साहित्य, नाटक, चित्रपट याच क्षेत्रांत कला आहे, या समजातून आपण बाहेर आलं पाहिजे. माणसाच्या जगण्यातलं जगातलं प्रत्येक क्षेत्र हे कला आहे, या दृष्टीला जावं लागेल
पडघम - सांस्कृतिक
राजन खान
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 19 October 2021
  • पडघम सांस्कृतिक कला साहित्य चित्रपट नाटक कलाकार लेखक नाटककार

कला फक्त साहित्य, नाटक, चित्रपट याच विषयांमध्ये आहे, असं नाही. लोक वाचत नाहीत, लोक बघत नाहीत, लोक चांगलं वाचत नाहीत, लोक चांगलं बघत नाहीत, अशी एक तक्रार या साहित्यादी कलांमधले लोक करत असतात.

इथं आधी साहित्य, नाटक, चित्रपट याच क्षेत्रांत कला आहे, या समजातून आपण बाहेर आलं पाहिजे. जगात माणसाच्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक क्षेत्रात कला आहे. माणसाच्या जगण्यातलं जगातलं प्रत्येक क्षेत्र हे कला आहे, या दृष्टीला जावं लागेल. आणि त्या त्या क्षेत्रांत जगणारी, काम करणारी माणसं, त्या त्या क्षेत्राची कलावंत आहेत, हे गृहीत धरावं लागेल. लाकडं कापणं, शेती करणं, मजुरी करणं, स्वयंपाक करणं, घर बांधणं, स्वच्छता करणं, दारू तयार करणं, जेवणं, कारखान्यात काम करणं, कारकुनी करणं, कपडे शिवणं, गप्पा मारणं, अशा जगण्यातल्या सर्व कृती या कलाच आहेत. आणि जगातला प्रत्येक माणूस आपल्या जगण्याच्या कलेत रमलेला असतो. त्यात तो आयुष्य घालवत राहतो. स्वतःच्या नादाची कला सोडून प्रत्येक माणसाला जगातल्या बाकीच्या कला पाहायला वेळ आणि संधी मिळेल आणि त्याची त्याला गरज वाटेलच, असं नाही. मला स्वतःलाही ते फार गरजेचं वाटत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

शेती या कलेत रमलेल्या शेतकरी या कलाकारानं साहित्य वाचावं, नाटक पाहावं, कविता ऐकावी हे फार आवश्यक नाही. ते जर आवश्यक करायचं असेल आणि आपली वाचनसंस्कृती, दृश्यसंस्कृती हे इतर लोक वाचत, बघत नसल्यामुळे वाढत नाही, असं म्हणायचं असेल तर, माझं म्हणणं असं आहे की, शेतकऱ्याला मी साहित्य, नाटकादी कलांकडं घेऊन येतो, पण त्याआधी लेखक, नाटककार यांनीही शेती या कलेत आपलं योगदान जरूर द्यावं. शेतकरी, मजूर, कामगार आणि जगातल्या इतर तमाम जगण्याच्या कलेतल्या लोकांनी साहित्य, नाटकादी कलांवर आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ खर्च करावा असं वाटत असेल, तर लेखक, नाटककारांनीही आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ, त्या दुसऱ्या कलांमध्ये द्यायला हवा. ते होणार नसेल तर लोक वाचत नाहीत, बघत नाहीत, अशा तक्रारी करू नयेत.

साहित्य, नाटक, चित्रपट या परोपजीवी कला आहेत आणि मुळात या कलांचा मूळ उपयोग लोकांचं मनोरंजन हाच आहे. या कलांचा शोध लागल्यापासून या कलांचा वाचक, श्रोता, प्रेक्षक हा मुळात जगण्याच्या विविध कलांमध्ये जगणारा, राबणारा माणूसच राहिला आहे. तो आपल्या कलेत जगून, राबून झालं की, उरलेला थोडा वेळ करमणूक व्हावी म्हणून देत आलेला आहे. एका अर्थानं तो या परोपजीवी कलांवर उपकार करत आलेला आहे आणि या कला जगवत आलेला आहे.

साहित्य, नाटक, चित्रपट या कलांचे विषय माणसाच्या जगण्याच्या इतर कला, क्षेत्रं यांच्याकडून घेतले जातात आणि लिहिणारी माणसं या कला कशा असाव्यात, नसाव्यात, यावर आपली भाष्यं करतात. याला जाणिवा, ज्ञान, प्रबोधन, संदेश देणं असं म्हटलं जातं. म्हणजे जग, जगातली माणसं, माणसांची क्षेत्रं कशी होती, कशी आहेत, कशी असायला हवीत, याच्या नोंदी करणाऱ्या कला म्हणजे साहित्य, नाटक, चित्रपट, चित्र, इत्यादी. ही जगासाठी उपयुक्तच गोष्ट आहे, पण तरीही जगातल्या प्रत्येक माणसानं आपला वेळ आपलं जगणं, जगण्याच्या क्षेत्रांच्या कला सोडून वाचणं, बघणं या कलांना द्यावा, असा आग्रह धरणं चूक आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा.  खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधून मधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसे किणीकरसुद्धा वळत राहिले, पण एकंदर कवितेचा नूर बघितला तर किणीकर खय्यामपेक्षा अध्यात्मात फार खोल उतरले होते. त्यांनी संपूर्ण अध्यात्मविचार पचवला होता. प्रचितीचा दावा किणीकर करत नाहीत, पण त्यांनी सर्व भारतीय अध्यात्मविचार मन लावून समजून घेतला होता.

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

..................................................................................................................................................................

तरीही त्यातली बरीच माणसं आपला वेळ आणि पैसा खर्च करत या कला बघतात, वाचतात, असंच आजवर घडत आलेलं आहे. त्यातही आपल्या जगण्याला पूरक काही असेल तर लोक बघतात, वाचतात, हेही घडत आलेलं आहे. शंभर पुस्तकं किंवा शंभर नाटकं लोकांना एकाच वेळी वाढली तर त्यातली किती वाचायची, बघायची, हे लोक आपल्या रसाचं, आपल्याला पूरक त्यांत काही आहे का, हे आधी शोधतो आणि मगच त्यासाठी वेळ देतो, हे नैसर्गिक सत्य आहे. सर्वच माणसं सर्वच पुस्तकं किंवा नाटकांना वेळ देतील, ही अशक्य गोष्ट आहे. त्यांची रुची हा यातला महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि तिच्याविरुद्ध तक्रार करणं, मला योग्य वाटत नाही.

यात आत साहित्य, नाटक यांच्या दर्जाचा मुद्दा घेऊ. चांगलं किंवा वाईट साहित्य, नाटक हे कुणी ठरवायचं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं, याचा काहीही मूलभूत, सार्वकालिक आणि सार्वजनिक निकष नाही. तो शक्यच नाही. कारण प्रत्येक माणूस वेगळा, त्याची मती वेगळी, त्याची रुची वेगळी. त्यामुळे साहित्य, नाटक, चित्रपट, चित्र किंवा सादर करण्याच्या कोणत्याही कलेच्या बाबतीत अंतिम चांगलं किंवा अंतिम वाईट असं काहीही ठरवता येत नाही, ते शक्यच नाही.

पण तरीही जे समाज आणि काळ यांच्या निकषावर टिकून राहील, ते चांगलं साहित्य किंवा चांगली कला असं ढोबळ म्हणता येतं. पण यातली एक ऐतिहासिक मख्खी अशी आहे की, तुम्ही बघा, माणसाच्या जातीला आपलं जगणं सुकर करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची टोळी करायची सवय पूर्वापार आहे. तोच टोळी करण्याचा मानवी नियम साहित्य, नाटक आणि सादर करण्याच्या कोणत्याही कलेला लागू होतो.

आजवर गाजलेली, टिकून राहिलेली, कोणतीही पुस्तकं, नाटकं, चित्रपट किंवा विविध कलांमधल्या कलावंतांची नावं बघा, त्यांची त्यांची कोणत्या ना कोणत्या प्रकारची टोळी तयार करण्यात आणि आपली कला खपवण्यात किंवा टिकवून धरण्यात ते यशस्वी झाले, असंच दिसून येईल.

..................................................................................................................................................................

संतसाहित्यातील तत्त्वज्ञानविषयक संज्ञांचा हा कोश प्राचीन मराठी साहित्याच्या प्रगत अभ्यासासाठी उपयुक्त आहे. वाङ्मय अभ्यासक, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आणि जिज्ञासू वाचक यांच्यासाठी हा संज्ञाकोश गरजेचा, महत्त्वाचा आणि संदर्भसंपृक्त आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/marathi-sant-tatvdnyan-kosh

..................................................................................................................................................................

एखाद्या गोष्टीची क्रेझ तयार करता आली पाहिजे आणि क्रेझ तयार करण्यासाठी टोळी करता आली पाहिजे आणि क्रेझ शतकानुशतकं टिकून राहायची तर टोळीही शतकानुशतकं टिकण्याची व्यवस्था केली पाहिजे, हे ते चातुर्य आहे. (धर्म आणि जाती या काल्पनिक कला अशाच तर टिकून राहिल्या.)

तुम्ही तुमच्या साहित्य किंवा सादरीकरणाच्या कोणत्याही कलांना हाच नियम लावून पहा. कोणती कलाकृती पाहिली, नाकारली, टिकवली, मारली जावी, हे त्या कलाकृतीच्या भोवतीची कोणती टोळी किती प्रभावी, यावर ठरतं, असं मला वाटतं.

..................................................................................................................................................................

लेखक राजन खान प्रसिद्ध कथा-कादंबरीकार आहेत.

aksharmanav@yahoo.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा