स्वातंत्र्याचा स्वैराचार
पडघम - माध्यमनामा
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 21 April 2018
  • पडघम माध्यमनामा इलेक्ट्रॉनिक मीडिया Electronic Media प्रिंट मीडिया Print Media

परमेश्वराचा आणि आपला थेट ऋणानुबंध असल्याचे भासवत जनसामान्यांच्या भावनांचे व्यवस्थापन करणाऱ्या बाबा-बुवांचा उच्छाद भारतीय समाजव्यवस्थेत जसा शक्य आहे, तसाच ‘आम्ही सांगू तेच सत्य’ अथवा ‘आम्हीच कसे सर्वप्रथम वास्तव दाखवले’ हा दंभ असणाऱ्या माध्यमांचा सुळसुळाटही भारतीय व्यवस्थेत सहजशक्य झाला आहे. या मनमानी व्यभिचाराला आता समाजमाध्यमांची सोयीस्कर फोडणी मिळत आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या उदात्तीकरणाचे इतिवृत्त देण्यासाठी म्हणून भारतात शिरकाव केलेल्या मुद्रणकलेसोबत सद्य:स्थितीचे साद्यंत वृत्त देणाऱ्यांचा गत पन्नास वर्षांतील खळखळाट विचारी माणसाला इतक्यातच नकोसा होईल, हे भाकित कोणीच केले नसेल.

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यातील सीमारेषा पुसत हा बौद्धिक म्हणवला जाणारा कृतीयुक्त सदाचार सद्सद्विवेकाशी फारकत घेईल, असा विचार या क्षेत्रातील देशी-विदेशी प्रणेत्यांनीही केला नसेल. लोकशाहीची चौथी कोणशिला असे नामाभिधान देण्यात आलेल्या माध्यमांनी व्यवस्थेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यापेक्षा व्यवस्थेतील यच्चयावत दुर्गुणांचा परिपोष अंगीकारत जो चवचालपणा चालवला आहे, ते पाहता ‘भीक नको पण कुत्रा आवर’' म्हणायची पाळी आली आहे.

‘बेंगॉल गॅझेट’च्या अस्तित्वाने भारावलेली, आधुनिक शिक्षण, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता, उदारमतवादी तत्त्वांनी आपल्या समाजातील कर्मकांडावर प्रहार, मात करू पाहणारी एक पिढी, जिला या माध्यमाचे सामर्थ्य आकलन झाले होत,. त्यांच्याकडून या मूलभूत तत्त्वांसह ही माध्यमे मोठ्या जबाबदारीने हाताळण्यात आली. काळानुरूप लोकप्रबोधनावर भर देत लोकरंजन बाजूला ठेवत त्यांची वाटचाल सुरू राहिली. योग्य-अयोग्य, पोषक-घातक अशा विविध कसोट्यांवर तासून समष्टीच्या विकासासाठी श्रेयस्कर भूमिका पार पाडणारी माध्यमे भारतीय नवपिढ्यांसमोर तटस्थता, लोकहितवाद, स्वातंत्र्य, लोकशाही अशा मूल्यांचा वारसा देत राहिली. काळाच्या कसोटीवर एखादे तत्त्व तपासून गरजेनुरूप त्यात बदल करण्याची लवचिकताही तिने साधली. या निरंतर चाललेल्या प्रक्रियेतून प्रसंगी दमनशाही अंगिकारलेल्या शासकाला सत्तास्थानावरून खाली खेचण्याचे सामर्थ्यही अंगी बाणवले.

.............................................................................................................................................

‘सेपिअन्स - मानवजातीचा अनोखा इतिहास’ या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4406

.............................................................................................................................................

