची सत्तास्पर्धा, यातून त्यांच्या आयुष्यातल्या वैयक्तिक नातेसंबंधांना वेगळे संदर्भ प्राप्त झाले. शहरी जीवनावरच्या, त्यातूनही कॉर्पोरेट जगातल्या या कथांमधल्या पात्रांचे प्रश्न हे भाषा आणि प्रांतापलीकडचे आहेत.

गोविलकर यांच्या या पहिल्याच कथासंग्रहातल्या कथा आंतरराष्ट्रीय कंपन्यांची व्यावसायिक नीतीमत्ता आणि स्पर्धेच्या जगातला वेग यांच्याशी जुळवून घेण्याचा, तसेच नशिबाला दोष न देता आपला मार्ग स्वतः शोधायचा प्रयत्न करणाऱ्या आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4395

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......