डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसाव्या शतकातील मी
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
हेमंत शेट्ये
  • ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sun , 02 April 2017
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक Dr. Babasaheb Amberdkar aani Yakvisave shatak गिरीश जाखोटिया Girish Jakhotiya

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर विपुल लेखन झाले आहे. त्यांच्या लेखनावर संशोधनही झाले आहे आणि होत राहिल. त्यातील काही लेखन त्यांच्या व्यक्तित्वावर आहे, तर काही त्यांच्या लिखाणावर आहे. बाबासाहेबांवर आणि त्यांच्या लिखाणावर काही लिहायचे झाल्यास त्यांचे लिखाण आणि चिंतनाचे विषय समजून घेणे आवश्यक आहे. त्यांची कळकळ, तळमळ आणि प्रयत्न समजून घेणे आवश्यक आहे. डॉ. गिरीश जाखोटिया यांनी ‘बाबासाहेब आणि एकविसावे शतक’ या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात बाबासाहेबांचे विचार एकविसाव्या शतकाशी कसे संबंधित आहेत किंवा लागू पडतील, असे प्रथमदर्शनी वाटते. एकंदरीत ते पुस्तक वैचारिकतेशी संबंधित असावे असे वाटते. 

बाबासाहेबांच्या लेखनाचे आणि त्यांच्यावरील अन्य लेखनाचे तीस वर्षे केलेले वाचन तसेच व्याख्याने यांच्या परिपाकातून हे पुस्तक आले असल्याचा लेखकाचा दावा आहे. या पुस्तकाचे एकूण पाच भाग आहेत. त्यात पहिल्या भागात धम्म, धर्म आणि वैश्विक धर्म; दुसऱ्या भागात डॉ. आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि २१वे शतक; तिसऱ्या भागात इस्लाम, धम्म आणि डॉ. आंबेडकर, चौथ्या भागात डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व आणि व्यक्तित्व, तर पाचव्या भागात उद्योजकता, धम्म आणि डॉ. आंबेडकर असे विषय हाताळले आहेत, पण अनेक ठिकाणी संकल्पना आणि त्यांची मांडणी यांत विरोधाभास दिसून येतो. उदा. पहिल्या प्रकरणातील शीर्षकात असलेला वैश्विक धर्म कोणता, हे अखेरपर्यंत स्पष्ट शब्दांमध्ये कोठेही सांगितलेले नाही. प्रकरणांची मांडणी गोंधळात टाकणारी वाटते. त्यात तर्कसंगती शोधावी लागते.

पुस्तकाच्या शीर्षकात एक अदृश्य मी आहे. तो पुस्तक वाचताना वारंवार जाणवतो. तो इतका आहे की, पुस्तकाचे नाव 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसाव्या शतकातील मी' असे वाटावे. वैचारिक लेखन हे तटस्थपणे केलेले असावे, ही किमान अपेक्षा या पुस्तकात कुठेही पाळलेली दिसत नाही. ‘इकॉलॉजी’ या शब्दाचे भाषांतर अर्थकारण असे केलेले पाहून वाचकांना केवळ गृहीतच धरले नाही तर पुस्तक कोणी वाचत नाही असा लेखकाचा समज असावा असे वाटते. अशा विषयावरील पुस्तक पुरेशा गांभीर्याने लिहिलेले असावे, अशी अपेक्षा असते; गांभीर्याच्या अविर्भावाने नव्हे. 

संपूर्ण पुस्तकात बाबासाहेब आणि आजचे सामाजिक प्रश्न, आजच्या संकल्पना, आजच्या विचारांचा आढावा आजच्या व्यवस्थापन शाखाआधारे मांडण्याचा प्रयत्न जाणवतो. मात्र त्यासाठी प्रसंगी संदर्भ म्हणून जी उदाहरणे दिली आहेत, ती वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांची!  त्यामुळे पुस्तकात बाबासाहेब कमी आणि लेखक जास्त दिसू लागतो. हे म्हणजे हत्तीला माणसाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे, सिद्धान्ताला वैयक्तिक मतांनी भिडण्यासारखे आहे. वैचारिक लेखांनाही संशोधनपर लेखनासारखी तर्काधारित मांडणी आणि शिस्त अपेक्षित असते. तसेच विषयातील तात्त्विक मीमांसा समान वैश्विक बदलांवर आणि मूल्यांवर तपासून घ्यावी लागते. त्यामुळे वाचकाला विषयासोबत संवाद साधता येतो. संदर्भ तपासून घेता येतात. नव्या शक्यता अजमावता येतात. वाचनक्षमतेच्या कक्षा रुंदावता येतात. 

पुस्तकात विधानांच्या पुष्ट्यर्थ लेखकाने स्वतःच्याच कविता दिल्या आहेत. ‘डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व आणि व्यक्तित्व’ या प्रकरणात तर तीन कविता दिल्या आहेत. त्यातील एकाही कवितेचा संबंध प्रकरणाशी वा विभागाशी दुरान्वयेही येत नाही. त्यात काव्य कमी आणि शब्दकमानी जास्त आहेत. त्या अप्रस्तुत आहेत. एका कविता तर विंदा करंदीकरांच्या 'माझ्या मना बन दगड' या सुप्रसिद्ध कवितेतील शब्द बदलून रचली आहे...

भावुक मना बन दगड,

हाण रगड, बन दगड,

टण टणाटण गुद्दे लाव

ढोंग्यांवरती घाल घाव

वापर शिवाचा गनिमी कावा

भावुक बना दगड

हे सारे हास्यास्पद वाटते!

बाबासाहेब म्हणजे युगायुगातील अन्यायाच्या अंधाराला प्रज्ञेने भिडणारा महानायक. एकविसाव्या शतकाच्या काळाच्या परिमाणात त्यांना जोखताना आजच्या माहिती युगात होणारे शोषण आणि मानवी मूल्यांचे अध:पतन, अध्यापन आणि अध्ययन क्षेत्रातील खालवत चाललेला दर्जा, संशोधन क्षेत्रातील पीछेहाट, माणसांची बनत चाललेली यंत्रे, आरक्षणाच्या भूमिकेचा विपर्यास, हरवत चाललेले राजकीय तत्त्वज्ञान आणि सामाजिक भान, तंत्रज्ञानाच्या वेगामागून आर्थिक असमानतेच्या अंतर्गत होणारी नवी पिळवणूक, बीपीओ (BPO),मॉल्स आणि सेवा उद्योगातून उगम पावणारी नवी वर्णव्यवस्था आणि नव्या जातींचा संघर्ष अशा संदर्भात काही वाचावयास मिळेल अशी अपेक्षा होती.

या अनुषंगाने डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या विचारसरणीतून काही उपयुक्त अशी काही चिंतनशील तत्त्वे हाती लागतील ही अपेक्षा होती. आंबेडकरांनी वापरलेली साधने ही तर्क आणि अभ्यासाधारित होती. तोच धागा धरून या शतकातील सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समानतेतील अन्यायाला कशा रीतीने सामोरे जाता येईल याची चिकित्सा त्यांच्या विचारांशी सांगड घालून केली असती, तर या पुस्तकाचे उद्दिष्ट साध्य झाले असते, पण या बाबतीत वाचकाची पूर्ण निराशा होते. 'पुस्तक वाचून हाती काय लागले?' या विचारात वाचक सापडतो.

--------------------------------------------------------------------------------------------------------------

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि २१वे शतक - डॉ. गिरीश जाखोटिया

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे,

पाने- २०७, मूल्य - २५० रुपये.

---------------------------------------------------------------------------------------------------------------

लेखक मुंबईमध्ये ग्रंथपाल आहेत.

hemant24th@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात

सुनील साळुंके यांच्या कथाबीजाचं कोडं उलगडत जातं तेव्हा लक्षात येत, ही कथा मूळ परंपरेत बसत नाही. श्रद्धांना कवटाळत बसत नाही. कथालेखकाच्या स्वभावातच ती बसत नाही. तत्त्वज्ञानाच्या आहारी न जाता भावनेच्या हिंदोळ्यावर अक्षरलव्हाळीची अक्षरं हिंदकळत राहतात. तिथं अनेक प्रश्नांची उकल होऊन मन स्तिमित होते. कथालेखनात विलक्षण व्यवहार असणं हे उत्तम कथाकाराचं लक्षण असतं ते कथानकातून अनेकदा जाणवतं.......

खालिद जावेद यांच्या कथांतली भाषा अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो…

जावेद यांच्या कथालेखनाचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत कमी शब्दांत घडणाऱ्या घटनांच्या अवतीभवती असणाऱ्या पर्यावरणाचं दृश्यात्मक असं वर्णन करणं. त्या वर्णनांत काही वेळा आलेल्या प्रतिमांच्या लडी या पात्रांच्या मनःस्थितीला पूरक ठरणाऱ्या अशा आहेत. त्यांतली भाषा ही अचानक सपाट वर्णनाला भेदून काव्यात्मकतेच्या पायऱ्या चढून जाते, हे जाणवून वाचक स्तिमित होतो. त्यांच्या कल्पनाशक्तीने अवाक होतो.......

पुस्तकं येत गेली, तसे उत्तरोत्तर आधी घर आणि मग मनही पुस्तकांनी भरून गेले. असंख्य विश्वात एकाच वेळी नांदण्याचा अद्भुत म्हणावा असा आनंदमयी अनुभव दिला त्यांनी…

या पुस्तकाचे प्रास्ताविक असावे, तसा ‘मैत्री पुस्तकांशी’ या लेखाला अशा व्यक्तिगत वाचनानुभवांचा पाया आहे. ‘रचेल तोच वाचेल’ या शेवटी उपसंहारासारख्या लेखातही नव्या काही पुस्तकांवर लिहिण्याचा मोह आवरलेला नाहीच पण त्यापलीकडे समकालीन वाचनविश्वातल्या वेगवेगळ्या वळणांचा, त्यांनी गंभीर लिहिणाऱ्यांसमोर निर्माण केलेल्या आव्हानांचा, एकूणच या वादळी संपूर्ण अनिश्चित काळात वाचनाच्या माणसाच्या आयुष्यातल्या भवितव्याच.......

‘प्रतिक्षमता’ ही एक गुंतागुंतीची व्यवस्था असून ती माणूस जिवंत राहण्यासाठी आवश्यक असते. त्या आपल्या शरीरातील ‘प्रतिक्षमता’ची माहिती देणारे पुस्तक

आजार आणि रोगांचे कारण आणि प्रतिक्षमता समजण्यासाठी, समजून घेण्यासाठी, माणूस हजारो वर्षे उत्सुक होता. त्या वेळी आजार काही अतिमानवी कारणाने होतात अशी समजूत होती. आजार म्हणजे देवाने दिलेली शिक्षा वा आपल्या कर्माने दिलेले फळ असे त्याला वाटे. ग्रीक काळात वैद्यकशास्त्राचा जनक मानल्या जाणाऱ्या हिप्पोक्रिटसचे असे म्हणणे होते की, शरीरातील रक्त, कफ, पिवळे पित्त आणि काळे पित्त यांच्यातील संतुलन बिघडल्याने आजार होतो.......

‘संघर्षगाथा : बहुजन विद्यार्थिनींचा जीवनप्रवास’ - परिस्थितीशी दोन हात करून स्वतःचं ‘विश्व’ निर्माण करणाऱ्या बहुजन विद्यार्थिनींच्या जीवनसंघर्षाच्या यशोगाथा

शिक्षकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या वर्गात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्या परिस्थितीतून येतात हे कळावं म्हणून. कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या घरातील मुलींना कोणकोणत्या घुसमटींतून, मानसिक संघर्षांतून जावं लागतं, हे कळावं म्हणून. युवकांनी हे पुस्तक वाचायला हवं, आपल्या सभोतालची परिस्थिती जरी बिकट, संघर्षमय असली तरी आपणास त्यावर मात करता येते, हे कळावं म्हणून.......

‘हार्ट लॅम्प’ : हा फक्त कथासंग्रह नाही; तो एक संवाद आहे. तो आपल्याला आपला समाज किती प्रकाशमान आहे आणि किती अंधार अजून उरला आहे, याचा विचार करायला लावतो

बानू मुश्ताक यांच्या कथा आपल्याला या समाजातील दुटप्पीपणाची जाणीव करून देतात. त्या सांगतात की, खरी सुरक्षितता म्हणजे गप्प राहणं नाही, तर बोलण्याचं धैर्य मिळवणं आहे. ते मिळवण्यासाठी स्त्रीला स्वतःच्या कहाणीचं लेखन स्वतः करावं लागतं. ‘हार्ट लॅम्प’ म्हणजे एका समाजाचा, एका धर्माचा किंवा एका स्त्रीचा प्रवास नाही. ती प्रत्येक स्त्रीची कहाणी आहे, जी स्वतःच्या आयुष्यातल्या अंधारात एक छोटा दिवा लावते.......

‘द सीईओ माइण्डसेट’ : वीस वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असलेल्या एका अनुभवसंपन्न आणि बहुअंगी अनुभवांचा अर्क असलेलं पुस्तक… ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त...

क्वचित एखाद्या प्रकरणातली आत्मश्लाघ्यता टाळता आली असती, तर अधिक छान झाले असते. मात्र २० वर्षांपासून अधिक काळ ‘सीईओ’ असल्याच्या संपन्न आणि बहुअंगी अनुभवाचा या पुस्तकात अर्क आहे. तो शिव यांनी अगदी ‘टेक अवे पॉइंटर्स’च्या स्वरूपामध्ये दिला आहे. काही चांगले, तर काही कटू अनुभव त्यांनी मोकळेपणाने मांडले आहेत. ‘सीईओ’ असणाऱ्यांसाठी आणि होऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.......