आपल्याच नाकर्तेपणामुळे ग्रामीण जीवनपद्धती उद्ध्वस्त झाली, नागरीकरणाचे एकारलेले हव्यास निर्माण झाले!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 08 December 2018
  • पडघम देशकारण भारत Bharat इंडिया India ग्रामीण Rural शहरी Urban

आजकाल खेड्यापाड्यातल्या प्रत्येकालाच ‘सेटल’ व्हायचे असते. त्याचे हे सेटल होणे म्हणजेच शहरात जाऊन वास्तव्य करणे असते. शहरातल्या कुठल्यातरी दिशेला पसरलेल्या अनियंत्रित लोकसंख्यावाढीचा एक घटक बनून राहण्यासाठीचे स्वप्न उराशी बाळगून जो-तो असा सेटल होण्यासाठी धडपडत असतो. गत अनेक दशकांपासून लोक असे स्थलांतरित होत आहेत. एका दीर्घकालीन जीवनशैलीचा त्याग करून मोठमोठ्या शहरांत जाऊन वास्तव्य करत आहेत. ग्रामीण भागातल्या व्यक्तीला शहरी जीवनशैलीचे असणारे स्वाभाविक आकर्षण म्हणून या स्थित्यंतराकडे बघता येईल का? हे स्थित्यंतर तेवढ्यापुरतेच सीमित असेल तरच बघता येईल. या अशा सेटलमेंट देशभरातून होत आहेत आणि आजही अव्याहतपणे सुरू आहेत. म्हणूनच याचे स्वरूप समस्या म्हणून समोर येत आहे.

कधी काळी काही मोजकीच माणसे पोटापाण्यासाठी म्हणून शहरात यायची. प्रारंभी वास्तव्यासाठी धडपडून कालांतराने तिथेच स्थिरस्थावर व्हायची. त्यांची ही धडपड साहित्यात वाचताना कौतुक वाटायचे. केवळ गौरी-गणपतीला गावाकडे जाणारे लोक म्हणून इतरांना हे कुतूहल असायचे. असे कुतूहल बाळगणाऱ्यांनी ते इतर वेळी शहरात कसे भकास जीवनगाणे गातात याचा विचार कधीच केला नाही. कारण ‘नागरी विकास’ करणाऱ्यांनी त्यांना अशी उसंतच मिळू दिली नाही. नागरीकरणाच्या, विकासाच्या भ्रामक कल्पनांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भारतातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी नगरांमध्ये स्थलांतरित व्हायला लागल्या. शहरे बकाल व अव्वाच्या सव्वा वाढली. प्रचलित जीवनपद्धती व अर्थव्यवस्थेच्या एकांगी विकास प्रारूपाची ती परिणती होती. एवढ्या मोठ्या संख्येने व प्रमाणात शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची आजवरील उपजीविकेची साधने आज नेमकी कुठे गेली? त्यांचे आजवरील जगणे नेमके आपल्या कोणत्या धोरणामुळे धूसर झालेले आहे, हा प्रश्न राज्यकर्त्यांना कधी पडला नाही आणि ज्यांना पडला त्यांना तो उपस्थित करता आला नाही.

विकासाचे चुकीचे प्रारूप राबवणारी राज्यसंस्था व तिचे कर्ते-करविते या भ्रामक कल्पनांत असे काही गुंतलेले आहेत की, या नागरीकरणाच्या व विकासदरवाढीच्या आकडेवारीच्या भूलभुलय्यात आपण आपल्या मूळ समस्यांत भर घालत असल्याचे भानसुद्धा कोणाला राहिलेले नाही. विविध प्रदेशांतील वा राज्या-राज्यांत झालेला विकासातील असमतोल हा गोंधळ चहुबाजूंनी वाढवतो आहे.

