तुमची दैवते कोणती, तुमचे गोत्र कोणते असल्या भाकडकथांनी देश प्रगती कधीच करत नसतो!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • अयोध्येतील राममंदिराचा संकल्पचित्र
  • Mon , 03 December 2018
  • पडघम देशकारण राममंदिर Ram Mandir भाजप BJP नरेंद्र मोदी Narendra Modi संघ RSS

निवडणुकांच्या निमित्ताने का होईना सध्या सर्वच राजकीयजनांना आपण हिंदू असल्याचा आत्मसाक्षात्कार होतोय, ही बाब समाधानकारक मानावी लागेल. विशेषत: राजकीय पक्षाच्या प्रणेत्यांना आपल्यातल्या या चिरंतन प्रवाहाची आठवण व्हावी यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही. सत्ताधीशांचा धर्म तसा निराळा असतो. तरीसुद्धा त्यांना आपला पिंडधर्म आठवावा हे सुखावह आहे.

लोकशाहीत तर सत्ताधीशांचा धर्म अधिक उत्तरदायित्वाचा, जबाबदारीचा असतो. जनसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे दैनंदिन जगणे सुखकर व्हावे यासाठी जनता मतदार बनून तुमची निवड करत असते. सरकार बनवण्याची संधी प्रदान करत असते. अशी संधी मिळाल्यानंतर सत्ताधीशांनी राजकीय धोरणनिर्धारण म्हणून जनतेच्या आशा-आकांक्षा सिद्धीस न्यावयाच्या असतात. मतदारांच्या अडी-अडचणींचे निराकरण करून त्यांना सन्मानपूर्वक जगता येईल अशा रीतीने या सत्तेचा सदुपयोग करायचा असतो.

सत्तेची संधी मिळालेल्यांसाठी जनतेने टाकलेल्या जबाबदाऱ्या पार पाडणे, त्यांच्या विश्वासाला जागणे हाच धर्म असतो. या प्राधान्यक्रमाला वा प्राधान्याने केल्या जाणाऱ्या कर्माला राजधर्म असे संबोधले जाते. हा राजधर्म पाळला जावा अशीच मतदारांची अपेक्षा असते. भारतीय राज्यघटनेत या राजधर्माच्या पालनाबाबतचे यथासांग मार्गदर्शन केलेले आहे. बरे सध्या राजकीय पक्षांकडून ज्या हिंदू धर्माचा गजर केला जात आहे तो हिंदू धर्मही अशा राजधर्माच्या काटेकोर पालनाचाच आग्रह धरत आलेला आहे.

हिंदू असणे काय असते? हिंदुत्व काय असते?, हिंदू असणे म्हणजे नेमके काय?  हिंदू धर्म परंपरा काय आहेत? हिंदू धर्म ज्या जगत्कल्याणाची भाषा- परिभाषा मांडतो हे सर्व समजून घेण्याची आस जगाला अनादिअनंत काळापासून लागलेली होती. आजही या शाश्वत मानवतावादी जीवनप्रवाहाबाबत या विश्वाला असणारे कुतुहल संपलेले नाही. प्रश्न आहे तो भारतात सत्तास्पर्धेत रंगलेल्यांच्या धर्मश्रद्धा पालनाचा आणि हिंदुत्व समजून घेण्यामागच्या त्यांच्या अंतस्थ हेतूंचा. सत्ताधाऱ्यांनी सत्तेचे निर्वाहन करताना आपल्या प्रजाजनांची जात-धर्म, जीवनश्रद्धांचा विचार करावयाचा नसतो. त्यांच्या आशा-आकांक्षांची पूर्तता केवळ ‘इदं न मम’ या तत्त्वाने करायची असते. निवडणुकीच्या मोसमात भारतातील यच्चयावत राजकीय धुरिणांना नेमका या तत्त्वाचा विसर पडतो अन् ते स्वत:च जात, धर्म, गोत्र शोधत बसतात. दुर्दैवाने याला कोणीही अपवाद नाहीत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे. या सरकारला आपण या कार्यकाळात काय केले हे अथवा येत्या पाच वर्षांच्या काळात काय करणार आहोत हे सांगण्यात कुठलाच रस नाही. याऐवजी ते धार्मिक मुद्यांना हात घालत आहेत अथवा आपण सत्तेवर येण्यापूर्वी काय नव्हते याचा हिशेब मांडण्यात व्यस्त आहेत. तर विरोधकांनाही या सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमधील उणिवांपेक्षा धार्मिक अस्मितेची भुरळ पडताना दिसते आहे. त्यामुळे गत चार-साडेचार वर्षांच्या काळात झालेल्या विकास प्रकल्पांची, लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीची अवस्था काय व कशी आहे? हे बघायलाच कोणी तयार नाही. या सरकारच्या कर्तृत्वाचे मोजमाप, यशापयशावर साधकबाधक चर्चा होण्याच्या शक्यताच दिसून येत नाहीत.

आर्थिक विकासाचे दावे करताना सत्ताधाऱ्यांकडून संख्याशास्त्राचा आधार घेतला जातो वा आकडेवारी उद्घृत केली जाते. राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची नावे पुन:पुन्हा तोंडावर फेकली जातात. पण किती लोकांच्या जगण्यात सकारात्मक परिवर्तन आले?, किती जणांची जीवनशैली उंचावली? याबाबत व्यवस्थितरीत्या चर्चा होणे संभवतच नाही. विरोधकांनाही त्यात फारसे स्वारस्य असल्याचे दिसत नाही. अन्यथा गत आठवड्यातल्या  राजधानी दिल्लीतल्या दोन महत्त्वपूर्ण घडामोडींकडे असे दुर्लक्ष झाले नसते. अयोध्येत राममंदिर उभारणीची घाई झालेल्या मंडळींनी आयोजित केलेल्या शक्तिप्रदर्शनाकडे जनसामान्यांनी केलेले सपशेल दुर्लक्ष आणि शेतकऱ्यांनी संसदेवर काढलेला मोर्चा या त्या दोन संवेदनशील घटना आहेत.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दीडपटीने वाढ करण्याचे सरकारचे आश्वासन किती फसवे आहे याचा पुरावा म्हणून एका कांदाउत्पादक शेतकऱ्याने कांद्याचे पैसे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले आहेत. जगाच्या पोशिंद्याला उपाशी ठेवून तुम्हाला धर्म कसा जोपासता येणार आहे? मुळात हे तुमच्या राजधर्माला शोभून दिसणारे आहे का? हा सवाल कोणीतरी या सरकारच्या कानावर घालायलाच हवा. पिकवण्यासाठी घातलेले पैसेही उत्पन्नातून निघत नसतील तर सरकारचे  किमान आधारभूत मूल्याचे अवडंबर किती पोकळ स्वरूपाचे आहे याचा आणखी कोणता पुरावा द्यायला हवा आहे? जनतेला आता तुमच्या धार्मिक अस्मिता कवटाळण्याच्या चालीरीती पुरत्या उमगलेल्या आहेत. तुमची दैवते कोणती, तुमचे गोत्र कोणते असल्या भाकडकथांनी देश प्रगती कधीच करत नसतो.

मंदिरातल्या रामापेक्षा जनतेच्या आयुष्यातला, त्यांच्या जीवनशैलीतला राम जागा करण्याची जबाबदारी अधिक महत्त्वाची नाही का? राजधानीत धडकलेल्या शेतकऱ्यांनी सरकारला हे सांगूनही राजकीय पक्षांनी आपला अजेंडा बदललाच नाही तर येत्या निवडणुकीत या लोकांना वनवासात धाडण्याची शक्यता अधिक आहे. लोकांचे आणि स्वत:चे धर्म उगाळत बसण्यापेक्षा नियत कर्तव्ये पार पाडावीत, राजधर्माचे प्रामाणिक पालन करावे हेच उत्तम नाही काय?

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......