जनता ‘तरुण राजकारण्यां’ना डोक्यावर घेणार नाही, अशी आपली समजूत ‘गोबेल्सचे प्रचारकी तंत्रज्ञान’ वापरून पद्धतशीरपणे करून देण्यात आली आहे!
पडघम - देशकारण
जीवन तळेगावकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 15 June 2023
  • पडघम देशकारण राजकारण तरुण राजकारण लोकशाही आप

राजकारण हे अशाश्वत असे कार्यक्षेत्र आहे. ज्यांना राजकारणी व्हायचे आहे, त्यांच्या ठायी लोकाभिमुख होऊन काम करण्याची अंतस्थ ऊर्जा असावी लागते. या ऊर्जेचा पारंपरिक पद्धतीने मिळणाऱ्या शिक्षणाशी काही संबंध असत नाही. लोकशाहीत ‘शिक्षित राजकारणी’ या प्रजातीला फारसे महत्त्व नसते. इथे अनुभवाधारित शिक्षण अधिक महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने राजकारण्यांची ‘पाठशाळा’ म्हणजे मतदारसंघ, आणि त्यांचे शिक्षक म्हणजे जनता जनार्दन! जनतेचा पाठिंबा हाच त्यांच्या अंतस्थ ऊर्जेचा स्रोत असतो.         

यशस्वी होण्याचे प्रमाण नगण्य असूनदेखील राजकारणात सक्रिय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड मोठी असते. असे काय आहे, या क्षेत्रात जे लोकांना एवढे खुणावते?

काम करणारा एक तळातला कार्यकर्ता/ पक्षाचा प्राथमिक सदस्य, अशीच खरे तर बहुतेकांची सुरुवात होते, कारण तेवढेच राजकारणात उतरण्याचा निर्णय घेणाऱ्याच्या हातात असते. त्यानंतर होणाऱ्या घडामोडींचा तो स्वतःची नाममुद्रा निर्माण होईपर्यंत फक्त एक भाग बनून राहतो, दिलेली कामे करत राहतो. कधी आपल्यापेक्षा जास्त अनुभवी, शिकलेल्या वा अगदीच न शिकलेल्या ‘अंगठाछाप’ मोठ्या नेत्यांचे आदेश झेलत झटत राहतो.

कार्यकर्त्याकडे नेमके ‘व्हिजन’ नसते, फक्त त्याला जनतेमध्ये स्वतःचे नाव मोठे करायचे असते, स्वतःची नाममुद्रा (आयडेन्टिटी) निर्माण करायची असते. खरे तर, त्याला कशाचीही शाश्वती देता येत नाही, कारण त्याला पक्षातून तशी शाश्वती कोणीच देत नसते. एक तर केलेल्या कष्टाचा मोबदला नाही, पगार नाही, प्रोव्हिडंड फंड नाही, हेल्थ इन्श्युरन्स नाही, शिक्षण क्षेत्रात काही अनुदान नाही, एखादी शासकीय ‘घर’ योजना नाही… एवढेच कशाला जनतेचे ओझे खांद्यावर वागवणाऱ्या या कार्यकर्त्याला स्वतःच्या परिवाराला देण्यास वेळदेखील मिळत नाही. मग त्याने या ‘लष्कराच्या भाकऱ्या’ का भाजायच्या?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

भारतीय संस्कृतीनुसार मनुष्याच्या ठायी तीन ‘एषणा’ (इच्छा) असतात, असे सांगितले आहे. ‘धनेषणा’, ‘दारेषणा’ आणि ‘लोकेषणा’. या तिन्हींपैकी जी नावलौकिक मिळवण्याची इच्छा असते, ती सगळ्यात प्रबळ असते, एकवेळ मनुष्य ‘धन’, ‘दारा’ या इच्छांवर विजय मिळवू शकतो, पण ‘लोकेषणे’वर विजय मिळवणे अगदी अशक्यप्राय असते. तो केवळ योगियांचा प्रांत आहे, असे समजले जाते. 

दुसरे म्हणजे, आपण जेव्हा असे म्हणतो, राजकारणी लोकांना ‘आयडेंटिटी क्रायसिस’ने झपाटलेले असते, तेव्हा खरे तर तो ‘लोकेषणे’चाच एक भाग असतो. बऱ्याच वेळा आपण खासगीत म्हणतो, “सत्तेत असले की, कितीही उशिरापर्यंत काम केले तरी राजकारणी तरुण दिसतात, सत्ता हातची गेली की, त्यांच्या चेहऱ्यावरची रयाच जाते.” त्यामागे कारण इतर दोन एषणांपेक्षा ‘लोकेषणा’च असते. “आता आपल्याला कोणी ओळखत नाही, कार्यक्रमांना पाहुणे म्हणून बोलावत नाही, जनतेसमोर जाण्याच्या संधी कमी झाल्यात”, हे अपयश त्यांच्या अंतर्मनाला खात राहते.    

खरे तर हा मनुजस्वभाव आहे. त्यावर काही औषध नाही, हे सत्य एकदा स्वीकारले की, तरुण राजकारण्याने स्वतःच्या ठायी असलेल्या ऊर्जेचा सकारात्मक विनियोग करायला शिकले पाहिजे. जे करायचे ते मनापासून करायचे, चांगल्यात चांगले करण्याचा प्रयत्न करायचा, जे करायचे ते केवळ ‘पक्षाने सांगितले, केलेच पाहिजे’, या भावनेतून करण्यापेक्षा स्वतः त्यात रस घेऊन एक आपलेपणाचा आयाम त्या अंगीकृत कार्याला द्यायचा प्रयत्न करायचा; म्हणजे काम उठून दिसते.

आदी शंकराचार्यांनी म्हटले आहे- ‘उद्धरेत् आत्मनाऽत्मानं’… ‘स्व:च स्वतःचा उद्धार करायला शिकले पाहिजे’. अशा वेळी आपला हात धरून पुढे नेणारा कोणी ‘लोकनेता’, ‘स्पिन डॉक्टर’ येईल, अशी अपेक्षा बाळगणे हे स्वप्नरंजनच आहे.  

भारत जगातली सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था आहे, सगळ्यात बहुसंख्य तरुणांचादेखील देश आहे. आपली व्यवस्था उणीपुरी ७५ वर्षांची आहे. म्हणजे अगदी ‘तरुण’ देश आहे. तेव्हा ज्यांना स्वतःला सांभाळणे अवघड होऊन बसले आहे, अशा वृद्ध राजकारण्यांनी देशाचा कारभार चालवत राहण्यापेक्षा, तो तरुणांनी चालवणे अधिक गरजेचे आहे. त्या कामी तरुणांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. वृद्ध राजकारण्यांकडून ही अशा बाळगणे व्यर्थ आहे.    

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

...............................................................................................................................................................                              

सरकारी-खासगी नोकरीत असोत का व्यापारात वा शेतीत; जसे लोक आपापल्या परीने संधीच्या शोधात असतात, तसे राजकारण्यांनीही करणे अपेक्षित आहे. ज्या देशात १३३ कोटी लोक आहेत, त्यात आपण संधी शोधली नाही, तर स्वतःचा उद्धार करणार कसा? कोणी संधी साधू म्हणो वा इतर काही, त्याने काही फरक पडता कामा नये; उलट मोठ्या पक्षात लहान कामे करत राहण्यापेक्षा लहान पक्षात मोठी कामे करावी किंवा स्वतःचे कार्यक्षेत्र मोठ्या पक्षात मर्यादित ठेवावे, म्हणजे आपल्या कामाचा ठसा उमटवता येतो.

हल्ली मोठे पक्ष छोट्या पक्षांतील नेत्यांना आपल्या पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना डावलून ‘लॅटरल एंट्री’ देतात. कारण त्यांना त्या राजकारण्याच्या ‘इनऑरगॅनिक ग्रोथ’बद्दल कुतूहल असते. मोठ्या पक्षात तळागाळातून वर आलेल्या एखाद्या नेत्याचे चित्र ‘लार्जर दॅन लाईफ’ रंगवले जाते, पण तसे अपवादात्मक परिस्थितीत होते, इतर खेटे घालणाऱ्या बहुतांचे काय? कित्येक वर्षे पक्षात काम करूनदेखील सामान्य कार्यकर्त्याला, मोठे झालेले देशाचे नेते तर सोडाच, प्रांताचे नेतेदेखील ओळख दाखवत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.

अमेरिका जगातली सगळ्यात जुनी लोकशाही आहे. तिथे ‘स्पॉईल्स सिस्टिम’प्रमाणे राजकीय कार्यकर्त्यांना अधिकाराची पदे मिळतात. आपल्याकडे ही पद्धत नाही असे नाही, पण त्यात ताळतंत्र असत नाही, वशिलेबाजी चालते. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता केवळ प्रामणिकपणे काम करत राहिला, तर त्याला ‘परतावा’ मिळतोच असे नाही, बहुधा नाहीच. ‘आयत्या पीठा’वर रेघोट्या ओढणारे ऐनवेळी पुढे येतात.

याचे कोणालाच समर्थन करता येत नाही. त्यामुळे राजकीय आकांक्षा बाळगणाऱ्यांनी आपल्या संधी स्वकर्तृत्वावर शोधायच्या असतात; त्यांच्या मागे त्यांना पाठिंबा देणारे कट्टर कार्यकर्ते आणि जनता उभी असली म्हणजे झाले! तेवढेच त्यांचे भांडवल असते. ज्यांना संधी प्राप्त होतात, ते लगोलग मोठ्या ‘सिस्टीम’चा भाग बनून जातात आणि मोठ्या राजकारण्यांचा रंग त्यांच्यावर चढतो. तो ते अभिमानाने मिरवतातही, कारण त्याच्या तळाशी त्यांचा स्वाभिमान नव्हे, तर ‘मनुज स्वार्थ’ असतो.  

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

..................................................................................................................................................................

ज्यांचे मोठ्या पक्षात भले झाले आहे, ते ही ‘सिस्टीम’ बदलू शकणार नाहीत, पण ज्यांना स्वतःचे ‘भले’ करायचे आहे, त्या तरुणांनी नवीन मार्ग निर्भयपणे निवडणे क्रमप्राप्त आहे. राजकारणात प्रत्येकाला स्वतःची ‘इमेज इक्विटी’ निर्माण करावी लागते. ती आपल्या ठायी असलेल्या चांगल्या मूल्यांमुळे जशी तयार होते, तशी उपद्रव मूल्यांमुळेदेखील होते. पहिल्या पठडीतले व्हायचे असेल, तर ‘चाणक्यनीती’चा आश्रय घ्यावा लागतो, आणि दुसऱ्या पठडीत तयार व्हायचे असेल, तर ‘निकोलो मॅकियाव्हेली’चा (अर्थात प्रत्यक्ष तो न वाचता, अभ्यासता!). आजकालचे जग चमत्काराला नमस्कार करते. लौकिकदृष्ट्या हा चमत्कार म्हणजे लोकांसाठी आपण केलेले काम आपल्यावतीने बोलले पाहिजे… मग ते सीमित कार्यक्षेत्रातले का असेना.

जर आपल्याला प्रामाणिकपणे काम करायचे नसेल, लोकाभिमुख व्हायचे नसेल, संघर्ष करायचा नसेल, पराभवाचा सामना करायचा नसेल, लोकांनी वाहिलेली लाखोली गंभीरपणे स्वीकारायची नसेल, चुकांपासून शिकायचे नसेल, स्वतःत बदल घडवायचा नसेल, लोकसंग्रह करायचा नसेल, लोकांचे काम करून देण्यासाठी रात्री-अपरात्री जोडे विरळ होईपर्यंत भटकायचे नसेल, वेळप्रसंगी जेलमध्ये जायचे नसेल, स्वतःवर खटले भरून घ्यायचे नसेल, तर आजच्या घडीला आपण यशस्वी राजकारणी होऊ शकत नाही.

अशा परिस्थितीत आपल्याला कार्यकर्ता होण्यातच समाधान मानावे लागेल. कारण ती एकप्रकारे ‘बिनपगारी’ नोकरी करणाऱ्यांची मानसिकता आहे, पण तिथे काही हाती लागत नाही. मात्र जर कुणी त्यातच समाधान मानत असेल, तर आपण ‘समाजसेवक’ आहात, राजकारणी नाही, हे लक्षात असू द्यावे. आणि तसे असेल तर आपल्याला कोणत्याही पक्षाची गरज नाही, आपण स्वतःच लोकांना हवेहवेसे वाटत राहाल.

समाजकारण म्हणजे राजकारण नव्हे. सत्तेच्या बळावर आपल्याला विकास घडवून आणता येतो, देशसेवा करता येते, त्यासाठी राजकारण आवश्यक असते. त्यामुळे या क्षेत्राला डावलून नव्हे, तर अंगीकारून तरुणांनी ‘उद्याचा भारत’ घडवायचा आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

आजकाल तरुण उद्योजक सगळीकडे दिसतात, त्यांची स्टार्टअप्स दिसतात, पण राजकारणात तरुण नेते संख्येने अल्प आहेत, आणि राजकीय स्टार्टअप्स तर नगण्य आहेत. तरुण उद्योजकांना डोक्यावर घेणारी जनता ‘तरुण राजकारण्यां’ना डोक्यावर घेणार नाही, अशी आपली समजूत ‘गोबेल्सचे प्रचारकी तंत्रज्ञान’ वापरून पद्धतशीरपणे करून देण्यात आली आहे, म्हणून भारतीय राजकारणात आज नवे राजकीय प्रयोग होताना दिसत नाहीत.

आजच्या घडीला ‘आप’सारखा पक्ष अपवाद समजावा. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, शून्यातून सुरुवात करून या पक्षाने किती कमी काळात देशातल्या दोन राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली आहे! असे प्रयोग भारतीय लोकशाहीत अजून व्हायला हवेत… आणि ते तरुणच करू शकतात.

..................................................................................................................................................................

लेखक जीवन तळेगावकर व्यवस्थापन तज्ज्ञ म्हणून काम करतात.

jeevan.talegaonkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा