विंग कमांडर अशोक लिमये वयाच्या चाळिसाव्या वर्षी, सतत उंचावणारं करिअर अपघातामुळे धोक्यात आलं असतानाही अत्यंत संयमानं मार्ग शोधू शकले...
ग्रंथनामा - झलक
सोनाली नवांगुळ
  • ‘राखेतून उगवतीकडे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 01 August 2023
  • ग्रंथनामा झलक विंग कमांडर अशोक लिमये Wing Commander Ashok Limaye द फिनिक्स रायजेस The Phoenix Rises राखेतून उगवतीकडे Rakhetun Ugavatikade सोनाली नवांगुळ Sonali Navangul

विंग कमांडर अशोक लिमये यांच्या ‘द फिनिक्स रायजेस’ या आत्मकथनाचा ‘राखेतून उगवतीकडे’ या नावाने सोनाली नवांगुळ यांनी मराठी अनुवाद केला आहे. नुकताच तो राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्याला नवांगुळ यांनी लिहिलेलं हे मनोगत...

..................................................................................................................................................................

विंग कमांडर अशोक लिमये यांचं ‘द फिनिक्स रायजेस’ हे पुस्तक ‘मेनका’च्या आनंद आगाशे व सुजाता देशमुखांनी मला दिलं, याचं प्रमुख कारण आमची दोघांची शारीरिक स्थिती आणि त्यामुळे आलेल्या मर्यादा एकसारख्या होत्या. दोघंही अपघातामुळे ‘पॅराप्लेजिक’ झालो होतो. हे मी अनुवादासाठी घ्यायला हवं, कारण शारीरिक स्थितीवर मात करण्याचं विंग कमांडर अशोक लिमयेंचं धैर्य, नियोजन, त्यातले अडथळे आणि त्यातून त्यांनी मिळवलेलं यश; हे सारं मला स्वत:च्या अनुभवामुळे अधिक चांगलं कळण्याची शक्यता आहे, असा त्यांचा विचार होता.

‘मेनका’कडून पुस्तक मिळाल्यावर पहिल्या तीन प्रकरणांचा कच्चा अनुवाद पूर्ण केल्यानंतर आनंद आगाशे मला विंग कमांडर अशोक लिमये यांना भेटायला घेऊन गेले. पुस्तकाचा विषय माझ्या नेहमीच्या विषयांपलीकडचा आणि भाषा माझ्या स्वभावाच्या तंतोतंत विरोधातली. त्यामुळे खूप शंका होत्या माझ्या मनात. त्यांना भेटायचं, म्हणून माझा उत्साह नुसता उतू जात होता.

विशेष म्हणजे बोलताना कळलं, आमच्या वयांमध्ये जरी बराच फरक असला, तरी आम्हा दोघांना पॅराप्लेजिया जवळपास २५ वर्षांपूर्वी झाला होता.

पुण्यातल्या त्यांच्या बंगल्यात आम्ही पोहोचलो, तर व्हीलचेअरवरून घरात सहज प्रवेश करता येईल, असा एक सुटसुटीत व अत्यंत योग्य मापात बांधलेला रॅम्प हजर होता. आत गेल्यावर साक्षात लिमयेसर सामोरे आले. ऐटदार, उंचनिंच, व्हीलचेअरवर थाटात बसलेले. त्यांच्याशी एक ‘कड्डक’ हस्तांदोलन झाल्यावर मी त्यांच्याकडे पाहत असताना माझ्या तोंडून नकळत उद्गार निघाला, “सर, तुमचं पोट किती सपाट आहे! आहा!!” सर हसले. कदाचित या नाचऱ्या उत्साहातून माझ्या स्वभावाची चुणूक त्यांना मिळून गेली असावी.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

पॅराप्लेजिया झालेल्या माणसांना कमरेखालच्या भागात संवेदना नसणं, यामुळे फक्त शरीराच्या वरच्याच भागाची हालचाल होणं, हालचालीच्या कमतरतेमुळं हाडं ठिसूळ होत जाणं वगैरे असतंच. त्यातच नैसर्गिक विधींवर नियंत्रण नसल्यामुळे शरीर व मनावर असणारा ताण, व्यायामाचा व नेमक्या डाएटचा अभाव, शिवाय महत्त्वाचं म्हणजे दुर्बळ इच्छाशक्ती या साऱ्यांमुळे बरेचदा पॅराप्लेजिक माणसं पोटाकडचा व दंडाचा भाग वाढलेली, म्हणून बेढब दिसतात आणि बरेचदा जरुरीपेक्षा जास्त स्थूल असतात. सरांचं असं फिट असणं मला चकित तर करत होतंच, पण आपणही त्यांच्याकडून चार युक्तीच्या गोष्टी घेऊन ‘असं’ दिसायला हवं, ही प्रेरणाही देत होतं. मी प्रचंड प्रेमात पडले लिमयेसरांच्या.

आजवर माझा कधी एनसीसीशीही संबंध नव्हता, त्यामुळे एकूण हे आखीव शिस्तीचं प्रकरण व कडक गणवेशातली भाषा माझ्या चांगल्याच दांड्या उडवणार होती. पहिल्यांदा लिमयेसरांना मी अगदी बाळबोध शंका विचारली, “सर, पायलटचा डेकोरम इतका कडक असतो का, की ते विमानात बसायला जाताना चार पावलंसुद्धा चालत न जाता टॅक्सीतून जातात आणि मग आत चढतात?” सर माझ्याकडे पाहत म्हणाले, “म्हणजे?” मी त्यांच्या पुस्तकातल्या त्या विशिष्ट ओळीवर बोट नाचवलं. तेव्हा अगदी मनमोकळं हसत त्यांनी सांगितलं, “टॅक्सिईंगचा टॅक्सीशी संबंध नाही. विमान आकाशात उडण्यापूर्वी, धावपट्टीवरून धावताना जी हालचाल करावी लागते, त्याला ‘टॅक्सिईंग’ म्हणतात.”

- प्रश्न विचारण्यातला प्रामाणिकपणा लक्षात घेऊन सर मला मनापासून माहिती पुरवत होते. भारतीय सैन्यदलाविषयी, फायटरफ्लाईंगसारख्या कामाविषयी गावा-शहरातल्या माणसांना उत्सुकता वाटावी आणि पुढे या क्षेत्रात येण्याची इच्छा नवयुवकांच्या मनात तयार करावी, असाच त्यांचा पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश होता.

विमानं ठेवण्यासाठीच्या वैशिष्ट्यपूर्ण जागेला काय म्हणतात, हे सामान्य ज्ञानही मला असण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे इतकी अवजड विमानं ‘हँगर’ला कशी अडकवतात, हाही प्रश्न मला पडलाच होता. गालातल्या गालात हसत लिमयेसर शंका दूर करत होते. या भेटीत आम्हा दोघांमध्ये एक छान मोकळेपणा तयार झाला.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

मणिपूरला ईशान्य भारतातलं ‘काश्मीर’ होण्यापासून रोखायला हवं...

मणिपूरमधील घडणाऱ्या अमानवी घटनांकडे पाहण्याची ‘आपपरभावी वृत्ती’ त्या घटनांइतकीच हादरवून टाकणारी आहे...

मणिपूरमधील अराजक आणि ‘संविधान सभे’च्या शेवटच्या भाषणात डॉ. आंबेडकरांनी दिलेला इशारा

मणिपूरमध्ये तातडीनं शांतता प्रस्थापित करणं, ही राज्य आणि केंद्र दोन्ही सरकारांची जबाबदारी आहे

.................................................................................................................................................................

लिमयेसरांची आणि माझी शारीरिक अवस्था समान असली, तरी आमची घडणच मुळात वेगवेगळी होती. लिमयेसर भारतीय सैन्यदलाच्या मुशीतून झळाळून बाहेर पडलेले. त्यामुळे अपघातानंतर त्यांना बसलेला धक्का, अपघातावेळचं वय, सावरण्यासाठी लागलेला काळ; हे सारंच माझ्या अनुभवांपेक्षा वेगळं होतं. बाहेरच्या जगाचा त्यांना असलेला अनुभव आणि केवळ फायटर पायलट बनून न राहता, सतत शिकत राहण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास, यामुळे त्यांचं जगणं आणि जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाही फारच वेगळा होता.

वयाच्या नवव्या वर्षी अपघात झाल्यावर जे काही उपचार मिळाले, त्यानंतर मी शारीरिक अडचणींबद्दल विशेष जाणीवजागृती नसणाऱ्या बत्तीसशिराळ्यासारख्या माझ्या खेडेगावातच येऊन राहिले होते. बाहेरच्या जगातली पॅराप्लेजिया झालेली माणसं आपलं आयुष्य कशा तऱ्हेनं जगताहेत, हे शोधण्याचा न माझ्या मनात विचार आला, न इतर कुठून माझ्यापर्यंत पोहोचला. ते मार्ग बरेच नंतर धडपडीतून सापडत गेले. तरीही पॅराप्लेजियासह जगण्याचे आणि सतत चैतन्यमय राहण्याचे सगळेच मार्ग असं नाही.

म्हणूनच लिमयेसरांची दैनंदिनी ऐकून माझ्या जगण्यात गुणात्मक फरक जरूर पडला. त्यांच्याकडून नव्या युक्त्या मिळाल्या. शरीर हे जैविक यंत्रच, एखाद्या अक्षमतेमुळे त्याची बिघडलेली भट्टी समजून घेऊन, ती आणखी बिघडू नये म्हणून योग्य व्यायाम, औषधोपचाराचं नियोजन, सतत कार्यमग्न राहण्याची केलेली सोय आणि शक्य तितकं चलनवलन लिमयेसर कसे करतात, हे ऐकताना माझा स्वतःबाबतीतला उत्साह वाढत गेला. मला दिसणाऱ्या इतर पॅराप्लेजिक्सच्या तुलनेत मी खूपच ‘अॅक्टिव्ह’ होते, पण माझं विमान लिमयेसरांना पाहिल्यावर खाली उतरलं, पुन्हा उडण्यासाठी!

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्ट २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

............................................................................................................................................................

लिमयेसरांच्या पुस्तकातलं वातावरण माझ्यासाठी खूपच उपरं असल्यामुळे ते शक्य असेल तितकं ओळखीचं करून घ्यावं, असं फार मनात होतं. ते वातावरण बघितल्यावर मला अनुवादाची भाषा सापडेल, असं वाटत होतं. म्हणून लिमयेसर व आनंद आगाशेंकडे मी एनडीए पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी ते मान्य केलं, संबंधितांकडून परवानगी काढली. तिथल्या दैनंदिनीविषयी लिमयेसरांचं मार्गदर्शन घेतलं. त्यांनी नेवीमध्ये करिअर करण्यासाठी एनडीएमध्ये शिकत असलेला एक विद्यार्थी - मृगेंद्र जोशी याच्याशी जोडून दिलं. तो आणि त्याचे आईबाबा मंजू आणि विनायक हे दोघंही एनडीएचा परिसर फिरताना सोबत होते. हळूहळू पुस्तकातल्या ‘स्क्वॉड्रन’, ‘बटालियन’, ‘मफ्ती’, ‘पीओपी’, ‘लॅनयार्ड’, ‘सॉर्टी’ वगैरे अनेक शब्दांना माझ्या नजरेत चित्र व अर्थ मिळत गेला.

लहानपणापासून लिमयेसरांना हॉस्टेल्समध्ये राहण्याचा सराव होताच, त्यामुळे शिक्षणाच्या व पुढे नियुक्त्यांच्या निमित्तानं सतत नव्या जागी जाऊन ती जुनी करणं त्यांना जड गेलं नाही. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना वडलांकडून विमानं उडवण्याविषयीचं कुतूहल जागवणारं ‘ऑब्झरवर्स बुक’ मिळालं. त्यानंतर विमानांविषयी जितकं काही वाचायला मिळेल, ते वाचण्याचा त्यांना नादच लागला. मग दरवर्षी ‘ऑब्झरवर्स बुक’ची नवी आवृत्ती मिळत गेली.

छंदाचं रूपांतर ध्येयामध्ये झालं. ट्रेकिंग, हायकिंग वगैरे छंद होतेच. या सगळ्यातून नेमकी व कठोर शिस्त आणि बोलण्यापेक्षा कृतीतून सिद्ध होणं, हा लिमयेंचा स्वभाव बनत गेला. या पुस्तकात तो पुरेपूर उतरला आहेच. त्यामुळे वयाच्या चाळिसाव्या वर्षी, सतत उंचावणारं करिअर अपघातामुळे धोक्यात आलं असतानाही अत्यंत संयमानं ते मार्ग शोधू शकले. म्हणूनच पुस्तक लिहिताना जगण्यातल्या भावनोत्कट गोष्टीपेक्षा प्रशिक्षणावर त्यांनी अधिक भर दिला आहे. ते सांगतानाची भाषाही काटेकोर, सैल नसलेली व कमी गुंतवणारी असली, तरी तेच या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे.

अत्यंत फोकस्ड जशी त्यांची जगण्याची शैली आहे, तशीच लिहिण्याचीही आहे! कधी कधी त्यांचे विनोद व विशिष्ट भाषाशैली कळणं मला जड गेलं, पण इतकं आव्हान तर हवंच अधिक चेव येण्यासाठी.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा : 

द्वेष, तिरस्कार आणि सूडबुद्धीनं पेटलेली इथली माणसं आतून पूर्णतः किडली आहेत, असंच आता वाटू लागलंय...

मणिपूर धुमसतेय, मात्र खरा प्रश्न असा आहे की, आताचे दंगे ‘मैतेई विरुद्ध कुकी’ असेच का आहेत?

मणिपूर जळत आहे... पण कुणाला काय त्याचे! जळो, जळत राहो... आम्हा काय त्याचे!

.................................................................................................................................................................

लिमयेसर अपघातापूर्वी कसे दिसायचे, हे पाहण्याचीही उत्सुकता मला होती. तेव्हा त्यांनी गोविंद निहलानींचा ‘विजेता’ नावाचा सिनेमा सुचवला. त्यात अगदी छोटी, कुणाल कपूरचा ‘फ्लाईंग इन्स्ट्रक्टर’ म्हणून खऱ्या आयुष्यातली भूमिका त्यांनी निभावली होती. लिमयेसरांना त्यांनी अपघाताच्या सुरुवातीच्या दिवसात सोसलेल्या त्रासाबद्दल बोलतं करायचा एक क्षीण प्रयत्न करताना मी विचारलं, “हॉस्पिटलमधले उपचार संपल्यावर घरी परतलात, तेव्हा अपघातामुळं काय घडून गेलंय याची तीव्र जाणीव झाली का?” - तर गंभीर चेहरा ठेवून सर म्हणाले, “माणूस खूप बुद्धिमान असला की, त्याला त्रास होतो. माझ्याबाबतीत तसं काही नव्हतं, त्यामुळं सोपं गेलं असेल कदाचित.”

तरी नेट लावत पुन्हा मी विचारलं, “निराशा येऊन सगळं नकोसं वाटतं का केव्हातरी?”

“हं, म्हणजे माझे मामा-मामी पूर्ण बहिरे आहेत, पण त्यांचं चाललंय नीट. माझी बायको प्रिया माझ्या सगळ्या लहरी जाणते. कधी वैताग आला, तर तिच्याशी बोलतो. आता पहा सोनाली, माझी किंवा तुझी केस... व्हीलचेअर आहे, बाकी ऐकू येतंय, बोलता येतंय. उरलेलं सगळं ठीकठाक आहे. यू आर यंग. आय अॅम फिट. आणखी काय हवं?”

“नवं विमान ज्या पद्धतीनं तुम्ही उत्सुकतेनं पाहिलं, तसं अपघातानंतरचं अनोळखी शरीर, नवं जगणं पाहिलं? मन:स्थितीचं काय?”, असंही प्रश्न बदलून विचारायचा प्रयत्न केला.

म्हणाले, “उत्सुकतेनं असं नाही पाहिलं, पण शरीर समजून घेणं ही गरज होती. गरज पूर्ण करण्यासाठी ना-ना प्रश्न विचारायला हवेत. प्रश्न पडले, तर उत्तरंही मिळतात. मार्ग काढावे लागतात... आणि मनःस्थिती! त्या वेळी प्रत्येक गोष्ट माझ्याकरता नवी होती. हॉस्पिटलमधल्या छताला फॉल्स सिलिंग होतं. त्यावर असणाऱ्या डिझाईनमध्ये किती चौकोन आहेत, हे मला पाठ झालं. ते दिसले की, मला धीर वाटायचा. इतकं सोपं आहे हे! हॉस्पिटलमधली टॉयलेट्स व्हीलचेअरसाठी सोयीस्कर नव्हती. त्या वेळचा अनुभव लक्षात घेऊन माझ्या घराच्या रचनेत मी स्वतः लक्ष घातलं, कारण मला व्हीलचेअरसह आरामशीर व सोपं जगायचं होतं. इथून दोन हातांवर बसलेल्या माणसापर्यंत जायचं, तरी मला सांगावं लागायचं की, तिथं घेऊन चला. त्यांना माझ्यापर्यंत येऊन काही द्यावं घ्यावं लागू नये, याचं प्रशिक्षण मला स्वतःला द्यावं लागलं. मला स्वतःला बजावावं लागलं की, मी स्वतः जाणारय, ते नाही येणार माझ्यापर्यंत! हळूहळू गेली २०-२५ वर्षं मी या सगळ्या गोष्टी शिकत चाललो आहे.”

स्वावलंबी होण्याचाच आणखी एक प्रयत्न म्हणून लिमयेसरांनी लूना आणि नंतर कार स्वत:च्या गरजेनुसार अनुकूल करून घेतली. त्यांच्या परवान्यानं काय हे विचारलं, तर म्हणाले, “हो... गाडी गरजेनुसार बनवून घेणं कर्म अवघड होतं, पण परवान्याबद्दल खूप त्रास झाला. त्रास झाला म्हणण्यापेक्षा माझा अॅप्रोच चुकीचा होता.”

“म्हणजे?”

“म्हणजे समजून घ्यायचं!”

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ ऑगस्टपर्यंत २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................

फार वर्णनात न अडकता शब्दफेकीतून लिमयेसरांनी व्यवस्थांबद्दलचा व्यक्त केलेला उपरोध मला समजला. भारतीय सेनादलातल्या हवाई विभागात अत्यंत महत्त्वाची पदं भूषवलेल्या लिमयेसरांची विनोदाची व उपरोधाची पद्धत माझ्या तशी सवयीची होऊ पाहत होती, पण तरी नवे धक्के बसत होते...

जाता जाता त्यांना म्हटलं, “तुम्ही म्हणता की, व्यक्तिगत प्रशिक्षणातून स्थैर्य येतं... ते तुमच्या हवाईदलातल्या चाकोरीत की, घरगुती जगण्यातही? दोन्ही ठिकाणच्या वातावरणामध्ये खूप फरक आहे ना म्हणून...”

“दोन्ही ठिकाणी माझं धोरण हे एकच खरं तर. मुलींबाबतीतही. जितकी मोठी चूक त्या करतील, तितकी माझी प्रतिक्रिया सौम्य असते. नियंत्रित असते. छोटी चूक असली की, आय विल थ्रो अप्. मोठ्या चुकीला, आय वूड नॉट से ए थिंग. त्यांना कळतं लगेच! घराचं दार आपटलं; तर मी जोरजोरात ओरडेन, पण दार तोडलं, तर मी काही नाही म्हणणार. दॅट्स प्रॉबॅबली द वे.”

‘राखेतून उगवतीकडे’ - विंग कमांडर अशोक लिमये | अनुवाद - सोनाली नवांगुळ

राजहंस प्रकाशन, पुणे | मूल्य - ३२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......