संत, वारकरी संप्रदाय यांचं भिडे आणि संघ परिवाराला का वावडं आहे?
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी
  • Wed , 18 July 2018
  • सदर सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar संत ज्ञानेश्वर Sant Dnyaneshwar संत तुकाराम Sant Tukaram वारकरी Warkari संभाजी भिडे Sambhaji Bhide राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS

भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्यापेक्षा ‘मनू’ श्रेष्ठ होता असं वादग्रस्त विधान पुण्यात केलं. हे विधान केवळ वादग्रस्तच नाही तर संतांचा घोर अवमान करणारं आहे. त्याही पुढे जाऊन म्हणता येईल की, हा वारकरी संप्रदाय आणि संत विचारांवर मोठा हल्ला आहे. 

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची दिंडी पुण्यात मुक्कामी असताना पुण्यात भिडेंनी संतांना तुच्छ लेखलं. पंढरपूरला विठ्ठल-रखुमाईच्या भेटीला जाणाऱ्या वारकऱ्यांना दुखावलं. भिडेंच्या या वक्तव्याविरोधात राज्यात संतापाची भावना आहे. संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांनी भिडे यांना सल्ला दिलाय- भिडेंनी तलवारी हातात घेत धारकरी होऊन हिंसकपणा दाखवण्यापेक्षा टाळ हातात घेऊन वारकरी व्हावं. तरच त्यांना ज्ञानोबा-तुकोबाराय कळतील. धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव धारण करून बरळणाऱ्या भिडे यांची भीड ठेवण्याइतके आम्ही वारकरी नामर्द नाही, असा इशारा देत देहूकरांनी ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथा हाणू काठी’ या अभंगाची आठवण करून दिली. 

महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या संतांच्या विचारांवर भिडेंनी हल्ला का चढवला? भिडेंकडे हे धाडस कुठून आलं? त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे? या प्रश्नांचा माग काढला तर लक्षात येईल की, भिडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. संघानं त्यांना सांगली, सातारा, कोल्हापुरात कार्य करायला पाठवलं. बहुजन तरुण मुलांना ते छत्रपती शिवराय, शंभू राजे यांचा इतिहास सांगत मनुवादी बनवतात. मनुनं लिहिलेली ‘मनुस्मृती’ हा भेदभावाचं तत्त्वज्ञान मांडणारा ग्रंथ. त्या ग्रंथातलं विकृत तत्त्वज्ञान लोकांना सांगून समाजावर ब्राह्मण्यवाद लादण्याचं काम भिडे करतात. ब्राह्मण्यवाद म्हणजे एका वर्चस्ववादी विचारांची भलामण. ‘मनुस्मृती’ ही वर्चस्ववादी आणि इतरांना तुच्छ लेखणारी टाकावू, कालबाह्य पोथी निषेधार्ह म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सहस्त्रबुद्धे नावाच्या थोर ब्राह्मणाच्या हस्ते कोकणात ‘मनुस्मृती’ची होळी केली होती. बाबासाहेबांनी जी पोथी जाळली, तिची तारीफ आता भिडे करत आहेत. 

मनुने गावोगाव जाऊन लोकांचं संघटन केलं. ‘मनुस्मृती’ची अंमलबजावणी सुरू केली. त्या आधारे हजारो वर्षं देश चालवला याचा भिडेंना गर्व आहे. या गर्वाचे गीत गात त्यांनी मनुपुढे ज्ञानोबा-तुकोबाराय कमीच असं सांगत टाळाऐवजी तलवारीची महती गायली. 

.............................................................................................................................................

 या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4448

.............................................................................................................................................

वारकऱ्यांना पर्याय म्हणून धारकरी पंथ भिडेंनी का तयार केला आहे? यामागे संघ परिवाराची सोची समजी चाल आहे. संघ परिवार त्यांना खटकणाऱ्या, नावडणाऱ्या प्रत्येक प्रतीक, तत्वज्ञान, पंथ यांना पर्याय तयार करतो. पर्यायी तत्त्वज्ञान मांडायचं आणि नावडणारा पंथ, तत्त्वज्ञान मारून टाकायचं असं हे कारस्थान आहे. संघाला समता हे मूल्य मान्य नाही, मग संघानं त्याला पर्याय दिला ‘समरसता’ या नावानं. संघाला संविधान मान्य नाही, त्याला पर्याय दिला ‘मनुस्मृती’चा. संघाला आदिवासी जनजातीचं ‘आदिवासी’ असणं मान्य नाही, त्यांनी आदिवासी हे ‘वनवासी’ आहेत असं म्हणायला सुरुवात करून, ते आदिवासींच्या गळी उतरवलं. जंगल मालक आदिवासींना ‘वनवासी’ म्हणजे वनातले परके दीनवाणे बनवलं.

संघाला रयतेचा राजा, कुळवाडी भूषण, लोककल्याण राजा ही छत्रपती शिवरायांची बिरूदं खटकतात. मग संघानं शिवराय हे गोब्राह्मण प्रतिपालक होते, असं म्हणणं रेटलं. शंभूराजे हे महापंडित, कवी, रणनीतीकार, जगप्रसिद्ध योद्धे, सात भाषा बोलणारे बहुभाषा ज्ञानी, तत्त्वज्ञ राजा होते, हे लपवून ठेवत संघानं त्यांना ‘धर्मवीर’ म्हणून मांडलं. त्यांची महती, चरित्र संकुचित केलं. असा हा प्रतीकं, विचार, तत्त्वज्ञानाशी खेळत स्वतःचा वर्चस्ववाद लादण्याची संघाची विचारसरणी उराशी बाळगून भिडे कार्य करतात. 

सायकल चालवणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे, छोट्या खोलीत राहणे, उच्चशिक्षित आहे असा गवगवा करणे, गांधींना मानत नसताना गांधी टोपी घालणे, साधे राहणे हे भिडेंचे दाखवायचे दात आहेत. त्यांचा त्याग लोकांना भुलवतो जरूर, पण त्यांचे खायचे दात हिंस्त्र आहेत. त्यातून ते संतांचा, वारकऱ्यांचा द्वेष करत आहेत. वारकरी संप्रदायाला पर्याय म्हणून धारकरी संप्रदाय म्हणूनच ते पुढे रेटत आहेत. 

संत, वारकरी संप्रदायाचं भिडे आणि संघ परिवाराला का वावडं आहे? संतांनी ‘भेदाभेद भ्रम अमंगळ’ हे तत्त्वज्ञान मांडलं. समाजाला संयम, अहिंसा शिकवली. अवघे प्राणीमात्र समसमान हे तत्त्व

ज्ञान बिंबवलं. ‘हे विश्वची माझं घर’ हे सांगितलं. स्त्री-पुरुष अवघे सारखे हे अभंगातून मांडलं. एकूण समन्वयाची, संवादाची, सहअस्तित्वाची, सहकाराची जीवनशैली म्हणजे वारकरी संप्रदाय. पण समन्वय, संवाद, सहअस्तित्व, सहकार संघाला-भिडेंना मान्य नाही. त्यांना वर्चस्ववाद, द्वेषाचं आकर्षण जास्त आहे. म्हणून संघाला कधी अहिंसक जैन धर्म सांगणाऱ्या महावीरांचं आकर्षण वाटलं नाही. प्रज्ञा, शील, करुणा सांगणाऱ्या गौतम बुद्धांविषयी प्रेम वाटलं नाही. देशातल्या भक्ती संप्रदायाचा महासमन्वय घडवून आणणाऱ्या, दिंडी-कीर्तन परंपरा सुरू करणाऱ्या संत नामदेवांचं कौतुक वाटलं नाही. शौर्य, भक्ती आणि ज्ञानाचा समन्वय घडवून शीख धर्म सांगणाऱ्या गुरू नानक, गुरु गोविंद सिंग यांच्याविषयी ममता वाटली नाही. जातीभेद गाडून स्त्री-पुरुष समता, दलितोद्धार करणाऱ्या लिंगायत धर्म संस्थापक बसवण्णा यांच्याविषयी जिव्हाळा वाटला नाही. लाखो जर्मन नागरिकांची कत्तल करणारा हिटलर, कुऱ्हाड हातात घेतलेला क्षत्रियांचा नायनाट करणारा परशुराम यांना मात्र संघ गर्वानं मिरवतो.

वारकरी संप्रदाय भक्ती, शक्ती आणि ज्ञान या तत्वांवर उभा आहे समतेचं तत्त्वज्ञान सांगतो. पंढरीच्या वाळवंटात विठूची लेकरं आध्यात्मिक समता अनुभवतात हे भिडे आणि संघाला खटकतं. त्यांना टाळ कुटणं हा नेभळटपणा वाटतो. म्हणून लोकांनी हातात टाळाऐवजी तलवारी घ्याव्यात असा भिडेंचा आग्रह आहे. या तलवारी मनुचं राज्य आणण्यासाठी वापरायच्या, ‘मनुस्मृती’विरुद्ध बोलणाऱ्यांची तोंड बंद करण्यासाठी सपासप चालवायच्या असे भिडेंचे मनसुबे आहेत. भिडे यांच्या पायावर पंतप्रधान माथा टेकवतात. मुख्यमंत्री त्यांना हात जोडतात, त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. खरं तर भिडे युरोप-अमेरिका, चीन, जपान या देशात जन्मते आणि असे वक्तव्य करते तर त्यांना मानसिक आजारी म्हणून मानसोपचार तज्ज्ञांकडे दवाखान्यात, नंतर मनोरुग्ण इस्पितळात भरती केलं गेलं असतं. कारण वंशवादाचा, वर्चस्वाचा पुरस्कार करणं हा आजार आहे, गुन्हा आहे. ‘मनुस्मृती’चं समर्थन आताच्या काळात फक्त वेडगळ लोकच करू शकतात. पण भिडेंना केंद्र, राज्य आणि रा. स्व. संघाचं संरक्षण कवच आहे. त्यामुळे ते बरळत आहेत. आंबा प्रकरणात स्त्री-पुरुष भेद केला म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, चौकशी सुरू आहे. मिरज दंगलीतले ते आरोपी आहेत. अशा व्यक्तीनं संतांचा अपमान केलाय, म्हणून नवा वाद ओढवलाय. 

तुकोबारायांना देहूत धर्ममार्तंडांनी छळलं. गंबाजी-दंभाजी, मंबाजी त्या कारस्थानात पुढे होते. ज्ञानोबा माउलींना चांडाळ ठरवणारे धर्ममार्तंडच होते. संतांचा हा छळ लोक विसरलेले नाहीत. आता भिडे वारकरी संप्रदायाला तुच्छ लेखून महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचत आहेत, पुन्हा छळत आहेत. त्यामुळे भिडे आधुनिक मंबाजी आहेत, असं म्हणत औरंगाबादच्या मराठा क्रांती मोर्चानं भिडेंना चोप देण्याची भाषा केली आहे. जातीयवादी, वर्चस्ववादी मनुची तुलना भिडे संतांशी करतात आणि मनू श्रेष्ठ आणि संत कमी असा विकृत विचार तरुणांना सांगतात, हे खपवून घेणार नाही, असा या संघटनेनं ‘मनुस्मृती’चं दहन करत जाहीर इशारा दिलाय. 

भिडेंच्या हिंसक विचारांना हिंसक कृतीनं (चोपणं वगैरे) उत्तर देणं चूकच होईल, पण महाराष्ट्रात द्वेष आणि हिंसक वातावरण खदखदतंय, त्यातून एक दिवस स्फोट होईल याची ही ‘लिटमस टेस्ट’ म्हणता येईल. असा स्फोट होऊ नये, कुणी कुणाला चोपू नये, तलवारी चालवू नये, अशीच सामान्य माणसांची इच्छा असेल\असते, पण लक्षात कोण घेतो! 

.............................................................................................................................................

लेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

vishal pawar

Fri , 27 July 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......