नव्वदीच्या दशकात या असंतुलनाचे दूरगामी परिणाम दिसायला लागले. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दोलायमान दूरवस्थेने प्रश्न अधिक भेसूरपणे समोर यायला लागले. पण तरीही या समस्येकडे गंभीरपणे अथवा समस्या म्हणून कोणी पाहू इच्छित नाही. शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी ‘इंडिया विरुद्ध भारत’ अशी मांडणी करून त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4699/26-11-Kasab-ani-mi

.............................................................................................................................................

जगात सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या यादीत भारतातील शहरांची नावे अधिक मोठ्या प्रमाणात आली आहेत, यात आनंद मानण्यात तसे काही गैर नाही. पण कधी काळी आपल्या जमिनीत शेती करणारा, त्या शेतीवर आधारित इतर संलग्न व्यवसायांत उदरनिर्वाह भागवणारा ग्रामीण भागातील नागरिक तिथे पोट भरत नाही म्हणून मोठमोठ्या शहरातल्या बकाल वस्त्यांत येऊन वास्तव्य करतो. परंपरागत व्यवसाय-कौशल्याची त्याची खासीयत, स्थैर्य नाहीसे होऊन मिळेल ते काम करून पोट भरण्याची वेळ, या वाढीव नागरीकरणात त्याच्यावर येत असेल तर हे स्थित्यंतर लाभदायक कसे मानावे?

नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण करणे तर सोडाच, पण अशी व्यापक क्षमता असणारी पूर्वीची परंपरागत व्यवस्था सांभाळण्यात आलेल्या अपयशाचे कसले गोडवे गायचे? शहरांमध्ये स्थलांतरित झालेल्यांचे जिणे कसे असते? ही पुन्हा आपल्या धोरण-निर्धारकांच्या नव्या अपयशाची गाथा ठरते. भराव टाकून बळकावलेल्या जमिनीचे ओझे, मिठी नदीचा पूर, ओझे पेलण्याच्या क्षमता संपल्याच्या पाऊलखुणा कोसळून पडलेल्या पुलांनी सांगितल्या आहेत. या उलट्या वाटचालीत केवळ उदरभरणासाठी बाहेर पडणाऱ्या पिढ्यांचीच होरपळ झालेली नसून भविष्यातल्या अनेक पिढ्यांसमोर हे दुर्दैवी वास्तव आ वासून उभे आहे. 

खेडी ओस पाडून विकासाचा आभास व्हावा, अशी बेटे उभारण्यात आपण काय कमावले अन् काय गमावले? याचा विचार आता साधकबाधक पद्धतीने व्हायलाच हवा आहे. एका ठिकाणचे लोक दुसरीकडे जाऊन सुखी होणार असतील तर त्यास कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. पण पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या लोकांच्या पायाभूत गरजा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरत असणाऱ्या यंत्रणांवर या वाढीव जबाबदाऱ्या टाकण्यात काय हशिल?

सुखाच्या कल्पना व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष असतात हे मान्य करूनही सरकार नामक यंत्रणेने आजवर  आपण नागरिकांना पायाभूत सुविधा पुरवण्यात कितपत यशस्वी झालो आहोत याचा विचार करायलाच हवा. ‘रोटी, कपडा और मकान’ छापाच्या मूलभूत व पुरातन घोषणांचा उद्घोष ऐकणाऱ्यांनाही नकोसा झाला आहे. वास्तव्यास असणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्याची या महानगरांची क्षमता संपलेली असतानाही त्या बकाल वस्त्यांना स्मार्ट करण्याचा किमान तसे म्हणण्याचा अट्टाहास आता राज्यकर्त्यावर्गानेही सोडायला हवा.

आपल्याच नाकर्तेपणामुळे उद्ध्वस्त झालेली ग्रामीण जीवनपद्धती, नागरीकरणाचे एकारलेले हव्यास असे पातक आपण आणखी किती काळ डोक्यावर वागवणार आहोत? याचा विचार आपण सर्वांनीच कधीतरी आवर्जून नको का करायला?

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......