पाकिस्तान आणि पाकिस्तानप्रणित आतंकवाद, हा एक मोठा प्रश्न भारतासमोर आहे. वर वर बघता असं वाटतं की, आतंकवादाचा प्रश्न काश्मीरच्या इतिहासामधून निर्माण झाला आहे. काही प्रमाणात ते खरेसुद्धा आहे.
यात अजून एक बाजू अशी की, काश्मीरविषयी दोन्ही देशांमधील सामान्य नागरिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. पाकिस्तान लष्कराने तर सामान्य पाकिस्तानी माणसाला या बाबतीत अक्षरशः पेटवले आहे. काश्मीर आपण जिंकून घेऊ शकतो, हे त्याला सांगण्यात आलेले आहे. परंतु या प्रश्नाला अजून एक अत्यंत महत्त्वाची बाजू आहे.
२०१७ साली चीनविरुद्ध झालेल्या डोकलाम कारवाईच्या वेळी भारतीय सैन्याचे ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स’ असलेले लेफ्टनंट जनरल अनिल भट यांनी ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही बाजू अधोरेखित केली आहे. ते म्हणतात, खरा प्रश्न पाकिस्तानी सैन्य हा आहे. पाकिस्तानी सैन्याकडे प्रचंड सत्ता एकवटली गेली आहे. पाकिस्तानामधली राजकीय आणि आर्थिक सत्तासुद्धा सैन्याकडेच एकवटली गेली आहे. पाकिस्तानी सैन्याच्या सेनापतीच्या मर्जीविरुद्ध पाकिस्तानात कुणी पंतप्रधान बनू शकत नाही आणि बनला तर टिकू शकत नाही.
त्याचबरोबर पाकिस्तानी सैन्यानं पाकिस्तानातलं कॉर्पोरेट क्षेत्र आपल्या ताब्यात ठेवलं आहे. पाक सैन्य रस्ते बनवतं, हॉटेलं चालवतं. त्याच बरोबर सिमेंट उद्योग, साखर उद्योग, इन्श्युरन्स, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट असे अनेक उद्योग पाक सैन्याच्या ताब्यात आहेत. ही प्रचंड सत्ता पाक सैन्याला सोडायची नाहिये. परिणामी पाकिस्तान आर्थिक गर्तेत चालला आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. बलोचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा या प्रांतांमध्ये बंडाळी माजली आहे. सामान्य माणूस महागाई आणि बेरोजगारी यांच्यामध्ये भरडला गेला आहे.
अशी अवस्था पाकिस्तानमध्ये वारंवार येते आहे. अशी वेळ आली की, जनतेचं लक्ष मूळ प्रश्नांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ले केले जातात. असे हल्ले झाले की, युद्धाचे ढग जमतात. काही सैनिकी कारवाया होतात. जनतेमध्ये राष्ट्रवादाची मोठी लाट येते आणि मूळ प्रश्न बाजूला पडतात. लेफ्टनंट जनरल अनिल भट यांच्या मते हा खरा प्रश्न आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या परिस्थितीमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग असा की, पाकिस्तान हे ‘अण्वस्त्रधारी राष्ट्र’ आहे. त्यामुळे आपल्याशी भारत ‘ऑल आऊट वॉर’ करणार नाही, या भरवश्यावर पाक लष्कर असते! त्या धुंदीतून सगळे आतंकवादी खेळ केले जातात.
आतंकवादी हल्ला केला की, भारत शिक्षा करतो. काही चकमकी जरूर घडतात. परंतु ज्या काही चकमकी होतात, त्यांच्याबद्दल आपल्या जनतेशी खोटे बोलता येते. नुकत्याच झालेल्या युद्धामध्ये आपण भारताला लक्षात राहील, असा धडा शिकवला आहे, असे पाक जनतेला सांगण्यात आले आहे. पाकिस्तानात भारताला आपण हरवले म्हणून ‘विजय-यात्रा’ वगैरेसुद्धा काढण्यात आल्या आहेत. जनरल असीम मुनीर यांना ‘फील्ड मार्शल’ हे पद देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. यावरून आपल्या लक्षात येते की, पाकिस्तानी आतंकवाद हा एक बहुआयामी आणि अत्यंत जटिल असा प्रश्न बनून राहिला आहे.
नुकत्याच झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामधील संरक्षण तज्ज्ञांमध्ये एक महत्त्वाची चर्चा सुरू झाली आहे. ती अशी की, युद्ध हा आतंकवादावरचा योग्य तोडगा आहे का? याबाबतीत दोन्ही बाजूचे तज्ज्ञ काय म्हणत आहेत, हे ऐकले तर आपल्याला आपले मत तयार करता येऊ शकते.
आपल्याला वाटत असते की, अनेक दशके न सुटलेल्या आतंकवादासारख्या प्रश्नावर युद्ध हाच एक उपाय असू शकतो. आपला हा विचार एका मर्यादेपर्यंत योग्यसुद्धा आहे, परंतु आजच्या आधुनिक जमान्यात युद्ध ही एक अत्यंत अतिशय गुंतागुंतीची गोष्ट बनली आहे. विशेषतः ज्या राष्ट्रांकडे ‘अण्वस्त्रे’ आहेत, त्या राष्ट्रांच्या बाबतीत युद्ध हा प्रकार पूर्वीसारखा सरळ आणि सोपा उरलेला नाही. युद्ध झाले, एक बाजू जिंकली, एक हरली आणि त्यामार्गाने प्रश्न सुटला असे आज होत नाही. ‘अण्वस्त्रां’मुळे एक बाजू जिंकली आणि एक बाजू हरली असे होत नाही. दोन्ही बाजू हरतात. ‘अण्वस्त्रे’ इतका संहार करतात की, विजयाची चव चाखायला कुणी मागेही उरत नाही.
या आधीच्या लेखात आपण भारताने पाकिस्तानशी ‘ऑल आऊट वॉर’ करावे का, अशी चर्चा केली होती. या लेखात भारतीय सैन्यामधले तीन जनरल्स आणि दोन नागरी संरक्षण तज्ज्ञ यांची मते आपण बघितली होतीत्यापैकी केवळ एक म्हणाला होता की – ‘ऑल आऊट वॉर’ करायला हरकत नाही, कारण ‘अण्वस्त्रे’ वापरण्याची हिंमत पाककडे नाही. बाकीचे चार तज्ज्ञ सर्वंकष युद्धाच्या विरोधात होते. त्यातले दोन जनरल्स म्हणाले होते की, आपण मर्यादित युद्ध करावे. आपण पाकिस्तानच्या सीमा न ओलांडता पाकवर हल्ले करावेत. आज आपल्याला दिसून येतंय की, भारतानेसुद्धा अगदी हाच मार्ग स्वीकारला आहे.
७ मे ते १० मे या काळात चकमकी झाल्या आणि हल्ले झाले. या चार दिवसांत परिस्थिती गंभीर होत गेली. आता कुठल्याही क्षणी सर्वंकष युद्ध सुरू होते आहे की, काय असे सगळ्या जगाला वाटू लागले. पाकिस्तानवर दबाब वाढला. पाकिस्तानने शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला. या वेळेपर्यंत भारतालाही जो धडा शिकवायचा होता तो शिकवून झाला होता. त्यामुळे भारतानेही शस्त्रसंधी करायला होकार दिला.
आता दोन्ही देशात ‘विजय यात्रा’ काढल्या जात आहेत. दोन्ही देशांमध्ये राष्ट्रवादाला प्रचंड उधाण आलेले आहे. दुसऱ्या राष्ट्राचे आपण कसे प्रचंड नुकसान केले आहे, हेसुद्धा दोन्ही राष्ट्रांमध्ये सांगितले जात आहे.
.................................................................................................................................................................
हा लेख तुम्ही या व्हिडिओ लिंकवर पाहू-ऐकू शकता
.................................................................................................................................................................
या सगळ्या पार्श्वभूमीवर युद्ध हा उपाय आहे का, ही चर्चा भारतातल्या संरक्षण तज्ज्ञांमध्ये चालू आहे. एक बाजू म्हणत आहे की, पंतप्रधान मोदी यांनी २०१६ सालच्या उरी हल्ल्यापासून हा आतंकवादाचा प्रश्न चांगला हाताळला आहे. उरी, पुलवामा आणि आता पहलगाम या प्रत्येक आतंकावादी हल्ल्यानंतर प्रत्येक वेळी भारताने आधीपेक्षा मोठी शिक्षा भारताने पाकला केली आहे. विशेषतः या वेळी भारताने पाकला दाखवून दिले आहे की, त्याला आतंकवादाची न परवडणारी किंमत मोजावी लागली आहे.
युद्धाच्या शक्यतेची भीती पाकिस्तानला दाखवत राहणे, हा एकच मार्ग आहे. शिवाय पाकिस्तानच्या या असल्या उद्योगांमुळे सगळं जग ‘अण्वस्त्र युद्धा’च्या खाईत लोटलं जात आहे, हेसुद्धा भारताच्या या हल्ल्यामुळे जगाच्या लक्षात येऊ लागले आहे. त्यामुळे पाकिस्तानवर आतंकवाद रोखण्यासाठी भयंकर दबाब येईल. पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती बघता सततची युद्ध पाकितानला शक्य होणार नाहीत, असे या बाजूचे म्हणणे आहे.
असे म्हटले जाते की, भारताने या चार दिवसांच्या युद्धात साधारणपणे १० ते १५ हजार कोटी रुपये खर्च केले. तर पाकला साधारणपणे चार ते पाच हजार कोटी खर्च करावे लागले. म्हणजे, त्यांच्या रुपयाचा आंतरराष्ट्रीय विनिमय दर लक्षात घेतला, तर सुमारे १५ ते २० हजार कोटी रुपये!
या शिवाय शेअर बाजार कोसळल्यामुळे झाले, ते नुकसान वेगळे. अनेक विमानतळ बंद पडून झालेले नुकसान वेगळे आणि भारताने आत्तारी सीमा बंद केल्यामुळे पाकिस्तान चार हजार कोटी रुपयांच्या व्यापाराला मुकला. ते नुकसानसुद्धा वेगळे. याही पुढे जाऊन तर भारतामधून मिळणारी औषधे बंद झाल्यामुळे पाकिस्तानी जनतेचे जे नुकसान झाले, ते अजून वेगळे! पाकिस्तानची आर्थिक स्थिती भारतापेक्षा अगदीच क्षीण असल्यामुळे ही आर्थिक शिक्षा त्यांना खूप महागात पडेल, असे युद्धसमर्थक म्हणत आहेत.
यावर दुसऱ्या बाजूचे संरक्षण तज्ज्ञ म्हणत आहेत की, आधीच गरीब असलेल्या प्रजेला या सगळ्यामुळे काय फरक पडणार आहे? गरीब माणूस अजून थोडा गरीब झाल्यामुळे तसा काय फरक पडणार असतो? त्यांच्या म्हणण्यानुसार युद्धाचा खरे तर अगदी उलट परिणाम होतो. युद्ध झाले की, समाजात ‘युद्ध-ज्वर’ वाढतो, ‘राष्ट्रवादा’चे उधाण येते. त्यामुळे गरीब माणसाला आपल्या ‘गरिबी’चा थोडा काळ का होईना विसर पडतो.
आज भारताच्या रुपयाचा विनिमय दर प्रत्येक डॉलरमागे ८५ रुपये आहे. पाक रुपयाचा हाच दर ३५० रुपये आहे. यामुळे पाकिस्तानात प्रचंड महागाई माजली आहे. गंमत अशी की, या महागाईची सवय पाकिस्तानी जनतेला झाली आहे. तिला या युद्धामुळे पाकिस्तानचा रुपया ३५०वरून ३७०ला गेला, तरी तसा काय फरक पडणार आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे.
आर्थिक चटके बसून पाकिस्तानला शहाणपण येत नाही, हा अनुभव आहे, असे हे लोक दाखवून देत आहेत. भारताशी झालेल्या प्रत्येक युद्धाच्या वेळी पाकची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आली आहे, परंतु त्यांना काहीही फरक पडलेला नाही. धर्माची आणि राष्ट्रवादाची झिंगच अशी असते की, सामान्य प्रजेला त्याशिवाय दुसरे काही दिसत नाही आणि जाणवतही नाही.
युद्धज्वराला विरोध करणारे अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात- प्रत्येक आतंकी हल्ल्यानंतर तुम्ही जास्त जास्त शिक्षा करत चालला आहात. म्हणजेच तुम्ही ‘ऑल आऊट वॉर’च्या दिशेने एक एक पायरी चढत वर चालला आहात. यामुळे एक वेळ अशी येईल की, अण्वस्त्र युद्ध अपरिहार्य बनून जाईल. उरीच्या वेळी तुम्ही पायदळ वापरून ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, पुलवामाच्या वेळी तुम्ही पाक-व्याप्त काश्मीरमध्ये ‘एअर स्ट्राईक’ केले. आणि आता पहलगामच्या वेळी पाकची सीमा न ओलांडता मिसाइल आणि ‘ड्रोन स्ट्राईक’ केले. या प्रत्येक वेळी तुम्ही जास्त जास्त शिक्षा करत गेलात. आता जर परत आतंकवादी हल्ला झाला, तर तुम्ही काय करणार?
