भारत काय शिकला कोरोना महामारीपासून? काही शिकला की नाही?
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
सलील जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 03 October 2022
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय करोना Corona कोरोना Corona करोना व्हायरस Corona Virus कोविड-१९ Covid-19

कोरोना महामारीत एकच गोष्ट काहीशी दिलासा देणारी होती, ती म्हणजे या महामारीचा भारतातील कमी प्रादुर्भाव. लोकसंख्येत जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आपल्या देशाने या रोगावर आश्चर्यकारकरित्या काबू मिळवला असं वाटत होतं. २०२० वर्षाच्या सुरुवातीस अगदी चार तासांच्या अवधीत एवढा मोठा देश बंद करून तेथील व्यवस्थेने त्याचा प्रसार कदाचित कमी केला होता. तसंच करोनाचा एका विशिष्ट वयोगटात होताना दिसत होता. त्याचबरोबर मोठी शहरं व निमशहरी विभागात तो जास्त पसरत होता. सुरुवातीस जगातील इतर देशांप्रमाणे जर भारतातसुद्धा मृत्यसंख्या वाढीस लागली, तर एकूणच परिस्थिती अतिशय गंभीर होईल, अशी जी भीती होती, ती त्यामानाने कमी मृत्यूदरामुळे नाहीशी झाली होती.

‘आपण करोनावर कशी मात केली’ याची प्रत्येक भारतीयाकडे तयार कथा होती. कोणी म्हणे की, आपल्याकडे असलेल्या तरुण वर्गामुळे आपण वाचलो, कारण हा रोग तरुणांना होत नाही. कोणी म्हणत की, भारतात प्रत्येकाला बालपणी मिळणाऱ्या रोगप्रतिकारक इंजेकशन्समुळे भारतीयांत कोरोनाशी लढण्याची क्षमता आलेली आहे. काहींच्या मते आपल्याकडे असलेल्या वातावरणामुळे लहान-सहान जंतूंशी आपला सामना अगदी बालपणापासून होत असल्याने कोरोना वाढू शकला नाही. यापैकी कुठल्याही कारणास वैज्ञानिक आधार न मिळत नव्हता, तरी असे अनेक पोकळ सिद्धान्त तरंगत होते.

बरं, एक सहवाद असाही होता की, या महामारीची लस येताच ती बनवण्याची सगळ्यात उत्तम व्यवस्थाही आपल्याच देशांत असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटमुळे होऊ शकते. तसेच भारतात प्रतिबंधक लसी देण्याची व्यवस्था, त्याच्या जाहिरातीचे तंत्र हे अगदी हल्लीच संपलेल्या पोलिओ अभियानामुळे तयार आहे. त्यामुळे जनमानसात एक निर्धास्त वातावरण तयार होते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

२०२०च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यापासून दूरचित्रवाणीवर किंवा आप्तेष्ट-मित्रांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येत होते की, एका कुठल्या तरी सामूहिक आत्मविश्वासावर सगळी मंडळी आपापल्या कामास लागली होती. हा आत्मविश्वास कोणत्या वैद्यकीय कारणांवर आधारित होता, याचे उत्तर कोणीही देत नव्हते. म्हणजे काल-परवापर्यंत अतिशय वेगाने पसरणारा कोरोना असा अचानक काहीही न करता कसा गेला, असा साधा प्रश्नही कोणी विचारताना दिसत नव्हते. त्यामुळे लग्नकार्य, प्रवास या सगळ्यांना ऊत येताना दिसत होता.

अर्थात ज्यांचे पोट रोजच्या घराबाहेर जाण्यामुळेच चालतं, त्यांना घरात बसून राहणं, हा पर्याय नसतो आणि अशांची संख्याही जास्त असणार, हे उघड होतंच. पण सगळ्याच बाहेर पडणाऱ्यांना हा प्रश्न होता, असं म्हणणं धाडसाचंच ठरेल.

या सगळ्या पार्श्वभूमीवर कोरोनासंक्रमित व्यक्तींची संख्या, वाढता मृत्युदर, वैद्यकीय उपकरणांची कमतरता, हे बघता भारतीय व्यवस्था अत्यंत गाफिल राहिली, असंच म्हणावं लागेल.

जगात आजच्या घडीस फाजील आत्मविश्वासानं, स्वतःच्या देशास अत्यंत हातघाईच्या परिस्थितीत ढकलण्याचं जर कुठलं उदाहरण शोधावयाचं असेल तर अमेरिकेकडेच बोट दाखवावं लागेल. अतिशय घिसाडीघाईनं नियोजन केल्यानं लाखोंच्या संख्येनं इथं प्राणहानी झाली. पण एरवी जगण्याच्या प्रत्येक गोष्टीस अमेरिका प्रमाण मानणाऱ्या भारतीय समाजास व सरकारास तेथील चुकांमधून बोध घेण्याची थोडीही इच्छा होऊ नये, याचं आश्चर्य वाटतं. रोजच्या बातम्यांमध्ये अमेरिकेचे वाभाडे काढणाऱ्या कुठल्याही समाजमाध्यमास तेथील लोकांच्या कृतीनं किंवा सरकारच्या धोरणानं, तसंच हल्ली होत असलेल्या काही चांगल्या कृतीनं भारतात सार्वत्रिक समज निर्माण होईल, असं काही करावंसं वाटू नये, ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. अमेरिकेच्या अनुभवांवरून एक अदृश्य शत्रू चाल करून येणार आहे आणि पुढील काही दिवस व रात्री वैऱ्याचा आहेत, हे न समजू शकणारी समाज व शासकीय व्यवस्था असणं, हे एक दुर्दैवच म्हणावं लागेल.

दुकटी ती गर्दी

भारत व इतर युरोपियन देशांप्रमाणे अमेरिकेत कोरोना लाट अशी कधीच नव्हती. मार्च २०२०पासून अमेरिका हा खऱ्या अर्थानं या विषाणूने वेढला गेला होता. फार फार तर लागण झालेल्यांच्या संख्येत थोडी फार घट मधूनमधून जाणवत असे. जर अगदी वर वर निरीक्षण केल्यास कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ ही सणासुदीच्या दिवसांनंतर प्रकर्षाने जाणवत होती. म्हणजे ‘मेमोरियल डे’ (मे २०२०), ‘थँक्स गिविंग’ (नोव्हे. २०२०), नाताळ व नवीन वर्ष (जाने २०२१), शाळा-कॉलेजेसना लागणारी सुट्टी (फेब्रु २०२१). त्या नंतर बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या प्रचाराच्या सभा व त्यातून त्या भागात पसरलेला कोरोना हे समीकरण पुराव्यासकट सिद्ध झालेलं होतं. तसंच सध्याचे अध्यक्ष बायडन यांनी घरी बसून केलेला यशस्वी प्रचार हा एक मार्गदर्शकच ठरावा, असा दिसत होता.

या पार्श्वभूमीवर उत्तराखंडात हरिद्वारला झालेला कुंभमेळा, प. बंगाल वर इतर राज्यांत झालेल्या निवडणुका, त्यातील नेते मंडळींची मुखपट्टी न वापरता केलेली भाषणं, रोड शोज हे अचंबित करणारं होतं. हे टाळणं सहज शक्य नव्हतं का?

विषाणूचं राजकारण

अमेरिकेतील २०२०च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारानं देशाची एक प्रकारे फाळणीच केली होती, असंच म्हणावं लागेल. लोकांची वर्गवारी करताना नकळत मास्कसारख्या ७५ अमेरिकी पैशांत एके काळी मिळणाऱ्या क्षुल्लक गोष्टीचं राजकारण होताना दिसत होतं. त्यावरून तरी बोध घेऊन भारतीय राजकारण्यांनी, ज्यात काहींकडे अमाप प्रसिद्धी व जनमानसाचा कौल आहे, त्यांनी राजकारणापासून फारकत घ्यायला हवी होती. महाराष्ट्रासारखा पुरोगामी राज्यात चालू असलेलं राजकीय टोळीयुद्ध हे अतिशय लाजीरवाणी होतं. त्याला जबाबदार कोण किंवा चूक कोणाची हा विचार नंतर करता येईल, पण जो विखार राजकारण्यांमध्ये दिसून येत होता, त्यात मूळ विषाणू व्यवस्थापनाचा विचार कुठे तरी हरवलेला दिसत होता.

लस उत्पादन व व्यवस्थापन

अमेरिकेतील कोरोनाच्या सुरुवातीचा काळात ‘सेंटर फॉर डीसीस कंट्रोल’ या संस्थेने काही अगम्य कारणामुळे परदेशी यशस्वी असलेल्या कोरोना टेस्ट किटची निर्मिती अमेरिकेत होऊ दिली नाही. त्याचा परिणाम असा झाला की, कोरोनाशी अमेरिकेला लढाईच्या पहिल्याच फेरीत टेस्ट किटअभावी निदान करणं अशक्य  होऊन पराभव पत्करावा लागला. पण अशी चूक अमेरिकेने लस निर्मितीच्या वेळेस केली नाही. लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांना भरपूर आर्थिक मदत, तसंच कुठल्याही अपयशाला जबाबदार न धरण्याची हमी ही आधीच देण्यात आली. तसंच ‘मर्क’ आणि आणि ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ या दोन्ही कट्टर व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांना वैरभाव विसरून एकाच लसीचं उत्पादन करण्यास सांगण्यात आलं. म्हणजे तीन लसींवर अमेरिकेतील चार मोठे उत्पादक काम करत होते.

भारतात सिरम हे मोछं नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होतं. सिरमचा जगभरात दबदबा या त्याच्यावरील विश्वासाने तयार झाला आहे, यात वादच नाही. आज जगातील दोन तृतीयांश बालकांना इतर रोगांसाठी सिरमनिर्मित लस मिळते. तरीही त्या प्रकारच्या लसींचं उत्पादन करणारा एकच उत्पादक सगळ्या भारतास पुरेल असं वाटणं, हे अनुभवशून्यतेचंच लक्षण मानावं लागेल. सिरमला सरकारकडे ३००० कोटी रुपयांची मदत, तसंच अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना कच्च्या मालाची मदत मागावी लागली, हे दुर्दैवी होतं. आणि ही मदत मागताना त्यांना समाजमाध्यमांची मदत घ्यावी लागली, म्हणजे त्यांना दिल्लीहून कुठलीही राजनीतिक मदत मिळत नसणार, हे उघड आहे.

तसंच महाराष्ट्रात असलेली हाफकिनसारखी औषधं बनवणाऱ्या (कदाचित थोड्या जुन्या वळणाची) कंपनीची मदत घेता आली नसती काय? भारत सरकारच्या विदेशी लसींना परवानगी देण्याच्या निर्णय स्तुत्य असला तरी तो सुमारे तीन महिने उशिराने घेण्यात आला होता. तसंच या विदेशी लसींच्या कंपन्यांकडे लसींची भरपूर मागणी होती, म्हणजे त्यात भारताच्या उशिरानं आलेल्या मागणीचा पुरवठाही उशिरानंच होणार होता.

संदेशवहन व जाहिरात

सबंध २०२० या वर्षात अमेरिकेतला महामारीच्या व्यवस्थापनाचा चेहरा राजकीय होता. कोरोनावरील विचार, उपचार व त्यांचे आकडे प्रामुख्यानं राष्ट्राध्यक्ष देताना दिसत. डॉक्टर्स, शास्त्रज्ञ हे नुसतेच तोंडी लावण्यापुरते असत. अपवाद काय तो फक्त डॉ. ऍंथोनी फौची यांचा असे. राष्ट्राध्यक्षच सगळी मखलाशी करत, ज्याचा परिणाम गोंधळ किंवा चुकीची माहिती पसरण्यात झाला. भारतातसुद्धा या दरम्यान कुठलंही राजनीतीक नेतृत्व कुठल्याही शास्त्राचा वापर करून माहिती देताना दिसत नव्हतं. राजकीय तसंच शास्त्रीय माहिती ही एकाच व्यक्तीनं देणं आणि तीही देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी हा चुकीचा पायंडा होता. त्या माहितीची विश्वासार्हता ती कशी जोखणार?

खरं म्हणजे भारताचा लसीकरणाचा अनुभव जगातील कित्येक महासत्तांपेक्षा चांगला आहे. पोलिओ, डायरिया, एड्स आदी अभियानं, त्याकरता घेतली गेलेली अनेक मान्यवरांची मदत, हे वाखाणण्याजोगं आहे. यातील कुठलाही उपाय कोरोनाच्या लशींबद्दलची साशंकता कमी करण्यासाठी वा मास्कबद्दल जागरूकता तयार करण्यास उपयोगी पडू नये?

अपयशाचा स्वीकार व पाऊल पुढे

आजमितीस जगातील कुठलाही देश छातीठोकपणे हे सांगू शकणार नाही की, त्याने कोरोना महामारीवर योग्य व्यवस्थापनानं विजय मिळवला आहे. कुणाचे लाट थोपवण्यात चुकले, तर कोणाचे लसीकरणात. पण हे करत असताना फार कमी देश आहेत, जे उघडपणे आपल्या चुका कबुल करतात. अमेरिकेत डॉ. फौचींची मास्कबद्दलची धारणा, काही देशांना प्रवास बंदी घालण्याचा उशीर, तसंच अगदी अलीकडे १५ दशलक्ष लसीचं वाया गेलेलं उत्पादन, या सगळ्या चुका अतिशय उघडपणे चर्चेत असणाऱ्या होत्या. त्यातून सुद्धा खूप शिकण्यासारखं आहे. डॉक्टरांना, शात्रज्ञांना त्यांच्या चुकांचा ऊहापोह न करता खुलेपणाने बोलण्याची मुभा द्यावयास हवी होती. कारण आपण फक्त जगातील इतर देशांच्या चुकांचाच तुलनात्मक अभ्यास करू शकतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कोरोनाच्या  पलीकडे

या कठीण परिस्थितीत जग या महामारीतून कसं सावरलं, याचा अंदाज बांधणं कठीणच आहे. पण अमेरिकेतील बऱ्याच समित्या याचा नक्कीच विचार असतील. मे २०२१च्या अखेरपर्यंत देशात ३०० दशलक्ष लशींचा अतिरिक्त साठा असेल अशी तजवीज केली गेली. त्यामागे कदाचित माणशी लागू शकणाऱ्या तिसऱ्या डोसचा विचार असावा. कदाचित लशींबद्दलची साशंकता बघता समूह प्रतिकारशक्ती कधीच मिळू शकणार नाही आणि दरवर्षाला एक लस घ्यावीच लागेल, असा विचारसुद्धा असू शकतो. त्यामुळे लसींचं उत्पादन वाढवण्याची गरज वाटत असावी. भारताची आर्थिक परिस्थिती कितीही हातघाईची असली, तरी या एका गोष्टीकरता भांडवल उभारण्यास आकाश पातळ एक करण्याची जरुरी होती. भारताने आर्थिक संकटात सोनं तारण ठेवण्याची आठवण  फार जुनी नव्हे. हे तर अस्मानी संकट होतं.

महामारीच्या व्यवस्थापनाकरता अमेरिकी अपयशाची यादी जगातील कुठल्याही देशास पुरून उरावी, अशीच आहे. या सगळा यशापयशाच्या खेळात कुठेतरी एक आशेचा अंधुक किरण दिसू लागला आहे. ही आशा विज्ञान, आकडेवारी तसंच निर्णय पारदर्शकता या तीन पायांवर उभी आहे. हा आशावाद लशींबद्दल साशंकता, रोज सुमारे ५०००० लोकांना होणारी लागण, दर दिवशी होणारे  १००० मृत्यू (२५ टक्के  जनतेचं पूर्णपणे लसीकरण झालेलं असूनसुद्धा), राजकीय विचारांनी पसरवलेली सामाजिक दुही, कृष्णवर्णीयांवर होत असलेल्या अन्यायामुळे ढवळून  निघालेलं समाजमन, तसंच महामारीने आर्थिक संकटात असलेला मध्यम व निम्नवर्ग असे सगळे प्रश्न भेडसावत असतानासुद्धा दृढ होत राहिला.

यशाचा अकाली उत्सव साजरा करण्याऐवजी अशा सगळ्याच उदाहरणातून भारतीय प्रशासनानं मोकळ्या मनानं शिकण्यासाठी सज्ज व्हायला हवं होतं. भारत काय शिकला कोरोना महामारीपासून? काही शिकला की नाही?

.................................................................................................................................................................

लेखक सलील जोशी बोस्टन, अमेरिकास्थित असून माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रात काम करतात.

salilsudhirjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......