तथाकथित श्वानप्रेमींना न्यायालयाने दिलासा दिला खरा, पण समस्येचं काय? त्याबाबत आपण कधी विचार करणार की नाही?
पडघम - देशकारण
आ. श्री. केतकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 13 September 2025
  • पडघम देशकारण कुत्रा Dog भटकी कुत्री Pariah Dogs

‘भटक्या, मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याने अनेक जण जखमी’

‘एका लहान मुलाचा भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे मृत्यू’

‘पिसाळलेल्या कुत्र्याने अनेक जणांचा चावा घेतला’ 

अशा प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रांत दर एक-दोन दिवसांनी वाचायला मिळतात.

कुत्रा हा माणसाचा सर्वांत जुना मित्र-प्राणी आहे, असं म्हणतात. माणसानं त्याला ‘माणसाळवलं’ आहे, हे खरं आहे. अनेकांना कुत्र्यांचं प्रेम असतं. ते त्यांना पाळतात आणि व्यवस्थित संगोपनही करतात. वेळोवेळी त्यांचं लसीकरण करून घेतात. त्यामुळे त्यांचा कुत्रा चुकून कधी कुणाला चावला, तर ‘रेबीज’ या जीवघेण्या भयानक रोगाची लागण होत नाही. हे लोक रस्त्यावरही आपल्या कुत्र्यांना गळ्यात पट्टा बांधून फिरायला नेतात. अशी कुत्री मालकांच्या आज्ञेत असतात. त्यांच्या वाटेला कोणी गेलं, तरच ती चावतात.

कुत्रा पूर्णपणे ‘माणसाळलेला’ले प्राणी झाला असला, तरी त्याला आपलं म्हणजे माणसांचं खाणं देणं योग्य नाही, हे श्वानप्रेमींना माहीत असतं. ते कुत्र्यांसाठी खास बनवलेलं किंवा तयार मिळणारं अन्नच देतात. मात्र हे ध्यानात न घेता तथाकथित श्वानप्रेमींना ‘पाव, बिस्किटे वगैरे पदार्थ हे कुत्र्यांचं नैसर्गिक खाणं नाही. या पदार्थांमुळे त्यांना त्रास होतो, पोटाचा आजार होतो, असं कितीही सांगितलं तरीही त्याकडे दुर्लक्ष करून ते कुत्र्यांना माणसांचंच अन्न देतात.

असं केल्यानं आपल्याला पुण्य मिळणार अशी त्यांची (धार्मिक संस्कारांनी घडवलेली) मनोधारणा असते. त्यांचं हे श्वानप्रेम त्यांच्या घरापर्यंत मात्र कधी येत नाही. बाहेर काहीही केलं तरी चालतं, अशी त्यांची समजूत असावी. कदाचित घरच्यांनाही ते आवडत असावं. मात्र कुत्रा पाळला, तर त्याची करावी लागणारी उस्तवार त्यांना नकोशी वाटत असते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

उलट या कुत्र्यांच्या वेळी-अवेळी जोरजोरात भुंकण्याने वा रडण्याओरडण्याने, (त्यांचं रडणं तर अगदी भेसूर भीती निर्माण करणारं असतं) ज्यांच्यावर निद्रानाश होण्याची वेळ आली आहे, शांत झोप लागलेली असताना या भयानक मोठ्या आवाजानं ज्यांची झोपमोड झाली आहे, कुत्र्यांच्या चावे घेण्यामुळे ‘रेबीज’च्या भीतीपोटी ज्यांना महागडी इंजेक्शनं घ्यावी लागली आहेत, (आणि ती इंजेक्शन न मिळाल्यानं काहींना मृत्यूही आला आहे), त्यांच्याकडे मात्र हे श्वानप्रेमी सहृदयतेनं पाहत नाहीत.

आणि जे कुणी कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरच डाफरतात. प्रसंगी मारहाणही करतात. अनेकांना हा अनुभव आला असेल. म्हणजे यांना श्वानप्रेम असतं, पण माणसांचं मात्र काहीही होवो, त्याची त्यांना फिकीर अजिबात नसते.

अखेर या श्वानपीडितांना न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागला. त्याची दखल घेत भटक्या कुत्र्यांना एका ठिकाणी बंदिस्त करावं, असा न्यायालयानं काही दिवसांपूर्वी आदेश दिला. पण त्यानंतर काही अभ्यासकांनी अनेक कुत्र्यांना एकत्र ठेवल्यामुळे त्यांना रोगांची लागण होऊ शकते. असं केलं तर काही काळात त्या बंदिखान्याच्या आसपास फिरकणंही अवघड होईल, असं शास्त्रीय आधारानं सांगितलं. म्हणजे ‘रोगापेक्षा औषध भयानक’ अशी स्थिती व्हायची.

त्यानंतर लगेचच न्यायालयानं सुधारित आदेश काढून सांगितलं की, अशा प्राण्यांचं लसीकरण करण्यात यावं आणि त्यांचं निर्बिजीकरण करण्यात येऊन, त्यांना पुन्हा त्यांच्या नेहमीच्या भागात सोडण्यात यावं. या तोडग्यामुळे कथित श्वानप्रेमी संतुष्ट झाले असणार. आपला विजय झाला, असं त्यांना वाटलं असावं.

पण न्यायालयाच्या सुधारित आदेशाचा विचार करून ते आपलं आचरण ठेवतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना रस्त्यावर खायला घालू नये, त्यासाठी ‘एक ठिकाण निश्चित करण्यात यावं आणि तिथंच खाणं देण्यात यावं’ असं म्हटलं आहे. श्वानप्रेमींनी हा आदेश प्रमाण मानून त्याप्रमाणे वागायचं ठरवलं, तर त्याचा काही प्रमाणात तरी उपयोग होण्यासारखा आहे. कारण रस्त्यांवर झुंडीनं हिंडणारी कुत्री बराच काही काळापुरती तरी दिसणार नाहीत, त्यामुळे तेवढा काळ लोक तेथून न भिता जाऊ शकतील.

मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे मूळ प्रश्न बाजूलाच राहतो. तक्रार होती ती भटक्या कुत्र्यांनी मुला-माणसांना चावण्याची आणि पाठलाग करून दुचाकीस्वारांना चावण्याची वा त्यांच्या अंगावर येण्याची, ज्यामुळे अपघात होतात आणि रेबीजची लागण होण्याच्या भीतीनं इंजेक्शनं घ्यावी लागण्याची. कुत्र्यांच्या वेळी-अवेळी मोठमोठ्यानं रडण्या-ओरडण्याची, त्यामुळे झोपमोड होण्याची, निद्रानाशाचा विकार जडण्याची. या बाबींकडे न्यायालयानं लक्ष दिलेलं दिसत नाही.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

श्वानप्रेमींना कुत्र्यांचं ओरडणं कदाचित गोड, मधुर वाटतही असेल; पण सामान्य लोक, लहान मुलं, वयोवृद्ध आणि दुखणेकरी यांच्यासाठी ते बऱ्याचदा खूप त्रासदायक ठरतं. आवाज बंद होईतोवर ते बेचैन असतात. त्यांना स्वस्थ झोप येत नाही.

भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण करणं, त्यांना अँटि-रेबीजचं इंजेक्शन देणं आणि पुन्हा आधीच्या जागीच सोडून देणं, याचा थोडाफार उपयोग होईल. पण मूळ प्रश्न सुटेल का? कुत्र्यांचा मूळचा स्वभाव चावे घेण्याचा आहे, मग ती पिसाळलेली असोत वा त्यांचे निर्बिजीकरण झालेली. ती योग्य सावज हेरून कुणाला ना कुणाला चावणारच.

अगदी लहान मुलं प्रतिकार करू शकत नाहीत, एवढं कुत्र्यांना माहीत झालेलं असतं. त्यामुळेच ते लहान मुलांवर हल्ले चढवतात. त्यांना काही न्यायालयाचा आदेश वाचता येत नाही. रस्त्यावरून वेगानं जाणाऱ्या वाहनांचा, खास करून दुचाकीस्वारांचा सुगावा लागला रे लागला की, कुत्र्यांचा तांडा वेगानं, जोरजोरात भुंकत जाऊन त्याचा पाठलाग करणारी कुत्री आपण अनेकदा पाहतो. अशी भटकी कुत्री मागे लागली की, दुचाकीस्वार घाबरून वेग वाढवतात आणि अपघाताला निमंत्रण देतात. अशा अपघातांची उदाहरणंही आपल्यापैकी अनेकांना माहीत असतीलच.

त्याबाबत आपण कधी विचार करणार की नाही?

.................................................................................................................................................................

लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.

aashriketkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

लोकसंख्येच्या प्रमाणातच जागा द्यायच्या झाल्या, तर महिलांना जवळपास पन्नास टक्क्यांच्या आसपास जागा द्याव्या लागतील. पण तशी मागणी कुणीच, महिला प्रतिनिधीही, करत नाहीत, ही आश्चर्याचीच बाब म्हणायला हवी!

एकीकडे ‘नारीपूजा’ म्हणायचे, तर दुसरीकडे असे वर्तन, हे संघ-भाजपच्या दुतोंडीपणाचेच लक्षण आहे. या विधेयकामुळे त्यांचा मुखवटा गळून पडला असून खरा चेहरा उघड झाला आहे. खरे तर त्यांना हे विधेयक नव्याने आणण्याचीच आवश्यकता नव्हती, कारण २०२३मध्ये संसदेत ते एकमताने मंजूर झाले होते. पण तसे केले असते, तर तेच अडचणीत आले असते. कारण त्यांना महिलांना असे सामर्थ्य मिळायला नको होते.......

बाबाबुवा, गुरू, साधू, संत या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी लोकांच्या मानसिक दुर्बलतेचा, अज्ञानाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत सातत्याने समाजाचे शोषण केले आहे – विशेषत: स्त्रियांच्या

अनेक बाबाबुवांनी ‘आध्यात्मिक साधना’, ‘देवाची कृपा’ किंवा ‘उपचार’ यांच्या नावाखाली स्त्रियांचे लैंगिक शोषण केले आहे. तरीही त्यांच्या अनुयायांनी त्यांना समर्थन दिले, ही गोष्ट समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. याचा विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते - अंधश्रद्धा ही केवळ अज्ञानाची समस्या नाही, तर ती एक सामाजिक, मानसिक, आर्थिक आणि राजकीय समस्या आहे.......