अली खान महमुदाबाद यांच्या पोस्टमुळे धोका नाहीय, तर कुणी टीका केली की, ज्या प्रकारे त्याचा ‘आवाज बंद’ करण्याचा संघटित प्रयत्न होतोय, त्याचा(च) ‘खरा धोका’ आहे
पडघम - देशकारण
आ. श्री. केतकर
  • अली खान महमुदाबाद
  • Sun , 08 June 2025
  • पडघम देशकारण पहलगाम Pahalgam काश्मीर Kashmir अली खान महमुदाबाद Ali Khan Mahmudabad

काही वेळा काही गोष्टी आपल्याला वाटतं तशा नसतात, आणि काही वेळा आपल्याला जे सांगितलं गेलं किंवा जे आपण शिकलो, ते चुकीचंच होतं, असं वाटायला लागतं. कारण काही अतिज्ञानी लोक अगदी त्याच्याविरुद्ध काहीतरी सांगतात आणि आपल्याला हे कसं कळलं नाही, किंवा कुणी निदान सांगितलं का नाही, असं वाटायला लागतं. या अतिज्ञानी लोकांना ते कसं कळतं, कुणास ठाऊक! पण होतं काय की, त्यांच्या या (अगाध) ज्ञानप्रकाशामुळे आपल्याला दिपून जायला होतं, स्वतःचीच कीव येते. पण काही जण मात्र त्यांची त्यांच्या अगाध ज्ञानाबद्दल कीव करतात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांचं महत्त्वच या लोकांना कळलेलं नसतं!

आता हेच पहा ना, साधारण महिनाभरापूर्वी (२२ एप्रिलला) पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हत्याकांडात २६ निरपराध पुरुषांना आपल्या जिवाला मुकावं लागलं. त्यांच्या अभागी बायका, मुलं दीनवाणी झाली होती. दहशतवाद्यांच्या या कृत्यानं संपूर्ण देश हळहळला. दहशतवाद्यांबाबत राग उफाळून आला. त्यांना धडा शिकवा, अशी मागणी होऊ लागली. त्याप्रमाणे आपल्या लष्करानं काही प्रमाणात धडा शिकवलादेखील!

नंतर अनेकांनी त्या पर्यटनस्थळी पोलिसांची गस्त का नव्हती? पर्यटकांची गर्दी असतानाही, सुरक्षारक्षक का नव्हते? किंवा आपल्या गुप्तहेरांकडून याबाबत काहीच माहिती का दिली गेली नाही? असे प्रश्न विचारले. त्यांबाबत कसलंही उत्तर मिळालं नाही. पण काही अतिज्ञानी लोकांना अशी वेळ आलीच का, असा जो प्रश्न पडला, तो मात्र कुणाच्या डोक्यात आला नव्हता. वाचकांनाही काही प्रश्न पडले असतील. पण ते विचारले, तर हे ‘अतिज्ञानी’ त्या सगळ्यांना ‘बिनडोक’ म्हणणार!

अर्थात त्यांच्या अगाध ज्ञानाचं भांडारही नक्कीच हेवा वाटण्याजोगं असणार. कारण भाजपच्या एका प्रवक्त्यानं एका वृत्तवाहिनीवर (न्यूज २४, वेळ - १०.३० : ब्रेकिंग विथ अजेंडा) विचारलं की, ‘तेथे असलेल्या महिला अहिल्यादेवी होळकरांप्रमाणे का लढल्या नाहीत? किंवा मुसलमानांशी लढणाऱ्या झाशीच्या राणीप्रमाणे त्या झुंजल्या का नाहीत? त्यांनी इतिहासाचा अभ्यास करायला हवा होता. तसे त्यांनी केले असते, तर त्यांना ‘वीरांगना’ म्हणून गौरवलं गेलं असतं!’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आपण समजतो की, अहिल्यादेवी काही शस्त्रास्त्रं घेऊन कुणाशी लढल्या नव्हत्या. आपण त्यांना शिक्षणाची आस असणाऱ्या आणि सुधारणावादी म्हणून ओळखतो. अगदी अपवादात्मक प्रसंग म्हणून राघोबादादा पेशवे ज्या वेळी त्यांच्यावर चालून येत होते, तो. पण तेव्हाही अहिल्यादेवींनी शस्त्रांचा आधार न घेता केवळ एका पत्राने विजय मिळवला होता.

त्यांनी राघोबादादांना लिहिलं होतं की, आपण चालून याल खरे, पण तुम्हाला आमच्या स्त्रीसैनिकांबरोबर लढावं लागेल. त्यात कदाचित तुम्ही जिंकाल, पण तरीही तुम्ही महिलांविरुद्ध लढलात, त्यात काय पराक्रम, असा तुम्हाला बोल लागेल, आणि आम्ही विजयी झालो, तर मात्र तुमची जी नाचक्की होईल, तिला पारावारच राहणार नाही. बस्स. त्या पत्रानं राघोबादादा माघारी वळले, असं इतिहास सांगतो. (पण त्या प्रवक्त्यालाच इतिहासाच्या अभ्यास करण्याची गरज आहे, हे कोण सांगणार? त्या सांगणाऱ्यालाच ‘देशद्रोही’ ठरवलं जाईल.)

...आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई मुसलमानांशी कधी लढल्याचं कुणालाच, अगदी इतिहासतज्ज्ञांनाही, माहीत नाही. त्या लढल्या त्या १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात, तेही त्या लढ्यात सहभागी मुस्लिमांच्या बरोबरीनं, अशा नोंदी आहेत. पण हे आपलं अज्ञानच म्हणायचं! याचा अर्थ आपल्याला काहीच योग्य प्रकारे शिकवलं गेलं नसावं. कदाचित पुढील काळात याच गोष्टी इतिहास म्हणून शिकवल्या जातील. कारण तशीही पाठ्यपुस्तकांतील इतिहासात बदल करण्याची सुरुवात झालीच आहे!

या प्रवक्त्यापाठोपाठ भाजपचे संसद सदस्य राम चंदर जांग्र यांनी म्हटलं की, जे पुरुष दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले, त्यांनी थोडं ‘अग्निवीर’ प्रशिक्षण घेतलं असतं, तर ही वेळ आली नसती. असं असलं, तरीही मोठा दोष मुख्यतः तिथं उपस्थित असलेल्या महिलांकडेच जातो, कारण त्यांनी बंदुका घेतलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला नाही.’

म्हणजे जांग्र यांच्या मते आपल्या देशातील महिला एवढ्या बलशाली आहेत की, त्यांना ‘अग्निवीर’ प्रशिक्षणाची गरजच नव्हती. यात जांग्र यांना ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीनं असंही सूचित करायचं असावं की, नेहमी महिलाच सारं बिघडवून टाकतात, ते स्वयंपाकघर असो किंवा रणभूमी.

खरं म्हणजे जगातील कोणत्याही देशापेक्षा आपण अनेक देवींची पूजा, प्रर्थना करतो. इतकंच काय पण आपण आपल्या भारत देशालाही ‘माँ भारती’ म्हणतो... आणि तरीही एक सत्ताधारी पक्षाचा खासदार त्या कठीण प्रसंगी त्या प्रसंगोचित वागल्या नाहीत, हल्ल्याच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या महिलांनाच त्यांनी त्या घुसखोर दहशतवाद्यांशी दोन हात केले नाहीत, म्हणून बोल लावतो. केवळ अगाध ज्ञानींनाच असा साक्षात्कार होऊ शकतो!

पहलगामच्या त्या हत्याकांडाबाबत हे असं गलिच्छ मतप्रदर्शन एक खासदार करू शकतो, आणि हे त्याच्या पक्षाचे पाठीराखे आणि तत्सम लोकांचंही मत असू शकतं. मग ते महिला असोत वा पुरुष. आणि त्यांच्या ‘गोदी मीडिया’माध्यमांबद्दल आणि ‘जल्पकां’च्या फौजेबाबतही हे खरं असू शकेल. शिवाय ते गलिच्छ उद्गार काढणाऱ्या त्या खासदाराचा निषेध केला जाऊ नये आणि त्याला कोणतीही शिक्षा होऊ नये म्हणून निकरानं प्रयत्न करतील.

अलीकडेच परराष्ट्र मंत्र्यांनी लोकशाहीचे आणि त्यातही खास करून भारतातील लोकशाहीचं कौतुक केलं होतं. आता जांग्रसारखे खासदार आणि ज्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांना पाकिस्तानच्या ‘दहशतवाद्यांची बहीण’ म्हटलं, ते मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा काय, आणि जगदीश देवड ज्यांनी आता भारतीय सैन्य मोदींच्या पायाशी झुकते, असं सैन्याची बेअब्रू करणारं विधान केलं होतं, ते काय, त्या साऱ्यांना असं काय वाट्टेल ते बोलण्याचं स्वातंत्र्य होतंच की! पण त्यांना असे बोल बोलू नका, म्हणून कोणी अडवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मात्र भाषण स्वातंत्र्याच्याही काही मर्यादा असतात, याची आठवण करून दिली जाते!

आता अली खान महमुदाबाद यांचंच उदाहरण पाहा. त्यांना कोठडीत ठेवण्यात आलं, तेही त्यांनी समाजमाध्यमांवर टाकलेल्या एका पोस्टमुळे. महमुदाबाद हे अशोका विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात ‘साहाय्यक प्राध्यापक’ (असिस्टंट प्रोफेसर) आहेत. त्यांना पोस्टमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल, लडाख विद्यापीठाचे कुलगुरू साकेत खुशवाह, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री पंडित, गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. नीरजा गुप्ता आणि राजस्थान केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आनंद भालेराव आणि शिक्षणक्षेत्रातील २०० जणांनी ‘महमुदाबाद हे छुप्या पद्धतीने टीका करत आहेत, त्यांना या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या समाजमाध्यामांवरील या पोस्टने जातीय सलोखा कमी करायचा आहे.’ असं म्हणत त्यांच्यावर टीका केली.

हा ‘अवगुंठित’ प्रकार नैतिक मूल्यांचं रक्षण करण्याच्या नावाखाली टीका करणाऱ्यांवर हल्ला चढवण्याचाच आहे. हा सत्ताधाऱ्यांना विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा सत्ताधाऱ्यांच्याच डावपेचांचा एक भाग असावा, असं वाटतं. खरं तर मेहमुदाबाद यांचा प्रयत्न हा न्याय मिळवण्याचा आणि धोरणात सातत्य असायला हवं, असं सूचित करणारा होता. (दरम्यान काही अटींवर महमुदाबाद यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे.) तरीही या जल्पकांनी भाषेचा नीट अभ्यास करायला हवा, त्याचं महत्त्व समजून घ्यायला हवं, म्हणजे ते भलतेसलते अर्थ काढणार नाहीत.

हा सारा गोंधळ ज्यामुळे सुरू झाला, ती समाजमाध्यमावरील पोस्ट ८ मे २०२५ची होती. त्यामध्ये मेहमुदाबाद यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतची माहिती योग्य प्रकारे दिल्याबद्दल कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे कौतुक आणि पहलगाम हल्ल्याला भारतीय लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचा गौरव केला होता.

महमुदाबाद यांनी लिहिलं होतं : “मला आनंद होतो की, अनेक उजव्या मताच्या समालोचकांनीही कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं कौतुक केलं. शाबासकी दिली. हे चांगलंच आहे. पण त्याच वेळी त्यांनी ज्या वेळी जमावांनी कायदा हातात घेऊन ‘लिंचिंग’ने ज्यांना मारलं, अनेकांच्या घरांवर, दुकानांवर बुलडोझर चालवले आणि जे भाजपच्या द्वेषभावनेनं ठराविक लोकांना भयभीत करण्याचे प्रयत्न करत आहेत, आणि त्यामुळे जे कमनिशबी बळी जात आहेत, त्यांच्यावर ही वेळ आणणाऱ्यांचा निषेध करायला हवा. तसं केलं नाही, तर मात्र हा केवळ ढोंगीपणाच म्हणावा लागेल.”

त्यांच्या या पोस्टवर टीका करणाऱ्या चार कुलगुरूंनी म्हटलं की, यामुळे महमुदाबाद यांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या भूमिकेला कमी लेखलं आहे. शिवाय त्यांना केवळ एक प्रतीक म्हणून सर्वांपुढं आणलं आहे, असंही म्हटलं आहे, तेही कथित सांप्रदायिकतेला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी. जाणत्यांना यावर हसावं की, रडावं असंच वाटलं असणार. कारण ‘अर्थाचा अनर्थ’ करण्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

लवकरच या चार कुलगुरूंना त्यांच्या या कामगिरीबद्दल सन्मानित केलं गेलं तर आश्चर्य वाटू नये. कारण महमुदाबाद यांनी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा उल्लेख केला, तो त्यांची उपस्थिती ही भारताच्या ‘विविधतेत एकता’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ यांचं प्रतीक होती म्हणून. त्यांचा रोख हा उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या कथित ‘राष्ट्रवाद’ आणि ‘राष्ट्रभक्ती’ यांवर होता. कारण जे समालोचक मुस्लीम अधिकाऱ्यांची स्तुती करतात, ते एकूण मुस्लिमांवर केले जाणारे हल्ले आणि लिंचिंग, केवळ गोमांस असल्याचा संशय आला म्हणून ते मांस नेणाऱ्यांवर होणारे हल्ले, (नुकतीच एक बातमी आली होती की, मध्य प्रदेशात हा प्रकार झाल्यावर ते प्रयोगशाळेत नेण्यात आलं, तिथं ते गोमांस नसून म्हशीचं मांस असल्याचं उघडकीस आलं होतं.) आणि बुलडोझर न्यायामुळे (?) बेघर झालेल्या, उपजीविकेचं साधन गमावून बसलेल्या मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाकडे मात्र डोळेझाक करतात. त्याबद्दल चकारशब्दही काढत नाहीत. एखाद्याच्या विधानाचा भलताच अर्थ काढून त्याला बदनाम करायचं हे तंत्र आहे.

महमुदाबाद यांनी तर अल्पसंख्याकांना न्याय मिळावा, यासाठी सरकारचं धोरण सर्वांसाठी समान असलं पाहिजे, असं सूचित केलं होतं.

या सगळ्यावर ताण केली ती हरयाणा राज्याच्या महिला आयोगाच्या रेणू भाटिया यांनी. त्यांनी १२ मे २०२५ रोजी एक नोटीसच प्रसृत केली. त्यांनी असा दावा केला की, महमुदाबाद यांच्या पोस्टने महिला अधिकाऱ्यांना अपमानित केलं आहे, आणि जातीय बेबनावला उत्तेजन दिलंय. यामुळे १८ मे २०२५ रोजी महमुदाबाद यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात हरयाणाच्या महिला आयोगाकडून पोस्टकर्त्याला अटक केल्यानं, राजकीय अतिरेक झाला.

महिला आयोगाचं काम महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणं हा आहे. त्यांना समाजमाध्यमांवर लष्करी कारवाई किंवा राजकीय ढोंगावर टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार नाही. महमुदाबाद यांनी स्वतःच म्हटलं आहे की, महिला आयोग महत्त्वाची कामं करतो. मात्र मला जे समन्स देण्यात आलंय, त्यात मी केलेली पोस्ट, ही महिलांच्या हक्कांवर किंवा महिलांसाठी असलेल्या कायद्यावर आक्रमण कशी करू शकते, हे मला समजत नाही.

महत्त्वाची बाब अशी आहे की, महमुदाबाद यांच्यापोस्टवर एवढ्या तत्पतेनं नोटीस देणारा हरयाणा महिला आयोग, मध्य प्रदेशचे एक मंत्री विजय शहा यांनी महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांना त्यांची, म्हणजे ‘दहशतवाद्यांची समाजभगिनी’ असं म्हटलं, त्याबाबत काहीच करत नाही. त्यामुळे महिला आयोगाच्या हेतूविषयी शंका येते. हा महिला आयोग सत्ताधाऱ्यांचा ‘राजकीय अजेंडा’ तर राबवत नाही ना?

याबरोबरच शैक्षणिक संस्थांच्या अधिकारावरही गदा येत आहे. महमुदाबाद यांच्या पोस्टवरचा वाद वाढत जाण्याचीही शक्यता आहे. आधीच भारत शैक्षणिक संस्थांच्या स्वातंत्र्याच्या यादीत १७९व्या स्थानावर आहे! महमुदाबाद यांना झालेली अटक ही ‘भाजप युवा मोर्चा’च्या एक नेता आणि महिला आयोग यांच्या तक्रारीमुळे झाली आहे. सरकारच्या बुद्धिवाद्यांवर पद्धतशीर हल्ला चढवण्याच्या धोरणाचाच हा भाग आहे, असं अनेक शिक्षक संघटनांनी म्हटलंय.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

जेएनयूच्या शिक्षक संघटनेचे सूरज मुझुमदार यांनी म्हटलं आहे की, हा केवळ एका व्यक्तीच्या नाही, तर समाजाच्या कोणत्याही महत्त्वाच्या विषयावरील चर्चेच्या हक्कावरीलच हल्ला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या डीन अनिता रामापाल यांनी महमुदाबाद हे शिक्षक आहेत, ते कुणाला भडकवत नाहीत, असं म्हटलं आहे. अशोका विद्यापीठाच्या ‘फॅकल्टी असोसिएशन’ने सरकारची कृती म्हणजे जाणून बुजून केलेला छळ आहे. कोठडीत असताना त्यांना वैद्यकीय उपचार देण्यास, तसंच कुणाशीही संपर्क साधण्यास मनाई केली गेली होती. ही गोष्ट माणुसकीच्या विरोधी तसंच शैक्षणिक संस्थांमधील कुणी सरकारच्या धोरणाविरुद्ध आवाज काढू नये, असं बजावणारी कृती आहे.

अशोका विद्यापीठाने मात्र महमुदाबाद यांची टिप्पणी ही त्यांची वैयक्तिक होती, असं म्हणून अंग काढून घेतलं आहे. त्यांच्या एका माजी विद्यार्थ्यानं म्हटलंय की, विद्यापीठाची कृती ही मत व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्यासाठी नाही. तर त्यांच्यावरील दबावानं सरकारला संतुष्ट करण्यासाठी केलेली दिसते. काही काळापूर्वी प्रताप भानू मेहता आणि अरविंद सुब्रह्मण्यम यांसारख्या विद्वानांवर ज्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न झाला होता, त्याचीच ही नवी आवृत्ती दिसते.

पेचप्रसंग निर्माण झाला की, विद्वानांना वाऱ्यावर सोडण्याच्या विद्यापीठांचा पोकळपणा दाखवणारी ही घटना आहे, आणि विद्यमान भारतातला हा सर्वांत मोठा धोका आहे. भारताला महमुदाबाद यांच्या पोस्टमुळे धोका नाहीय, तर कुणी टीका केली की, ज्या प्रकारे त्याचा आवाज बंद करण्याचा संघटित प्रयत्न होतोय, त्याचा(च) ‘खरा धोका’ आहे.

.................................................................................................................................................................

लेखक आ. श्री. केतकर ज्येष्ठ पत्रकार आहेत.

aashriketkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, अशा ‘पाटा-वरवंट्या’खाली युरोप चिरडला जात आहे

युरोपमधील एके काळच्या दोन सामर्थ्यवान देशांतल्या निवडणुका नुकत्याच जवळजवळ एकाच वेळी पार पडल्या. दोन्ही देशांत सत्ताधारी पक्षांचा दारुण पराभव झाला. त्यावरून ‘सत्ताधारी पक्षांविरुद्ध बंड’ (anti-incumbancy) असं उथळ निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी केलं आहे. हे बंड कुठल्या एका पक्षाविरुद्ध नसून परिस्थितीविरुद्ध होतं. आणि या परिस्थितीला सर्व मुख्य पक्ष जबाबदार आहेत, या भावनेतून जनतेनं सर्वच मुख्य पक्षांना झिडकारलं.......