बुद्धपौर्णिमा विशेष : विवेक आणि धर्म यांची सांगड घालणारा बुद्धाचा धम्म
पडघम - सांस्कृतिक
अर्पिता मुंबरकर
  • भगवान गौतम बुद्ध यांचे एक शिल्प
  • Tue , 17 May 2022
  • पडघम सांस्कृतिक गौतम बुद्ध Gautam Buddha बौद्ध धम्म Buddha Dhamma भगवान गौतम बुद्ध Bhagwan Gautam Budha डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar

काल, १६ मे २०२२ रोजी बुद्धपौर्णिमा साजरी झाली. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...

..................................................................................................................................................................

बरेच दिवस मनात होते आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ वाचावा, पण मन एकाग्र करून, शांतचित्ताने वाचायला वेळ मिळत नव्हता. लॉकडाऊनच्या काळात खूप निवांत वेळ मिळाला. त्यामुळे हा ग्रंथ व्यवस्थित वाचू शकले. त्यातून मला समजलेले गौतम बुद्ध, त्यांचे विचार मी मांडण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

विवेक आणि धर्म यांची सांगड कशी घालावी, याची साक्ष हा ग्रंथ देतो. बाबासाहेबांच्या चिंतनाच्या पराकाष्ठेचा पुरावा हा ग्रंथ ठरतो. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या बाबतीत पूर्ण बुद्धिवादी दृष्टीकोन बाबासाहेबांनी या ग्रंथात स्पष्ट केलेला आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

मी काही काळ विनोबांच्या आश्रमात राहत होते. तिथे सकाळ-संध्याकाळ सर्वधर्म प्रार्थना होत असे. त्यात मुस्लीम, ख्रिस्ती, इसाई, जैन, पारशी, शीख, यहुदी, बौद्ध अशा सर्व धर्मांच्या शिकवणुकीचा विचार असायचा. मला ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ वाचताना बौद्ध प्रार्थना आठवली-

‘जीते अक्रोध हे क्रोध, साधुत्व से असाधू को

कंजुषी दान हे जीतो, सत्य से झुटवाद को

वैर से न कदापी भी, मिटते वैर है कही

मैत्री से ही मिटे वैर, यही धर्म सनातन’

अशा प्रार्थनेतून बुद्धाची शिकवण आपल्या मनावर प्रभाव पाडते. भारताच्या इतिहासात बुद्धांच्या विचारांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यांनी सांगितलेल्या सद्विचारांची सद्यस्थितीतही आवश्यकता आहे.

गौतम बुद्ध मुळातच दयाळू, शांत करुणामयी स्वभावाचे होते. कालांतराने विवाह झाला, मुलगा झाला, तरीही त्यांचे संसारात मन रमेना. सुखासाठी धडपडत असलेल्या संसारी अखेर दुःखाचे ताट वाढून ठेवलेले असते, या विचाराने बेचैन होऊन, त्यातून सुटण्याचा मार्ग शोधण्यासाठी ते घराबाहेर पडले. त्यांच्या त्यागाने व तपश्चर्येने भारत देशच नव्हे, तर संपूर्ण विश्व प्रकाशमान झाले.

बुद्धांचे तत्त्वज्ञान

बुद्धांनी आपल्या शिकवणुकीत उपदेशात आत्यंतिक आत्मक्लेषावर भर दिला नाही की, आत्यंतिक भोगवादाची तरफदारीही केलेली नाही. जीवनात दुःख आहे, पण त्यावर सदाचाराने मात करता येते. बुद्धांच्या मते मन घडवते, तसा मनुष्य घडतो; मनाला सत्याचा शोध करायला लावला पाहिजे. मानवाच्या सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे. पण बुद्धीच्या जोरावर आपण मनाला एकाग्र आणि सरळ करू शकतो, मनच सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. म्हणून माणसाने आपली प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीच्या पातळीवरच घासून पाहावी. तणावमुक्त मनाने बुद्धीचा वापर करून ‘जगाल तरच तगाल’ हा बुद्धांचा उपदेश, हे तत्त्वज्ञान सद्यस्थितीतही समाजाला अत्यंत उपयुक्त आहे.

बुद्ध नुसते उपदेश करून थांबले नाहीत, तर त्यांना मानव जसा जगावा वाटला, तसे ते स्वतः जगले, त्यांचा विचार उपदेश व त्यांचा प्रत्यक्ष आचार यात विसंगती नव्हती. सद्गुणांच्या आचरणावरच त्यांचा कल असे. शिवाय त्यांनी कधीही स्वतःला देव, प्रेषित किंवा अवतार घोषित केले नव्हते. ‘मला सापडले ते सत्य मी सांगतो आहे, तपासून पहा, बुद्धीला पटले तर स्वीकारा’ असे स्पष्टपणे आपले विचार मांडतानाही बुद्ध समोरच्या व्यक्तीला समजेल अशा प्रश्न-उत्तरात्मक, संवादात्मक चर्चेतून आपला विचार पोहोचवत असत.

भ्रम, पलायन, दांभिकपणा, चमत्कार, यज्ञयाग या गोष्टींना त्यांनी कधीही थारा दिला नाही. त्यांची करुणा अपार होती. सर्वत्र पसरलेले दुःख बुद्धांनी आतून अनुभवलेलं होतं. धम्म समतेवर आणि मानवतेवर आधारित आहे. धम्मात ईश्वराला-परमेश्वराला मुळीच स्थान नाही, माणसाला केंद्रस्थानी ठेवून, माणसालाच महत्त्वाचे स्थान देऊन, या धम्मात मोक्ष नाही, तर मार्ग आहे आणि विज्ञाननिष्ठ व शांतीचा मार्ग आहे. अशा धर्माची निर्मिती बुद्धांनी मानव कल्याणासाठी केलेली आहे.

अहिंसेचा संदेश

बुद्धांचा अहिंसेचा संदेश तर जगाच्या दृष्टीने क्रांतिकारी संदेश आहे. त्यांची अहिंसा अतिरेकी नव्हती, सर्व प्राणिमात्रांबद्दल प्रेम-करुणा करणे म्हणजे अहिंसा होय! त्यांच्या आहिंसेच्या शिकवणुकीत करुणा आणि मैत्री यांचा संबंध दिसतो. बुद्ध म्हणतात, ‘सर्वांवर प्रेम करा म्हणजे कोणाचीही हत्या करण्याची किंवा त्याला दुःखी करण्याची इच्छा होणार नाही.’ हत्या करू नका सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा व मैत्रीपूर्ण वागा, असे बुद्ध सांगतात. त्यांनी अहिंसेला कधी नियमांचे रूप दिले नाही, ते एक तत्त्व आहे, आपली जीवन पद्धत म्हणून विकसित झाले पाहिजे.

शांतीचा उद्गाता

अहिंसेच्या क्रांतिकारी संदेशाबरोबरच बुद्धांच्या विश्वशांतीने विश्वाला युद्धाविन्मुख केले. बुद्ध संतापाने पेटले आहेत, त्यांच्या तोंडून कठोर व निष्ठुर शब्द कधी बाहेर पडला आहे, असे कधीच झाले नाही. संपूर्ण मानवजातीविषयी अपार सहानुभूती-करुणा त्यांच्यात ओतप्रोत भरलेली होती. जगात वाईटपणा आहे म्हणण्याऐवजी बुद्ध म्हणत ‘हे जगाचे अज्ञान आहे’. त्यांनी विरोधाला शांतपणे व आत्मसंयमाने तोंड देत. त्यांच्याजवळ चिडखोरपणा, संताप फिरकतही नसे. त्यांची वागणूक म्हणजे मूर्तीमंत सुसंस्कृतपणा. त्यांचे हेच वागणे, त्यांचा शांतीचा संदेश महात्मा गांधींपासून ते प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन, मॅक्स मुलर, कार्ल जंग इत्यादी जगातील महान व्यक्तींना प्रभावित करतो. या महनीय व्यक्तींना बुद्धांचा शांतीचा विचार नेहमीच प्रेरणादायी ठरलेला आहे.

मानवी जीवनात अष्टांगिक मार्गाचे महत्त्व

बुद्धांनी आपल्या उपदेशात अष्टांगिक मार्गाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, संम्यक अजिविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, या आठ मार्गांचा मानवांनी आपल्या जीवनात अवलंब केला, तर मानवाला दुःखावर मात करण्याची शक्ती प्रेरणा मिळते. काम, क्रोध, द्वेष, मत्सर इत्यादी दोष आपले जीवन दूषित करतात. ते दूर करून आपले जीवन निर्मळ करण्याचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग होय!

हा मार्ग मनुष्याला ज्ञाननिष्ठ बनवतो. त्यामुळे चित्ताला शांती मिळते. मानवाने आपल्या दैनंदिन जीवनात या मार्गाने वाटचाल केली, तर जीवन आनंदी होत जाईल. आत्मपरीक्षणाची ताकद वाढवणाऱ्या या मार्गाचा जीवनात नैतिकता-सदाचार आणण्यासाठी अवलंब केला पाहिजे.

बुद्धांचा स्त्रीमुक्तीचा विचार

प्राचीन भारतात स्त्रियांची दैयनीय अवस्था होती. बुद्धांच्या उदयानंतर स्त्रियांना विशेष अधिकार प्राप्त झाले. आज जी समाजात स्त्री-पुरुष समतेची भूमिका अभिप्रेत आहे, ती बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून आलेली आहे. बुद्धांचा विचार हा स्त्री समर्थनाचा व त्यांच्या कल्याणाचा होता. स्त्री आहे म्हणून स्वतःला कमकुवत न समजावे, दिलेल्या स्वतंत्र अवकाशाचा योग्य अन्वयार्थ लावून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, असा बुद्धाचा प्रयत्न होता.

बुद्धांनी स्त्रियांच्या उन्नतीकरता वेगळे प्रयत्न केले नाहीत, त्यांनी जे मिळवले ते सर्व स्त्री-पुरुषास दिले. तिथे भेदभाव केला नाही. अशा बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होऊन, अखंड साधना करून, स्वतःला उच्च स्तरावर घेऊन जाणारी स्त्री प्रजापती गौतमीच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली, ती जगाच्या इतिहासातील पहिली स्त्री मुक्ती चळवळ होय.

या चळवळीमुळे हजारो वर्षांचे रूढी-परंपरांचे जोखड झुगारून स्त्री मुक्त झाली. तिने स्वत:चा विकास व स्वमनाचा विकास केलाच, पण आपल्या दुःखावर मात करून समाजपरिवर्तनासही हातभार लावला. पट्टचरा, श्रुंगालमाता, उत्पलवर्णा, धम्मधिन्ना, नंदा, खेमा, भद्रा अशा अनेक स्त्रियांनी मुक्ती मिळवली. या सर्व स्त्रिया सर्वसामान्य घरांतून आलेल्या... त्या काही वादविवाद पटू नव्हत्या किंवा पंडिताही नव्हत्या, तरीही बुद्धांचे तत्त्वज्ञान आत्मसात करून त्यांनी स्वतःला तत्त्वचिंतक बनवले. दुःखाला पाहून हतबल न होता किंवा कुणाचे दास्यत्वही न पत्करता दुःखावर मात करून निर्वाण पद प्राप्त केले. स्त्रियांना असे तत्त्वज्ञान आत्मसात करायला अनुमती देणारा जगाच्या इतिहासातील पहिला पुरुष म्हणजे बुद्ध!

मानवाला स्वतःची ओळख देणारा धम्म

स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय राज्यघटनेतील तत्त्वे बुद्धांच्या तत्त्वज्ञानातूनच आलेली आहेत, हे बाबासाहेबांनी केलेल्या बौद्ध धर्माच्या अभ्यासावरून सहज लक्षात येते. त्यामुळेच आज सर्वसामान्य माणसाला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येणे शक्य झाले आहे. समतेचे मूलभूत मानवी हक्क स्वतःला उपभोगता आले पाहिजे, ही जाण बाबासाहेबांच्या ‘भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथातून निर्माण होते. पण हेही तितकेच खरे की, बाबासाहेबांचा बुद्ध डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला नाही, तर डोळे उघडे ठेवून जग बदलणारा आहे. बाबासाहेबांना केवळ ध्यानधारणा, विपश्यना, दानपरामिता यात रमणारा व बुद्धगयेला भेटी देणारे कर्मकांड, असा धम्म नको होता; त्यांना हवा होता समाजाची पुनर्रचना करणारा धम्म! २२ प्रतिज्ञांचे पालन करणारा धम्म!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

बाबासाहेब धर्मांतरानंतर आपले विचार व्यक्त करताना म्हणतात- ‘धर्मांतरित बौद्धांची वेगळी ओळख बाह्य रूपाने दिसणार नसली, तरी नीतिमान असेल, तो बौद्धधर्मीय समजावा!’

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने अगदी मनापासून या मार्गावर चालण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांचे धम्मविचार कृतीत येऊन भविष्यकाळात सक्षम समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही…

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा -

एकविसाव्या शतकातील बौद्धधर्म : तीन कसोट्या

डॉ. आंबेडकरांचा ‘बौद्धवाद’ सर्व प्रकारच्या वर्चस्ववादी शक्तींना विरोध दर्शवणारा असून सामाजिक व्यवस्थेसाठी न्याय आणि विवेक ही मूल्ये अति महत्त्वाची मानतो

डॉ. आंबेडकरांसारख्या लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय या मूल्यांसाठी आजीवन खडतर कष्ट करणाऱ्या नेत्याला धर्मपरिवर्तनासाठी ‘बौद्ध तत्त्वज्ञाना’ची ओढ लागावी, यात नवल नाही!

ज्यांना बुद्ध समजून घ्यायचा असेल, त्यांनी ‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ हा ग्रंथ वाचणं, समजून-जाणून घेणं आवश्यक आहे

.................................................................................................................................................................

लेखिका अर्पिता मुंबरकर महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळाच्या जिल्हा समन्वयक आहेत.

arpitamumbarkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा