अनंतराव भालेराव : कैवल्यदानी संपादक
पडघम - माध्यमनामा
प्रवीण बर्दापूरकर
  • ‘मराठवाडा’ या दैनिकाचे संस्थापक संपादक अनंतराव भालेराव, कुसुमाग्रज आणि गोविंदराव तळवलकर
  • Sat , 17 November 2018
  • पडघम माध्यमनामा दैनिक मराठवाडा Marathwada अनंतराव भालेराव Anantrao Bhalerao

आता अस्तंगत झालेल्या ‘मराठवाडा’ या दैनिकाच्या मराठी पत्रकारितेवर आजही प्रभाव असणार्‍या अनंतराव भालेराव यांचं जन्मशताब्दी वर्ष १४ नोव्हेंबर रोजी सुरू झालं. भालेराव हे महाराष्ट्रात सर्वदूर घट्ट पाळंमुळं पसरलेले केवळ मूल्यनिष्ठ, अबोल, धाडसी, बहुपेडी संपादक-लेखक नव्हते, तर तो एक सर्वव्यापी संस्कार आहे, अशी ठाम धारणा असणार्‍या पिढीचा मी प्रतिनिधी आहे. जन्मशताब्दीनिमित्त प्रकाशित होणार्‍या अनंतराव भालेराव स्मृतिग्रंथातील हा लेख.

.............................................................................................................................................

तसं पाह्यला गेलं तर मी काही अनंतराव भालेराव स्कूल म्हणा की विद्यापीठाचा, विद्यार्थी नव्हे. पण, ‘मराठवाडा’ दैनिकाचा पहिला अंक मला आठवतो आणि तेव्हाच्या न कळत्या वयापासून अनंतराव नावाचा एक संस्कार माझ्यावर होत गेलेला आहे.

माझी आई नर्स होती. तिची नियुक्ती वैजापूर तालुक्यातील खंडाळा या गावी झालेली होती. कुंभार आळीत एका दीड खणाच्या खोलीत माझी आई म्हणजे माई आणि तिचे आम्ही दोन मुलगे राहत होतो. माई विधवा होती आणि महत्त्वाचं म्हणजे देखणी होती. आता नेमकं नाव आठवत नाही, पण गावातला एक पुढारी वारंवार आणि वेळी-अवेळी आमच्या घरी येत असे. तेव्हा मी आठवीत होतो आणि नेमकं काही कळण्याचा वय नव्हतं, पण त्याच्या येण्यानं माईला विलक्षण त्रास होतोय हे कळत होतं. गावात आम्ही नवीन होतो. कोणाकडे जावं आणि बोलावं हे काही उमजत नव्हतं. एक दिवस मी कोणत्या तरी तिरीमिरीत तेव्हा ‘मराठवाडा’चे संपादक असलेल्या अनंतराव यांना एक पत्र लिहिलं आणि ही आपबीती सांगून ते  पत्र प्रकाशित करण्याची विनंती केली. त्या माणसाची सॉलिड बदनामी व्हावी; पर्यायानं त्यानं आमचा नाद सोडावा, हा माझा ते पत्र प्रकाशित होण्याची विनंती करण्यामागचा बाळबोध-पांढरपेशा-सदाशिवपेठी हेतू होता. अवघ्या पाच-सात दिवसांतच तो माणूस घरी आला आणि त्यानं माईची सपशेल माफी मागितली. ‘अण्णांच्या भावकीत आहात हे आधीच का सांगितलं नाही ?’ अशी त्याची तक्रार होती. मग कळलं, अण्णा म्हणजे ‘मराठवाडा’ दैनिकाचे संपादक असलेले भालेराव; त्यांना ‘अण्णा’ म्हणत असावेत असा अंदाज ‘त्या’ माणसाच्या बोलण्यातून आला आणि खंडाळा हे भालेराव यांचं गाव आहे. नंतर त्यांचं एक पत्रही आलं. त्या गावात असेपर्यंत कोणीही आमच्या घराकडे वाकडी नजर करून पाहिलं नाही.

पुढच्या औरंगाबाद चकरेत मी थेट ‘मराठवाडा’ कार्यालय गाठलं अनंत भालेराव यांना भेटलो. ‘तुम्ही तक्रार छापली नाही, पण आम्हाला दिलासा मिळाला’, हे सांगून टाकलं! ते काही आमच्या जवळ किंवा दूरू-दूरच्याही नात्यात नव्हते. त्याच अस्पष्ट भेटीत त्यांना ‘अण्णा’ म्हणतात, हे मला स्पष्टपणे कळलं. अण्णा जे काही बोलले, तेव्हा ते मला काही कळलं नाही. माझं ते वयही नव्हतं. प्रत्येक तक्रार बातमी नसते, पण त्या तक्रारीचं निवारण हळुवारपणे कसं करायचं हा पत्रकारितेतला माझ्यावर नकळत झालेला पहिला संस्कार, हा असा आहे. नंतरही मी त्यांना अधूनमधून भेटत असे. माझी काही पत्रंही त्याकाळात ‘मराठवाडा’त प्रकाशित झालेली आहेत. आयुष्याच्या प्रवासात नंतरही अनंतराव भालेराव असेच कुठे-कुठे भेटत गेले आणि न बोलता संस्कार करत राहिले आणि त्यांचं अस्तित्व महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात किती ठळक आहे दिसलं.

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

नंतरच्या काळात भालेराव यांचा मुलगा निशिकांत याची भेट झाली. तीही औरंगाबादेत नव्हे तर दिल्लीत. त्यावेळी तो दिल्लीत पत्रकारितेचा अभ्यास करत होता. नेहरु युवक केंद्र, औरंगाबाद यूथ सेंटरमध्ये मी सक्रिय होतो. पद्माकर खेकाळे, उल्हास गवळी यांच्यामुळे माझी तिकडे लुडबूड सुरू होती. याच लुडबुडीचा एक भाग म्हणून मी दिल्लीला विश्व युवक केंद्राच्या एका कार्यक्रमासाठी गेलो आणि निशिकांतची भेट झाली. पहिल्याच भेटीत आमची झालेली दोस्ती अजूनही टवटवीत आहे. त्या काळात एक वेळ जेमतेम जेवता येईल एव्हढ्या पगारात नेहरु युवक केंद्रात अर्धवेळ ग्रंथपाल म्हणून काम करत माझा जगण्याचा संघर्ष सुरू होता. नंतर तेव्हाच्या बांधकाम आणि इमारत खात्यात रोजंदारीवर लागलो. आकाशवाणीचं केंद्र औरंगाबादला  सुरू झाल्यावर आकाशवाणीवरील एक अधिकारी वसंतराव देशपांडे यांनी छोट्या-मोठ्या असाईनमेंट द्यायला सुरुवात केली. त्यातून आपल्याला लिहिता येतं हा विश्वास आला.

पण , इथं एक गोची होती. त्या काळात औरंगाबादला कुठंही गेलं की, ‘ज. रा. बर्दापूरकरांचा तू कोण?’, हा प्रश्न समोरून  हमखास येत असे. ज. रा. बर्दापूरकर यांचं मुद्रितमाध्यम आणि ‘मराठवाडा’ दैनिकातील योगदान मोठं होतं. औरंगाबादला राहिलो तर या क्षेत्रात त्यांचं नाव ओलांडून आपण जाऊच शकणार नाही याची खात्री पटत गेली आणि त्यामुळे मी वैतागलेलोही होतो. त्यातच आणीबाणीत काही तरी छोटी-मोठी आगळीक घडली आणि कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष असलेले तत्कालिन डी.आय.जी. राममूर्ती यांनी असोसिएशनच्या सचिव असलेल्या आस्मादिकांना दम भरला. मी वसंतराव देशपांडे यांना गाठलं. त्यांनी ‘गोमंतक’चे तेव्हा संपादक असलेल्या माधव गडकरी यांना पत्र दिलं आणि मी थेट गोव्यात जाऊन पणजी गाठलं. तो माझा पत्रकारितेतला उदय होता!     

यंत्र तसंच तंत्रज्ञान आणि बंधनं या दृष्टिकोनातून तो काळ माध्यमांसाठी प्रतिकूल होता. आजच्या पिढीचा विश्वास बसणार नाही, पण फोन सहज मिळणे लांबच, सर्वत्र दिसतही नव्हता आणि पेजर, सेलफोन तर भारताच्या दृष्टिक्षेपात नव्हते. दळणवळण कठीण होतं. संगणक, फॅक्स, इंटरनेट काहीच नव्हतं. अन्य गावातील वृत्तपत्रे पोस्टाने येत. पणजी , मग कोल्हापूर, सातारा, चिपळूण आणि नागपूर या माझ्या प्रवासात मी ज्या-ज्या वृत्तपत्रांत नोकरी केली, तिथं पोस्टानं येणारा ‘मराठवाडा’ दैनिकाचा अंक ही माझी मानसिक गरज बनली. माझी त्यामुळे ‘मराठवाड्या’शी जुळलेली नाळ राहायची. ‘मराठवाडा’ दैनिक वाचायला मिळालं की घरापासून लांब आल्याचा सुरुवातीचा होमसिकनेस काहीसा दूर पळत असे. या होमसिकनेसबाबत नंतर घर सोडून आलेले सगळे होतात तसा मी निगरगट्ट झालो. पण, त्या काळात ‘मराठवाडा’ आणि ‘संचार’ या दैनिकांचे अंक सर्वांना सहज प्राप्त होत नसत. आलेलं टपाल प्रथेप्रमाणे आधी संपादकाकडे जात असे आणि ‘मराठवाडा’ तसंच ‘संचार’चे पोस्टाने आलेले अंक ते काढून घेऊन उर्वरित टपाल वृत्तसंपादकाकडे पाठवत. संपादकांनी ते अंक बघितले की, साधारणपणे अग्रलेख लिहिणारे सहाय्यक संपादक, वृत्तसंपादक, रविवार पुरवणीचे संपादक अशा क्रमाने हे अंक फिरत आणि मग इतरांसाठी ते उपलब्ध होत.

‘मराठवाडा’ आणि ‘संचार’ या दैनिकांत आलेल्या अग्रलेखाशी आपल्या दैनिकाचा अग्रलेख ताडून पाहिला जात असे. विशेषत: ‘मराठवाडा’ दैनिकातील अग्रलेखाशी स्वत:च्या मजकुराची सहमती झाली की, संपादक स्वत:वर जाम खूष असत. मी तर केवळ मराठवाड्यातला होतो, पण नागपुरात असताना हरिहर येगावकर, शांताराम बोकील, शंकरराव बेदरकर, रमेश राजहंस ही मंडळी अनेकदा ; मी जणू काही अण्णांचा कोणी प्रतिनिधी आहे, अशा अविर्भावात ‘मराठवाडा’च्या अग्रलेखात व्यक्त झालेल्या मतांशी त्यांची झालेली सहमती आवर्जून शेअर करत. ‘मराठवाडा’तील म्हणजे भालेराव यांची आणि आपली मतं कशी सारखी आहेत याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेणं हा तत्कालिन महाराष्ट्रीय वृत्तपत्रसृष्टीचा स्थायीभावच झालेला होता, इतका भालेराव आणि ‘मराठवाडा’ दैनिकाचा अनेकांना स्वाभाविकच असूया वाटण्यासारखा दबदबा होता.

यात माझा स्वार्थ म्हणजे मला हे अंक लवकर मिळत. शिवाय अशी मतं जुळल्यामुळे हे सिनियर स्वत:वर बेहद्द खुश होत. त्यामुळं अनेकदा माझी चहा-विडीकाडी सुटत असे! नागपूर पत्रिका, तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स अशा सर्वच वृत्तपत्रांतील सिनियर्स तेव्हा नव्यानं भरती झालेल्यांना ‘जरा अनंत भालेरावांचे अग्रलेख वाचा म्हणे पत्रकारिता काय असते ते कळेल’, असा पत्रकारितेचा पहिला धडा देत असत.

सुरेश द्वादशीवार यांच्यासोबत मी विदर्भ साहित्य संघ आणि ‘लोकसत्ता’च्या नागपूर आवृत्तीत प्रदीर्घ काळ काम केलं. अर्थात द्वादशीवार मला सिनियर आणि राज्याच्या सांस्कृतिक तसंच साहित्य संस्थांच्या राजकारणात त्यांचं नाव मोठा दबदबा असणारं, पण  भालेराव आणि नरहर कुरुंदकर हा आमच्या अधिकृत सिनियर-ज्युनिअर सहकारी आणि अनधिकृत अकृत्रिम स्नेहशील मैत्र आजवर असण्यातला कायम दुवा राहिला.

औरंगाबाद सोडल्यावर पणजी, कोल्हापूर, सातारा, चिपळूण, नागपूर, मुंबई आणि दिल्ली असा माझा पत्रकारितेच्या निमित्तानं प्रवास झाला. या सुमारे पावणेचार दशकाच्या प्रवासात मी अण्णांच्या जमेल तसा आणि जमेल तेव्हढा संपर्कात राहिलो. मी त्यांच्या खास वर्तुळात नव्हतो, त्यांचा उजवा किंवा डाव हात तर मुळीच नव्हतो, त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला कधी मिळाली नाही; औरंगाबाद सोडून मी ती संधी घालवली असंही म्हणता येईल. ‘मराठवाडा’ या दैनिकासाठी मी अधिकृतपणे कधी कामही केलं नाही. निशिकांत भालेराव ‘मराठवाडा’त रुजू झाला, दरम्यान राजीव गांधी-पित्रोदा जोडीने संवाद साधनं सुलभ केलं. मग विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात किंवा नागपूर-विदर्भात काही महत्त्वाचं घडलं तर निशिकांतचा फोन येत असे आणि ती बातमी मी बिनदिक्कतपणे ‘मराठवाडा’शी शेअर करत असे. ‘मराठवाडा’तून निशिकांत वेगळा झाला तरी. ‘मराठवाडा’तून कोणा-न-कोणाचा फोन येतच राहिला. नागपुरात मी नागपूर पत्रिका, अल्पकाळ तरुण भारत व युगधर्म आणि मग लोकसत्ता या दैनिकात प्रदीर्घ काळ नोकरी केली पण, त्यापैकी एकाही दैनिकाच्या वरिष्ठांनी कधी ‘मराठवाडा’शी बातमी/माहिती का शेअर करतो म्हणून टोकलं नाही; हा अनंत भालेराव नावाच्या संपादकाचा महाराष्ट्रावर असणारा प्रभाव होता आणि या प्रभावाला मी ‘अण्णा’ असं घरगुती नावानं संबोधतो याचं अप्रूप या माझ्या सर्वच वरिष्ठांना होतं!

औरंगाबादला चक्कर झाली की, मी आधी फोन करून एकदा तरी अण्णांना भेटायला जात असे. एक काळ असा होता की, सन्मित्र कॉलनीत जाणं प्रतिष्ठेचं समजलं जात असे. ब्रिटनला जाऊन शेक्सपिअरच्या घराला भेट देणं, ऑस्ट्रियात साल्झबर्गला जाऊन मोझार्टच्या घरी जाऊन माथा टेकवून येणं, वॉशिंग्टनला जाऊन व्हाईट हाऊस बघणं हे जितकं सहज; तशीच भावना औरंगाबादला आल्यावर सन्मित्र कॉलनीतील अण्णांच्या घरी किंवा मराठवाडा कार्यालयात जाताना माझ्या मनात असे, नेमकी हीच भावना अनेकांनी अण्णांचा विषय निघाल्यावर महाराष्ट्रातील बोलून दाखवलेली आहे. 

अशा एका भेटीची आठवण माझा मनात कायम घर करून आहे. कारण त्या आठवणीची नाळ अण्णांच्या साधेपणा आणि निर्मोहीपणाशी जोडली गेलेली आहे. ही बहुदा १९८७ची घटना आहे. तडजोड न करण्याच्या स्वभावाला शोभेल अशा पद्धतीनं ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाचा तडकाफडकी राजीनामा देऊन मी रस्त्यावर आलेलो होतो... त्यामुळे सुरू असलेल्या परिणाम निराकरणाचा एक भाग म्हणून चरितार्थासाठी ‘सकाळ’ या दैनिकासाठी स्वत: तर ‘लोकसत्ता’ या दैनिकासाठी पत्नी-मंगलाच्या नावे नागपूरचा वार्ताहर म्हणून काम करत होतो. शिवाय कामगार नेते वसंत लुले यांचा ‘चर्चा’ या दिवाळी अंकाचा मदतनीस आणि इतर ‘छुटपूट’ उद्योग सुरू होते. हे सुरू असतानाचा मित्रवर्य आणि काँग्रेसचे नेते, तत्कालीन खासदार विलास मुत्तेमवार यांच्या मालकीच्या ‘जनवाद’ हा दिवाळी अंक संपादित करण्याची ऑफर आली. मुत्तेमवार पत्रकारितेतून राजकारणात आलेले होते आणि गांधी कुटुंबियांशी त्यांचे निकटचे संबंध होते. अत्यंत गाजावजा करत त्यांनी ‘जनवाद’ हे दैनिक सुरू केलेलं होतं. लेटर-हेड ते दिवाळी अंक अशा सर्वच ठिकाणी संपादक म्हणून माझं नाव सर्वांत वर राहील, अंकाचा विषय तसंच लेखक मी ठरवेन आणि त्यात विद्यमान संपादक तर सोडाच, पण मालक म्हणजे खुद्द विलास मुत्तेमवार यांचा किंचितही हस्तक्षेप चालणार नाही; या माझ्या अटी मुत्तेमवार यांनी दिलदारपणे मान्य केल्या. लेख मागतानाच लेखकाला मानधनाचा धनादेश देण्याचीही माझी अट मान्य करताना विलास मुत्तेमवार यांनी एका बँकेतील स्वत:च्या खाजगी खात्याचं स्वाक्षरी केलेले कोरे पन्नास धनादेश माझ्या स्वाधीन केले. लेखकाला समक्ष भेटून लेख मागण्याच्या मोहिमेवर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालो, मजल-दरमजल करत औरंगाबादला पोहोचलो. अण्णांना एक दिवस सकाळी भेटलो. लेख देण्याची विनंती केली. विषय वगैरे ठरल्यावर दोन दिवसांनी लेख देण्याचं अण्णांनी मान्य केलं . मी मोठ्या ऐटीत ५०० रुपयांचा धनादेश एका पाकिटात घालून अण्णांना दिला आणि बाहेर पडलो. तेव्हा ५०० रुपये ही रक्कम मोठी होती, पण नियोजनाप्रमाणे ‘स्टार’ लेखकाला तितकं मानधन देण्याचं मी ठरवलेलं होतं. मजकुराबाबत एकदा बोलणं अंतिम झाल्यावर त्याप्रमाणे मी विलास मुत्तेमवार यांच्या सहीचे धनादेश देत होतो. 

औरंगाबादेतल्या जुन्या दोस्त-यारांना भेटण्यात उंडरून ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी लेख घ्यायला गेलो, तेव्हा अण्णांनी लेख तर दिलाच, पण ‘इतकं मानधन खूपच होतंय’, असं म्हणत तो धनादेशही परत केला. शिवाय माझ्याकडून मानधन घेण्यासच नकार दिला. मी खूप विनवण्या केल्या पण, त्यांनी ते मानधन घेतलंच नाही. ‘टचवुड’ सांगतो ; गेल्या सुमारे पावणे चार दशकांच्या पत्रकारितेत इतक्या संपादकांना भेटलो, साहित्य बीट कव्हर करण्याच्या आणि असंख्य  दिवाळी अंक संपादित करण्याच्या निमित्तानं असंख्य अस्सल साहित्यिक तसेच अनेक ‘लेखकरावां’नाही भेटलो, पण दिलेलं मानधन जास्त आहे असं सांगून ते परत करणारे अण्णा हे माझ्या आयुष्यातील एकमेव संपादक आणि लेखक! निरोप घेताना तेव्हा त्यांच्या पाया पडलो, तेव्हा माझ्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या होत्या.

