सर्वोच्च, स्वागतार्हही!
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • सर्वोच्च न्यायालयाने व्याभिचार, आधार, नोकरीतील बढती आणि समलैंगिकतेविषयी एेतिहासिक असे निकाल दिले आहेत
  • Sat , 29 September 2018
  • पडघम देशकारण सर्वोच्च न्यायालय Supreme Court व्याभिचार Adultery विवाहबाह्य संबंध Extramarital Affair समलैंगिकता Homosexuality नोकरीतील बढतीत आरक्षण Reservation in Promotion आधार Aadhaar

देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या विरोधात कथित बंड पुकारून मोठं वादळ उभं केल्याचा आव आणि त्यात राजकीय तेल ओतलं जाण्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. त्याच सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं गेल्या आठवड्यात काही महत्त्वपूर्ण निवाडे दिले आहेत. एवढंच नाही तर तत्पूर्वी त्या कथित बंडात सहभागी झालेल्या एकाची आपला उत्तराधिकारी म्हणून शिफारस त्याच सरन्यायाधीशांनी केलेली आहे. हे निवाडे आणि ती शिफारस लक्षात घेता, त्या कथित बंडाची हवा फुसकी होती, तसंच त्या बंडाच्या सुप्त राजकीय हेतूंबद्दल, तेव्हा उपस्थित झालेल्या काही शंकांवर शिक्कामोर्तब झालेलं आहे.

न्याययंत्रणेची विश्वासार्हता, पावित्र्य, नि:क्षपातीपणा केवळ काहींच्या हाती सुरक्षित असून न्यायनिवाडा करणारे इतर सर्व सरकारचे बाहुले झालेले आहेत आणि या खटल्यांच्या निवाड्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं वातावरण निर्माण करणाऱ्यांचा या शिफारस व निवाड्यांमुळे मुखभंग झाला आहे. पुढच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती करताना सेवाज्येष्ठता डावलली जाणार, हा काँग्रेसच्या काही वकील नेत्यांकडून झालेला कांगावा तर भीतीपोटीच होता, असंही आता म्हणता येईल, कारण अशी ‘डावला-डावली’ कशी करतात, हे काँग्रेसला चांगलं ठाऊक असल्यानंच त्यांच्या पोटात हा भीतीचा गोळा उठला असावा.     

‘आधार’ची वैधता आणि शासकीय सेवातील बढत्यात आरक्षणाच्या संदर्भात नुकतेच आलेले सर्वोच्च न्यायालयीन निवाडे कोणाही संवेदनशील न्यायाधीशाकडून जसे अपेक्षित होते, तसेच आले आहेत. त्या निवाड्यांच्या संदर्भात ज्या प्रतिक्रिया राजकीय पक्षांकडून आलेल्या आहेत, त्या फार काही गंभीरपणे घेण्याच्या लायकीच्या नाहीत. कारण आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांत सत्तेत असताना आणि नसताना कसं बेताल वागायचं या संदर्भात राष्ट्रीय मतैक्य आहे!

याचं चपखल उदाहरण वस्तू आणि सेवा कराचं आहे. जीएसटीची तयारी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील युपीएच्या काळात झाली, त्या करप्रणालीचा तो किचकट महामसुदाही त्याच काळात तयार झाला आणि तो अंमलात आणण्यास तेव्हा विरोधी पक्षात असणार्‍या भाजपनं ठाम विरोध केला. जीएसटीची आकारणी सरळ आणि सुलभ असावी अशी तेव्हा भाजपची मागणी होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत सत्तेत आल्यावर विरोधी पक्षात असतानाचा विरोध बासनात गुंडाळून ठेवून भाजपनं जीएसटी लागू केला आणि सत्तेतून विरोधी पक्षात आलेल्या काँग्रेसनं त्याला विरोध केला. जीएसटीची आकारणी सरळ आणि सुलभ असावी अशी आता काँग्रेसची मागणी आहे! आपल्या  देशातील राजकीय पक्षांना त्यांचा राजकीय अजेंडाच कसा महत्त्वाचा आहे, याचं हे मासलेवाईक उदाहरण आहे. त्यामुळे आधार आणि बढत्यातील आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वच राजकीय पक्षांनी त्यांचा ‘राजकीय बाणा’ सोडला नाही, यात आश्चर्य काहीच नव्हतं.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा पोलिसात किंवा तो खटला न्यायालयात दाखल असलेल्या म्हणजे कलंकित असलेल्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात यावी, सबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश, समलैंगिकता आणि व्यभिचाराच्या पुनर्व्याखेच्या संदर्भात अशात सर्वोच्च न्यायालयाकडून आलेले निवाडे ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आहेत. जास्त महत्त्वाचं म्हणजे ते देताना न्यायसंस्थेनं समतेला न्याय्य झुकतं माप देण्याचं दाखवलेलं भान फारच प्रशंसनीय आहे, यात शंकाच नाही. संसद ‘कायदे मंडळ’ आहे म्हणूनच संसदेला डावलून कलंकित उमेदवारांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यासंबंधी थेट आदेश देण्याचं टाळण्याचा जो समंजसपणा सर्वोच्च न्यायालयानं दाखवला, त्यामुळे संसद विरुद्ध न्याययंत्रणा हा संभाव्य संघर्ष टाळला, ते मला तरी फारच भावलं.