आजही काही सन्माननीय संस्था हा सतीचा मार्ग अनुसरण्याचे काम करत आहेत. पण यांचा अपवाद वगळता स्पर्धेच्या नावाखाली घडामोडींची दखल घेताना, वार्तांकन करताना आज जे ताळतंत्र सोडले जात आहे ते पाहता ही माध्यमे नेमके काय साध्य करू पाहताहेत, असा प्रश्न पडतो. मुद्रित माध्यमातला शब्द खरा मानला जातो, हा विश्वासही माध्यमांनी गमावला आणि चलतचित्रांद्वारे वार्तांकन करणाऱ्यांनी तर पत्रकारितेतील बाराखडीही टीआरपीसाठी विकून टाकली असावी. समाजातील अनिष्ट घडामोडींवर नियंत्रण प्रस्थापित करण्याची नैतिक क्षमता व समाजातील नैतिक प्रतिष्ठाच गमावून बसल्यानंतर या माध्यमांकडून वाचक काय अपेक्षा करणार? एखादा गल्लाभरू थिएटरमालक पैसावसूल चित्रपटाची तबकडी वारंवार लावतो, तसाच गोरखधंदा या इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी सुरू केला आहे. कुठल्यातरी राजकीय बॅनरसाठी पॅकेजेसवरील कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या या वाहिन्या मनोरंजनासाठीच्या वाहिन्यांएवढ्याच ट्रस्टवर्थी अर्थात विश्वासार्ह असतात, हे आता जनसामान्यांना उमजू लागले आहे म्हणून ठीक.

नुकताच न्यायालयाने कथुआ बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या नावाचा उल्लेख केल्याबद्दल काही वृत्तवाहिन्यांना जाब विचारला आहे. पीडित व्यक्तीचे नाव वार्तांकनादरम्यान येता कामा नये, ही पत्रकारितेतील मूलभूत बाबही या अतिउत्साही वाहिन्यांनी पाळली नाही. त्यांचा उथळपणा त्यांच्या धंदेवाईक दृष्टिकोनास साजरा असला तरी या भारतीय समाजाच्या चालचलनासाठी घातक आहे, याची जाणीव कोणीतरी त्यांना करून द्यायला हवी. अन्यथा भारतीय सीमेवर कोवळ्या वयात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या जवानापेक्षा मोठ्या पडद्यावरच्या नटाच्या खटल्याची निर्लज्ज बातमी करण्याचे प्रकार करमणूक मंडळींकडून सतत केले जातील. लोकप्रियतेच्या नादात सतत सनसनाटी निर्माण करण्याची गलिच्छ कार्यपद्धती पाहता यांच्या धंद्यासाठी ते समाजात अनिष्ट घडवून आणणार नाहीत याची शाश्वती कोण देणार?

समाजमनाची, व्यवस्थेची एवढीच चिंता असेल तर महिलांना उपभोग्य वस्तू असल्याचा समज दृढ करणाऱ्या जाहिराती या वाहिन्यांवर प्रसारित कशा काय केल्या जातात? ‘वेदांचा तो अर्थ आम्हांसिच ठावे’ असा दावा करणाऱ्या मध्ययुगीन मानसिकतेची पुनरावृत्ती करणारा एक संधिसाधूंचा नवा वर्ग, नवी मानसिकता जन्माला घालण्याचे पातक माध्यमे करत आहेत. कमीअधिक फरकाने हाच प्रकार मुद्रित माध्यमांतही बाळसे धरू लागला असून उच्चतम व्यावसायिक नीतिमत्ता, सत्य-असत्याची पारख करण्याच्या क्षमता, समाजहितासाठी विधायक कृतिशीलतेचा पुरस्कार या सर्वच बाबी इतिहासजमा झाल्या आहेत. तत्कालीन घडामोडींपेक्षा समग्र व्यवस्थेच्या चालचलनाची दिशा, त्यातले नकारात्मक प्रवाह रोखण्यासाठी आपण काय करतो आहोत? असा प्रश्न माध्यमांना केव्हातरी पडेल का?

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

vishal pawar

Thu , 26 April 2018


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

पुस्तक फक्त वाचण्यासाठी ही संकल्पनाच बदलली आहे? आता ते केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते!

सर्व जगाचीच प्रवृती, संस्कृती आता ‘पैसाक्रेंद्रित’ झाली आहे. तेथे ‘वाचकांचा वापर’ हा केवळ बुद्धिवंतांची गर्दी तेथे होते, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. त्याचबरोबर अनेक प्रेक्षकांकडून, प्रामुख्याने समाजमाध्यमांवर आपण किती मोठे आहोत, हे दाखवण्यासाठी करण्यात येतो. आता केवळ प्रदर्शन, दिखावा करण्यासाठी, अभिमानाने मिरवण्यासाठी आणि लोकांचे आणि माध्यमांचेही लक्ष स्वतःकडे वेधून घेण्यासाठी वापरण्यात येते.......

सरदार पटेल यांचा भव्य पुतळा उभारणार्‍या मोदींनी सोमनाथ मंदिराविषयी लेख लिहिण्याआधी त्याच्या जीर्णोद्धाराचा इतिहास माहीत करून घ्यायला हवा होता…

इतरांच्या धार्मिक संवेदनशीलतेला खोल जखमा करणे, हाच आपला मार्ग आहे, असे एखाद्या जनसमुदायाला वाटत असेल, तर ते देशावर भविष्यात येऊ घातलेल्या भयानक अरिष्टाचे दुश्चिन्ह आहे. धर्मश्रद्धेचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत सोडवता येत नाहीत. देशातील विविध धर्मांतील लोकांच्या मनात द्वेष भावना वाढीस लागून देशात अराजक निर्माण होण्याची आणि देशाचे शतखंडित तुकडे होण्याची शक्यता वाढते, हे आपल्या केव्हा लक्षात येईल? .......

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे!

जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते, तेव्हा तेव्हा सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी मोरारजी देसाईंनी आचार्य अत्रे यांना सत्तर दिवस तुरुंगात टाकले. तसेच एका वगनाट्य लेखनाच्या कारणावरून त्याच मोरारजीने आमच्या शाहीर अण्णाभाऊ साठेंना हद्दपार केले होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.......

कोकणासारख्या पिटुकल्या प्रदेशाचे झाले थोडेफार नुकसान, झाली काही माणसे व्याधीग्रस्त, मोडले काहींचे संसार, तर… विकासासाठी हे सहन करायलाच हवे!

इटलीतील त्या गावाप्रमाणे लोटे परशुरामचीही स्थिती होणार की काय, हे आता सांगता येणे कठीण. कदाचित होणारही नाही. आशेवर राहायला काय हरकत आहे? यातील इटलीचे नुकसान आणि भारताचा लाभ तेवढा सुजाण नागरिकांनी ध्यानी घ्यावा. त्या युरोपियन महासंघाची एक एजन्सी आहे - ‘युरोपियन केमिकल एजन्सी’. ती सुमारे दहा हजार फॉरेनर केमिकल्सवर बंदी लादण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास आपण अशी रसायने तयार करणारी आशियातील एक बलाढ्य शक्ती असू.......

पं. नेहरू आणि मोदी यांच्यातील अंतर हे ‘आयडिया ऑफ इंडिया’मधील आहे. आजचे भारतीय तरुण, बुद्धिजीवी-बुद्धिवादी आणि सजग नागरिक कोणत्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे वारसदार म्हणून स्वत:कडे पाहतात?

नेहरूंचा भारत आधुनिकतेकडे, विज्ञानाकडे, लोकशाहीकडे आणि विद्याशाखांच्या विकासाकडे जाणारा होता; तर मोदींचा भारत धार्मिक प्रतिमांभोवती केंद्रित, भावनिक भाषणांवर अवलंबून आणि प्राचीन गौरवाच्या काल्पनिक कथांमध्ये रमणारा आहे. राष्ट्राची शक्ती विज्ञान, शिक्षण, रोजगार, उद्योग, आणि तर्कसंगत विचारात असते. आणि म्हणूनच धार्मिक-ध्रुवीकरणावर आधारित राजकारण घातक असते.......