पासवानांच्या ‘चिराग’ची फडफड!   
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर  
  • चिराग पासवान आणि रामविलास पासवान; चिराग पासवान आणि नितीशकुमार
  • Sat , 19 June 2021
  • पडघम देशकारण भाजप BJP जद (यू) JDU लोक जनशक्ती पक्ष Lok Janshakti Party चिराग पासवान Chirag Paswan रामविलास पासवान Ram Vilas Paswan नितीशकुमार Nitish Kumar

शह-काटशह, डाव-प्रतिडाव, कोपरखळ्या, खुन्नस-वचपा, अशा अनेक कृती राजकारणात सतत घडत असतात. या कधी दृश्यमान असतात, तर कधी नसतात. दृश्यमान नसणाऱ्या अशा कृतींचे परिणाम काही काळानंतर दिसू लागतात. राजकारणाचा हा खेळ कधी कुणाला वर चढवतो, तर कधी कुणी राजकारणाच्या साप-शिडीवरून थेट तळाला येऊन पोहोचतो. या सगळ्या कृतींकडे कसं बघायचं, हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन असतो. त्यामुळे त्या कुणाला मनोहर वाटतात, तर कुणाला राजकारणाचा तो एक अपरिहार्य भाग वाटतो. बिहारच्या लोक जनशक्ती पक्षामध्ये सध्या जे चालू आहे, त्याचं वर्णन नितीशकुमार यांनी इंधन काढून घेतल्यानं पासवान यांचा ‘चिराग’ आता फडफड करू लागला आहे, अशा शब्दांत करता येईल. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिराग पासवान यांच्यावर राजकीय सूड उगवला असा त्याचा अर्थ आहे.

आपल्या देशात समाजवादी विचाराची जी काही छकलं झाली, त्यापैकी एक रामविलास पासवान यांनी २००० साली स्थापन केलेला त्यांचा सवतासुभा म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आहे. या पक्षाला म्हणजे रामविलास पासवान यांना बिहारमध्ये मागासवर्गीय समाजाचा चांगल्यापैकी पाठिंबा आहे, हे त्यांनी जनता दल (यु)मधून फुटून निघाल्यावर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत सिद्ध केलेलं आहे. २०१४ आणि २०१९ अशा दोन लोकसभा निवडणुकांत या पक्षाला बिहारात सहा जागा मिळाल्या. रामविलास पासवान यांचा लोकसंग्रह आणि सत्ताधाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा गुण वाखाण्यासारखा आहे.

रामविलास पासवान आणि नितीशकुमार या बिहारमधील दोन नेत्यांचं अत्यंत खास वैशिष्ट्य म्हणजे दोघांचाही लढा धर्मांध शक्ती म्हणजे भाजप विरुद्ध आहे, तरीही त्यातला संधिसाधूपणा म्हणजे या दोघांनीही त्याच भाजपच्या चमच्यातून सत्तेचं दूध प्राशन केलेलं आहे! अर्थात ते दोघेही याला संधिसाधूपणा समजत नाहीत, हा त्यांचा राजकीय कोडगेपणा म्हणायला हवा. शुगर कोटेड आणि जरा वेगळ्या शब्दांत हेच म्हणणं सांगायचं झालं, तर राजकारणात चालून आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करून घेण्याची नजर असलेले मुत्सद्दी म्हणजे रामविलास पासवान आणि नितीशकुमार आहेत! अर्थात या बाबतीत रामविलास पासवान टेकाड असतील, तर नितीशकुमार पर्वत आहेत, हे काही वेगळं सांगायला नको!

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

रामविलास पासवान यांनी अशा राजकीय सुर्वणसंधी अनेकदा साध्य केलेल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान भाजपच्या आश्रयाला गेले आणि सुमारे अर्धतपाच्या काळानंतर त्यांनी पुन्हा केंद्रातला सत्तेचा सोपान चढण्यात यश मिळवलं. नरेंद्र मोदी-अमित शहा आणि रामविलास पासवान यांच्या राजकारणाच्या बाजाचा अंदाज भल्याभल्यांना आलेला नाही. तसा तो लोक जनशक्ती पक्ष आणि भाजप यांच्यात युती झाली, तेव्हाही आलेला नव्हता. तेव्हा मी दिल्लीतच पत्रकारिता करत होतो आणि अमित शहा यांनी पाटण्याहून लोक जनशक्ती पक्षासोबत भाजपसोबत युती करत आहे, अशी घोषणा केली, तेव्हा दस्तुरखुद्द भाजप मुख्यालयातही भल्याभल्यांना कसा धक्का बसला होता, हे अजूनही आठवतं.

रामविलास पासवान हयात होते, तोपर्यंत लोक जनशक्ती पक्षातील कुरबुरींना तोंड फुटलेलं नव्हतं, कारण रामविलास यांचा करिष्मा आणि वचकही तसाच होता. बिहारवर वर्चस्व निर्माण करण्याच्या नितीशकुमार आणि रामविलास यांच्यात सुरू असलेल्या सुप्त संघर्षालाही जाहीर स्वरूप प्राप्त झालेलं नव्हतं. त्या संदर्भात जे काही शह-काटशहाचं राजकारण सुरू होतं, त्याला तोंड फुटलेलं नव्हतं. मात्र रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पक्षाची सुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली आणि नितीशकुमार यांचा जनता दल (यु) आणि लोक जनशक्ती पक्षात वर्चस्वाचा संघर्ष उघडपणे सुरू झाला, तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत त्याची फार काही झळ नितीशकुमार आणि त्यांच्या जनता दल (यु) पक्षाला बसलेली नव्हती.

चिराग पासवान यांच्याकडे लोक जनशक्ती पक्षाची सूत्रं आली, ती केवळ ते रामविलास यांचे पुत्र आहेत म्हणून, हे काही वेगळं सांगायला नको. चिराग पासवान तरुण आहेत, अभियांत्रिकीतलं उच्च शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. दिसायला रुबाबदार असल्यामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीचेही दरवाजे ठोठावून बघितले आहे. मात्र वडिलांच्या आग्रहामुळे तेही राजकारणाच्या वाटेवरून चालू लागले आणि पुरेशी राजकीय पक्वता येण्याच्या आतच त्यांनी नितीशकुमार यांच्यासारख्या ‘हेवी वेट’शी पंगा घेऊन स्वत:चं राजकीय भविष्य धूसर करून टाकलं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भाजपची बिहारमधील युती जनता दल (यु)पेक्षा नितीशकुमार यांच्याशी जास्त पक्की आहे आणि ती तशी पक्की असणं नैसर्गिक नसून अगतिकता आहे. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा जनता दल (यु) आणि नितीशकुमार यांच्यापेक्षा बिहारात मोठं होण्याच्या संधीची भाजपला प्रतीक्षा होतीच. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ती संधी रामविलास पासवान यांच्या अनुपस्थितीत चिराग पासवान यांनी भाजपला मिळवून दिली.

चिराग पासवान म्हणजे लोक जनशक्ती पक्ष आणि नितीशकुमार म्हणजे जनता दल (यु) हे दोन्ही पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)चे घटक पक्ष असले तरी बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल (यु)च्या म्हणजे नितीशकुमारच्या विरोधात उमेदवार उभे करण्याचा निर्णय चिराग पासवान यांनी घेतला. लोक जनशक्ती पक्ष किती जागा जिंकू शकतो, यापेक्षा जनता दल (यु)चा किती जागी पराभव करण्यास कारणीभूत ठरू शकतो, याचा अंदाज आल्यावर भाजपने मौन धारण करून चिराग पासवान यांना पुरेशी ‘कुमक’ पुरवली हे काही लपून राहिलेलं नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याआधीपासूनच बिहारमध्ये नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्ष सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष ठरेल अशी भाकीतं व्यक्त केली जात होती आणि ती खरीही ठरली.

बिहारमधल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप संख्याबळाने सर्वात मोठा पक्ष ठरला आणि जनता दल (यु) चक्क तिसऱ्या नंबरवर फेकला गेला. कारण लालूप्रसाद यादव सर्वेसर्वा असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव यांनी अनपेक्षितपणे मुसंडी मारून दुसऱ्या क्रमांकाचं संख्याबळ पटकावलं. अर्थात भाजप आणि जनता दल (यु) युती असल्यानं ठरल्याप्रमाणे नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, तरी झालेल्या पिछेहाटीचं शल्य त्यांच्या मनात होतं आणि त्याचा राजकीय वचपा काढल्याशिवाय ते राहणार नाहीत, हे उघड होतं. त्याप्रमाणे घडलं आता घडलं आहे.

सर्व राजकीय पक्षात असतात तसेच सत्तेसाठीचे संघर्ष लोकसभेत जेमतेम सहा सदस्य असलेल्या लोक जनशक्ती पक्षातही आहेत, हे नितीशकुमार यांनी हेरलं आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं बिगूल वाजायला सुरुवात होताच फासे फेकले. कुठल्या तरी हिंदी चित्रपटात ‘ये खेल तुमने शुरू किया है, इसे मैं खतम करूंगा’ असा डॉयलॉग आहे. नितीशकुमारांना शह देण्याचा खेळ चिराग पासवान यांनी सुरू केला आणि त्या खेळाचा शेवट आता नितीशकुमार करत आहेत. लोक जनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंडाचं निशाण फडकावलं. पक्षाच्या गटाचं लोकसभेतील नेतेपद चिराग पासवान यांच्याकडून काढून घेऊन पशुपती पारस यांच्याकडे सूपूर्द केलं. पक्षाच्या संसदीय गटात फूट पडली. चिराग पासवान अल्पमतात गेले. त्यांच्या गटात आता तेच एकमेव खासदार उरले आहेत. पुढच्या सगळ्या हालचाली नितीशकुमार यांच्या नियोजनाप्रमाणे घडत गेल्या आणि चिराग पासवान एकटे पडले.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पक्षात फूट पडली हे मान्य करून स्वत:च्या नेतृत्वाखालील पक्ष मूळ असल्याचं सिद्ध करण्याऐवजी चिराग पासवान यांनी त्या पाच खासदारांना पक्षातून काढून टाकलं. आता ते पाच खासदार  विरुद्ध एकटे चिराग पासवान अशी अस्तित्वाची खडाखडी सुरू झालेली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीतच बिहारातील मतदार पशुपती पारस यांच्यामागे आहेत की, चिराग पासवान यांच्यामागे हे सिद्ध होईल.

एक बऱ्यापैकी प्रभावी असलेला प्रादेशिक पक्ष अंतर्गत लाथाळीमुळे अस्तित्वहीन होत असल्याचा आनंद निश्चितच भाजपला असेल, पण दुसरीकडे त्यामुळे नितीशकुमार यांचे पाय बिहारमध्ये आणखी घट्ट होतील, याची भीतीही असेल. त्यामुळे यापुढचा बिहारातला भाजप विरुद्ध नितीशकुमार हा सुप्त राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत जाईल. लोक जनशक्ती या चिटुकल्यापिटुकल्या पक्षातील अंतर्गत संघर्षाला असे भाजप विरुद्ध नितीशकुमार या सुप्त संघर्षाचे कंगोरे आहेत.

या लाथाळीत भारतीय जनता पक्ष चिराग पासवान यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना मंत्रीपद देतो की, नितीशकुमार यांच्या सांगण्यानुसार पशुपती पारस यांना, की दोघांच्याही हातात वाजवण्यासाठी गाजराची पुंगी मिळते, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......