मात्र असं करताना कलंकित उमेदवार हा लोकशाहीला लागलेला रोग असल्याचं सुनावण्याचा परखडपणाही न्यायालयाकडून दाखवला गेला, तसंच त्या संदर्भात कायदा करण्याचं काम संसदेचं असल्याचं स्पष्टपणे सूचित केलं गेलं आहे. कायदे मंडळ कायदे करणार, ते लोकांनी पाळावे, नाही पाळले तर प्रशासनानं त्यावर नजर ठेवावी आणि कायदे न पाळणाऱ्यांना न्यायालयानं शिक्षा करावी, अशी आपल्या देशातील कारभाराची ढोबळमानानं रचना आहे. त्यात कायदे मंडळ सर्वोच्च आहे, पण त्याचं कोणतंही भान विशेषत: मराठी-इंग्रजी प्रकाश वृत्तवाहिन्यांना नव्हतं. ‘सर्वोच्च न्यायालयाचे संसदेला आदेश’ , ‘...संसदेला निर्देश’ अशा हेडलाईन्स वाहिन्यांनी चालवल्या आणि बौद्धिक तोकडेपणा सिद्ध केला.

एखाद्या तज्ज्ञाचा अपवाद वगळता झालेल्या चर्चांमध्ये सहभागी होणारेही सुमारच होते. एका महाभागानं तर आता आपण ‘नर आणि मादीकडे जातो आहोत’, असा निष्कर्ष काढला. त्या चर्चांमध्ये, विशेषत: समलैंगिकता आणि विवाहबाह्य संबंधांना मान्यता मिळाल्यानं जणू काही भारतीय समाजावर फार मोठा अनाचारी आघातच झालेला असल्याचा काढला गेलेला तो बेसूर होता.     

समलैंगिकतेला मान्यता आणि विवाहबाह्य संबंधांचा मी पुरस्कर्ता नाही, पण विरोधक तर मुळीच नाही. कारण वैयक्तिक (सार्वजनिक नव्हे!) पातळीवर प्रत्येकाला हवं तसं जगण्याचा अधिकार मला मान्य आहे. समलैंगिकतेला मान्यता आणि विवाहबाह्य संबंध गुन्हा न ठरवण्याचे निवाडे तथाकथित संस्कृती रक्षकांना अर्थातच रुचणारे नाहीत. ‘जे मला मान्य नाही, ते संस्कृतीत बसत नाही’ असा बचाव करणारी आपल्या समाजाची आणि त्यातही कथित संस्कृती रक्षकांची रोगट मानसिकता आहे. या मानसिकतेलाच हे संस्कृती रक्षक नैतिकता आणि समाज मान्यता समजतात, हे तर घोर अज्ञानच आहे.

या संदर्भात केंद्र सरकारच्या वतीनं जे काही म्हणणं न्यायालयासमोर मांडण्यात आलं, त्यातून ही रोगट मानसिकता पुन्हा एकदा समोर आलेली आहेच. खरं तर, वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाला त्याच्या मर्जीनुसार जगण्याचा अधिकार आहेच आणि तेच त्याचं स्वातंत्र्य आहे. संस्कृती रक्षकांनी मात्र त्यावर नैतिक/अनैतिक, नैसर्गिक/अनैसर्गिक असे स्टॅम्प मारलेले असून परदेश प्रवासासाठी जसे व्हिसाचे मारलेले अधिकृत स्टॅम्प ग्राह्य धरले जातात, तसेच संस्कृती रक्षकांचे स्टॅम्प समाजाने मान्य करावे, असा अनाठायी आग्रह कायमच केला जातो. समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा तो संकोच असल्याची भूमिका सातत्याने काही मंडळींकडून मांडली जात आहे, मात्र त्याकडे अनैतिक किंवा संस्कृतीबाह्य असं म्हणून दुर्लक्ष केलं गेलं.

न्यायालयीन पातळीवर ही एक प्रदीर्घ लढाई होती आणि त्यात अखेर सर्वच स्तरावर समानता आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारांचा विजय झालेला आहे. त्यांच्या म्हणण्याला सर्वोच्च न्यायालयानं कायदेशीर कोंदणच आता मिळवून दिलेलं आहे. या निवाड्यांमुळे मानवी जगण्यातील नैसर्गिकतेचा तोल ढळेल, संपूर्ण समाजात अनाचार माजेल, अनैतिकता पसरेल असं समजणं हा शुद्ध भाबडेपणा तरी आहे किंवा प्रचंड ढोंगीपणा तरी.

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की, कीर्तन-प्रवचन करून/ऐकून कोणताच समाज पूर्णपणे संत-सज्जन होत नसतो आणि कीर्तन-प्रवचन न करता/ऐकता पूर्ण समाज कधीच बदफैलीही होत नसतो. काही मोजके जण यापूर्वीही समलैंगिक होते आणि समाजात काही प्रमाणात विवाहबाह्य संबंध ठेवणारे होतेच. त्यामुळे या संपूर्ण समाजाची नैतिकता रसातळाला पोहोचलेली नव्हती आणि समाजाचा तोलही बिघडलेला नव्हता. त्यामुळे या निवाड्यांमुळे समाजाच्या जगण्यात सामूहिक स्तरावर काही मोठ्ठे बदल होणार आहेत किंवा अनाचार माजणार आहे, ही भीती व्यर्थ आहे. स्त्री-पुरुष संबंधांकडे कोणत्या तरी दूषित नैतिक/अनैतिकतेच्या नजरेतून बघणारांनी एकदा ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ हा ग्रंथ वाचावा म्हणजे स्त्री-पुरुष संबंधांच्या संदर्भात त्यांचे समज किती भ्रामक आहेत, हे त्यांना समजेल.  

हाजी अली दर्गा असो की सबरीमला मंदिर; कोणत्याही जाती-धर्माच्या कोणत्याही प्रार्थना स्थळी किंवा मंदिरात स्त्रियांना प्रवेश न देण्यात ज्यांना कुणाला नैतिकता, समानता आणि पावित्र्य दिसत असेल ते लोक माणूस म्हणवण्याच्या किमान लायकीचे तरी आहेत का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे आपण प्रत्येक स्त्रीची अप्रतिष्ठा करतो आहोत. जिच्या उदरातून आपला जन्म झालाय त्या आईची अवहेलना करतोय... हे आपण विसरतो आहोत. उद्या एखाद्या मंदिरात जर पुरुषांना प्रवेश बंदी केली वर्चस्वाचे लढे किती तीव्र होतील? खरं तर, या आणि मंदिर प्रवेशाचे असे आणि कोणतेही प्रश्न न्यायालयाकडे न जाऊ देता त्या-त्या पातळीवरच सुटले असते, तर सर्वार्थानं हा समाज सुसंस्कृत, पुरोगामी, प्रगत आणि समता मानणारा आहे, हे सिद्ध झालं असतं.  

हे निवाडे तसं तर बरेच उशीरा आलेले आहेत, पण आले ते धाडसानं आले आणि ते समतेचा गजर करत आलेले आहेत. हे सर्व स्वागतार्ह निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलेले असल्यानं आता तरी या विषयांवरील अ-संस्कृत चर्चा थांबतील अशी अपेक्षा बाळगणं व्यर्थ ठरू नये.  

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 04 October 2018

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर! मी संस्कृतीरक्षक आहे. तुम्ही म्हणता की : >> या निवाड्यांमुळे मानवी जगण्यातील नैसर्गिकतेचा तोल ढळेल, संपूर्ण समाजात अनाचार माजेल, अनैतिकता पसरेल असं समजणं हा शुद्ध भाबडेपणा तरी आहे किंवा प्रचंड ढोंगीपणा तरी. >> इथे एक निरीक्षण नोंदवावंसं वाटतं. ते म्हणजे वायमर जर्मनीत १९२० नंतर समलैंगिक पुरुषांची अक्षरश: नरकपुरी माजली होती. हिटलरने त्यांना गोळा करून यमसदनी धाडलं. त्यामुळे सामान्य जर्मन माणसाचा हिटलरला पाठींबा लाभायला मदत झाली. मी इंग्लंडमध्ये जिथे राहतो ते ब्रायटन नामे ठिकाण गे लोकांचे नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे. गे पुरुषाचे आरोग्याचे प्रश्न बरेच जटील असतात. जरा इथे नजर टाका : https://www.mayoclinic.org/healthy-lifestyle/adult-health/in-depth/health-issues-for-gay-men/art-20047107 . माझ्यासारखे संस्कृतीरक्षक उगीच बडबड करीत नाहीयेत. यासंबंधी अधिक माहिती इथे मिळेल : https://www.maayboli.com/node/47299?page=4#comment-3006689 आपला नम्र, -गामा पैलवान


Gamma Pailvan

Wed , 03 October 2018

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर! बायकांना पाळीच्या काळात मंदिरांत प्रवेश निषिद्ध असण्यामागे कारण आहे. माखलेल्या बुडाने कोणी देवळात जात नाही. अवयव स्वच्छ करून आंघोळ करून नंतरच जायचं असतं. तद्वत पाळी संपली की नहान करून शुचिर्भूत होऊन जायला हरकत नाही. प्रौढ मनुष्य मलमूत्र विसर्जनाचा वेग आवरून दर्शनास जाऊ शकतो. परंतु एकदा का पाळी सुरू झाली की ती संपेपर्यंत तिचा वेग आवरून धरता येत नाही. म्हणून ती संपेपर्यंत वाट पहायची असते. पुरुषी मनोवृत्ती वगैरे सरळ थोतांड आहे. पटंत असेल तर पटवून घ्या अन्यथा सोडून द्या. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......