अण्णांचं व्यक्तिमत्त्व तसं खडबडीत, खरं तर काहीसं राकटच. वेशभूषाही बेतास  बात. कपडे कायमच धुवट. पण अण्णांच्या डोळ्यात एक आश्वासक ममत्व जाणवायचं. हा माणूस कोणाला रागवेल, पण त्याचं काही बुरं करणार नाही याची खात्री अण्णांच्या डोळ्यात बघितलं की मिळायची. हा माणूस खडबडीत दिसतोय,  पण तो कपटी, कारस्थानी नाही हे लगेच जाणवायचं. डोळ्यातून असं ममत्व ओसंडणारी माणसं भेटली की प्रेमाचं एक अख्खं गाव मुक्कामासाठी भेटल्यासारखा आधार कायम वाटतो. अण्णांना भेटलं की अगदी ‘सेम-टू-सेम’ तस्संच वाटायचं. मराठी भाषेलाही अण्णांच्या मनात असलेलं हे ममत्व खूपच भावलेलं असावं. म्हणूनच राग व्यक्त करताना किंवा विरोध करतानाही अण्णांचे शब्द ‘अंगार’ बनलेले दिसत नाहीत. सौम्य भाषेतला विरोध किती ठाम तसंच सात्त्विक असतो आणि सात्त्विकतेच्या तेजाला समोरचा आपसूक शरण कसा जातो, याची प्रचीती अण्णांच्या भाषेतून येते. ही प्रासादिक आणि मनाचा ठाव घेणारी साधी भाषा हे अण्णांचा बलस्थान होतं असंच मला  वाटतं. भाषेच्या बाबतीत भालेराव हे कैवल्यदानी संपादक होते, असा प्रत्यय कायमच आलेला आहे!

एखाद्या माणसाचं कर्तृत्व आणि ऊंची समजण्यासाठी आपल्या आकलनाची खोली डोहखोल असावी लागते हे मला राजकीय आणि विधिमंडळ वार्ताहर म्हणून वावर सुरु झाला तेव्हा समजलं. भालेराव नावाच्या संपादकाची किंमत आणि विश्वासार्हता किती लखलखीत, घनगर्द आणि विस्तारलेली आहे हे सत्तेच्या दालनात वावरतांना उमजलं. अनंत भालेराव नावाचा प्रभाव आणि त्यांच्या धवल प्रतिमेच्या गडद छायेत जणू मराठी पत्रकारिता यथेच्छ बागडत असण्याचा तो काळ होता. त्यांच्यानंतर अशी घनगर्द आश्वासक-गडद-शीतल छाया देणारा वृक्षच मराठीच काय महाराष्ट्राच्या अन्य भाषक पत्रकारितेच्या प्रांगणात बहरला नाही. मराठवाड्याचा कल काय आहे ही जाणून घ्यायचं असेल तर ‘मराठवाडा’वाचा’, असं राजकारण, प्रशासन आणि संस्कृतिक वर्तुळात राज्याच्या कानाकोपऱ्यात आवर्जून सांगितलं जाई. (अशीच प्रतिमा आणि विश्वासाहर्ता सोलापूरच्या रंगाअण्णा वैद्य म्हणजे दैनिक ‘संचार’ आणि चिपळूणच्या निशिकांत उपाख्य नानासाहेब जोशी म्हणजे दैनिक ‘सागर’च्या बद्दलही होती!)

गांधीवादी, सर्वोदयी, समाजवादी तसेच पूर्ण वेळ काम करणाऱ्या रचनात्मक तसेच पुरोगामी कार्यकर्त्यात तर ‘औरंगाबादला जायचंय नं? काळजी कशाला करतोस? जा, थेट ‘मराठवाडा’ कार्यालय गाठ. अनंतरावांना भेट. सगळं मार्गी लागेल!’  असा विश्वास बिनदिक्कत दिला जात असे. ‘आणि ते नसलेच तिथे तर?’ असा भाबडा प्रश्न समोरून आलाच क्वचित तर, ‘कोणी ना कोणी सापडेलच मराठवाडात. काही काळजी करू नकोस’, असा दिलासाही हमखास मिळत असे. दोन मराठवाडेकर मराठवाड्याबाहेर एकमेकाला भेटले की, त्यांच्या बोलण्यात ‘आंबेजोगाई’च येणार, ‘अंबाजोगाई’ नाही... अगदी तस्संच दोन-चार मराठवाडेकर मंत्रालयात किंवा अन्य कुठे भेटले आणि राजकारणावर बोलू लागले की, ‘अण्णांचा मराठवाडा म्हणतुया नं मग बरुबरच असणार,’ हे प्रमाणपत्र दिलं जाण्याचा अनुभव सार्वत्रिक असे. बोलणारे मराठवाडेकर शहरी किंवा ग्रामीण ; जसे असतील तसा फक्त भाषेचा बाज बदलणार! औरंगाबादेत मुक्कामाला असणारे नोकरदार शनिवारी मुंबई-नागपूरला जाताना रात्रीच्या बसमध्ये बसण्याआधी तिकडच्या मराठवाडेकरासाठी ‘कावड’ हा अण्णांचा स्तंभ असलेला ‘मराठवाडा’चा अंक आवर्जून सोबत घेणार, हाही अण्णा आणि ‘मराठवाडा’ दैनिकावर असणाऱ्या अस्सल लोभाचा एक भाग असे. पत्रकारितेच्या आणि अन्य निमित्तानंही महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात फिरलो, पण अशी आचंबित करणारी लोकप्रियता वाट्याला आलेले अनंत भालेराव यांच्यासारखे दुसरे संपादक आणि ‘मराठवाडा’ दैनिक माझ्या पिढीनं पहिले नाहीत.           

विद्यापीठ नामांतराच्या काळातही मराठवाड्याबाहेर हीच भावना कायम होती. ‘अनंतरावांना नामांतर मान्य नाही हे खरं, पण त्याचा अर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी त्यांच्या मनात द्वेष आहे किंवा अनंतराव जातीयवादी आहेत असं मुळीच नाही असं’, एका मुख्यमंत्र्यानी नाव उघड न करण्याच्या अटीवर एकदा सांगितलं होतं. ‘तुम्ही हे बोलायला हवं’, असा आग्रह मी धरला तेव्हा, ‘हे बोलण्याची राजकीय वेळ ही नाही’, असा बचावात्मक पवित्रा या पुढार्‍यानं घेतला होता.

आता एक कबुलीजबाब या लेखाच्या निमित्तानं देतो- नामांतराच्या मुद्द्यावरून अण्णांविषयी आपण असहिष्णुता आणि असंस्कृतपणा दाखवला असं मला तरी अलीकडे वाटतंय. नामांतराच्या मागणीला माझा पाठिंबा होता. हा ठराव विधिमंडळात संमत झाला, तेव्हा मी कोकणात-चिपळूणला निशिकांत जोशी संपादक असलेल्या ‘सागर’ या दैनिकात होतो आणि मला पत्रकारितेत येऊन जेमतेम तीन/चार वर्षं झालेली असावीत. तेव्हाही नामांतराच्या बाजूनं मी हिरिरीनं लिहित-बोलत होतो. पण , सारासार विवेकानं मतं ठाम करण्याची मानसिक जडणघडण होण्याचा तो माझ्या आयुष्यातला काळ होता. त्यामुळे अण्णांचा तेव्हाचा नामांतराला असलेला विरोध मला नीट समजला होता , असं वाटत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला विरोधाचा, प्रतिवादाचा हक्क असतो आणि त्याचा आपण आदर करावा ही प्रगल्भता तोपर्यंत माझ्यात विकसित झालेली नव्हती. त्यामुळे मीही अण्णांच्या विरोधी गटात गेलो आणि त्यांना दूषणं दिली. ती माझ्यातली अकारण म्हणा की अजाणतेपणी आलेली, असहिष्णुताच होती, तो असंस्कृतपणाच होता . एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाविषयी एखाद्यानं विरोधाचा सूर काढला की, त्याला ‘जातीयवादी’ ठरवून मोकळं होणं, ही अध:पतनाची मुलभूत प्रक्रिया आहे, हे मला तेव्हाच समजायला हवं होतं, असं राहून-राहून वाटतं.

आता तर, समाजात असहिष्णुता आणि असंस्कृतपणा म्हणजेच विचारसरणी असं मानणारा हुच्चपणा फोफावला आहे. या पार्श्वभूमीवर अनंत भालेराव नावाचा मूल्यगर्भ संस्कार तसंच तत्कालिन ‘मराठवाडा’ नावाच्या दैनिकाची गरज किती तीव्र आहे याची जाणीव नव्यानं सततच होत असते. अर्थात या जाणीवेला उडण्यासाठी पंख नाहीत, रुजण्यासाठी जमीन नाही आणि अनंत भालेराव यांच्यासारखं नेतृत्व नाही...

.............................................................................................................................................

ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी संपादित केलेल्या आणि नांदेडच्या अभंग प्रकाशनाच्या वतीनं लवकरच प्रकाशित होणार्‍या या स्मृतिग्रंथाच्या नोंदणीसाठी संजीव कुळकर्णी यांच्याशी ९८२३१२५३४३ या क्रमांकावर संपर्क साधावा.

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......