छापण्याजोग्या गोष्टी, लिहिण्याजोग्या आणि वाचण्याजोग्याही
ग्रंथनामा - आगामी
विजय तेंडुलकर
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस’, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाला प्रख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांनी लिहिलेली प्रस्तावना...

.............................................................................................................................................

कधी कधी लिहिण्या-वाचण्याचाच थकवा येतो. काही करू नये असे वाटते. अशा अवस्थेत सुनील कर्णिकांचे हे लेखन माझ्या बाजूला पडून होते.

ते माझ्या बाजूला होते कारण काही दिवसांपूर्वी कर्णिकांनी ते माझ्याकडे आणून टाकले होते. ते वाचून बरे वाटले तर मी त्याला प्रस्तावना लिहावी अशी त्यांची इच्छा होती. त्याच्या प्रशस्तीपर ते काहीही बोलले नव्हते.

बाड ठेवले आणि इतर गोष्टी करून ते निघून गेले.

लेखन त्यांचे नसते तर मी ठेवून घेतले नसते. माझ्याकडून वाचून होण्याची शक्यताच नव्हती. मध्येच कधी तरी एक क्षण आला. काय वाटले कुणास ठाऊक - खरे तर काहीच न वाटता असावे — मी कर्णिकांचे लेखन हाती घेतले.

कर्णिकांची माझी ओळख जुनी. पुरातन काळी ‘जाहीरनामा’ नावाचा एक दिवाळी अंक माझ्या संपादनाखाली निघाला होता. त्याचे बाळंतपण करण्याचे काम कर्णिकांनी केले होते.

हे काम त्यांनी इतक्या अबोलपणे, मनापासून आणि साहित्याच्या गंभीर समजुतीने केले की, एरवी हाताखालच्या माणसांबद्दल असंतुष्ट रहाणारा मी त्या पहिल्या आणि शेवटच्या अंकानंतर कर्णिकांनी मला, काही काम नसता भेटत रहावे असे मानत राहिलो.

याला त्यांचे संपादकीय गुण कारण नव्हते. व्यक्ती म्हणून त्यांच्यात असे काही होते की - उदाहरणार्थ त्यांचा सर्व व्यवहारातला समोरच्या माणसाला आश्वासक काटणारा संथपणा (जो श्री. पु. भागवत यांच्याकडून ते शिकले असे ते या पुस्तकात त्यांच्याविषयी लिहिताना सांगतात) आणि आयुष्याकडे बघण्याची समजूत (ही केवळ त्यांची स्वत:चीच)- ज्यामुळे मला ते अधूनमधून अकारण भेटावेत असे माझ्या कळत नकळत वाटू लागले होते.

तसे झाले नाही कारण एक तर हातावर पोट म्हणतात तसे कामाचे आयुष्य जगणाऱ्या कर्णिकांमागे त्यांचे व्याप होते आणि कदाचित असेही असेल की, कर्णिकांची प्रेमाची आणि विसाव्याची स्थाने वेगळी होती. या पुस्तकात ही स्थाने कोणती ते आले आहे.

कर्णिकांनी लिहिण्यासाठी निवडलेली माणसे बव्हंशी का, जवळ जवळ सर्वच, पुस्तकांच्या आणि छपाईच्या क्षेत्राशी अशी ना तशी संबंधित आहेत. कर्णिकांचे कर्ते जीवनच या क्षेत्राशी अनेक नात्यांनी निगडित राहिले आहे. स्वत:विषयी ते लिहितात : ‘मी गेली पंचवीस वर्षं साहित्याच्या क्षेत्रात छोटी छोटी कामं करतोय. कधी ग्रंथसेवक तर कधी मुद्रितशोधक, कधी पुस्तक-विक्रेता तर कधी वृत्तपत्र-प्रतिनिधी, कधी संपादक तर कधी प्रकाशक! एखाद्या वेळी अलिबागच्या छापखान्यात मुक्कामाला रहावं, तर मध्येच कधीतरी ताजमहाल हॉटेलच्या हाऊस जर्नलच्या कचेरीत आपल्या मराठमोळ्या इंग्रजीचे अद्भुत प्रयोग करावेत. कधी जुन्या-नव्या पुस्तकांच्या दुकानात नाना तऱ्हेची मासिकं-पुस्तकं धुंडाळत रहावं, तर कधी सभा-संमेलनांना हजेरी लावावी. कधी कविता लिहाव्या, परीक्षणं खरडावीत, मुलाखती घ्याव्या, तर कधी मोठ्या साहित्यिकांच्या संगतीत राहावं. कधी एखाद्या प्रकाशकाच्या बरोबरीने त्याच्या पुस्तकांचे गठ्ठे खांद्यावर घेऊन सांगली-सातारा-मिरज-कोल्हापूर-बेळगाव-सोलापूर असा दौरा करावा. वर्ष-सहा महिन्यांनी धंदा बदलला की नव्या जगाचं दर्शन...’

साहित्याचे - त्यातही मराठी साहित्याचे - एकूण जग तसे मर्यादित असले तरी कर्णिकांचे आयुष्य या मर्यादित जगात हे असे नित्य नवे होत राहिले. या नित्य नव्या निमित्तांनी समोर आलेली लहान-मोठी, खरीखोटी माणसे कर्णिकांनी त्यांच्या लहानसहान सवयींसकट एखाद्या टिपकागदासारखी शोषून घेतली. खालमानेने आपले काम करताना कर्णिकांचा एक डोळा जणू समोरच्या माणसावर रोखलेला होता आणि याचा पत्ता त्या माणसाला नव्हता.

असा डोळा अनेकांना असतो. कर्णिकांचे कैशिष्ट्य हे की त्यांचा हा डोळा उणे बघतो तसे अधिकही तितक्याच साक्षेपाने टिपतो. वर हे सर्व कोणताही कंजूषपणा न करता (जो अनेकांकडे असतो) या लेखनात आपल्याला सांगतात. या लेखनाचे मोठे बळ कोणते असे विचारले तर मी हेच सांगेन. समोरचे बरे-वाईट एकूण एक साक्षेपाने टिपणारी आणि तरी ऋजू, निर्मळ, शिशु साहित्यप्रेमाने भारलेली, पानापानात जाणवणारी निकोप जीवनदृष्टी हे त्याचे बळ आहे.

या लेखनात केवळ साहित्यिक नाहीत. साहित्य-व्यवहाराशी अशी ना तशी संबंधित अशी अनेक छोटीमोठी माणसे इथे कर्णिक आपल्याला भेटवतात. यात श्री. पु. भागवत आणि राम पटवर्धन यांच्यासारखे संपादन क्षेत्रातले आणि वि. पु. भागवतांसारखे मुद्रण-क्षेत्रात एक कालखंड गाजवणारे बुजुर्ग आहेत, तसे फार कुणाला माहीत नसलेले, अनेक वर्षे मुद्रित तपासनीचा व्यवहार मानेवर खडा ठेकून एका निष्ठेने करून साहित्याची प्रदीर्घ सेवा निरलसपणे बजावीत असलेले मनोहर बोर्डेकर आहेत. ‘ललित’ मासिकाच्या कचेरीतल्या मधू नावाच्या कारकुनाचे एक स्वतंत्र शब्दचित्र कर्णिकांच्या या पुस्तकात आहे. या पुस्तकात कवितेतून आग ओकणारे नामदेव ढसाळ आहेत, शब्द न् शब्द साखरेत घोळून बोलणारे आणि लिहिणारे वामन देशपांडे आहेत, स्वत:ला दलित मानणारे आणि लोकांनीही तसे मानावे असे मानणारे सुर्वे आहेत, आपण जसे आहोत तसेच दिसू मागणारे भाऊ पाध्ये आहेत, कवितेच्या आणि दारूच्या नशेत अखंडितपणे जगलेले कवी मनोहर ओक आहेत आणि साहित्याचे संकुचित जग टाकून आदिवासींच्या लढ्यात स्वत:ला झोकून दिलेले तुलसी परबही आहेत. कर्णिकांच्या आयुष्यात त्यांना हे भेटले एवढेच यांच्यातले साम्य.

कर्णिक या सर्वांना एका अंतरावरून अभ्यासतात, तसे त्यांच्या पोटात प्रसंगाप्रसंगाने शिरून आतल्या गोष्टीही नीट पाहून घेतात. या लेखनात त्या मांडताना ते ज्या सहजपणे यातले उणे-अधिक सर्वच सांगतात. तो सहजपणा फार महत्त्वाचा आहे. त्यामागे माणसाविषयीची आणि त्यांच्या व्यवहारांविषयीची एक स्वच्छ जाण आहे. चांगल्या-वाईटाविषयी न्यायनिवाडा करून वाईट ते लपवण्याची किंवा ते हलकेच सुचवून पुढे सटकण्याची नैतिक घाई इथे मुळीच नाही आणि या गोष्टींना अवास्तव महत्त्वही दिलेले नाही. जगण्याची व्यापक समजूत असलेले, नीतिअनीतीच्या आग्रहापलीकडे गेलेले मनच इतक्या मोकळेपणे, प्रेमाने तरी तटस्थपणे, परिचित-क्कचित् अतिपरिचित किंवा प्रसंगी त्रासदायक - माणसांविषयी लिहू शकते.

कर्णिकांना नैतिकतेची बाधा नसली तरी मते आहेत. क्कचित् व्यक्तीविषयक पूर्वग्रहदेखील आहेत आणि हे ते आपल्यापासून लपवून ठेवीत नाहीत. या पूर्वग्रहांची कारणेही तेच देतात. ओघाने हे सर्व त्यांच्या या पुस्तकातल्या व्यक्तीविषयक लेखनात येते. मते आणि पूर्वग्रह ठेवून हे लेखन ती व्यक्ती आपल्यापर्यंत अव्वल स्करूपात, तिचे बरे-वाईट स्वभाव-विशेष दाखवीत, पोचवते. सुर्वे, गोविंद तळवलकर यांच्या या पुस्तकातल्या आठवणी टीकात्मक आहेत, पण त्यात विखार नाही. केवळ वर्णन आहे.

श्री. पु. भागवत यांच्या कौटुंबिक जीवनाविषयीचा एक भाग या पुस्तकात ‘मौजेचे दिवस’ या प्रकरणात आला आहे. कर्णिकांनी हे जीवन मौज प्रकाशनाचे काम पहात असता स्वभावगत लक्षपूर्वकतेने पाहिले. त्यांच्या मनात ते ठसून गेले. ज्या नाजूक हाताने आणि हळुवारपणे कर्णिक ते या पुस्तकात लिहितात, तो हात मुद्रित तपासनीसाचा किंवा पुस्तके खांद्याकरून वहाणाराचा किंवा पत्रकाराचा वाटत नाही, तो कलावंताचा वाटतो. हे या पुस्तकातले संबंध प्रकरणच नाजूक हाताने आणि प्रचंड समजुतीने लिहिलेले आहे. मी तर म्हणेन की मराठी साहित्य प्रांतांत मौज परिवाराविषयी इतके चांगले (म्हणजे स्तुतीपर नव्हे) आजवर अन्य कुणी लिहिले नसेल.

आपण इतरांविषयी शेरेबाजी केली तर स्वत:ला का वगळले असे वाटून की काय, कर्णिकांनी या पुस्तकाचे अखेरचे प्रकरण स्वत:विषयी लिहिले आहे (माझी गंमत). आपल्याला पानापानावर भेटणारे मोकळेढाकळे, क्कचित् मिष्किल आणि बघता बघता सरळ चेहऱ्याने एखाद्या प्रतिष्ठिताची चड्डी सोडणारे कर्णिक या अखेरच्या पानांत मात्र भरपूर अवघडलेले वाटतात. या पुस्तकातला भिडस्त भाग हा एवढाच. वास्तविक इतरांविषयी बोलणारा नकळत स्वत:विषयीही सांगत असतोच किंवा असे म्हणू की इतरांविषयी बोलताना तो स्वत:लाही दाखवीत असतो. या पुस्तकात कर्णिक असे भरपूर आले आहेत आणि ज्यांना ते बघण्याची इच्छा असेल त्यांना ते पानोपानी दिसतील. तरीही कर्णिकांना स्वत:ला आपल्या लेखनाचा किंवा तपासणीचा विषय या लेखनाअखेरी का करावासे वाटावे याचे उत्तर एकच असू शकते : इतरांविषयी लिहिण्याचा आणि त्यांना ओघाने ‘जज्ज’ करण्याचा अधिकार आपला नाही असे त्यांना मनातून वाटत असले पाहिजे. हे लेखन करून आपण थोडे अधिकच धाष्टर्य दाखवीत आहोत अशीही शंका त्यांना असावी. या पुस्तकाचे त्यांनी ठेवलेले नाव या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ शीर्षकाखाली ते टीप जोडतात - ‘न लिहिण्याजोग्या, न वाचण्याजोग्या.’

तरीही या गोष्टी ते प्रसिद्ध करीत आहेत हेही अर्थपूर्ण आहे. लेखक साशंक असला तरी त्यांच्यातला संपादक त्यांना या पुस्तकाच्या वाचनीयतेची खात्री देत असावा.

या लेखनाला घाट नाही. ही आत्मकथा नाही तशी ती रूढार्थाने व्यक्तिचित्रेही नाहीत. मुक्त आठवणींच्या स्वरूपात ते झाले आहे. आठवणी जशा संमिश्र आणि एकमेकीवर चढलेल्या, एकमेकीत गुंतलेल्या असतात तसे ते आहे. व्यक्तीवरून व्यक्तीकडे ते जात रहाते. एका घटनेतून दुसरी घटना निघते. विषयावरून विषयाकडे कर्णिकांची लेखणी उड्या घेते. असे कोणताही निश्चित घाट नसलेले, चौवाटा दाखणारे लेखन आरंभी त्याच्या अनौपचारिक स्वरूपामुळे बरे वाटले तरी पुढे बहुधा चऱ्हाटवजा आणि कंटाळवाणे होते. या पुस्तकातले लेखन वाचून कधी संपले ते मला कळले नाही.

वास्तविक या लेखनात आलेली माणसे, त्यांचे जग मला अपरिचित नव्हते. इतकेच नव्हे तर त्यातले काही अतिपरिचयाचे होते. तरीही या लेखनाने मला रमवले, काही नवे दिले, विचाराला प्रवृत्त केले, हे त्याचे यश म्हटले पाहिजे.

कर्णिक चांगले संपादक आहेत हे माहीत होते. पण ते चांगले लेखक आहेत हे आता कळले.

.............................................................................................................................................

न छापण्याजोग्या गोष्टी - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - २२० रुपये. 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4349

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......