पोटतिडकीनं काम करणाऱ्या शिक्षकांचं काम आणि चांगले चाललेले विभाग धुडगूस घालून बंद पाडण्याचा उन्माद आणि कर्मदरिद्रीपणा कृपा करून करू नका
पडघम - सांस्कृतिक
मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर
  • ललित कला केद्राचे विभाप्रमुख प्रा. प्रवीण भोळे, त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि पुणे विद्यापीठाची मुख्य इमारत
  • Thu , 08 February 2024
  • पडघम सांस्कृतिक ललित कला केंद्र Lalit Kala Kendra प्रवीण भोळे Pravin Bhole पुणे विद्यापीठ Pune University राम Ram रामायण Ramayana

ज्या नाटकावरून एवढा गदारोळ, मोड-तोडफोड, भावनाप्रचोदन, पुणे विद्यापीठावर आणि विशेषतः ‘ललित कला केंद्रा’वर चिखलफेक वगैरे सध्या जे घडतंय, त्या पार्श्वभूमीवर त्या नाटकात नेमकं काय होतं, काय घडलं असेल, आणि या घटनेचे वेगवेगळे आयाम समजून घेतले गेले पाहिजेत. या लेखातलं विश्लेषण आणि मांडलेली मतं लेखकाची वैयक्तिक आहेत; त्यांचा पुणे विद्यापीठ आणि तिथला त्याचा विभाग यांच्याशी संबंध नाही. सहकाऱ्यांशी आणि मित्रमंडळींशी (सगळ्या पाती : आंबेडकरवादी, हिंदुत्ववादी, समाजवादी, उदारमतवादी) झालेल्या चर्चामुळे स्पष्टता यायला मदत झाली, मुद्देही मिळाले; त्या सर्वांना धन्यवाद.

डाव्यांचं कारस्थान?

डाव्यांचं कारस्थान वगैरे जे पसरवलं जातंय, त्यात सुतराम तथ्य नाही. कारण असं की, पुणे विद्यापीठातली प्राध्यापक मंडळी (लेखकासकट) बहुशः आपापल्या विषयांशी आणि विद्येशी ईमान राखून, आपापल्या वकुबाप्रमाणे, प्रामाणिकपणे, विद्यार्थिहित समोर ठेवून काम करणारी आणि समाजाबद्दल संवेदनशीलता बाळगणारी असली, तरी इतर बाबतीत मध्यममार्गी आणि स्वतःला सांभाळून राहणारीच आहेत. झुंडीचा भाग नसलेली अशी मंडळी सहसा टोकाला जात नाहीत.

दुसरीकडे डावे म्हणजे कोण हाही प्रश्नच आहे. डावं याचा कुठलाही अर्थ घेतला, तरी त्या विचाराच्या लोकांच्या देशप्रेमात खोट आहे (आणि याचा उजवीकडचा उलट पक्ष राष्ट्र वगैरे ‘आम्हालाच काय ते कळतं’) असा जो समज पसरलेला दिसतो, तोही अपप्रचारातून झालेला गैरसमज आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ११व्या दिवशी ललित कला केंद्रात हे घडलं, म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला डाव्यांचा खोडसाळपणा आहे, हा व्यापक कट आहे, पुणे विद्यापीठ हा डावे आणि नक्षलवादी यांचा अड्डा बनलाय, अशा प्रकारचा अपप्रचार सोशल मीडियावर सर्रास आणि क्वचित् जाहीरपणे केला जात आहे. या अपप्रचारात काडीचंडी तथ्य नाही. याचं एक कारण वर सांगितलं आहे.

दुसरं कारण असं की, अयोध्येतील पारंपरिक पद्धतीनं नृत्यरूपात रामकथा सांगणाऱ्या ‘कथक’ प्रकारचा आविष्कार पिढ्यान् पिढ्या करणारे अयोध्या शरण मिश्रा यांची विशेष प्रस्तुती २२ जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेचं औचित्य साधून ललित कला केंद्रात झाली.

एवढंच नव्हे, १८४३ साली विष्णुदास भावे यांनी लिहिलेल्या ‘सीतास्वयंवर’ या मराठी आद्य नाटकाचं पुनरुजीवन प्रा. प्रवीण भोळे यांनी १९९९ साली ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन केलं होतं, आणि १९९९-२००० दरम्यान याचे सुमारे ३५ प्रयोगही केले होते. या प्रस्तुतीला आणि प्रा. भोळे यांच्या खटाटोपाला त्या काळी अनेक ज्येष्ठ रंगकर्मींनी मोठी दाद दिली होती.

या नाटकाचं असं पुनरुजीवन करून सादरीकरण करणारे प्रा. भोळे हे एकमेव रंगकर्मी आहेत. अशा अभ्यासू व्यक्तीला आज ‘मीडिया ट्रायल’मध्ये डावं, राष्ट्रद्रोही वगैरे ठरवलं जात आहे आणि अर्वाच्य भाषेत त्यांच्याबद्दल सोशल मीडियावर लिहिलं बोललं जात आहे, हा दैवदुर्विलास आहे.

ललित कला केंद्राचा विद्यार्थिवर्ग

ललित कला केंद्राच्या नाटकविषयक अभ्यासक्रमातल्या विद्यार्थ्यांच्या अंतर्गत परीक्षेचा / मूल्यांकनाचा भाग म्हणून हे नाटक (नाटक कसलं, स्किट) विद्यार्थ्यांनी लिहून विद्यार्थ्यांनी सादर करू घातलं होतं. हे विद्यार्थी अंडरग्रॅज्युएट म्हणजे १८-२१ वयोगटातले आहेत. विद्यापीठात बहुजन-अभिजन सर्व वर्गांमधून आणि महाराष्ट्राच्या सर्व भागांमधून विद्यार्थी येतात. या वयातल्या विद्यार्थ्यांची स्वाभाविक अपरिपक्वता, भाबडेपणा, बेफिकिरी, दिलदारी, उमदेपणा, बावळटपणा, अर्ध्या कच्च्या सामाजिक-राजकीय जाणिवा-समजा, आणि औचित्यविचार बाजूला ठेवून बेधडक गोष्टी करवू शकणारी या वयातली प्रचंड ऊर्जा-उत्साह हे सगळे आयाम समाजातला प्रौढ-समजदार-परिपक्व वर्ग, सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक संघटना, पत्रकार आणि प्रशासन-पोलीस यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या क्षमता, सामाजिक आर्थिक शैक्षणिक कौटुंबिक पार्श्वभूमी आणि ऊर्मी (मोटिवेशन) यांमध्ये जे कमी-जास्त समाजात सगळीकडेच दिसतं, तेच पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसवरही दिसतं.

नाटकाची संहिता

वादग्रस्त नाटकाची संहिता सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरते आहे असं ‘Forwarded many times’ या शीर्षकावरून दिसतं. नाटकात नाटक असा या संहितेचा फॉर्म दिसतो. नाटकातल्या नाटकात काम करणाऱ्या नटांमधला दोन प्रयोगांच्या मधला विंगेतला संवाद हा या नाटकाचा विषय आहे. दशावतारी, वग किंवा उत्तरेतल्या नौटंकीची प्रहसनात्मक लोकशैली अपेक्षित आहे, असं वाटतं. नाटकातल्या न घडलेल्या नाटकातली पात्रं रामायणातली असली, तरी संवाद त्या पात्रांच्या मानवी नटांमधले आहेत, दाखवलेल्या भावभावना आणि प्रसंग त्या मानवी नटमंडळींच्या आहेत.

संहितेचा शेवट कॉमिक आणि सकारात्मक वाटतो - म्हणजे राम या पात्राचा पळून जाऊ घातलेला नट परत येतो आणि रावणाच्या पात्राचा नट पळून जाऊ घातला आहे, असं सूचित करून ही संहिता संपते. हीच संहिता सादर केली गेली असती का, हे कळायला आता मार्ग नाही, कारण नाटक मुळात पूर्ण सादर करू दिलं गेलंच नाही.

औचित्याचा प्रश्न : नाटकाची संहिता

नाटक सादर करू दिलं गेलं असतं, तर ज्यांनी चार संवादांनंतरच तिथे राडा घातला त्यांच्याही कदाचित लक्षात आलं असतं की, नाटकात आक्षेपार्ह काही नव्हतं, आणि नंतर कॅटीनमध्ये चहा, वडापाव-मिरच्यांवर ताव मारताना तितकीच गरमागरम भांडण चर्चा होऊन दिलजमाई-मनोमीलन वगैरे होऊन हा विषय संपला असता.

चार-दोन ठिकाणी संहितेत शिव्या आल्या आहेत, हे खरं आहे. त्यांपेक्षाही असभ्य समजल्या जाणाऱ्या शिव्यांचा मुक्त वापर असलेले नाटक-सिनेमे-मालिका यांची कमतरता ना प्रायोगिक रंगभूमीवर / सिनेमात आहे, ना व्यावसायिक. या नाटकाच्या चौकटीत शिव्यांची गरज किंवा औचित्य काय, हा प्रश्न अभ्यासाचा भाग म्हणून नक्कीच विचारला जायला हवा. पण शिव्यांच्या वापराबद्दल तक्रार करणारे आणि तथाकथित संस्कृतिरक्षक तरी साधे सरळ आणि सदासौजन्यशील आहेत का, हा प्रश्न राहतो. मुद्दा हा आहे की, पहिला दगड त्यानं उचलावा ज्यानं कधीही कुठलंही पाप केलेलं नाही, जो निष्कलंक आहे.

दुसरा आक्षेप सीता आणि लक्ष्मण यांच्या पात्रांनी एकमेकांना मिठी मारली, आणि सीतेचा नट सिगरेट ओढताना दाखवला यावर घेतला जातो आहे. मिठी सीता आणि लक्ष्मण या पात्रांनी मारलेली नाही, त्या त्या पात्रांचे नट त्यांच्या त्यांच्या भूमिकांच्या बाहेर असताना हे घडलं, असं दाखवलं आहे. हेच सिगरेट आणि शिव्यांबद्दल. इथे शब्दच्छलाचा आरोप होऊ शकतो, पण संहिता काळजीपूर्वक वाचली, तर नाटक- अभिनयाबाहेरच्या वाचकालाही हे स्पष्ट दिसेल.

तिसरा आक्षेप / आरोप अश्लीलतेचा आहे. ‘लैंगिक संदर्भ आणि भाषा यांचा वापर’ या अर्थी अश्लीलता संहितेत कुठेही नाही. आणि अश्लीलतेचा आरोप करायचा झाला, तर निम्मे अधिक संस्कृत कवी आणि त्यांचा कुलगुरू कालिदास यांना थेट गजाआडच करावं लागेल. तेव्हा अश्लीलतेच्या आरोपात काहीच दम नाही.

व्हॉटसअ‍ॅप चर्चामधला आणखी एक सूर असा दिसला की, सर्जकता आणि बोल्डनेस सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करावं का? हा मुद्दा प्रायोगिक/व्यावसायिक रंगभूमी/सिनेमा आणि एकूणच कलाव्यवहाराच्या संदर्भात योग्यच आहे. इथल्या संदर्भात गरजेपेक्षा जास्त अर्थ काढून ‘पराचा कावळा’ करू नये, कारण मुळात अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वैराचार वगैरे चर्चेत न्यावी, या लायकीची ही संहिता नाही. तिचा तसा उद्देशही नाही आणि कुणाच्या धर्मभावना दुखावण्याचा हेतूही तीत दिसत नाही.

आक्षेप आणि आरोप बाजूला ठेवून स्वतंत्रपणे संहितेकडे बघितलं तर काय दिसतं? एक थोडंफार वाचन असलेला आणि चार नाटक-सिनेमे प्रेमानं बघितलेला वाचक प्रेक्षक - आणि गेली वीस वर्षं पुणे विद्यापीठात अनेक विद्यार्थी पाहिलेला एक शिक्षक - या भूमिकेतून मला ही संहिता सामान्य वाटली. हे त्या विद्यार्थ्यांवरचं ‘जजमेंट’ नाही आणि ललित कला केंद्रावरचं भाष्यविष्य तर अजिबात नाही. विद्यार्थी वाढीच्या एका टप्प्यावर आहेत, त्यांना अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. या प्रक्रियेत त्यांना प्रयोगांबरोबरच चुकाही करण्याची पूर्ण मुभा हवी. चुका झाल्या, तर त्यांना योग्य ती दिशा दाखवायला त्यांचे शिक्षक समर्थ आहेत.

मुलं आहेत, आपलीच मुलं आहेत, त्यांच्या हातून चुका जरी घडल्या तरी मारहाण, अर्वाच्य शिवीगाळ, मोडतोड (विशेषतः सार्वजनिक ठिकाणांची), पोलीस, कोर्टकचेऱ्या, कोठडी असलं काही, मागे लावून न देण्याची परिपक्वता (आणि थोडीशी तरी विनोदबुद्धी) सगळ्याच समाजानं दाखवावी, आणि अशा घटनांचं राजकीय भांडवल न करण्याचा समंजसपणा आणि उमदेपणा सर्व राजकारणी आणि त्यांचे पक्ष-संघटना यांनी दाखवावा, एवढी किमान अपेक्षा आहे. कुटुंब ही जशी मुलांसाठी धडपडत चुका करत शिकण्यासाठीची ‘सेफ स्पेस’ असते, तसंच कुठलंही विद्यापीठ ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक-मानसिक-सामाजिक वाढीसाठीची ‘सेफ स्पेस’च असली पाहिजे.

इथे हेही मी सांगू इच्छितो की, हे नाटक लिहिणारे आणि बसवणारे जर माझे विद्यार्थी असते आणि त्यांनी मला सल्ला विचारला असता, तर माझ्या आजच्या वयाच्या आणि अनुभवाच्या परिप्रेक्ष्यातून त्यांना मी आजूबाजूचं राजकारण आणि समाजभावना यांबद्दल संवेदनशील राहून विषय मांडणी, संदेश, शैली आणि सादरीकरण ठरवण्याचा स्पष्ट सल्ला दिला असता.

औचित्याचा प्रश्न : शुक्रवारचा राडा आणि शनिवारची तोडफोड

नाटकात टोकाचं आक्षेपार्ह काही होतं, असं जरी मानलं तरी कुठल्याही - विशेषतः सार्वजनिक मालमत्तेची नासधूस, मारहाण, शिवीगाळ समर्थनीय आहे का? तसं करणाऱ्यांना कुणाचीच जरब नसते, असंच सगळीकडे का दिसतं? यावर उपाय काय?

स्त्री आणि गुरू यांना देवतासमान मानणाऱ्या उदात्त हिंदूसंस्कृतीचे कैवारी म्हणवणारे रामभक्तच ललित कला केंद्राच्या एका विद्यार्थिनीचा खांदा-मान तुडवून स्टेजवर घुसले, त्यांनी नटमंडळी आणि गुरुवर्य प्रा. प्रवीण भोळे यांना अर्वाच्य शिवीगाळ केली आणि तीही ललित कला केंद्रासारख्या आश्रमतुल्य विभागात राडा घालून, ही ‘आयरनी’ कोणी लक्षात घेतली आहे का?

मारहाणीत एका विद्यार्थ्यांचा हात मोडला आहे, एकाला ‘लिगामेंट इन्जुरी’ झाली आहे, अनेक विद्यार्थिनींना धक्काबुकीत लागलं आहे. इथं ‘गीतरामायणा’तल्या विश्वामित्राच्या ‘वेदीवर रक्त मांस / फेकतात ते नृशंस / नाचतात स्वैर सुखे मंत्र थांबता’ या ओळी आठवतात.

एवढंच नव्हे तर होस्टेलमध्ये ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांना ठरवून ‘टार्गेट’ केलं जातंय, म्हणून बहुतांश विद्यार्थी घरी गेले आहेत आणि केंद्राचं कामकाज ठप्प झालं आहे. या सगळ्याचं इतर विभागांच्या विद्यार्थ्यांवरही दडपण आलं आहे. ‘रामराज्या’त वाल्मीकी-वसिष्ठांच्या आश्रमात रामभक्तांनी असा हैदोस घातला असता, तर मर्यादापुरुषोत्तम श्रीरामानं आपल्या असल्या भक्तांचं काय केलं असतं? आपल्याच सांस्कृतिक मूल्यांना आपणच पायदळी तुडवत आहोत, हे भान राडाखोरांना आणि त्यांच्या पोशिंद्या संघटनांना आहे का? या मुजोरीला आवरायची वेळ आली आहे.

विद्यापीठाची भूमिका?

एक संस्था म्हणून काय काय करू नये, याचा आदर्श वस्तुपाठच विद्यापीठानं या प्रकरणात घालून दिला आहे.

एक, शुक्रवार आणि शनिवार दोन्ही घटनांमध्ये विद्यापीठ सुरक्षा प्रमुखांची नेमकी काय भूमिका होती? शनिवारी तर पोलीस आणि सुरक्षा विभाग निवांत उभं राहून ललित कला केंद्राची तोडफोड बघत होता. असं का घडलं असेल?

दोन, परीक्षा हा विद्यापीठाच्या कामाचा अधिकृत भाग आहे. शुक्रवारची घटना परीक्षा होत असताना म्हणजे ऑन-ड्यूटी घडली. राडाखोरांविरुद्ध तक्रार नोंदवणं आणि अशा इतर अधिकृत कामांची जबाबदारी तांत्रिकदृष्ट्या विद्यापीठ प्रशासनावर आहे. हा प्रोटोकॉल पाळला गेला नाही, कारण प्रा. प्रवीण भोळे यांनाच ‘तुम्हीच जाऊन तक्रार नोंदवा’ असं तोंडी सांगण्यात आलं, आणि पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायचं नाकारलं.

दुसरीकडे कुणाच्या तरी तक्रारीवरून प्रा. भोळे आणि विद्यार्थी यांना परस्पर अटक करण्यात आली. म्हणजे चोराला सोडून संन्याशाला सुळी. अशी परस्पर अटक विद्यापीठाच्या संमतीशिवाय होऊ शकत नाही. विद्यापीठानं पोलिसांना तशी लेखी संमती अटक होण्याआधी दिली होती का? एका कमिटेड शिक्षकाची किंमत ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणवून घेणाऱ्या आमच्या कॉलरताठ विद्यापीठाच्या लेखी पायपुसण्याएवढीच आहे का?

अवघड परिस्थितीत विद्यापीठ आपल्याच कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहत नाही, त्यांची फिकीर करत नाही, हात झटकून मोकळं होतं असा समजायचं का? विद्यापीठ आपल्याच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत इतकं बेफिकीर आणि ढिसाळ राहणार असलं, तर कुठला विभागप्रमुख, प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचारी जबाबदारी घ्यायला तयार होईल? विद्यापीठाच्या या बेफिकिरीचा पुढच्या वर्षीचे प्रवेश आणि रॅकिंगवर परिणाम होणार आहे, हे वेगळं सांगायची गरज नसावी.

तीन, राजकीय आणि विद्यार्थी संघटनांमधून व्यवस्थापन परिषदेत गेलेल्या धुरीणांनी तरी शनिवारचा हल्ला थांबवण्यासाठी काही केलं का? ज्याचं व्यवस्थापन करतायत त्या विद्यापीठाशी किमान एवढी तरी बांधिलकी दाखवावी, ही अपेक्षा गैर आहे का?

चार, या प्रकरणात आणखी एक चरचरीत ‘आयरनी’ आहे. सीता निष्कलंक आणि निष्पाप असूनही जसं तिलाच अग्निदिव्य करून आपलं पातिव्रत्य सिद्ध करावं लागलं, तसाच प्रकार इथे प्रा. भोळे, विद्यार्थी आणि ललित कला केंद्राच्या बाबतीत घडत आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळावी, म्हणून कोण उभं राहिलं? प्रा. भोळे स्वतः, विद्यापीठ नव्हे. तक्रार नोंदवायला कुठलाही प्रोटोकॉल न पाळता कुणाला पाठवलं गेलं? प्रा. भोळे यांना. ही ‘मेडिको लीगल केस’ असताना विद्यापीठाकडून प्रशासकीय आणि लॉजिस्टिक सपोर्ट किती होता? एक मोठं शून्य. ‘कारणे दाखवा’ नोटीस कुणावर बजावली गेली आहे? प्रा. भोळ्यांवर. विद्यापीठ कुणासाठी आहे? तत्त्वतः विद्या आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी, विद्या, शिक्षण, संशोधन, विद्वत्ता आणि प्राध्यापक हा विद्यापीठाच्या लेखी ‘सायडिंग’ला टाकलेला डबा किंवा ऑप्शनला टाकलेला विषय आहे का? कोणास ठाऊक!

खरं तर प्रा. भोळे आणि अटक झालेले विद्यार्थी या सर्वांचा आत्ताच्या पोलीस प्रकरणाचा सर्व आर्थिक आणि प्रशासकीय भार विद्यापीठानं घ्यायला हवा. ललित कला केंद्राचे विद्यार्थी, विशेषतः त्या नाटकाशी संबद्ध, यांना शॉकमधून बाहेर येण्यासाठी काउन्सेलिंगची गरज असू शकते. त्याची व्यवस्था आणि खर्च करून विद्यापीठ काही संवेदनशीलता आणि माणुसकी दाखवेल का? शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सगळ्यांनाच तातडीनं आश्वस्त करणं गरजेचं आहे. कॅपसवरचं नासलेलं वातावरण निवळणं गरजेचं आहे, शैक्षणिक वातावरण पुन्हा मोकळं आणि कामकाज सुरळीत करणं गरजेचं आहे.

कुलगुरूही मोठ्या दडपणाखाली असावेत. तरीही त्यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी मोकळेपणानं बोलावं, पदाच्या आणि औपचारिकतेच्या बाहेर येऊन संवाद उभा करावा, कारण तेही आमच्यातलेच एक आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक आणि प्रामाणिक हात पुढे आला, तर सर्व कॅम्पस या प्रसंगात त्यांच्याबरोबर उभा राहील, अशी खात्री वाटते.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

शिक्षण, संघटना आणि राजकारणी

२००५मधला भांडारकर संस्थेवरचा हल्ला आणि आत्ताचा नाटकाच्या दुसऱ्या दिवशी झालेली ललित कला केंद्राची तोडफोड, यांमध्ये एक मोठं साम्य आहे. दोन्ही घटना निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या आहेत. आपाततः सुनियोजितही असाव्यात. आताही राजकीय भांडवल करणं चालू आहे का? त्यात कुणाचा कसा आणि काय फायदा आहे? ज्यानं त्यानं या प्रश्नांची उत्तरं शोधावीत.

मायबाप राजकारणी आणि विद्यार्थी संघटना वगैरे यांना हात जोडून एवढीच नम्र विनंती आहे की, राष्ट्राची पुढची पिढी घडवायचं वगैरे काम आम्ही शिक्षक मंडळी आपापल्या वकुबानुसार पण प्रामाणिकपणानं आणि ‘दीक्षित तो नित्य क्षमी’ (‘गीतरामायण’) या ‘कमिटमेंट’नं करत आहोत; शाळा-कॉलेज-विद्यापीठ-शिक्षण-विद्यार्थी यांना तुमच्या राजकारणातली ‘सोयीस्कर प्यादी’ आणि तात्कालिक राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या ‘चुलीतली लाकडं’ म्हणून वापरू नका. तुमचं सत्तेसाठीचं वगैरे राजकारण शिक्षणाच्या बाहेरच ठेवा.

शिक्षणसंबद्ध खरे प्रश्न मुळातून समजून घेऊन त्यावर खरे उपाय शोधण्यात खरा रस असला तरच या - तसे आलात तर तुमचं मनापासून स्वागतच आहे. आम्ही हे प्रश्न एकट्यानं सोडवू शकत नाही. पोटतिडकीनं काम करणाऱ्या शिक्षकांचं काम आणि चांगले चाललेले विभाग धुडगूस घालून बंद पाडण्याचा उन्माद आणि कर्मदरिद्रीपणा कृपा करून करू नका.

.............................................................................................................................................

लेखक मिहिर कृष्ण अर्जुनवाडकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्यूलेशन विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. 

mihir.arjunwadkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......