‘द लास्ट वॉर’ या पुस्तकामुळे प्रवीण सोहनी हे संरक्षणतज्ज्ञ प्रसिद्धीच्या झोतामध्ये आले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दर हल्ल्यानंतर जास्त जास्त शिक्षा करत जाण्यामुळे आपण ‘ऑल आऊट वॉर’च्या अगदी कड्यावर येऊन उभे राहिलो आहोत. यामुळे दर वेळी सर्वंकष युद्धाचा उंबरठा कमी कमी होत चालला आहे. ‘ऑल आऊट वॉर’ च्या अगदी उंबरठ्यावर आपण उभे आहोत.
अचानक युद्ध पेटू नये म्हणून दोन्ही देशांनी खूप काळज्या घेतलेल्या असतात. दोन्ही देश सतत संशयग्रस्त राहिले, तर अचानक युद्ध पेटू शकतं. त्यामुळे दोन्ही बाजूंची सैन्यं सीमेपासून शेकडो किलोमीटरवर ठेवलेली असतात. रणगाडे आणि मोठ्या तोफा वगैरे दूर ठेवलेल्या असतात, परंतु आता ड्रोन्स आणि मिसाईल्स यांचा जमाना आला आहे. आता कधीही आणि सीमेच्या कितीही आतून ही ड्रोन्स आणि मिसाईल्स डागली जाऊ शकतात. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये संशयाचे वातावरण तसेही वाढलेले आहे. दुसरी बाजू पूर्णपणे सावध व्हायच्या आत फार मोठा हल्ला केला जाऊ शकतो.
थोडक्यात, एकीकडे विश्वासाचे वातावरण कमी कमी होत आहे आणि दुसरीकडे युद्धसीमाही कमी कमी होत चालली आहे. ‘युद्ध हाच उपाय’चे विरोधक नेमका हाच मुद्दा मांडत आहेत. त्यांच्या मते ज्यांच्या शेजाऱ्याकडे अण्वस्त्र आहेत, त्यांनी युद्धारंभ होणारच नाही, हे बघितले पाहिजे.
युद्ध-विरोधक अजून एक महत्त्वाचा मुद्दा मांडताना दिसतात. ते म्हणतात, आता पुढच्या वेळी आतंकवादी हल्ला झाला, तर तुम्ही पाकला शिक्षा म्हणून सर्वंकष युद्ध करणार आहात का? आणि या प्रकारात ‘अण्वस्त्र युद्ध’ सुरू झाले तर काय? पाकला शिक्षा करण्याच्या नादात, तुम्ही आपल्या चाळीस-पन्नास कोटी लोकांची आयुष्यं पणाला लावणार आहात का? असं झालं, तर पाकिस्तानला शिक्षा करण्याचा डॉक्ट्रिन यशस्वी झाला, असं म्हणता येईल का?
त्यात भरीस भर म्हणून आता मोदी सरकारने जाहीर केले आहे की, आता यापुढे भारत देशात कुठलीही आतंकवादाची घटना घडली की ‘भारताविरुद्ध युद्ध पुकारले गेले आहे’, असे आम्ही समजणार आणि योग्य ती कारवाई करणार. त्यावर ‘युद्ध हा उपाय नाही’ असे सांगणारे म्हणत आहेत की, समजा, भारताच्या एखाद्या दुसऱ्याच शत्रूने असा आतंकी हल्ला घडवून आणला असेल तर काय? या परिस्थितीमध्ये चौकशी न करता तुम्ही पाकला जबाबदार धरणार आहात का? समजा बांगलादेशातून काही अतिरेकी आले आणि त्यांनी काही केलं, तर तुम्ही काय करणार?
ते अजून एक मुद्दा मांडत आहेत. त्यांचे म्हणणे आहे, आता विरोधी पक्ष दर वेळी काही तरी ज्वलंत करण्याविषयी दबाव वाढवत राहील. या मुद्द्यामध्येही अर्थ आहे. या वेळी २२ तारखेला हल्ला झाल्यावर ७ तारखेची कारवाई होईपर्यंत विरोधकांनी सरकारवर केवढा दबाव टाकला होता, हे आपण सगळ्यांनीच बघितलेले आहे.
असे घडू नये म्हणून ‘युद्ध नको’वाले म्हणत आहेत की, असे थेट युद्ध करण्यापेक्षा तुम्ही ‘कोव्हर्ट ऑपरेशन्स’ म्हणजे ‘गुप्त करवाया’ करा. त्या अनेक मार्गांनी करता येतात. त्याअंतर्गत पाकिस्तानामधल्या अतिरेक्यांच्या हत्या करणे, पाकिस्तानामधल्या अतिरेकी संघटनांवर हल्ले करता करणे, अशा गोष्टी करता येतील. शिवाय, सायबर हल्ले करून अतिरेकी संघटनांचे आर्थिक नुकसानसुद्धा करता येईल. याही पुढे जाऊन आयएसआय या पाकच्या गुप्तहेर संघटनेचे सर्व्हर्ससुद्धा हॅक करता येतील.
अजून एक मार्ग म्हणजे पाकिस्तानला ‘फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स’ या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी संस्थेच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याचे प्रयत्न करणे. ही G-7 या देशांच्या संघटनेची संस्था आहे. दहशतवादी देशांना या संसथेच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्यात येते. या मार्गाने आतंकवादासाठी लागणारे फंडिंग मिळणे अवघड बनेल.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
अजय साहनी हे एक महत्त्वाचे संरक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांच्या मते दर हल्ल्यानंतर अशी सैनिकी प्रतिक्रिया देण्यापेक्षा भारताने दहा वर्षांचे नियोजन करून सतत गुप्त करवाया करत राहावे. त्यांच्या मते या मार्गानं भारत पाकिस्तानचे कंबरडे कायमचे मोडू शकेल.
त्यांच्या म्हणण्यानुसार भारताला आतंकवाद नियंत्रणात आणण्यात यश आलेले आहे. २००० साली काश्मीरमध्ये एकंदरीत चार हजार माणसे मारली गेली होती. गेल्या वर्षी सुमारे १२०च्या आसपास मारली गेली आहेत. हे मोठे यश आहे. अशी परिस्थिती असताना आपण युद्धाचा धोका कशासाठी पत्करायचा. ‘कोव्हर्ट ऑपरेशन्स’ करून उरलेले काम पूर्ण करता येईल. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये आतंकवादी लोकांवर हजारो ड्रोन हल्ले केले आहेत. त्यांचे हजारो अतिरेकी मारले आहेत, परंतु त्यामुळे काहीही फरक पडलेला नाही. या गोष्टीचाही विचार भारताने युद्धाचा धोका पत्करताना करायला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
‘द हिंदू’मधील मुलाखतीमध्ये जनरल अनिल भट यांना ‘भारताने युद्ध करावे की करू नये?’ असा प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले की, ‘खरं सांगायचं तर पाकिस्तानवर युद्धाचा दबाव ठेवणे योग्य ठरेल असे मला वाटते’. पण पुढे त्यांनी ‘इनसाइड द पाकिस्तान आर्मी’ या पुस्तकाच्या लेखिका कॅरी श्कोफील्ड या लेखिकेचा संदर्भ दिला. भारताने काय करावे असे तुमचे मत आहे?, असा प्रश्न जनरल भट यांनी श्कोफील्ड यांना विचारला होता. त्यावर श्कोफील्ड म्हणाल्या की, “भारताने आपली कार चालवत असताना पुढच्या काचेवर पाकिस्तानला ठेवू नये. भारताने आपले लक्ष मुख्यतः आपल्या आर्थिक विकासावर केंद्रित करावे. पाकिस्तानला भारतानं कारच्या ‘रिअर व्ह्यू मिरर’वर ठेवावे”.
श्कोफील्ड यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, इतिहास बघितला तर आतंकवाद आणि प्रादेशिक अस्वस्थता हे प्रश्न काही दशके टिकले तरी ते कायमस्वरूपी नसतात. ज्या देशाचा आर्थिक विकास होत राहतो, तोच देश शेवटी या बाबतीत यशस्वी होतो. आज पाकिस्तान भिकारी झाला आहे. जसा जसा पाकिस्तान आर्थिक गर्तेत चालला आहे, तसा तसा कश्मीर घाटीमधील त्याचा पाठिंबा कमी कमी होत गेला आहे. भारतासारख्या संपन्न होत चाललेल्या देशाचा हात सोडून पाकिस्तानसारख्या भिकारी देशाबरोबर कोण जाईल? काश्मिरी लोकांना चांगले माहीत आहे की, आपण भारत, पाकिस्तान आणि चीन अशा अण्वस्त्रधारी देशांच्या बेचक्यात सापडलो आहोत. संरक्षणाच्या दृष्टीने आपण या तिघांनाही महत्त्वाचे वाटत आहोत. त्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य कदापि मिळणार नाहिये. भारत आणि पाकिस्तानमधील आर्थिकदृष्ट्या जो बलवान आहे, त्याच्या बरोबर जाण्यावाचून काश्मिरी लोकांना पर्याय राहणार नाही.
या अशा आहेत दोन्ही बाजू. याचा विचार तुम्ही करायचा आहे. यू बी द थर्ड अंपायर!
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment