‘भ’कार आणि ‘शिवराळ’ संजय राऊत!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • शिवसेनेचे संजय राऊत
  • Mon , 05 June 2023
  • पडघम राज्यकारण संजय राऊत Sanjay Raut शिवसेना बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शरद पवार Sharad Pawar

खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल संजय राऊत केलेली थुंकण्याची कृती हा महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या किळसवाण्या संस्कृतीचा कळस आहे. ज्या राजकारण्यांना आता सक्तीनं घरी बसवण्याची वेळ आली आहे, त्या यादीत संजय यांचं नाव अग्रभागी आहे. कारण अश्लाघ्य असंस्कृतपणे जाहीर वर्तन करण्याची त्यांची ही काही पहिली वेळ नव्हे.

यांच्याकडे दोन नजरेतून पाहण्याची गरज ज्या वर्गात आहे, त्यातील मीही एक आहे. एक्स्प्रेस वृत्तपत्र समूहात संजय आमचा सहकारी होता. अतिशय धडपड्या, उत्साही आणि माहितीपूर्ण असा तेव्हाचा सळसळता तरुण संजय अजूनही आठवतो. त्याच्यातील लेखन कौशल्य ‘लोकप्रभा’चे तत्कालीन संपादक प्रदीप वर्मा यांनी रत्नपारख्याच्या नजरेनं हेरलं. पाहता पाहता संजय राज्यातला आघाडीचा पत्रकार बनला.

तो ‘लोकप्रभा’त असताना आम्हा ज्येष्ठांशी अतिशय अदबीनं वागायचा. पुढे ‘सामना’चा कार्यकारी संपादक आणि राज्यसभा सदस्य झाल्यावरही संजयनी ज्येष्ठांशी अदबीनं वागायची सवय कायम ठेवली, हे आवर्जून नोंदवायला हवं.

संजय आमच्या पिढीतला सर्वांत तरुण संपादक झाल्याचा अभिमान आणि कौतुक तेव्हा आम्हाला होता. राजकारणात पुढे तो आणखी मोठा झाला. शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतल्यावर राज्यात सत्तारूढ झालेल्या महाविकास आघाडीचा तो एक शिल्पकार होता. माध्यमात त्याचा उल्लेख ‘चाणक्य’ असा केला जाऊ लागला. सत्ता आणि पद मिळूनही संजयचे पाय जमिनीवरच असल्याचा अनुभव याही काळात अनेक ज्येष्ठांनी घेतला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

शिवसेनेचा खासदार, प्रवक्ता म्हणून हजरजबाबीपणानं वावरणारा, आक्रमणपणे प्रतिपक्षावर तुटून पडणारा संजय आम्हा मित्रांसाठी मुळीच बदलला नव्हता. अशात भेट झाली, तेव्हा ‘काय चाणक्य कसा आहेस?’ असा उल्लेख केल्यावर ‘तुम्हा ज्येष्ठांसाठी मी तोच ‘संज्या’ आहे’, असा म्हणणारा संजयच आहे.

संजयनी श्रीकांत शिंदेंच्या संदर्भात जे काही वर्तन केलं, त्याचं मुळीच समर्थन करता येणार नाही. शिंदे खासदार नसते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव नसते, राजकारणातही नसते तरीही संजयचं ते वर्तन कोणत्याच पातळीवर समर्थन करण्यासारखं ठरलं नसतं.

संजय आक्रमक होता आणि आहेही. शिवसेनेच्या ‘संस्कृती’शी अद्वैत नातं असल्यानं संजयमध्ये एक शिवराळपणाही आहे. ‘अरे’ला ‘कारे’ करत समोरच्याला शिंगावर घेण्याची बेडर वृत्तीही आहे. हे सर्व गुण आहेत का अवगुण, हे ठरवण्याचे निकष व्यक्तीसापेक्ष असू शकतात.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्यातही असे गुण होते आणि त्यांच्या छत्रछायेत प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे संजयमध्येही ते स्वाभाविकपणे उतरले आहेत. पण जे बाळासाहेबांना शोभत होतं, ते आपल्यालाही शोभेल असं नाही, याचा विचार संजयनी कधी केलाय असं दिसत नाही. त्यामुळे संजयबद्दल जनसामान्यात सोडाच, पण शिवसेनेच्या नेते आणि सैनिकांतही फार काही आपुलकीची भावना आहे, असं महाराष्ट्रात तरी फिरताना जाणवत नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणाला आक्रमकतेची परंपरा आहे, पण त्या आक्रमकतेनं सुसंस्कृतेशी फारकत घेतल्याची फार काही उदाहरणं २०१०पर्यंत सापडत नाहीत. माझी पिढी पत्रकारितेत येऊन आता साडेचार दशकं होताहेत. १९८१ साली विधीमंडळ आणि नंतर राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात आल्यावर बरेच नेते बघायला मिळाले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पुढे केंद्रीय मंत्री झालेल्या बबनराव ढाकणे यांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारणं, त्याच सभागृहाचा सदस्य असताना राजदंड पळवणं किंवा जाबुवंतराव धोटे यांनी अध्यक्षांच्या दिशेनं पेपरवेट भिरकावणं, अशा काही आक्रमक कृती घडल्या आहेत. मुख्यमंत्री असलेल्या बाबासाहेब भोसले यांचा जाहीर ‘उद्धार’ करणं किंवा तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या दिशेनं चपला भिरकावल्या गेल्याचेही प्रकार आठवतात.

आज खूपसे शांत झालेले छगन भुजबळ यांनी विधीमंडळ सभागृहातल्या आक्रमकतेला एक वेगळाच आयाम मिळवून दिला. सभागृहात झालेलं कामकाज किंवा एखाद्या सदस्यानं केलेलं वक्तव्य नोंदीतून काढून टाकण्याचा निर्णय अध्यक्ष किंवा सभापतींनी दिला, तर तो पत्रकारांवरही बंधनकारक असतो. त्याचं प्रकाशन करता येत नाही. भुजबळ विधानसभेवर निवडून आलेले ते शिवसेनेचे एकमेव सदस्य होते. तेव्हा विधानसभेत २८८ निवडून आलेले आणि एक नियुक्त असे एकूण २८९ सदस्य असत. विधानसभेच्या कामकाजात भुजबळ विरुद्ध अन्य २८८ सदस्य असं रणकंदन नेहमीच माजत असे. कारण भुजबळ यांचा शिवसेना संस्कृतीला साजेशा काहीशा शिवराळ आक्रमकपणा असे.

विधानसभा अध्यक्षांनी भुजबळांचं म्हणणं कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश द्यायला सुरुवात केली, तेव्हा भुजबळ यांनी वेगळीच शक्कल लढवली. सभागृहातून वक्तव्य काढून टाकण्याचा आदेश दिला गेला की, भुजबळ सभागृहाबाहेर येऊन पत्रकारांशी बोलताना कामकाजातून काढून टाकल्या गेलेल्या वक्तव्याचा पुनर्उच्चार करत आणि त्यांना मोठी प्रसिद्धी मिळत असे.

शिवसेनेत बंडखोरी केल्यावर भुजबळ आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात रंगलेली जुगलबंदी अनेकांच्या अजूनही स्मरणात असेल, मात्र त्या जुगलबंदीत ‘भ’कार नव्हता.

संजयनी मात्र राजकारण करताना सुसंस्कृतपणा आणि शिष्टाचाराचे सिमोल्लंघन केलं आहे. ते पूर्वी आक्रमकपणे बोलत, पण एकनाथ शिंदे आणि गट शिवसेनेतून फुटून निघाल्यावर संजयच्या वक्तव्यातला ‘चौकीदार’, ‘रिक्षावाला’ अशा तुच्छ उल्लेखसह शिवराळपणा ‘भ’काराकडे झुकला आहे आणि थुंकण्याच्या प्रतिक्रियेतून तो कृतीच्याही पातळीवर उतरला आहे. हे अतिशय निंदनीय आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

पक्षाच्या प्रवक्त्याला पक्षाचीच भूमिका लावून ठेवावी लागते, रेटून न्यावी लागते. असं करणं ही पक्ष प्रवक्त्याची अपरिहार्य अगतिकता असते, हे खरं, पण सध्या एकूण राजकारणात जो काही शिवराळ आणि ‘भ’कारपणा आला, तो सर्वपक्षीय असल्यानं जास्तच निषेधार्ह आहे.

असा शिवराळपणा करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील अनेक नगांची नावं घेता येतील, पण महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर संजय या निंदनीय शिवराळांचे महामेरू आहेत, असंच म्हणावं लागेल. एकनाथ शिंदे गटाचे महेश शिंदे आणि संजय शिरसाट, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे, भाजपचे आशिष शेलार, अतुल भातखळकर असे अनेक जण या शिवराळ पंथाचे निष्ठावंत वारकरी आहेत. संजयसकट या सर्वांचंच बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिकही अध:पतन वैपुल्यानं झालं आहे, याचा खेद वाटतो.

शिवराळपणा क्षणभर बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न किंवा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून संजय राज्यसभेत कधी आक्रमक झाल्याचं आजवर दिसून आलेलं नाही. ज्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा संजय करतात, त्याच एकनाथ शिंदेंना भेटायला वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी शरद पवार जातात, तेव्हा संजयचा ‘भ’कारी शिवराळपणा आणि आक्रमकता दडून बसलेली असते, असा हा विरोधाभास आहे.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सध्याची अवस्था लक्षात घेता संजयना राज्यसभेची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता नाही. एकदा का सत्ता आणि पद गेलं तर एक चांगला पत्रकार, एक चांगला मित्र आणि एक आक्रमक राजकारणी म्हणूनही संजय विस्मरणात जाईल. कारण ‘भ’कार आणि शिवराळपणाच्या पाण्यावर राजकारणाचं पीक कायमच बहरलेलं नसतं, हे संजयनी विसरू नये.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......